अनेक मंत्री बिनडोक असतात हे खरे असले तरी सगळे मंत्री शिवराळ नसतात. मनातून एखाद्याला झणझणीत शिव्या घ्याव्या, असे जरी त्यांना वाटत असले तरी सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून त्यांना तोंडावर आलेली शिव्यांची उबळ आतल्या आत जिरवून टाकावी लागते, असा माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याचा निष्कर्ष आहे. अलीकडेच `शिवाजी कोण होता? या कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ३९ वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकावरून महाराष्ट्रात जो अभूतपूर्व गदारोळ झाला तो पाहून पोक्याला आश्चर्य वाटले नाही. या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिंदे सरकारातील त्या मंत्र्याने मध्यरात्री तीन वाजता अर्वाच्य शिवीगाळ केली तिचा विस्तृत तपशील प्रसारित झाल्यावर पोक्याला त्या मंत्र्यांच्या शिव्यांविषयीच्या विद्वत्तेची खरोखरच कमाल वाटली. विषय कोणताही असो, ज्या विषयात ज्या मंत्र्यांची मास्टरी आहे त्याचा राज्याच्या सर्वोच्च पातळीवर सन्मान व्हायला हवा, ही पोक्याची भूमिका आहे. कारण शिवीवर कोणाचीही मालकी नसून एखाद्याला आलेल्या भयंकर रागाचा तो उत्स्फूर्त अविष्कार असतो आणि त्यात सर्वप्रथम आयाबहिणींचाच उद्धार केला जातो, हे सर्वांना ठाऊक आहे. ही परंपरेने चालत आलेली पद्धत आहे आणि त्याला मंत्र्यांसारखे भले भले लोक बळी पडत असतील तर त्यावर समाजात सकारात्मक विचारमंथन व्हायला हवे, असे पोक्याला वाटते.
प्राचीन काळातील महाराष्ट्रातील पहिल्या शिलालेखातही मातेवरून शिवी हासडणार्या माणसाची रोगट मनोवृत्ती दिसते आणि ही परंपरा तशाच प्रवृत्तीच्या माणसांनी इतकी पुढे नेली की आज मराठी भाषेत शेकडो नव्हे, तर हजारी गाठणार्या अश्लील, ग्राम्य, इंद्रियवाचक शिव्यांची उतरंड पाहायला मिळते. `ग्रंथाली’ने तर हे इतके मनावर घेतले की `मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार’ हे १७६ पानी पुस्तकच त्यांनी १४ नोव्हेंबर २०११ला प्रकाशित केले. सहा महिन्यांच्या आत त्याची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. या पुस्तकाचे लेखक, संपादक, अभ्यासक अ. द. मराठे यांनी महाराष्ट्र पालथा घालून ग्रामीण आणि शहरी भागात कोणत्या शिव्या घालून एखाद्याचा किंवा एखादीचा उद्धार केला जातो, हे साग्रसंगीत लिहिले. मराठी लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक दुर्गा भागवत यांनी त्यांच्या कामाला प्रेरणा दिली आणि महाराष्ट्रातील शिव्यांचा खजिना या पुस्तकरूपाने मराठी जनतेला `याची देही याची डोळा’ पाहायला मिळाला. पोक्याच्या मतानुसार देशातीलच नव्हे तर जगातील कोणतीही भाषा शिव्यांच्या बाबतीत महाराष्ट्राइतकी समृद्ध नाही. त्या शिव्या वाचताना, ऐकताना आपल्याला लाज वाटते, पण अश्लील म्हणींच्या विविध रुपात या शिव्या महाराष्ट्रभर आजही अस्तित्वात आहेत. शिंदे यांच्या त्या मंत्र्यांच्या हाती हे पुस्तक पडले असते तर त्याच्या ज्ञानात किती भर पडली असती, याची कल्पनाच केलेली बरी. पण काही वाचायचे नाही आणि शीर्षकावरून अक्कल पाजळायची ज्यांना सवय आहे, त्यांचे ज्ञान अर्धवटच राहणार, असे पोक्या म्हणतो.
त्यांचे म्हणणे खरेच आहे. मीसुद्धा पोक्याच्या सांगण्यावरून त्याच्या संग्रही असलेले ते असत्य म्हणींचे म्हणजेच शिव्यांचे पुस्तक वाचले आणि आपण आजपर्यंत ज्ञानाच्या या झाकलेल्या ठेव्याला मुकलो होतो, त्याचा पश्चाताप झाला. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी शिव्यांच्या म्हणींचे विश्व आणि त्यांचे मानसशास्त्रीय आणि सामाजिक पैलू उलगडून दाखवले आहेत. शिव्यांवर आधारित वाक्प्रचार, असभ्य म्हणी, संकेत, असभ्य शब्दांचे सूचक अर्थ, त्या शब्दांची प्रतीकात्मकता असे बरेच काही या पुस्तकात आहे. त्यातून लेखकाने काढलेले निष्कर्षही योग्य वाटतात. दुर्गा भागवत यांच्या लोकसंस्कृतीविषयक पुस्तकात म्हणींवरील एक स्वतंत्र प्रकरणच आहे. डॉ.रा.चिं. ढेरे यांच्या `गधेगाळीच्या निमित्ताने’ या लेखात तर गाळी म्हणजे शिव्यांच्या अनेक बाबी उजेडात आल्या आहेत. म्हणूनच हे पुस्तक त्या शिवीगाळ करणार्या मंत्र्यांच्या हातात पडेल आणि तो ते वाचेल असे काहीतरी शिंदे किंवा त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी आणि आमदारांनी केले पाहिजे असे पोक्याचे आवाहन आहे. त्यामुळे आपले शिव्यांचे ज्ञान फार तोकडे आहे आणि ते समृद्ध करण्यासाठी आपण या पुस्तकाची जाहीर पारायणे करावी, असे त्याला वाटल्याशिवाय राहणार नाही. या पुस्तकातील अश्लील गावरान म्हणी, वाक्प्रचार त्याच्या ज्ञानात इतकी भर घालतील की उद्या महाराष्ट्रातील आदरणीय शिवीसम्राट अशी त्यांची ओळख हंड्रेड अँड वन पर्सेंट होईल. पोक्या तर असे म्हणतो की सरकारमध्ये या मंत्र्याला शिक्षणमंत्री केला तर तो हे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तक म्हणून लावेल आणि त्याची बोर्डाची प्रश्नपत्रिकाही तो स्वतःच काढेल. `एक तरी शिवी अनुभवावी’ या शीर्षकाचे पुस्तक लिहिण्याचा मोहही त्याला आवरणार नाही. शिवी हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा आहे, या विषयावर त्याची सार्या महाराष्ट्रभर अभ्यासपूर्ण व्याख्याने होतील, आणि तेव्हाच त्याला आत्तापर्यंत हसणार्या आणि त्याची थट्टा करणार्या प्रतिगाम्यांना त्याच्या विद्वत्तेचा साक्षात्कार होईल. मुख्यमंत्र्यांनी उगाच सभ्यतेचा बुरखा पांघरून उपदेशाचे डोस त्याला पाजू नयेत तर त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त आणि गुप्त गुणांना वाव द्यावा, तरच तो महाराष्ट्राचे नाव देशात उज्ज्वल करेल, असा विश्वास पोक्याला आहे. महाराष्ट्रातील शिव्यांचा सखोल अभ्यास करणार्या प्रौढांसाठी भव्य शिवी विद्यापीठाची स्थापना करण्याचा विचार इतका अभ्यास केल्यानंतर त्या मंत्र्यांच्या डोक्यात नक्कीच येईल, याची खात्री पोक्याला आहे. आजच्या काळाला शोभतील अशा नवनवीन शिव्या शोधण्याची प्रेरणा जेन झी म्हणजे नव्या पिढीला मिळेल. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोर्चे प्रतिमोर्चे न काढता त्याच्या मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष करून सरकारने त्यांना शिवीभूषण ही सन्माननीय पदवी देऊन त्याचा यथोचित सन्मान करावा. आज महाराष्ट्राला अशाच सद्गुणी मंत्र्यांची गरज आहे!

