• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

वेठबिगार

ऋषिराज शेलार अर्ध्या मुर्ध्या गोष्टी

Marmik Team by Marmik Team
August 11, 2026
in गावगप्पा, विशेष लेख
0
वेठबिगार

अध्वर्यूचं आणि मॅनेजरचं काल कामावर जाम भांडण झालं, कारण तसं किरकोळ. पण भांडण फारच कडाक्याचं! इतकं की अर्ध्या तोंडावर बोलून आलेला, काम सोडतो म्हणून. पण बोलणं वेगळं नि वास्तव वेगळं. सगळा राग ओसरल्यावर अर्ध्या अर्धा फूट जमिनीत गेलेला. बोलून तर झालं. पण खरंच काम सोडावं? त्या तिरमिरीत त्यानं निल्याला फोन केला होता. अर्जंट काम शोध म्हणून. तसं त्यानंही डायरेक सांगितलं होतं, इतक्या झटपट कुठल्या कंपनीत भेटंल याची शक्यता नाही. पण एकदोन खाजगी व्यक्तींकडे कामं आहेत, बोलणं करून घेऊ, वगैरे! मग काय अर्ध्या निघाला निल्याच्या घरी!

निलेश तसा कॉलेजात असतानापासून धडपड्या. कधी ह्या निवडणुकीत भाग घे, कधी राडे कर, प्रोफेसरांना काळे फास, असे अनेक उद्योग! किंवा मोर्चे काढ, अमुक डेच्या दिवशी काही सामाजिक संदेश दे, अश्या अनेक गोष्टींत त्याचा पुढाकार नसला तरी सहभाग असायचा. त्यामुळं नेतेगिरी करणारे पोरं कॉलेजात शिक्षण घेऊन पुढे गेली, मात्र त्याचा राग निलेशसारख्या कार्यकर्त्या मुलांवर निघाला नि त्याला विना डिग्री शिक्षण सोडावं लागलं.

पण त्या वयात त्यानं एक मुलगी पटवली, कोर्ट मॅरेज केलं, सगळं कसं हिरोवानी! पण प्रत्येक आदर्शवादाचे पोपडे निघतात. तसंच झालं. जोवर वास्तवाचं भान नव्हतं, तोवर दोघं प्रेमात मग्न होते, तोपर्यंत सगळे पैसे संपले. त्यात त्यांचं इंटरकास्ट! मुलीच्या घरच्यांना ते पसंत नव्हतं, त्यामुळं घाबरून पुणं-मुंबई फेर्‍या, चक्कर आणि मुक्काम बरेच झाले. त्यात मौजमजा, पोलीस स्टेशनचे चक्कर, मित्रमैत्रिणीला पार्ट्या हे ओघानं आलंच! मग पैसे किती असले तरी पुरतात थोडे? त्यात उधार-उसनवार्‍या व पुढे त्यातून कर्जबिर्ज सगळं आलं. जेव्हा परिस्थितीचे चटके जाणवू लागले, तेव्हा दोघांनी पण काम-धंदे शोधले. पण त्यानं होतं काय? घरभाडं, घरखर्च, पेट्रोल खर्च आणि वर चकचकीत जगण्याचं मोल! सगळं द्यावंच लागतं ना? त्यात गरोदरपण! त्यानंतर त्याच्या बायकोला नोकरी सोडावी लागली आणि पुढे बाळंतपण त्यात सिझेरियन! त्याचा खर्च एकूण कमाईपेक्षा जास्त झाला. त्यामुळं गडी थेट दहाव्या माळ्यावरून पहिल्या माळ्यावर आला. मग पडेल ते काम नि मिळेल त्या खोलीत राहू लागला. आधी टू बीएचके मध्ये राहणारा गडी आता सगळं बाडबिस्तर घेऊन एक खोलीत राहू लागला.

बाळंतपणानंतर त्याची बायको एक मानलेल्या बहिणीकडे गेलीय नि आता तो एकटाच त्याच्या खोलीत असतो. पण त्याच्या पायाला भवरा असल्यानं त्याला गावकुसातली हरेक खबरबात असते. त्यामुळंच काल अर्ध्यानं त्याला फोन केलेला!
अर्ध्या त्याच्या दारापर्यंत पोहोचला. बाहेर काही कपडे वाळत टाकत उभाय.
‘काय शेठ?’ अर्ध्यानं बघताच सलाम केला.
‘मापं काढायची असतील तर आल्या पावली निघ!’ निल्या त्याच्याच तिरमिरीत.
‘एवढं काय त्याच्यात चिडण्यासारखं?
कॉलेजात आम्ही तुला शेठच म्हणायचो ना?’ अर्ध्यानं आठवण दिली.
‘क्ष्ज्ञ्ड्या ती चीड होती माझी! कायम ताठ असतो म्हणून ॅत्रर््व्या पोरांनी ठेवलेली! साल्या तुला तेच बरं आठवलं!’ निलेश राव चक्क संतापले.

‘हे असं होतं काय? मला वाटलं…’ अर्ध्या वरमला!

‘चल, ये! बोलू आपण!’ अखेर निलेशनंच विषय बदलला. दोघं त्याच्या घरात गेले. हे घरं आहे? एक पलंग, दोन हंडे, एक मांडणी, दोनचार पातेले, एक कढई-तवा बाकी सटरफटर लागणारी भांडी. फार असं काही नाही. इथं पाण्याची जास्त टंचाई असते म्हणून एक प्लास्टिकचा मोठा ड्रम भरून ठेवलेला मोरीशेजारी! बस्स! मोजून आठ पावलात खोली संपते. त्यात त्याचं जग मावलेलं.
‘लहान आहे ना खोली?’ अर्ध्यानं पलंगावर बसत सहज विषय काढला.
‘कुठं? फार मोठीय!’ निल्यानं न बघता उत्तर दिलं. त्यानं एक पाण्यानं ग्लास भरून घेतला, तो अर्ध्यापुढं धरला.
‘नको! ह्या वातावरणात तहान लागतच नाही!’ अर्ध्यानं थगट चढलेला ग्लास बघून डायरेक नकार दिला.
‘नको पिऊ भौ! आमचं पाणी जारचं कुठं असतं? आम्ही पितो डायरेक नळाचं पाणी!’ बोलता बोलता त्यानं स्वतःच ग्लास पिऊन टाकला.
‘अरे तसं नाही काही! यार तू फार मनाला लावून घेतो बघ!’ अर्ध्या त्याची समजूत घालायला लागला.
‘असू दे आता किती बी साखरेत घोळलं अन् तुपात तळलं तरी… पण खूप दिवसांनी आठवण काढलीस?’ निल्यानं पुन्हा विषयावर गाडी आणली.
‘तुला सांगितलं ना? काल मॅनेजरशी भांडण झालं माझं! मग काय? कंपनी सोडावा वाटती आता!’ अर्ध्यानं मन मोकळं केलं.
‘मग काही एग्झाम द्यायच्या…’ निल्यानं उपाय सुचवला.
‘हा आता कॉल लावतो मंत्रालयात त्यांना सांगतो, एक तासात भरती काढा. मी पेपर लिहायला रेडी आहे. माझ्या घरचं आहे का ते? काल भांडण झालं अन् आज लगेच पेपर देऊन लागलो नोकरीला?’ अर्ध्या भडकला.
‘मला आता पेपर दे! असं म्हणायचं नव्हतं! राहू दे! एक ठिकाणी आहे काम! तुला चालेल का?’ निल्यानं प्रश्न केला.
‘पगार मिळेल ना महिन्याला? मग चालेल तर…’ अर्ध्यानं घाईनं होकार दिला.
‘अरे काम तर ऐकशील काय करायचं आहे ते?’ निल्यानं अधीर अर्ध्याला विचारलं.
‘काही असू दे! पण मी त्या मॅनेजरला बोलून आलोय. काम सोडतो म्हणून.’ अर्ध्यानं केलेला निर्धार ऐकवला.
‘बघ बाबा! तो गल्लीतला शेठ आहे ना? त्याच्याकडे काम आहे.’ निल्यानं माहिती दिली.
‘त्याच्यावâडं काय काम आहे? त्याच्या दुकानावर माणसं आहेत, शेतात गडी आहेत. मग..?’ अर्ध्या विचारात पडला.
‘हरकाम्या म्हणून!’ निल्यानं हसून सांगितलं.
‘म्हणजे?’ अर्ध्या बुचकळ्यात पडला.
‘त्याला एक माणूस पाहिजे. घरापासून दुकानापर्यंत ने-आण करायला. मुलांना शाळेत सोड-आण करायला. घरातलं सामान-सुमान आणायला. आणि इतर सांगितले ते काम करायला.’ निल्यानं सांगितलं तसं अर्ध्याचा चेहरा उतरला.
‘मग पगार किती देतील?’ अर्ध्याला अजूनही प्रश्न आहेच तर…
‘पगार देतील तेरा हजार! म्हणजे मला तसं बोलले! तू म्हणत असशील तर…’ निलेशराव बोलताच आहे…
‘नको! कोण सुखाचा जीव दुःखात घालेल? बरंय कंपनी तर कंपनी!’ अर्ध्यानं निर्णय बदलला.
‘का रे? आता का?’ निलेशनं मुद्दाम डिवचलं.
‘कंपनीत निदान विमा वगैरे मिळेल. तिथं कुणा एकाच्या कृपेवर काम करण्याची गरज नाही. त्यात असली कामं? नको रे!’ अर्ध्यानं भीती घेतली.
‘तुमचं ठीक आहे रे! तुम्ही कमीत कमी पदव्या घेतल्यात. आमचं काय? आम्हाला अश्याच शेठ, साहेबाकडे काम शोधावं लागतं. ते वेठबिगारासारखं राबवून घेतात. कामाचे तास नाहीत. ओव्हरटाईमचं लफडं नाही आणि कसलाच भरवसा नाही.’ निल्याला कंठ फुटला.
‘तसं नाही रे…’ अर्ध्याला काही बोलायचंय.
‘आता बायकोला अ‍ॅडमिट केलं.
डॉक्टरनं आकडा सांगितला. आकडा ऐकून मलाच भोवळ आली. सिझेरियन म्हंटल्यावर पैसे लागताच. मग पहिले पैसे मागायला गेलो शेठकडं. म्हणजे मी याआधी काम करत होतो त्याच्याकडं. तो पैसे मोजत होता. पण डायरेक गड्डी लपवून नाही म्हंटला रे तोंडावर! असा राग आला ना! तरी दोन महिने त्याच्याकडं काढून सगळे पैसे काढून घेतले कामाचे. पण आता बळंच ये म्हणतो तो. त्याच्या दारात ॅतायला जात नाही मी!’ निल्यानं त्याची रडकथा गायिली.
‘आमचंही काय आहे? बॉसच्या दाढ्या कुरवाळत बसायचं. त्यात किती घंटे झालेत? त्याचे किती पडतील? आणि प्रत्यक्षात किती मिळतात? यावर कुणी बोलत नाही. बोलू शकत नाही. बोलणार्‍याला लगेच बाहेर फेकलं जातं. घाण्याला जुंपलेलं बैलच…’ अर्ध्या मागं राहील कसा?
‘तुमचं ठीक आहे! कंपनी म्हंटलं की बघायला, सांगायला बरं वाटतं. आमचं म्हणजे सरळ सालदार. असंघटित कामगार. अंगातील चामडी झडेपर्यंत कामं करायची. वर शिव्या खायच्या. पैसे मेहरबानी झाली की तेवढे फेकले जातील ते उचलायचे. बस्स! त्यावेळेस चार बुकं नीट वाचली असती तर किमान डिर्ग्या मिळाल्या असत्या. आणि कुठं चिकटता आलं असतं…’ निलेश व्यथा सांगू लागला.
‘तुला वाटतं, हे एवढं भारिय? इथं हातात पदव्या आहेत. पण उद्या काम असेल की नाही, याची गॅरंटी नाही. तुझ्यात आणि माझ्यात फरक फक्त इतकाच आहे, तुझ्या लेखी आमचे घाव चकचकीत मनोर्‍यात बंदिस्त आहेत. त्यामुळे ते दिसत नाहीत. तुमचे ते उघड्यावर! समजा माझंही लग्न झालं, तर माझीही अवस्था काय होणारे? एवढा भार मी पेलू शकतो का? नाही. किमान तीन जीव पोसण्याइतके पैसे मी आजही कमावू शकतो का? नाहीच! मग पर्याय काय?’ अर्ध्याच्या प्रश्नावर दोघंही मौनात गेले. काही वेळ.

Previous Post

स्वयंपाकघरातून ‘किचन’कडे!

Next Post

गोष्ट एका कवटीची आणि अमृतसरची!

Next Post
गोष्ट एका कवटीची आणि अमृतसरची!

गोष्ट एका कवटीची आणि अमृतसरची!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.