माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याच्या स्वप्नात गणपतीबाप्पा आला ही काही नवलाची गोष्ट नव्हती. तो येणारच होता. पण पोक्याच्या म्हणण्यानुसार यावर्षी जरा तो रागातच होता. पोक्याला तो म्हणाला, दरवर्षी तुम्ही माझ्यासमोर आपली गार्हाणी मांडता, यावर्षी मी तुम्हा भक्तांसमोर माझे गार्हाणे मांडणार आहे. असे बोलून बाप्पाने जे नॉनस्टॉप लेक्चर दिले ते पोक्याने मला जसेच्या तसे ऐकवले. तेच हे लेक्चर –
प्रिय भक्तांनो, माझ्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत जो काही हैदोस पाहायला मिळतो त्याविषयी गेल्या काही वर्षांपासून तुमच्याशी बोलायचे होते. पण आता मात्र हद्द झाल्यामुळे तुमच्याकडे मन मोकळे करतोय. माझ्यावर तुमचे किती प्रेम आहे, याची जाणीव मला आहे. घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्पेâ माझा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो याबद्दल मला नेहमीच समाधान वाटत आलेय. पण यावर्षीची गोष्ट जरा वेगळी आहे. प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असते ती ओलांडली की सगळ्या गोष्टींचा विचका होतो. गणेशोत्सवही त्याला अपवाद नाही. आपली भारतीय संस्कृती आहे. तिची जपणूक उत्सवांमध्ये आपण करणार नाही तर कोण करणार!
पूर्वी कशा माझ्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणूका विराट असल्या तरी त्यात शिस्त होती. माझ्या गणपती बाप्पा मोरया या नामघोषाबरोबर पारंपारिक नृत्ये, फुगड्या, भजने, लाठीकाठीचे खेळ अशा मनमोहक प्रकारांसह मिरवणुका मोठ्या डौलात पुढे निघत असत. हौशी भक्त सामूहिक नृत्याची झलकही सादर करत असत. फुलांची उधळण, मोजक्याच फटाक्यांच्या माळा अशा थाटात माझे आगमन होत असे. पण गेल्या काही वर्षांत माझ्या मिरवणुका म्हणजे संस्कृतीचे आणि उत्सवाचेच विडंबन वाटते. मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरचे कर्णे, छाती हादरवणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज, त्यात मिरवणुकीला गालबोट लागेल, अशी र्होबासोंबा बीभत्स नृत्ये यांचीच रेलचेल असते. या सगळ्याचा आता कंटाळा आलाय.
दक्षिणेकडे साजरे होणारे उत्सव पाहा. घरापुढे छानछान रांगोळ्या, भरतनाट्यमपासून भारतीय नृत्यांची घरोघरी जोपासली जाणारी परंपरा, शिस्तबद्ध मिरवणुका, कुठेही कानठळ्या बसवणारा आवाज नाही. सारे अगदी तालासुरात आणि भक्तिमय वातावरणात. त्यांच्यापासून मुंबईकर आणि पुणेकरांनी काहीतरी शिकायला हवे. पण इथे काही भलतेच चाललेय. सध्या एकतर सरकारच्या बेफिकीरीमुळे खड्डे पडलेले रस्ते, सगळीकडे आहेत. वाहने त्या खड्ड्यांतून धक्के खात पुढे जात असतात, पण माझ्या मिरवणुकीत मलाही या खड्ड्याचा त्रास जाणवतो.
बिचारे भक्त तरी काय करणार! ते जेवढी जपून माझी मूर्ती नेता येईल तेवढी शक्ती लावून मला सुखरूप नेण्याचा प्रयत्न करतात. तरीही दुर्घटना घडतात. आरोप-प्रत्यारोप केले जातात, हे पाहिले की मन खिन्न होते. मी म्हणतो, एवढ्या उंच अवाढव्य मूर्ती बनवताच कशाला? मूर्ती देखणी असते, आयोजक आणि मूर्तिकाराची कल्पकता दाखवणारी असते. तरीही सध्याची एकंदर परिस्थिती पाहता कोणी धोका पत्करू नये. मध्यम आकाराची मूर्तीही चालू शकेल. दुसरी गोष्ट त्या डीजेच्या आवाजाची मिरवणुकीत त्याच्या आवाजाच्या दणदणाटाने माझा थरथराट होतो तर जनतेचे काय होत असेल! अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या अंथरुणाला खिळलेल्या हृदयविकारासारखा गंभीर आजार असलेल्या रुग्णांना या डीजेच्या आवाजाचा किती त्रास होत असेल. निदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तरी करमणुकीसाठी डीजेचा वापर करू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. आवाज मोठा म्हणजे उत्सव मोठा ही समजूतच चुकीची आहे.
ते पुणेकर कधी नव्हे ते यावर्षी जागे झालेत ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी डीजे लावण्याविरुद्ध आंदोलन पुकारलेय ही तर त्याहून उत्तम गोष्ट आहे. ज्या पुण्यात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो इंग्रज सरकारविरुद्ध देशभक्तांची एकजूट उभी ठाकावी म्हणून. तीही इंग्रजांना पळवून लावण्यासाठी इंग्रज गेले त्याबरोबर त्यांचा हेतूही संपुष्टात आला. आता त्या उत्सवाची जागा पुण्याच्या काही प्रतिष्ठित गणेशोत्सव मंडळानी घेतली आहे. तिथे भक्तिमय चांगले उपक्रम राबविले जातात. मग ते सामूहिक मंत्रपठण असो वा वेगवेगळी आकर्षक सजावट असो. पुण्याचे हजारो भगिनी-बांधव मोठ्या उत्साहाने त्यात सहभागी होत असतात. पण हे डीजेवाले जो धुमाकूळ घालतात त्यामुळे या पवित्र वातावरणाला गालबोट लागते. मी म्हणतो, मिरवणुकीतही नाचा, आपली हौस पुरवा, पण त्याला अचकट-विचकटपणाची जोड नको.
मी स्वतः नृत्यप्रेमी आहे. नृत्यगणेश म्हणून माझा गौरव केला जातो. नृत्य ही कला आहे. ती तिच्या सर्वांगसुंदर स्वरूपातच सादर झाली तर तिचे देखणेपण आणखी बहरते. मी चौसष्ट कलांचा अधिपती असल्याचे आपणास माहित आहेच. त्यामुळे प्रत्येक कलेचे जे आत्मरूप आहे ते आपण जपले पाहिजे. बाकी, मी गणांचा नायक, बुद्धीचा दाता, सुखकर्ता दुःखहर्ता आणि आणखी कुणीकुणी आहे, हेही तुम्हाला ठाऊक आहे. म्हणूनच मी नाराज होईन, असे काही करू नका. माझा उत्सव थाटामाटात साजरा करा, पण त्याचे पावित्र्य जपा! सध्या सगळे वातावरणच प्रदूषित झाले आहे. राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिकही. महागाईने कहर केला आहे. तुम्ही भक्तमंडळी हा सारा अन्याय कसा काय मुकाट्याने सहन करता याचेच मला आश्चर्य वाटते.
ऐन गणेशोत्सवात मोदकाला लागणारी साखरही महाग करणार्यांचे डोके खरोखरच ठिकाणावर आहे काय? तेल-तुपाचे भावही अवाच्या सव्वा वाढलेत. तुम्ही लोक सहन करता म्हणून वाटेल तशी महागाई लादतात ते तुमच्यावर. स्वतः कोट्यवधी कमवतात तेही तुम्ही दिलेल्या करांमधून. यांची पोरेबाळे मौजमजा करतात देशात-परदेशात आणि तुमची मुले पेपरफुटीमुळे जाब विचारायला रस्त्यावर आली तर हातपाय तुटेपर्यंत मार खातात, पण शेवटी सरकारला शरण येण्यास भाग पाडतात. मला कौतुक वाटते या मुलांचे. हीच लढवय्या पिढी मला देशाचा आधार वाटते. माझे आशीर्वाद आहेत त्यांच्या आणि त्यांना पाठबळ देणार्या तुमच्या पाठीशी!

