१९७८ सालातल्या नोव्हेंबर महिन्यातले हे मुखपृष्ठचित्र आहे. हा जनता पक्षाच्या राजवटीचा काळ होता. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत या पक्षाचे आव्हान उभे राहिले होते. शिवसेना जिंकली पाहिजे, नाही तर मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जाईल, असे खासगीत म्हणणारे ‘शरदबाबूं’सारखे मित्र जाहीरपणे मात्र वेगळेच काही बोलत होते. जनता पक्षाच्या कडबोळ्यात काँग्रेसजन आणि समाजवाद्यांचा भरणा अधिक असला तरी पाताळयंत्री जनसंघवाले त्याआडून वेगळीच रचना करत होते. कॉस्मोपोलिटन महानगराच्या नावाखाली मराठी माणसाला खच्ची करून मुंबई परप्रांतीयांच्या आणि बेपार्यांच्या घशात घातली जाण्याची जी भीती काँग्रेसच्या राजवटीत संभवत होती, तीच किंबहुना त्याहूनही अधिक भीती मुंबईवर जनता पक्षाच्या माध्यमातून शेठजीधार्जिण्या जनसंघीयांचा वरचष्मा झाल्यावर संभवत होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी खास ठाकरी शैलीतील वङ्कामुठीच्या ठोशाच्या रूपाने मराठीद्वेष्ट्यांना झेलपाटवून टाकण्याचा सल्ला दिला होता… आज जवळपास पन्नास वर्षांनंतर हा धोका प्रत्यक्षात उतरला आहे. मुंबईची खरी भाषा गुजरातीच असं म्हणणार्या, हिंंदीची भलामण करणार्या परप्रांतीयधार्जिण्यांची मुंबईवर सत्ता प्रस्थापित झाली आहे. आज साठीत पदार्पण करत असलेली शिवसेना अधिकाधिक बळकट झाली पाहिजे ही शिवसेनेची नाही महाराष्ट्राची, मुंबईकर मराठी माणसाची गरज आहे… वङ्कामूठ सैल पडली की मुंबई हातची गेलीच म्हणून समजा!

