ब्रह्मचार्यांची संघटना कुटुंबनियोजनाचे धडे देऊ लागले तर चालेल का? मग ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काही संबंध नाही आणि ज्यांनी स्वातंत्र्यानंतर बराच काळ तिरंगा ध्वजही फडकवलेला नाही, ते तिरंगा यात्रा कसे काढतात?-अमोल जोशी, घाटकोपर
तुम्ही दोन वेगवेगळ्या संघटनांबद्दल एकच प्रश्न विचारलाय? की एकाच संघटनेला दोन प्रश्न विचारलेयत? हेच कळत नसल्यामुळे उत्तर काय देणार? माझ्यासारख्या सामान्य माणसाचा फार गोंधळ होतो हो असे प्रश्न समोर आले की!
दिमागी अंधभक्त असणे चांगले की दिमागी नक्षल असणे चांगले? -विजय पाटील, सासवड
दिमागी नक्षल असणे चांगले, कारण दिमागी नक्षल असाल तर टेलिप्रॉम्प्टर बिघडला तरी दिमाग चालवून बोलता येतं, कमीत कमी समोर लिहून ठेवलेलं वाचता तरी येतं. अंधभक्ताच्या बाबतीत सगळाच अंधार.
देशात घर घर तिरंगा असं अभियान सरकार चालवतं आणि रस्तोरस्ती अशी माणसं तिरंगा ध्वज विकत असतात, ज्यांच्याकडे हक्काचं घरच नाही… झेंडे फडकवणे, राष्ट्रगीतं गाणे, ठरलेली गाणी लावणे आणि ठरलेल्या पदार्थांचा नाश्ता करणे, अशा ठरावीक पद्धतीने कोणताही राष्ट्रीय दिन साजरा करणार्या लोकांना कधीतरी हे चित्र दिसणार आहे का? -सुनीता लोखंडे, अंमळनेर
अहो, इथे सरकारला आहेत ती घरं पाडण्यातून वेळ मिळत नाहीये… आणि तुम्ही आता आणखी झेंडे विकणार्यांना घरं द्यायला सांगताय की काय? बोट धरायला दिलं की हात धरायला बघतात… तसं तुम्ही कराल ना मग त्यापुढे… म्हणजे, घर बांधून दिलं तर उद्या त्यांच्यासाठी शाळा बांधून द्या म्हणाल… समजा घर आणि शाळा हे दोन्ही त्यांना बांधून दिलं तर मग झेंडे विकणार कोण? आयतं स्वातंत्र्य मिळालेल्यांना झेंडाही आयता लागतो… तो बनवायला वेळ आहे कुठे कुणाला? आणि वेळ असला तरी मेहनत कोण करेल? त्यासाठीच घर आणि शाळा नसलेली माणसं लागतात… आणि त्यांना घर आणि शाळा कधीही मिळणार नाही, अशी तजवीजही करावी लागते…
पंतप्रधानांचे प्रदीर्घ भाषण ऐकणे सहन करण्याची क्षमता असलेला त्यांचा टेलिप्रॉम्प्टर बनवणार्या कंपनीला नोबेल नाही तर निदान पद्म पुरस्कार तरी दिला पाहिजे, यावर काय मत आहे तुमचे! -तनिष्का पोंक्षे, कोथरूड, पुणे
मग वाचणार्याला काय देणार तुम्ही?.. टेलिप्रॉम्प्टरवर लिहिलेलं जणू आपल्याला ओघाओघात सुचतंच आहे, असं दाखवत परफेक्ट अभिनयासह वाचणार्याला पुरस्कार न देता टेलीप्रॉम्प्टर बनवणार्याला पुरस्कार दिला तर पुरस्कार देणारे आणि घेणारे ‘वाचतील’ का?
देशाचे गृहमंत्री अमित शहा संसदेच्या अधिवेशन काळात सदनात फिरकलेही नाहीत, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पेलेट गनचा मारा, विद्यार्थ्यांना मारझोड करण्याचे आदेश कुणी दिले, याचं उत्तर देण्याचीही हिंमत त्यांच्यात नव्हती. हे कसले पोलादी पुरुष आणि सरदार पटेलांनंतरचे सर्वात ताकदवान गृहमंत्री? -उदय कुलकर्णी, कोल्हापूर
काळजी करू नका कुलकर्णीजी… काही दिवसांत ते सुद्धा सगळ्यांना माफ करून टाकतील… कोणीच माफी मागितलेली नसताना! एकाच माळेतले हिरे आहेत ते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धधोरणामुळे अहिल्यानगरातले रस्ते खराब राहिले आहेत, असं तिथले एक लोकप्रतिनिधी सांगतात. तिथले आणखी एक लोकप्रतिनिधी तुमच्या मतांची गरज नाही, असं मतदारांना अर्वाच्य भाषेत सुनावतात. हे दिव्य लोक निवडून देणार्या जनतेचा सत्कार कसा आणि कुठे करायचा? -संपत नगरकर, जामनेर
जंतर-मंतर आंदोलनातला (एखाद दुसरा) व्हिडिओ (मिळाला) तर बघा.. तुमच्या मनात आहे तशी आयडिया मिळेल… (कदाचित तुमच्यासारख्या दिमागी नक्षल लोकांना त्या आयडिया मिळू नयेत, म्हणूनच बंद दिमाग लोकांनी व्हिडिओ बॅन केले असतील…)
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या[email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…
