आपली कोणी माफी मागितलेली नसताना बळेबळेच त्यांना माफ करण्याचा आव आणणार्याला काय म्हणतात?-शिवानी साळवी, घोडबंदर रोड, ठाणे
फ्रेंड म्हणा… किंवा रात्रीचा मित्र म्हणा… ज्यांनी न मागता माफी दिली त्यांना काही म्हणण्यापेक्षा, ज्यांनी माफी मागितली नाही त्यांना काहीतरी म्हणा… त्यांना म्हणावं, मागितलेलं देत नाही म्हणून ओरडता, मग न मागता माफी दिली आहे ना त्याच्याबद्दल सुद्धा ओरडता का?… धिस इज नॉट फेअर!
देशाच्या गृहमंत्र्यांना संसदेत जायला, त्यांच्या पोलिसांनी दिल्लीत केलेल्या अत्याचाराबद्दल उत्तरं द्यायला वेळ नाही, पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावायला वेळ आहे. यांनी तेच काम पूर्णवेळ करायला काय हरकत आहे? – विलास तांबे, अकोला
तुम्हाला हवे ते करायला ते काय तुमच्यासाठी गृहमंत्री झाले आहेत का? त्यांनी तुमच्यासाठी काम करायचं की त्यांच्या माणसासाठी काम करायचं? प्रश्न विचारायाला दिलेत ना, आता तुम्ही उत्तर पण मागायला लागला? ते तुमच्या प्रश्नांना उत्तर देत बसले तर मग त्यांच्या मित्रांना पुरस्कार कोण तुम्ही देणार?
एक भंपक वयोवृद्ध काकू जंतर मंतर आंदोलनातल्या मुलींना ‘सावित्रीच्या लेकी बघा कशा अर्वाच्य बोलतायत’म्हणून हिणवत होत्या; त्या सगळीकडे कॉमेंट करताना त्याहून घाण शिव्या देतात, वाईट शब्द वापरतात. या मुलांना शिकवायला त्या तथाकथित सुसंस्कृत अक्कल आणतात कुठून? – अनिता दराडे, माणगाव
एका रात्रीत आलेली अशी अक्कल येत नाही… त्यामागे १०० वर्षांची तपश्चर्या आहे… आता या शंभर वर्षांत या शिवराळ काकूंना किती मानसन्मान मिळाला, असे फालतू प्रश्न विचारू नका अनिता काकू…
नव्या ‘नीट’ परीक्षेत म्हणे असा एक प्रश्न येणार आहे- पचास करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा, दीदी ओ दीदी हे सुसंस्कृत उद्गार आहेत, हे सिद्ध करून दाखवा. १०० मार्कांचा एकच प्रश्न आहे म्हणतात. तेवढा सोडवला की लगेच प्रवेश! – विनायक लेले, रत्नागिरी
नीटचा पेपर फुटल्यानंतर हाच पेपर फुटला आहे… या प्रश्नाला उत्तर सापडत नाहीये, काही ऑप्शन्सही नाहीयेत आणि ही परीक्षाही कॅन्सल करता येत नाहीये… ज्यांना हा पेपर आलाय ते तो प्रश्न टाळायचा म्हणतायत तर तुम्ही उगाच आठवण करून देताय लेले… ज्यांना हा प्रश्न सोडवता येत नाहीये त्यांना तुमचा प्रश्न वाचून नवीन प्रश्न पडेल… ‘लेले तुम्हीसुद्धा?’
पावसाळ्यात सगळीकडच्या रस्त्यांची चाळण झालेली आहे, सगळ्या नागरी व्यवस्था ढासळल्या आहेत, हे अंधभक्तांना दिसत नाही का? त्यांना या सगळ्याचा त्रास होतच नाही का? की ते हवेतूनच चालतात? – मृणाल पंडित, पुणे
भक्तांना अंध म्हणताय आणि वर दिसत नाही का म्हणून विचारताय? आणि तुम्ही म्हणताय असे भक्त आत्ता हवेतून चालत नसतील पण हवेतून चालणार्या बसेसची वाट बघतायत… फक्त त्या बसेस १०० टक्के इथेनॉलवर चालतील का, याचं टेस्टिंग करायचंय… पण ते टेस्टिंग करायला हवेत चालणार्या बसेस कोणाकडे आहेत का, याचा शोध चालू आहे. तोवर एक काम करा… ‘लवकरच मी हवेतून जाणार्या बसेस आणणार आहे’ असे म्हणणारे मी असं बोललोच नव्हतो असं उद्या बोलू नयेत म्हणून प्रार्थना करा, आणि त्यांना दुबईच्या शेखने
किडनॅप करू नये म्हणून उपासना करा… किंवा त्यांचा राजीनामा कोणी घेऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवा… ता. क. तुम्ही म्हणताय त्या भक्तांचा देव नाही खरा देव पाण्यात ठेवा… नाहीतर उगाच तुम्ही म्हणताय ते भक्त तुम्हाला पाण्यात बघायला लागतील…
लग्नसोहळ्याला हजर राहणारे ६२ टक्के लोक फक्त जेवणाचा विचार करतात, ६९ टक्के वर्हाडी लग्न हा फॅशन सोहळा मानतात आणि लग्नातला कोणताच क्षण ७० टक्के पाहुण्यांच्या आठवणीतही राहणार नसतो, असं एका सर्वेक्षणातून जाहीर झालंय. अशा सोहळ्यासाठी ऐपतीपलीकडे जाऊन, कर्जं काढून लोक लाखो लोक का खर्च करतात? – प्रथमेश राणे, कुर्ला
आयुष्यभर इतरांच्या लग्नात हजार रुपयाचा आहेर देऊन दोन हजारांचं सहकुटुंब हादडलेल असतं… आणि ते हादडत असताना तोंडसुख घेता घेता नाकही मुरडलेलं असतं. आणि जेव्हा आपली वेळ येते त्यावेळी ते सगळं आठवत असतं… त्यामुळे ते सव्याज फेडायचं असतं. मग तुम्ही म्हणताय तेवढा खर्च होणारच की… मनाची नसली तरी जनाची असतेच आणि जनाची नसली तरी मनाची असते… त्याचीच ती किंमत असते…

