• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

तुका झालासे कळस

- श्यामसुंदर सोन्नर

Nitin Phanse by Nitin Phanse
May 26, 2022
in भाष्य
0

वारकरी संतांच्या सुधारणावादी विचारांचा वारसा ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत. पत्रकार, कवी, वक्ते म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. कीर्तन हे केवळ मंदिरातील उपचार न राहता ते प्रबोधनाचे साधन व्हावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. स्त्री सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती यासाठी ते कीर्तनातून जनजागृती करतात. अशाच विचारांचे अन्य कीर्तनकार तयार व्हावेत, यासाठी त्यांच्या कीर्तनाची मालिका राष्ट्र सेवा दल पुस्तक रुपाने प्रसिद्ध करीत आहे. त्यातील `उजळावया आलो वाटा’ या त्यांच्या पुस्तकातील `तुका झालासे कळस’ या उद्बोधक कीर्तनातील अंश…
– – –

संतांच्या कृपेने उभ्या राहिलेल्या या वारकरी इमारतीचा कळस तुकाराम महाराज आहे, अशी स्पष्टोक्ती बहिणाबाई देतात. खरे तर तुकाराम महाराज यांच्यानंतरही वारकरी संप्रदाय आहे. तरीही बहिणाबाई तुकाराम महाराज यांनाच कळस का म्हणतात? अगदी वारकर्‍यांनी मान्य केलेल्या संत पंचायतनाचा धांडोळा घेतला, तरी त्यातील शेवटचे संत निळोबाराय आहेत. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि निळोबाराय असे संतपंचायतन आहे. असे असताना बहिणाबाई कळसाचा मान तुकाराम महाराज यांना देतात. काय कारण असले पाहिजे?
वारकरी चळवळीची पायभरणी ज्या कारणासाठी पंढरपूरच्या वाळवंटात नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराजांसह इतर संतांनी केली, त्या उद्दिष्टांची पूर्तता उच्च विचारवंत, वेदशास्त्र पंडित, समाजसुधारक तुकाराम महाराज यांनी केलेल्या कार्यामुळे झाली. तुकाराम महाराजांची मी सांगितलेली ओळख पाहून मला काही श्रोत्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नार्थक भाव दिसू लागले आहेत. का प्रश्नचिन्ह दिसत आहे? कारण तुकाराम महाराज यांची जी ओळख आतापर्यंत सांगितलेली नाही ती मी इथे मांडली आहे. उच्च विचारवंत, वेदशास्त्र पंडित, व्यवहारचतुर तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या नंतर त्यांच्या अभंगांवर, त्यांच्या साहित्यावर, त्यांच्या चरित्रावर ज्यांनी ज्यांनी कीर्तने केली, प्रवचने दिली, व्याख्याने दिली, ती देत असताना आतापर्यंत तुकाराम महाराज यांची जी ओळख आपल्याला ऐकायची सवय झालेली आहे ती कशी आहे? देहूचे थोर साधू, वैराग्यमूर्ती, संतहृदयसम्राट, महाराष्ट्रभूषण, विश्ववंद्य तुकाराम महाराज अशी विशेषणे आपण ऐकली असतील. परंतु उच्च विचारवंत, वेदशास्त्र पंडित, व्यवहारचतूर अशा प्रकारचे विशेष आपण कधी ऐकले नसतील. कारण आतापर्यंत अशी ओळख सांगण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही. मग तुम्ही म्हणाल, महाराज, आतापर्यंत जर तुकाराम महाराज यांची ओळख साधू, संत, जगद्गुरु अशा प्रकारची सांगितलेली असेल, तर मग तुम्हालाच अशी नवी ओळख सांगण्याची गरज का वाटली? त्याचे एक कारण आहे. ते कारण बहुतेक वारकर्‍यांना माहीत आहे. मी फक्त त्याची तुम्हाला आठवण करून देणार आहे. २००६ साली बारावीच्या परीक्षेच्या मराठी पेपरमध्ये एक परिच्छेद आला होता. परिच्छेद वाचा आणि उत्तरे लिहा. दर वर्षी बारावीच्या पेपरमध्ये अशा प्रकारचा प्रश्न असतो. दिलेला परिच्छेद वाचून त्यावरच्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. पण २००६ च्या बारावीच्या परीक्षेत जो परिच्छेद आला होता, तो जर एखाद्या वारकर्‍याने वाचला असेल, तर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. त्या वेळीही त्यावरून मोठा वाद झाला. त्याविषयी मोठे आंदोलन झाले. आंदोलन केले म्हणून आमच्या काही वारकरी महाराजांना तुरुंगातही जावे लागले. हा सर्व वाद वर्तमानपत्रांत खूप गाजला होता. पण प्रत्येकाच्याच घरात बारावीचा विद्यार्थी नसल्यामुळे नेमका काय परिच्छेद आला होता, हे कदाचित आपल्यापर्यंत पोहोचले नसेल आणि सांगून सांगून मला ते पाठ झाले आहे.
त्या परिच्छेदातील पहिलेच वाक्य होते, `तुकाराम नावाचा एक वेडगळ माणूस होता.’ तुकाराम महाराज आणि वेडगळ… बघा, लिहिणार्‍याचे बौद्धिक दारिद्र्य किती? अर्थात हे चुकून केले असेल असे समजण्याचे कारण नाही. काही मंडळींनी जाणीवपूर्वक आमच्या संतांचा, महापुरुषांचा चुकीचा इतिहास समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ संतचरित्रातच नव्हे तर इतिहासतही आमच्या अनेक महापुरुषांना बदनाम करण्याचे कारस्थान काही चांडाळांनी केले आहे. महापराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराज यांना दारुबाज, लफडेबाज म्हणून रंगविण्यात आले. तशा प्रकारचा इतिहास, कथा, कादंबर्‍या आणि नाटके लिहिली गेली. अशा नाटकांचे जास्तीत जास्त प्रयोग करून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पती सरदारपुत्र, पराक्रमी खंडेराव होळकर यांनाही मादक द्रव्याचे व्यसन होते अशा प्रकारे बदनाम करण्यात आले. आमच्या इतिहासाला आणि संतचरित्रांना अशा प्रकारे विकृत करून समाजापुढे मांडण्याचे षडयंत्र अनेक शतकांपासून सुरू आहे. अर्थात आता काही नव्या इतिहास संशोधकांनी संशोधन करून छत्रपती संभाजी महाराजांवरील बदनामीचा डाग पुसण्यात यश मिळविले आहे. आजही सरदारपुत्र खंडेराव होळकर यांच्यावरील बदनामीचा कलंक पुसण्यासाठी म्हणावे तेवढे संशोधन झालेले नाही. ते होण्याची आवश्यकता आहे. सांगत काय होतो, तर बारावीची परीक्षा देणारे जे कुमारवयीन विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात तुकाराम महाराजांविषयी वेडगळ अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. पुढे याच परिच्छेदात म्हटले होते की, तुकारामाचा वाण्याचा व्यवसाय होता. मात्र वाण्याच्या व्यवसायात बे दुणे चार असे गणित असते ते या तुकारामाला जमले नाही. म्हणून वाण्याचा व्यवसाय बुडाला, घरामध्ये दारिद्र्य आले. एक पत्नी अन्न-अन्न करून मेली. एक मुलगा अन्न-अन्न करून मेला. त्याच्यापुढे लिहिले होते पत्नी आणि मुलाच्या मरणामुळे झालेल्या अतीव दु:खाने हा तुकाराम गावातील विठ्ठल मंदिरात जाऊ लागला.
आता मला सांगा, मंडळी… तुकाराम महाराज काय बायको मेली म्हणून मंदिरात गेले का हो? तुकाराम महाराज काय मुलगा मेला म्हणून मंदिरात गेले काय हो? अहो तुकाराम महाराज यांच्या घराण्यात विश्वंभर बाबांपासून सात पिढ्या विठ्ठलाची भक्ती होती. ती भक्ती आपल्यासारखी नव्हती. आपली भक्ती लय भारी असते. पहिल्याच वारीला जायचे. तेही स्वत: नाही. कुणीतरी आग्रह करतो म्हणून वारीला जायचे आणि पहिल्याच वारीला गेल्यानंतर दहा रुपयांचे साखरफुटाणे, पंचवीस रुपयांचा नारळ, वीस रुपयांचा अबीर-बुक्का, हार असे एकशे एक रुपयांचे साहित्य घ्यायचे. या एकशे एक रुपयांत देवाकडे ढीगभर मागण्या करायच्या. काय मागण्या, मला खुशाल ठेव, माझ्या बायकोला खुशाल ठेव, सगळ्या लेकराबाळांना खुशाल ठेव आणि जावयाला पोलिसात भरती होऊ दे. किती रुपयांत? अरे पैसे घेऊन जावयाला नोकरी लावायला, देव काय नोकरी लावणारा एजंट आहे काय? तुकाराम महाराजांच्या घरात सात पिढ्या अखंड भक्तिपरंपरा असताना एकाही माणसाने देवाकडे एकही मागणं मागितलं नाही.
उलट तुकाराम महाराज स्पष्ट शब्दांत सांगतात-
काही मागणे हे आम्हा अनुचित। वडिलांची रीत जाणतसो।
असे कष्टाने भक्ती करणारे तुकाराम महाराज, समाजाला वास्तव जगण्याचे भान देणारे तुकाराम महाराज, ढोंगावर आसूड ओढणारे तुकाराम महाराज आणि त्यांना हे काय म्हणतात? बायको मेली म्हणून मंदिरात गेले. ते तरी तसे का म्हणू लागले? त्याचे एकमेव कारण आहे, आम्ही कीर्तनकारांनी तुकाराम महाराजांचे खरे चरित्र आपल्या कीर्तनातून लोकांसमोर ठेवले नाही. आम्ही त्यांना साधू केले. संत केले. जगद्गुरु केले. किलो किलो बुक्का वाहिला. टोपलं टोपलं फुले वाहिली. संपलं आमचं काम. मी या निमित्ताने एकच सांगू इच्छितो. तुमच्याकडे तुकाराम महाराजांचा फोटो नसेल तर खुशाल आणू नका. फोटो आणलेला आहे, पण त्याची पूजा करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर खुशाल पूजा करू नका. पण तुकाराम महाराज यांची गाथा घरामध्ये घेऊन या आणि त्यातील अभंगाप्रमाणे जीवनाची वाटचाल करा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणूनच ज्यावेळी हा वाद झाला तेव्हा तुकाराम महाराजांचे वास्तववादी आणि समाजाला उपयुक्त ठरू शकेल असे चरित्र लोकांसमोर आणण्याचा निर्धार केला. पत्रकार असल्याने संशोधक वृत्ती अगोदरच होती. तुकाराम महाराज यांच्यावर आतापर्यंत छापून आलेले विविध ग्रंथ मिळविले, संशोधनात्मक प्रबंध मिळविले. गाथांचे नव्याने पारायण केले. या अभ्यासातून मग तुकाराम महाराज यांच्या चार महत्त्वाच्या गुणांवर प्रकाश टाकण्याचा निर्धार केला. उच्च विचारवंत, वेदशास्त्र पंडित, व्यवहारचतूर आणि समाजसुधारक तुकाराम महाराज! ही महाराजांची नवी ओळख कीर्तनातून मांडण्याचे ठरविले. म्हणून ज्या गावात आपले पहिल्यांदा कीर्तन असेल, त्या गावात तुकाराम महाराज यांचा अभंग कीर्तनाला घेतला असेल, तर पहिल्यांदा चार गुणांचे सप्रमाण स्पष्टीकरण द्यायचे. मग वेळ मिळाला तर अभंगावर बोलायचे, असा निर्धार केला. पण हे चार गुण सप्रमाण, दृष्टान्तांसह मांडायला दोन तास लागतात.

Previous Post

टोपी हळूहळू नामशेष होतेय का?

Next Post

मी हे सांगितलंच पाहिजे…

Next Post

मी हे सांगितलंच पाहिजे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.