• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मुंबई नानांची, तुमची आमची, मराठी माणसांची

- मधुवंती सप्रे

Nitin Phanse by Nitin Phanse
May 26, 2022
in भाष्य
0
मुंबई नानांची, तुमची आमची, मराठी माणसांची

ब्रिटीशांना पोर्तुगीजांनी जरी मुंबई आंदण म्हणून दिली हा इतिहास असला, तरी तिला भरभराटीला आणलं एका मराठी माणसाने; ते होते जगन्नाथ शंकरशेठ! इंग्रजांचं राज्य आणि वर्चस्व असतानाही ते आपलं कार्य करीत राहिले आणि ब्रिटीशांना मुंबईचं महत्त्व काय आहे हे दाखवत राहिले, ते आपल्या कृतीतून.
– – –

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील अतिविराट सभेत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान असल्याचा इशारा दिला आणि असे कोणतेही प्रयत्न महाराष्ट्र खपवून घेणार नाही, हे ठणकावून सांगितले, तेव्हा सर्व मुंबईकरांना प्रिय असलेली मुंबई मनात निनादू लागली. संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह झालाच पाहिजे म्हणून आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर अशा अनेक मान्यवरांनी मोर्चे, संप, धरणं, तुरुंगवास पत्करून मुंबईवरचा मराठी माणसाचा हक्क शाबीत केला. त्याला गेल्या वर्षी साठ वर्षं झाली. तेव्हाही दिल्लीकरांनी मुंबई आमच्यापासून हिरावून घ्यायचं ठरवलं होतं आणि आज पुन्हा तेच बड्या नेत्यांच्या कृतीमधून दिसून येत आहे. याचं खर्‍या मुंबईकराला दुःख होत आहे.
मुंबई महाराष्ट्राची. भाषावर प्रांतरचना झाली तेव्हापासून मराठी भाषा ही महाराष्ट्राप्रमाणे मुंबईचीही आहे. पण आमचेच मराठी लोक मुंबईत अठरापगड लोक राहतात म्हणून, त्यांना समजावं म्हणून, मराठी भाषेची अवहेलना करीत इंग्रजी, हिंदीला जवळ करतात, तेव्हा कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण सतत आठवते.
ब्रिटिशांना पोर्तुगीजांनी मुंबई आंदण म्हणून दिली हा इतिहास असला, तरी तिला भरभराटीला आणलं एका मराठी माणसाने; ते होते जगन्नाथ शंकरशेठ! इंग्रजांचं राज्य आणि वर्चस्व असतानाही ते आपलं कार्य करीत राहिले आणि ब्रिटिशांना मुंबईचं महत्त्व काय आहे हे दाखवत राहिले, ते आपल्या कृतीतून. या मुंबईसाठी, इथल्या रहिवाशांसाठी काय काय केलं या थोर माणसाने! वाफेच्या बोटीने टपालसेवा, पिण्याच्या पाण्यासाठी स्वतःचा तलाव दिला. मुंबईतलं पहिलं नाट्यगृह बांधण्यासाठी स्वतःची जागा दिली.
सर्वांचा असा समज आहे की मुंबईत रेल्वे सेवा ब्रिटिशांनी आणली. साफ चूक आहे हे. जगन्नाथ शंकरशेठ यांनी रेल्वे आणली (१८५३ मधे) मुंबईत. फार द्रष्टे होते ते. वस्तुसंग्रहालय त्यांनीच उभारलं. मुंबईसाठी शैक्षणिकदृष्ट्या संपन्न व्हावी म्हणून विद्यापीठ स्थापनेतही सहभाग घेतला. तेव्हा नगरपालिका नसल्याने शहर सुधारणा समिती, मुंबईच्या गटारांचा प्रश्न, गॅसचे दिवे, इतकंच काय रेल्वेच्या कचेरीसाठी स्वतःच्या वाड्यातली जागा उपलब्ध करून दिली. आज ज्या नामवंत संस्था मुंबईत आहेत, त्यांची उभारणी नानांनी केली, वित्तीय संस्था, बँका इत्यादी. आपली राणीची बाग (आजचं जिजामाता उद्यान) ग्रंथ, ग्रंथालये, लंडनमधल्या रॉयल एशियाटिक सोसायटीची शाखा म्हणून मुंबईत स्थापन झाली, आज ती एशियाटिक (लायब्ररी) सोसायटी म्हणून ज्ञात आहे. या सर्वांना उदार आश्रय नानांनी दिला.
नानांचं चरित्र सांगण्याची ही जागा नव्हे. परंतु आपली मुंबई ही एका मराठी माणसाच्या दूरदृष्टीने घडलेली आहे. त्यात नानांचे पारशी, गुजराती मित्र बरोबर होते. परंतु पुढारी होते, जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना.
अलिकडचाच एक प्रसंग विलेपार्ले पश्चिम द्रुतगती मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे. (खरं तर त्यावर छत्री किंवा मेघडंबरी असायला हवी पुतळा ऊनपाऊस झेलीत असतो.) त्यामागे मुंबईचा विमानतळ आहे, पण एके दिवशी विमानतळ व्यवस्थापन कंपनीने आपल्या नावाची पाटी पुतळ्यापाशी लावली. विमानतळाला महाराजांचं नाव दिलेलं असताना त्या कंपनीने मराठी लोकांना डिवचलं. ताबडतोब शिवसेना कार्यकर्त्यांनी ती पाटी तिथून हुसकावली. फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच हे केलं. बाकीचे जे पक्ष आहेत त्यांना महाराजांबद्दल आदर नाही, असं समजायचं का?
महाराष्ट्रात मुंबईत होऊन गेलेले सर्व क्षेत्रातले थोर स्त्री-पुरुष पाहिले की मला असं वाटत राहतं, की प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठीच त्यांना पृथ्वीतलावर तेही महाराष्ट्रात मुंबईत पाठवलं असावं. कारण अनेक संघर्ष झेलून महाराष्ट्र मुंबईसह नव्या संकटांना तोंड देत कणखरपणे उभा आहे.
मुंबईचं मराठीपण आपण मुंबईच्या मराठी लेकरांनीच सांभाळलं पाहिजे. मी एखाद्या गटाबरोबर जेव्हा शालेय विद्यार्थ्यांना मराठीचं महत्त्व सांगते. उदा. मराठीची संत परंपरा, आधुनिक साहित्य परंपरा, नीतीमान समाजाची इथली संस्कृती. तेव्हा त्या मुलांचे चेहरे उत्सुकतेने आणि आनंदाने उजळलेले दिसतात.
मुंबईत महाराष्ट्रात पोटापाण्यासाठी येणार्‍या अन्य भाषिकांनी मराठी आत्मसात करायला हवी, असं प्रत्येक मुंबईकराला वाटलं पाहिजे. मुंबईचे खासदार, आमदार, नगरसेवक यांनी सर्वसामान्य परिस्थितीत राहणार्‍या मुलांसाठी आणि परभाषिकांसाठी आपापल्या मतदारसंघात मराठी भाषेचं उत्कृष्ट शिक्षण द्यायची सोय करायला नको का? त्यासाठी लेखक, कवी, विचारवंत, कलावंत, चित्रकार, संगीतकार या सर्वांना एकत्र आणून मराठी भाषेचा जागर आपण केला पाहिजे. मी स्वतः हे करायला तयार आहे. अर्थात माझ्यापुरतं मी करीत असते.
मूळ मुद्दा आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलेला इशारा आपण लक्षात ठेवून महाराष्ट्राच्या राजधानीला मुंबईला आपण आपला आधार द्यायला पाहिजे.
मुंबई सर्वांना सामावून घेते. मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही. इथे प्रत्येकाचं पोट भरतं म्हणून तर सबंध देशातून इथे सतत लोंढा येत असतो. तेव्हा आपण काय करू शकतो हे ठरवावं ज्याने त्याने. या लेखाचा शेवट कवितेने करते आहे.
माझी मुंबई
काय सांगू सखे तुला मुंबईचं जिणं
नको नको म्हणताना वाजत राही नाणं।।
धर्म किती जाती किती ठाऊक नसे कुणा
फ्लॅट चाळी झोपड्या किती बंगला असे कुणा
नाटक किती नाटकं किती रंग सिनेमाचा
कला किती कळा किती भंग कायद्याचा
किती सांगू भिन्न भिन्न भाषेतील वीण।।
रेल्वे धावे मेट्रो धावे धावे टॅक्सी रिक्शा
प्रवासाला धन मोजता वाटतसे शिक्षा
नोकरीसाठी शिक्षण हवं धंद्यासाठी डोके
पाण्यालाही चढा भाव माणूस मातीलाही विके
राजकारणी लोकांची ग इथे असे खाण।।
कर्ज घेऊन जागेसाठी राबतात दोघे
पैसे देऊन शिक्षणाला प्रवेश घ्यावा लागे
बाई धावे नोकरीसाठी मुलं पाळणाघरी
म्हातार्‍यांना पाहायला नाही कुणी दारी
म्हातार्‍यांनी जगण्यासाठी वृद्धाश्रमी जाणं।।
समुद्राला हटवून माणूस घेतो भूमी
वृक्षवल्ली छाटून तो घर बांधे नामी
शुद्ध हवा हरपली कारखाने खडे
माणसाला सुख हवे प्रगतीचे चढे
निसर्गाच्या कृपेचा ग सांगू किती गुण
अजून इथे मातीमध्ये उगवते तृण।।

Previous Post

निरुत्तरांची उत्तर (प्रदेश) पूजा!

Next Post

आजच्या युगातील बहिष्कृतांचे गार्‍हाणे

Next Post

आजच्या युगातील बहिष्कृतांचे गार्‍हाणे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.