• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आजच्या युगातील बहिष्कृतांचे गार्‍हाणे

- उदय कुलकर्णी

Nitin Phanse by Nitin Phanse
May 26, 2022
in भाष्य
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की फक्त कायदे करून उपयोग नाही, अस्पृश्यता जायची असेल तर ती सवर्णांच्या मनातून जायला हवी. शेवटी तसं काही होताना दिसत नाही हे बघून त्यांनी धर्मांतर केलं, जो विचार त्यांच्या मनात १९३५ पासूनच होता. आज बाबासाहेब बरोबर होते आणि समाजात हळूहळू बदल होईल असे म्हणणारे गांधीजी चूक होते हे दिसून येतं.
– – –

हिंदू धर्मात अनेक जाती आहेत, ब्राह्मण, मराठा, तेली, सोमवंशी क्षत्रिय पाचकळशी, इत्यादी हजारो. यातील अनेक जातींमध्ये पूर्वी जातपंचायत होती व ती आपल्या जातीतील लोकांच्या प्रश्नावर, महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घ्यायची. तो त्या जातीतील सर्वांना मान्य करावा लागायचा. आता जातपंचायत फारच कमी जातींमध्ये शिल्लक आहे, तसेच पूर्वी अनेक जातींमध्ये वाळीत टाकणे, बहिष्कार टाकणे ही प्रथा होती. त्या त्या जातीतील प्रथांच्याविरुद्ध, जातपंचायतीच्या निर्णयाविरुद्ध एखाद्याने वर्तन केले की त्याला व त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकले जायचे. त्या व्यक्तीशी, त्या कुटुंबाशी त्या जातीतील कोणीही संबंध ठेवायचे नाहीत. त्या कुटुंबाला अतोनात त्रास व्हायचा. त्या घरातील तरुण मुला-मुलींचे विवाह जमत नसत.
आता २०२२मध्ये अशी बहिष्कार टाकणे प्रथा उघडपणे अस्तित्वात नाही; शहरांतील उच्चवर्गीय जातींमध्ये तरी नाहीच. मात्र काही जातींमध्ये अजूनही जातपंचायतीचा खूप प्रभाव व धाक असतो. जातीपोटजातींचे भेद आपल्या समाजात आधीपासून होतेच. आता २०१४नंतर त्या भेदांबरोबरच देशात भाजपसमर्थक व भाजपविरोधक असे दोन गट निर्माण झाले आहेत. समाजात उभी दुफळी निर्माण झाली आहे.
भाजप समर्थकांमध्ये कोणत्या जातीचे लोक आहेत? सर्वच जातींचे आहेत. कोणत्या जातीतील लोक कोणत्या पक्षाचे जास्त समर्थक आहेत? उदा. ब्राह्मण जातीतील किती टक्के लोक भाजपचे समर्थक आहेत? सर्वसाधारण निरीक्षणावर आधारित काही अंदाज करता येईल, मात्र तसे सर्वक्षण केलेले नसल्याने, नक्की काही सांगता येणार नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये किती टक्के मराठा आहेत? मराठा समाजातील किती टक्के लोक भाजप समर्थक आहेत, किती टक्के लोक काँग्रेस समर्थक आहेत, याचीही आकडेवारी नाही. काही ढोबळ अंदाज राजकीय निरीक्षक सांगू शकतील. पण ब्राह्मण जातीतील बहुसंख्य लोक भाजपचे कट्टर समर्थक आहेत, अशी समजूत होण्यासारखे वातावरण असल्यामुळे काय होते की जो ब्राह्मण आहे, किंवा जो आडनावावरून ब्राह्मण भासतो, तो भाजपचा समर्थक आहे असे लोक गृहीत धरतात. ब्राह्मण जातीतील त्याचे मित्रही हे गृहीत धरतात आणि ब्राह्मणेतर जातीतील लोकही तेच गृहीत धरतात.
यात पुढे अशी गंमत होते, एखादा ब्राह्मण भाजपचा व त्यांच्या धोरणांचा कट्टर विरोधक असतो, परंतु त्याचे ब्राह्मण मित्र तो भाजपसमर्थकच आहे असे गृहीत धरून त्याला त्यांचे ते खास मेसेज (अर्थात स्वपक्षाविषयी भक्तीरसपूर्ण आणि विरोधकांविरुद्ध द्वेषपूर्ण- तसेच एका विशिष्ट धर्माविषयी भयंकर गरळ ओकणारे) पाठवणे वगैरे सुरू करतात किंवा फोनवरही तसेच बोलणे होते. मग भाजपविरोधक ब्राह्मणाने प्रतिवाद केला, तर मात्र भाजपसमर्थक ब्राह्मण भयंकर क्रोधित होतात व भाजपविरोधक ब्राह्मणावर बहिष्कार टाकतात. अगदी तीस-चाळीस वर्षांपासून असलेले संबंध दुरावतात. ब्राह्मण असूनही भाजपविरोधी बोलतो म्हणजे जातीविरुद्धच गुन्हा करत आहे असा त्यामागे अभिनिवेश असतो. इतर जातीतील कोणी भाजपविरोधी बोलणे आणि ब्राह्मणाने बोलणे यात फरक केला जातो.
त्यातून या भाजपसमर्थकांची समज अशी की भाजपविरोधी बोलतोय म्हणजे तो काँग्रेसी किंवा कम्युनिस्ट. काँग्रेसच्या काळात आम्ही किती सहन केलं असं रडगाणं गायच; जे अर्थातच खोटं आहे कारण त्यावेळेस असे झुंडीचे प्रकार नव्हते की शिव्याही दिल्या जात नसत. भाजपविरोधक ब्राह्मण मात्र भाजपसमर्थक ब्राह्मणांवर असा बहिष्कार टाकताना दिसत नाहीत. तुमची मते तुमच्याकडे, मला त्रास होऊ देऊ नका एवढंच ते म्हणत असतात.
इतर जातींमध्ये हा प्रश्न बहुदा नसावा, कारण तिथे घाऊक पद्धतीने एकाच पक्षाचे समर्थक नसावेत, जातीवरून पक्ष कोणता हे गृहीत धरले जात नसावे किंवा समजणे अवघड असावे.
सोशल मीडियावर येणार्‍या असंख्य ब्राह्मण जातीच्या लोकांच्या कॉमेंट वाचून ते वर्णश्रेष्ठत्ववादी आहेत हेही दिसतं. यामुळे दुसरा एक मुद्दा मनात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की फक्त कायदे करून उपयोग नाही, अस्पृश्यता जायची असेल तर ती सवर्णांच्या मनातून जायला हवी. शेवटी तसं काही होताना दिसत नाही हे बघून त्यांनी धर्मांतर केलं, जो विचार त्यांच्या मनात १९३५ पासूनच होता. आज बाबासाहेब बरोबर होते आणि समाजात हळूहळू बदल होईल असे म्हणणारे गांधीजी चूक होते हे दिसून येतं.
जातीच्या पलिकडे सहिष्णुतेचा मुद्दाही यात आहे. २०१४ पूर्वीचे सरकार समर्थक विरोधकांवर तुटून पडत नसत, झुंडीने हल्ला करत नसत. पूर्वी सरकारचा विरोधकांबरोबर संवाद होता, त्याचे समर्थकही टीकेला विखाराने उत्तर देत नव्हते, तो सलोखाच संपला. पण वरपासूनच तेच धोरण आहे? २०२०मध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस गावात एका दलित मुलीवर काही सवर्ण लोकांनी सामूहिक बलात्कार करून तिचा खून केला. उत्तर प्रदेश सरकारचा याला प्रतिसाद कसा होता? त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना तिथे जायला बंदी घातली, पत्रकारांना अडवले, कोणावर केस केली. एक पीआर एजन्सी हायर केली आणि चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या. सवर्ण लोकांनी आमच्या निष्पाप मुलांना अडकवलं जात आहे म्हणून मोर्चा काढला. हे वरच्या स्तरावर. ह्याच केसच्या दहा बातम्या जरी भाजपसमर्थक मित्राला पाठवल्या तर तो फक्त गप्प बसणार. चुकूनही दु;खद घटना, निंदनीय घटना म्हणणार नाही. वर २०१४ आधी अशा घटना घडल्या होत्या याचे दाखले देणार.
पूर्वीच्या काळी कसे चांगले संबंध होते एक उदाहरण देतो. ६ फेब्रुवारी २०२२ला लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या काही जुन्या मुलाखती पुन्हा बघण्यात आल्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं, साधारण १९६५ वगैरेच्या सुमारास त्या खूप गंभीर आजारी होत्या, चालतासुद्धा येत नव्हतं, तेव्हा गीतकार मजरूह सुलतानपुरी रोज दुपारी त्यांच्याकडे येत, त्यांना शायरी, कहानिया इत्यादी ऐकवत, त्यांचं मनोरंजन करत आणि संध्याकाळी परत जात. असं ते तीन महिने करत होते. मजरूहमुळे आजारातून बरे होण्यास खूप मदत झाली असे त्या म्हणाल्या. आता इथे बघा, मजरूह सुलतानपुरी हे कट्टर कम्युनिस्ट, ते काही काळ चळवळीतही सक्रिय होते, उलट लता मंगेशकर या हिंदुत्ववादी; पण यामुळे त्यांच्यातील स्नेहभावात कटुता आली नाही. व्यावसायिक स्तरावर तर त्यांनी एकमेकांबरोबर काम केलंच, पण वैयक्तिक स्नेहसुद्धा इतका चांगला होता. त्याच मुलाखतीत पुढे लताने म्हटलं आहे साहिर लुधियानवी हेसुद्धा हृदयनाथांना भेटायला येत. साहिरसुद्धा कम्युनिस्ट पण ते मैत्रीच्या आड आलं नाही. विरोधी विचारसरणीच्या लोकांना तेव्हा शत्रू मानलं जात नसे.
हिंदी चित्रपटक्षेत्रात असा सलोखा पूर्वीपासून होता, पण तिथेही आता फूट पडलेली आहे. सरळ दोन गट झालेले आहेत. कलेच्या क्षेत्रासारखा राजकीय क्षेत्रातसुद्धा असा सलोखा होता. विरोधी विचारसरणीच्या सामान्य लोकांमध्येही सलोखा होता. सत्ताबदल तर २०१४च्या आधीही झालेले होते. खुद्द भाजपचेही सरकार केंद्रात सत्तेवर आलेले होते. आता २०१४मध्ये असे काय झाले, इतकी कटुता कशी आली आणि ती भाजपविरोधकांमध्येही आली व उत्तर देण्यासाठी तेही तशीच भाषा वापरायला लागले? समाजाचा पोतच आता बिघडून गेलेला आहे व त्यात सुधारणा होईल अशी शक्यता आता वाटत नाही.

Previous Post

मुंबई नानांची, तुमची आमची, मराठी माणसांची

Next Post

रोल… कॅमेरा… इन्स्टिट्यूट

Next Post

रोल... कॅमेरा... इन्स्टिट्यूट

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.