• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

निरुत्तरांची उत्तर (प्रदेश) पूजा!

- संतोष देशपांडे (देशकाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 26, 2022
in देशकाल
0

कार्यसिद्धी झाल्यावर मूर्ती विसर्जित करण्याआधी त्या मूर्तीमध्ये जे प्राण असतात, जे देवपण असते, त्यासकट त्याचे विसर्जन करू नये असे धर्मशास्त्र सांगते. यासाठी जो विधी केला जातो त्याला उत्तरपूजा म्हणतात. हा संदर्भ मान्य केला आणि फडणवीस यांची सभा उत्तरपूजा असेल तर उद्धवजींची सभा ही नवचेतना जागवणारी, नवे प्राण फुंकणारी प्राणप्रतिष्ठा पूजा होती, हे फडणवीस यांनी नकळत मान्य केले, असेच म्हणायला हवे.
– – –

शिवसेनेची मैदानावरची ताकद दाखवणार्‍या शेकडो विराट जाहीर सभा मुंबईने आणि महाराष्ट्राने आजवर बघितल्या आहेत. एकीकडे सैनिकांचा भव्य मेळावा आणि त्यासमोर धडाडणारी ठाकरी तोफ असे दृश्य बघितले की विरोधकांना कायमच धडकी भरायची. सगळ्या जगावरच कोरोनाचे गंडांतर आल्यावर जाहीर सभा घेणे जनहिताचे नव्हते, त्यामुळेच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवेदनशीलता दाखवत संकटकाळात अशी सभा घ्यायचे टाळले. अशा सभा हा तर शिवसैनिकांसाठी एक उत्सव असतो. गगनभेदी घोषणा देत शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येतात आणि या महाराष्ट्रात आवाज कुणाचा आहे हे दाखवून देतात. १४ मेच्या संध्याकाळी वांद्रे कुर्ला संकुल परिसरात उद्धवजींच्या, प्रदीर्घ कालावधीनंतर होणार्‍या जाहीर भाषणाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी लाखो शिवसैनिकांचा महासागर लोटला होता. या सभेतील भाषणातून उद्धवजींनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. भोंगेबाज मुन्नाभाई आणि टिनपाट सोम्यागोम्या यांचा विषय तर त्यांनी एका फटक्यात संपवलाच, पण ‘मी पुन्हा येईन’ फेम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी बाबरी पाडली’ या नव्या हास्यास्पद दावेदारीची देखील त्यांनी जाहीरपणे खिल्ली उडवली. पहाटेचा शपथविधी करून आल्यावर फडणवीस हे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावूनच बसणार होते. पण तो प्रयोग फसला म्हणून त्या दोघांच्यामागे केंद्राकडून ईडी लावून घेतली, असा पोलखोल देखील उद्धवजींनी केला.
युवासेनाप्रमुख आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भाषणानेही महाराष्ट्राचे मन जिंकले. ‘मला आज शिवसैनिकांमध्ये हनुमान, प्रभू राम, सीता, लक्ष्मण, सिद्धिविनायक या देवता दिसत आहेतच, पण या शिवसैनिकांमध्ये मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई देखील दिसत आहेत,’ हे त्यांचे वक्तव्य, देव फक्त मूर्तीपूजेत नाही तर तो माणसांत आहे, या महाराष्ट्रातील संतांच्या शिकवणुकीचा आदर करणारेच होते. हिंदू धर्म म्हणजे वचनबद्धता असे सांगत प्राण जाए पर वचन न जाए म्हणत त्यांनी भाषणाची सांगता केली. चूल पेटवणारे, हाताला काम देणारे महाविकास आघाडी सरकार हवे की घर पेटवणारे विरोधक हवेत, असा खडा सवाल त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केला.
हाताला काम हा मूलभूत प्रश्न आज आपल्यासमोर उभा आहे. राजकारण विकासाचे करू द्यायचे का धर्माचे, हे आता लोकांनीच ठरवायचे आहे. बाबरी मशीद आणि राम मंदिर वादात या देशाने चाळीस वर्षे बरेच काही भोगले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता तो प्रश्न संपला असताना भारतीय जनता पक्ष आणि फडणवीस यांना पुन्हा पुन्हा संपलेल्या वादाचे उत्खनन का करावे वाटते? एकीकडे शिवसेना ‘हृदयात राम, हाताला काम’ म्हणत आहे तर दुसरीकडे स्वतःच्या सभेत फडणवीस हे केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांत लोकांच्या भल्याचे काय काय केले याची माहिती देणारी पुस्तिका न देता लोकांच्या हातात ‘हनुमान चालिसा’ची पुस्तिका देत आहेत. या देशाची भाजपाने आठ वर्षांत सर्व आघाड्यांवर जी पिछेहाट करून ठेवली आहे, महागाईचा जो पर्वत उभा करून ठेवला आहे, त्यानंतर गरीबाला भाकरीचा अर्धा तुकडा देखील मिळत नाही आणि तो गरीब माणूस आता त्या संकटमोचक हनुमानाच्या हवाली केलेला आहे. गरीबांनी आता त्या हनुमानाचा धावा करावा आणि पंतप्रधान मोदींकडून फार अपेक्षा करू नयेत, असेच फडणवीस हनुमान चालिसा वाटप करून सुचवत आहेत का? कोठे आहे महागाई, असे म्हणणारी (आणि झळा बसायला लागल्यावर मढ्याची दाढी केल्यासारखे इंधनावरचे कर कमी केल्याचा देखावा उभारणारी) असंवेदनशील व्यक्ती या देशाची अर्थमंत्री असेल तर मग महागाई जाणार कशी?
फडणवीस यांनी उद्धवजींच्या सभेनंतर लगेच १५ मे रोजी सभा घेतली आणि ती उत्तरपूजा असेल, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सव, सत्यनारायण पूजनामध्ये प्राणप्रतिष्ठा आणि उत्तरपूजा या दोन्ही केल्या जातात आणि सहसा एकाच यजमानाने त्या करायच्या असतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार एखाद्या मूर्तीची स्थापना केली जाते, तेव्हा सर्वात आधी त्या मूर्तीला देवपण देण्यासाठी प्राणप्रतिष्ठा पूजाविधी केला जातो. कार्यसिद्धी झाल्यावर मूर्ती विसर्जित करण्याआधी त्या मूर्तीमध्ये जे प्राण असतात, जे देवपण असते, त्यासकट त्याचे विसर्जन करू नये असे धर्मशास्त्र सांगते. यासाठी जो विधी केला जातो त्याला उत्तरपूजा म्हणतात. हा संदर्भ मान्य केला आणि फडणवीस यांची सभा उत्तरपूजा असेल तर उद्धवजींची सभा ही नवचेतना जागवणारी, नवे प्राण फुंकणारी प्राणप्रतिष्ठा पूजा होती, हे फडणवीस यांनी नकळत मान्य केले, असेच म्हणायला हवे. महाराष्ट्राच्या भावी विकासकार्यासाठी केलेल्या प्राण-प्रतिष्ठा पूजनाला एक दिवस पूर्ण होण्याच्याआधीच घाईत उत्तरपूजा का करावीशी वाटली? उद्धवजींच्या भव्य सभेत महाराष्ट्रधर्माचे सकारात्मक आणि विशाल स्वरूप दिसत होते, तर फडणवीस यांच्या गोरेगावमधील बंदिस्त जागेतील विशिष्ट भाषिक प्रदेशातील लोकांच्या सभेत एक संकुचितपणा आणि नकारात्मकता दिसत होती. फडणवीस यांचे संपूर्ण भाषण हिंदीमध्ये होते आणि त्यात हनुमान चालिसाचे ऐवजी समर्थ रामदासकृत मारूतीस्तोत्र म्हणून सांस्कृतिक देवाणघेवाण करायची संधी त्यांनी घालवली. ती हिंदी भाषिकांच्या मतांवर डोळा ठेवून केलेली उत्तरप्रदेश पूजा होती, हे लपण्यासारखे नव्हते.
महाराष्ट्रात राहायचे, महाराष्ट्राचे खायचे आणि गोडवे मात्र उत्तर प्रदेशाचे गायचे, याला कृतघ्नपणा म्हणतात. एकीकडे पंतप्रधान मोदी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अशी (त्यांच्या सगळ्या राजकारणाच्या थेट विरोधातली) घोषणा भाजपा अधिवेशनात देतात आणि दुसरीकडे फडणवीस (खर्‍या मोदीनीतीला अनुसरून) भाषिक आणि जातीय मेळावे घेतात. या राज्यात आणि खासकरून मुंबईत अनेक उत्तर भारतीय बांधव दुधात साखरेसारखे विरघळून गेलेले आहेत. ते मराठीजन झालेले आहेत. मात्र, या सभेच्या आयोजकांना हिंदीभाषिकांना मुंबईकर मानायचे नव्हते, त्यांचे हिंदीभाषिक वेगळेपण आपल्या फायद्यासाठी कुरवाळायचे होते. मुंबईत हिंदीचे आणि मराठीचे अनेक वर्ष मिश्रण होउन बम्बईया हिंदी नावाची बोलीभाषा तयार झाली आहे, तिथे कशाला हवा असला भाषावाद? मुंबईत मिनी उत्तर प्रदेश बनवायचा असेल तर ते या राज्याची जनता ते चालवून घेणार नाही आणि सच्चा मुंबईकर उत्तर भारतीय त्याला विरोधच करील.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि इथे अठरापगड जातीधर्मांचे सर्वभाषिक लोक गुण्यागोविंदाने रहात कित्येक पिढ्या रहात आलेले आहेत. मुंबईमध्ये दोन वेळचे पोट भरायला म्हणून आलेले इतर प्रांतीय गर्भश्रीमंत झाल्याची हजारो उदाहरणे सापडतील. मुंबई म्हणजे भारतीय एकात्मतेचे प्रतीक, संपूर्ण देशाचे मनोरंजन करताना एकात्मतेचा संदेश देणारी हिंदी चित्रपटसृष्टी इथेच आहे, हा योगायोग नाही. मुंबई ही भारताची कलाविष्काराची देखील राजधानी आहे. देशातले सर्वात मोठे सागरी बंदर इथेच आहे. आधुनिक भारत कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या या मुंबईत उत्तर प्रदेश आणि बिहारच्याच नव्हे तर गुजराती, मारवाडी, शीख, बंगाली यांच्या अनेक पिढ्या सुखाने राहिल्या आहेत. मुंबईच्या लोकलच्या चौथ्या सीटवर जात, धर्म अथवा भाषा बघून जागा दिली जात नसते, ती दिली जाते मुंबईकरांवरच्या एकोप्याच्या संस्कारातून. अशा या सर्वधर्मसमभाव जपणार्‍या मुंबई शहरात भाजपा हिंदीभाषिक संमेलन भरवते, अजान विरुद्ध हनुमान चालिसा असा अकारण विवाद उभा करते, इतकेच नाही तर मुंबई स्वतंत्र करा अशी घातकी मागणी देखील त्यांचा सोम्यागोम्या दिल्लीत जाऊन करू लागतो, तेव्हा मुंबईत आता रात्र वैर्‍याची आहे हे लक्षात घ्यायला हवे. गेली तीस वर्ष शिवसेनेने मुंबईची ही घट्ट वीण सांभाळली आहे. सव्वा कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचे दाटीवाटीचे हे महानगर सांभाळणे म्हणजे सोपे काम नाही. मुंबई आणि आसपासच्या नवी मुंबई, ठाणे, पनवेल, मिरा भाईंदर, भिवंडी निजामपूर, अंबरनाथ बदलापूर, वसई विरार, कल्याण डोंबिवली या जवळपासच्या महानगरपालिका क्षेत्रात अडीच कोटी जनसंख्या असून जगात लोकसंख्येची सर्वात जास्त दाटी असलेला हा भाग आहे. एखाद्या देशापेक्षा ही लोकसंख्या मोठी आहे. गेली तीस वर्ष शिवसेनेचा कारभार इथे बहुसंख्य भागात आहे. शिवसेना संकुचित असती तर देशभरातून लोक इथे आले असते का? तुटपुंज्या जागेत देखील राहून हे अन्यप्रांतीय शहर का सोडत नाहीत? रस्त्यावरचे खड्डे दाखवत फिरणार्‍या सोम्यागोम्याला माहिती असायला हवे की इथले लोक शिवसेनेबरोबरच राहतात कारण हे शहर त्यांचा सर्वात मोठा असा पोटाला पडलेला खड्डा लगेच बुजवते. हाताला काम आणि घरात पेटलेली चूल हेच आज सर्वात महत्त्वाचे आहे सामान्य माणसासाठी. ते देणे हाच खरा राजधर्म आहे आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार तोच पार पाडत आहे.
मुंबई परिसरातल्या अडीच कोटी जनसंख्येत स्थलांतरित उत्तर भारतीय आणि अन्यप्रांतीय समाजाचे प्रमाण मोठे आहे. शिवसेनेपुढे निरुत्तर झालेला फुटीरतावादी भाजपा पक्ष त्यांची मोट बांधून ‘अमराठी’ अशी एक व्होटबँक बनवायची खेळी करत आहे. ती खेळी एक निसरडी वाट असेल. इथे इतर भाषिकांचा हक्क मराठी माणसाइतकाच आहे पण मराठी माणसाच्या विरोधात अमराठी व्होटबँकेचे राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही. फडणवीस भाषणात म्हणाले की त्यांचे शारीरिक वजन कमी झाले असले तरी त्यांचे राजकीय वजन अजिबात कमी झालेले नाही आणि ते मविआला सत्तेबाहेर देखील खेचून दाखवणार आहेत. त्यांनी इकडून तिकडून गोळा करून नेलेले झिलकरी ‘जी जी रं जी जी’ करत सरकार पडण्याच्या तारखा सांगून करमणूक करत असतातच. खरेतर ठाकरे घराण्यातील कोणी सत्तास्थानावर आजवर बसले नव्हते. ते आता स्थानापन्न झाले आहेत आणि ते काही झोळी उचलून परत जाणारे ढोंगी फकीर नाहीत. फडणवीस यांचे वाढलेले वजन म्हणजे निव्वळ आकाराने मोठा, दिल्लीच्या हवेने भरलेला तो एक फुगलेला राजकीय प्ाâुगा आहे. दिल्लीपतींच्या एका टाचणीने फडणवीसांच्या राजकीय वजनाचा काटा शून्यावर येईल. उद्धवजींचे राजकीय वजन हे शिवसैनिकांच्यामुळे असल्यानेच अबाधित आहे. त्यांनी कधी स्वबळाची भाषा केलेली नाही, कारण स्वबळावर नाही, तर जनतेच्या पाठबळावर सरकार परत येते, हे त्यांना माहिती आहे. ते पाठबळ त्यांना पुन्हा लाभेल आणि स्वबळाचे हे फुगे फुटलेले दिसतील.

Previous Post

विविध वादांच्या जंगलात प्रवेश

Next Post

मुंबई नानांची, तुमची आमची, मराठी माणसांची

Next Post
मुंबई नानांची, तुमची आमची, मराठी माणसांची

मुंबई नानांची, तुमची आमची, मराठी माणसांची

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.