ठाणे शहराला विस्तीर्ण खाडी किनारा लाभला असला तरी वाढती अतिक्रमणे आणि प्रदूषणाच्या विळख्यात खाडी सापडली आहे. गेल्या काही वर्षांत जमिनीचे वधारलेले भाव यामुळे अनेक भूमिपुत्रांनी मालकी हक्काच्या जागा विकल्याने त्यांचे पारंपरिक व्यवसायदेखील बंद पडले आहेत. ५० ते ६०च्या दशकात भातशेती, मिठागरे, मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू होती. मात्र असे व्यवसाय आता लोप पावले आहेत. मात्र, प्रफुल्ल नाखवा यांनी खाडीत मत्स्यशेती करून जुनी परंपरा कायम राखली आहे.
– – –
ताजे फडफडीत मासे बघितल्यावर खवय्यांच्या तोंडाला पाणी नाही सुटलं तरच नवल! पापलेट, सुरमई, बांगडा, बोंबील अशी मासळी सर्वांच्याच परिचयाची असली तरी या माशांपेक्षा रुचकर आणि पौष्टिक मासळी कधी काळी ठाणे खाडीत मिळत असे. पाला, बोय, भादी, ढोमी, वडा, मांगीन असे एकाहून एक सरस मासे या ठाणे खाडीत मिळत असत. आणि हीच मासेमारी करून स्थानिक कोळी कुटुंबाचं पोट भरत होता. परंतु बदलत्या लाइफस्टाइलने आणि खाडी प्रदूषणाने इथला मासेमारीचा व्यवसाय काळाच्या ओघात बंद पडला. खाडीत पूर्वी १२७ प्रकारची मासळी मिळत असल्याचे चेंदणी कोळीवाड्यातील कोळी बांधव सांगतात. मासेरूपी सोनं देणारी खाडी आता काळ्या कोळशासारखी दिसते.
पण, या परिस्थितीवर मात करून ठाणे शहरातील चेंदणी कोळीवाड्यात सध्या मत्स्यशेती केली जाते. आजच्या तरूण पिढीला सांगितलं की पटकन विश्वास बसणार नाही. परंतु, पूर्वापार सुरू असलेला मत्स्यव्यवसाय कायमस्वरूपी तसाच ठेवण्याचा प्रयत्न मत्स्यउद्योजक प्रफुल्ल नाखवा यांनी केला आहे.
शहरातील पारंपरिक व्यवसाय लुप्त होत असून नोकरी अथवा दुसरा नवीन व्यवसाय शोधण्याकडे कल वाढतो आहे. कोळी, आगरी समाजाचे प्रतिनिधित्व करणार्या ठाणे शहरात मासेमारी मिठागरे नामशेष झाली आहेत. आजच्या ठाणे शहराचा चेहरामोहरा बघितल्यावर कधीकाळी इथे कोळी बांधव हा होडीतून मासे पकडण्याचा व्यवसाय करत होता का, असं विचारलं तर नक्कीच आजची स्थिती पाहता नकारात्मक उत्तर मिळेल. ठाणे शहराला विस्तीर्ण खाडी किनारा लाभला असला तरी वाढती अतिक्रमणे आणि प्रदूषणाच्या विळख्यात खाडी सापडली आहे. गेल्या काही वर्षांत जमिनीचे वधारलेले भाव यामुळे अनेक भूमिपुत्रांनी मालकी हक्काच्या जागा विकल्याने त्यांचे पारंपरिक व्यवसायदेखील बंद पडले आहेत. ५० ते ६०च्या दशकात भातशेती, मिठागरे, मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू होती. मात्र असे व्यवसाय आता लोप पावले आहेत. मात्र, प्रफुल्ल नाखवा यांनी खाडीत मत्स्यशेती करून जुनी परंपरा कायम राखली आहे.
चेंदणी कोळीवाडा आणि विटावा कोळीवाडा यामधल्या खाडीपट्टीत ही मत्स्यशेती सुरू आहे. गेली ५५ ते ६० वर्षे याच व्यवसायावर त्यांची उपजीविका सुरू आहे. येथे त्यांनी तीन तळी तयार केली असून, सफेद कोळंबी, काळे मासे आणि जिताडा याबरोबरच खेकड्यांचं संगोपन केलं जातं. मत्स्यशेतीतील मासे खाण्यासाठी चविष्ट असून, तळ्यात प्रदूषित पाणी येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. पाण्यात ऑक्सिजनची मात्रा उत्तम राहील यादृष्टीने खबरदारी घेतली जाते. आठवड्यातून एक-दोन वेळा तळ्यामधील मासे काढले जातात आणि कुटुंबाचा चरितार्थ चालेल इतके तरी उत्पन्न नक्की मिळते.
नाखवा म्हणाले की तळीतील माशांना लागणारे खाद्य आम्ही स्वतः बनवतो. त्यामुळे त्यावर होणारा जास्तीचा खर्च वाचतो. ते पुढे म्हणाले, ताजी फडफडीत मच्छी खवय्यांना मिळत असल्यामुळे माशांची ऑर्डर अगोदरच मिळते. जिताडा माशांचे बीज अलिबागवरून आणलं जातं. कोळंबी, खेकडे, जिताडा माशाला मोठी मागणी असते. भरतीच्या पाण्याबरोबर काही वेळा टायगर प्रॉन्स, ताम आदी दुर्मिळ मासेदेखील मिळतात. मात्र काही वेळा मासे मृत झाल्याने आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.
ठाणे खाडीत सुमारे १२७ माशांच्या जाती होत्या. पाला, बोय, भादी, ढोम्बी, वडा, मांगीन, गोधिड, खरबा, कोळंबी, जिले, निवटे, माकुल, चिंबोरी, जिताडा, खपली, कालेटा अशा विविध माशांची संपदा होती. मात्र वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे खाडी प्रदूषणाच्या गर्तेत अडकली. रासायनिक कंपन्या वाढल्यामुळे आणि शहरातील सांडपाणी खाडीत सोडल्यामुळे मत्स्यसंपदा हळुहळू संपुष्टात आली. पूर्वी खाडीत पकडलेले मासे चेंदणी कोळीवाड्यातील स्त्रिया बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असत आणि त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. कालांतराने खाडीतील जलप्रदूषण वाढून मासेमारीदेखील काळाच्या पडद्याआड गेली, अशी आज अवस्था आहे.
नाखवा यांनी खाडीत सफेद कोळंबी, काळे मासे, जिताडा आणि चिंबोरी यांचं संगोपन केलं जातं. माशांना सकस खाद्य दिल्यामुळे भरलेल्या माशांचं वजन उत्तम राहून खाण्यासाठी पोषक असतात. जिताडा ज्या तळीत वाढवला जातो तिथे १५ ते २० किलो वजनाचे जिताडे मासे मिळाले आहेत. तर जिथे चिंबोरीचं संगोपन होतं त्याठिकाणी तब्बल अडीच किलो वजनाचा खेकडा मिळाला आहे. मत्स्यशेती ही कल्पना शहरातल्या मुलांना थोडी वेगळीच वाटते. परंतु या तळीतील माशांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून विद्यार्थी येतात. नैसर्गिक वातावरणामुळे इथे आल्यावर सर्वांनाच या तळीची तसेच मत्स्यसंवर्धनाची भुरळ पडते. तसेच त्या विद्यार्थ्यांनादेखील या व्यवसायाचे आकर्षण निर्माण होते.
‘शहरात मत्स्यशेती’ ही कल्पनाच मनाला भुरळ पाडणारी आहे. निसर्गाच्या सान्निध्यात येथे भटकंती करायला वेगळीच मजा येते. विविध झाडांच्या हिरवाईत, हवेच्या मंजुळ ध्वनीबरोबर पक्ष्यांची वेगळी नजाकत येथे बघायला मिळते. मासे पकडण्यासाठी गळ टाकणे अथवा जाळे टाकण्याचा अनुभव वेगळाच वाटतो. मासेमारी करण्याचा हा अनुभव खूप चांगला वाटतो, असे सुशांत मणचेकर (ठाणे पूर्व) यांनी सांगितले.
थोडं चेंदणी कोळीवाड्याविषयी…
श्रीस्थानक म्हणजेच ठाणे शहर आणि आजचे स्मार्टसिटी ठाणे हे खूप पुरातन गाव असलेलं शहर! या शहरात मौजे चेंदणी गावठाण परिसरात कोळी समाजाची वस्ती आहे. जमीन महसूल संहितेप्रमाणे मौजे चेंदणी टीका नंबर १ ब्रिटिशपूर्व काळापासून नोंद आहे. आशिया खंडातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ वाडी बंदर ते ठाणे धावली. याच ठाणे स्थानकालगत असणारा चेंदणी कोळीवाडा हा गाव. पूर्वी मोठं बंदर असलेल्या चेंदणी कोळीवाड्याच्या किनारपट्टीवर जलवाहतूक होत असे. दक्षिण भारतातील कोचीनपुढे आखाती देशात सागरी मार्गाने होणारा व्यापार याच चेंदणी बंदरातून खाडीमार्गे होत असे. त्यामुळे खाडीला मोठे महत्व होते. ब्रिटिशांनी मिठाचा व्यापार, आखातात होणार्या फातेमारीला उत्तेजन मिळावे, बंदराशी दळणवळण व्हावे आणि व्यापार उद्योगाला गती मिळावी यासाठी १८७० ते १८८० या दशकात ठाणे स्थानकाचा रेल्वेमार्ग पुढे चेंदणी बंदरापर्यंत वाढवला. चेंदणी गावातील खाडीकिनारा हा मालवाहू जहाजाला तेलपाणी व दुरुस्तीसाठी संरक्षित किनारा असल्याने परदेशी जहाजांना उपयुक्त थांबा होता. मालवाहू जहाजांना बोलीभाषेत फातेमारी म्हणून ओळखलं जाई. मालवाहू जहाजांची नावे हेमवंती, कमळावंती, महादेव प्रसाद, महालक्ष्मी, जलमोहिनी, जलविहार, जयवंती, लीलावंती, अकबरी अशी होती. येथील कस्टम ऑफिसमध्ये त्यावेळी जहाज व होड्यांना परवाना दिला जात असे.