• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

दूरस्थ अडगळीतल्या जातीजमाती जोडल्या…

- ना. धों. महानोर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 21, 2022
in विशेष लेख
0
दूरस्थ अडगळीतल्या जातीजमाती जोडल्या…

महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातल्या, ज्यांना कधी राजकारणात स्थानच नव्हतं, अशा लहानलहान जाती-जमाती, समाज, गावकुसाबाहेरचेच नव्हे, तर थेट वाडी-वस्तीत भटकंतीत असलेले सगळे दुर्लक्षित घेऊन त्यांना बाळासाहेबांनी तिकिटं, सत्ता देऊन ग्रामपंचायत, नगर महानगरपालिका व आमदार-खासदार म्हणून राजकारण व समाजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणलं. मोठं केलं. या लहान जातींचंच मोठं संघटन झालं. वरपांगी हे दिसून येणार नाही. फार बारीक पद्धतीनं मी ते पाहिलं. म्हणून त्यांना एवढे बलवत्तर पुढारी व दीर्घकालीन राजकारण मोडता आलं.
– – –

शब्दांचा मितव्यव असलेली चांगली कविता जशी खूप काही सांगून जाते, मनात घर करून बसते, तसंच मला खूप आधीपासून फक्त दोन शब्दांत किंवा एक-दोन ओळीत लिहून रेखाटलेलं चित्र, व्यंगचित्र खूप आवडतं. नवा आनंद देऊन जातं. आजही वृत्तपत्रात मुख्य हेडलाइन पाहिल्यावर लगेच मी व्यंगचित्र पाहतो, वाचतो. लक्ष्मण, शाम जोशी, वसंत सरवटेंपासून किती तरी लहान-मोठे व्यंगचित्रकार मला खूप आवडतात. ही आवड निर्माण करून दिली ती पंचवीस-तीस वर्षांपूर्वीच्या ‘मार्मिक’मधल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या संपन्न अशा व्यंगचित्र कुंचल्यानं आणि त्याखालच्या शब्दांच्या लहान-लहान टिपणीनं, त्यातल्या लेखनानं.
१९७८ ते ८४च्या काळात मी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत होतो. तिथे माझ्या जवळच बसणारे त्यावेळचे आमदार मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक यांनी ‘मार्मिक’ आणि तत्सम लेखन सहजपणानं मला पुरवलं, चर्चा-भाषणांमध्ये आम्ही एक-दुसर्‍यांना वेळ वाढवून द्यायचो, घ्यायचो. साहित्य-कला क्षेत्रात या आमदारांना खूप रस होता, मराठीविषयी नितांत प्रेम होतं म्हणून त्यांचं-आमचं मैत्रीत रूपांतर झालं. प्रबोधनकार ठाकरे ते थेट बाळासाहेब ठाकरे, ‘मार्मिक’, ‘शिवसेना’ यासंबंधी, त्यांच्या विचारधारेसंबंधी जवळून माहिती मिळत गेली. कै. वसंतराव नाईक ते थेट बॅरिस्टर अंतुलेपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेसंबंधीचे धोरण व बाळासाहेबांचे स्नेहबंध समजून घेता आले. राजकारण हा माझा पिंड नाही. तरीही यातले बरेच काही समजून घेताना मला मजा वाटली.
मराठी माणूस, मराठी भाषा, मराठीपण, मराठी समाज, मराठी संस्कृती असा महाराष्ट्र बांधावयाची घट्ट कल्पना हाती घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत आधी मुख्यत: सुरुवात करून मग महाराष्ट्रभर त्या विचारांसाठी प्रचंड धडपड केली. तीन आमदारांचे पाय १९८८ला विधानभवनात रोवले होते, तिथे १९९५ला स्वतःचं राज्य उभं केलं. यातलं यश-अपयश, मोडतोड, समविचारी जोडाजोड, तडजोड सगळं काही केलं. पुष्कळदा स्वतःच्या स्वभावाला, विचाराला, स्वाभिमानाला छेद देऊनही करावं लागलं; जे मनात, कल्पनेत होतं ते उभं केलं. याचं श्रेय त्यांना द्यावंच लागणार. खूप शांतपणानं, सहनशीलपणानं व दोन टोले देऊन पेक्षा घेऊनही जे राजकारणात करावं लागतं ते केले. मुंबईपासून संभाजीनगर व विविध ठिकाणी महापालिका क्षेत्रांत पाय रोवले. महाराष्ट्रात लाखोंच्या विराट सभा घेतल्या. महाराष्ट्राच्या राजकारणाला संपूर्ण बदल देणारं, धक्का देणारं असं चित्र उभं राहिले. राजकारणच बदललं.
१९९०-९२च्या सुमारास काँग्रेसचे सरकार असताना शरदराव पवार, कै. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना मुंबईतल्या महापालिकेच्या व काही मुंबईतल्या इतर गंभीर प्रश्नांच्या संबंधात बाळासाहेब ठाकरे विधान भवनात आलेले होते. एका खोलीत ते बसलेले होते. बरेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते. मी त्या बाजूने जाताना प्रमोद नवलकरांनी ओळख करून दिली. बाळासाहेब भेटीनं खूश झाले. बोलले. माझ्या पत्रात आलेल्या विधान परिषदेतल्या कामकाजासंबंधी आस्थेनं बोलले. अजिंठा कला अकादमीच्या ठराव मान्यतेसंबंधी खूश झाले, म्हणाले, ‘ही मराठी भाषा कला लोककलांची, गीतसंगीताची परंपरा जतन करणारी व नवीन खूप काही शिकवणारी कला अकादमी झाली पाहिजे.’ मी चांगलं काम केलं, चांगली कविता लिहितो याचं तोंडदेखलं नव्हे, तर मनापासून त्यांनी कौतुक केलं. मला नवलाईचं वाटलं. त्यांची माझी ही पहिली समक्ष भेट. परंतु खूप वर्षांचा स्नेह असावा, अशी भेट होती. माणसं कुठल्या कुठल्या लहान-लहान ठिकाणाहून येतात. संधी मिळाली तर आत्मविश्वासानं मोठी होऊन जातात, इत्यादी काही बोलत राहिले.
पु. ल. देशपांडे यांचा पंच्याहत्तरीनिमित्त मोठा सत्कार समारंभ दादरला जयंतराव साळगावकरांनी समिती गठित करून घडवून आणला. अतिशय नेटका, सर्व क्षेत्रांतल्या निवडक अशा पाच हजार रसिकांच्या उपस्थितीतला गौरव समारंभ. मी या समितीत होतो आणि महाराष्ट्राच्या वतीनं भाईंवर एकट्यानंच बोलावं, असं ठरलं होतं. म्हणून पाच मिनिटे बोललो, स्वागताला मी दारात होतो. चित्रपट, नाट्य, गीत, संगीत, समाजसेवा, राजकारण सर्व क्षेत्रांतील माणसं येत होती. मी स्वागताला दारात उभा होतो, जागा करून देत होतो. ज्या राजकारण्यांची टोकाची भांडणं रोज आपण वाचतो, कथा, दंतकथा ऐकतो, ती जिवलग होऊन खूप आपलेपणानं कार्यक्रम सुरू होण्याआधी गप्पाष्टकांमध्ये दंग होती. बाळासाहेबांशी अनेकांच्या भेटी, चर्चा मी पाहिल्या ऐकल्या. हेच का ते बाळासाहेब? असाही प्रश्न पडला. इतका सरळ साधेपणा, मोकळेपणा व निर्मळपणानं चर्चा-स्नेह. माझ्याशी नंतर पु.लं.च्या संबंधी मी बोललो होतो म्हणून ते अधिकच गौरवानं बोलले. हा शतकाचा कलावंत. नंतर त्यांच्या एका विधानानं काही वर्षांनी मोठा कोलाहल माजला. बाळासाहेबांनी स्वतःला तपासून पाहिलं. चूक लगेच दुरुस्त केली. पु. ल. देशपांडे यांच्या घरी जाऊन थेट नमस्कार करून, नम्रपणानं सगळं पुसून टाकलं. असा हा आतला हळवा माणूस मी तेथे पाहिला.
नंतर कधीतरी एकदा बाळासाहेब जळगावी आले होते. मोहाडीच्या शेती संशोधन केंद्रावर त्यांची माझी भेट झाली. मुख्यमंत्री मनोहर जोशी, माझे दोन स्नेही व बाळासाहेब एवढेच तासभर होतो. ‘आमचं सरकार आहे. पण त्याला अ‍ॅग्रीकल्चर समजत नसल्यानं नीट चाललेलं नाही. अशी प्रामाणिक कबुली देऊन त्यांनी शेती, शेतीतले नवे प्रश्न, पाणी, वॉटरशेड, खेडी व त्यांची आर्थिक मोडतोड अशी चर्चा समोर ठेवून मला बोलतं ठेवून फक्त ऐकून घेऊन एकाला टिपण करायला सांगितलं. मुख्यमंत्र्यांना चर्चेत बोलतं केलं. शेतीतले खरे प्रश्न आहेत तितकेसे अवघड नाहीत. यासाठी विशेष काम करण्याचीच खरी गरज आहे, असं सांगून त्यांनी त्यांच्याकडून होत नाही, झालं नाही, शहरांचंच ऐकून केलं, याबद्दल खूप खेद व्यक्त केला. नवं धोरण खेडी शेतीची पुनर्बांधणी करून करावं, असं मुख्यमंत्र्यांना सांगत राहिलो. मी निघताना ‘गाथा शिवरायांची’ हे माझं नवं गीतकाव्य दिलं, कॅसेट दिली. ‘हा शेतकर्‍यांचा प्रतिनिधी कसा व सामान्यांचा कसा राजा हे बघा’, दाखविल्यावर अवाक् झाले. पुतळ्यांच्यापेक्षा महाराजांचा, शेतकर्‍यांचा, जाती-धर्माविरहित विचार संदर्भ देऊन त्यांच्या हाती दिला. हेच सर्वत्र जावं. मी गीतबद्ध करतो. श्रीमती लता मंगेशकरांशी बोलतो, इत्यादी बरंच बोलले. मुद्दा असा की, त्यांना चांगलं काय, खरं काय ते पटवून दिलं, तर स्वतःला बदलून टाकून ते नम्रपणे स्वीकारण्याची परिवर्तनाची मी त्यांच्या स्वभावात पाहिलं. पण नंतर सरकार त्याचं राहिलं नाही. स्मिता ठाकरे, राज ठाकरे हे त्यांचे घरातले लोक मला संगीत, गाण्यांच्या मंगेशकरांच्या कार्यक्रमात परिचय नसतानाही आपलेपणानं गीतकाव्य या नव्या खंडकाव्याचंही पुन्हा ‘जैत रे जैत’सारखं काहीतरी करू या, असं म्हणाले. मला असा या कुटुंबाचा परिचय नव्हता. तो झाला.
प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, दिवाकर रावते, सुरेश प्रभू आणखी कितीतरी शिवसेनेची खूप प्रेमानं भेटतात. साहित्य-गीत-कविता वाचल्याचं ऐकल्याचं सांगतात. पुष्कळदा बाळासाहेब ठाकरेंच्या चर्चेतलं सांगतात. नवल वाटतं. मी कोण कुठला? कुठल्या विचाराचा? यशवंतराव, शरदराव यांच्या खास जवळचा कौटुंबिक संबंधातला. हे ठाऊक असूनही त्या संबंधीची रेखा येऊ दिली नाही. उलट चांगलंच बोलत राहिले. माझ्यासोबतचे लोकही आश्चर्य व्यक्त करतात, हे तेच बाळासाहेब आहेत का?
माझ्या काही दुर्दैवी प्रसंगांचं त्यांना खूप वाईट वाटलं. ते अस्वस्थ झाले. मुख्यमंत्र्यांचं-मुख्यमंत्री म्हणून दिलगिरीचं स्नेहभावाचं पत्र आलं. त्यात बाळासाहेब ठाकरेंचंही प्रतिबिंब होतं.
बाळासाहेब ठाकरे यांना विशेषतः राजकारणात यश प्रत्यक्ष मिळालं, सरकार स्थापन याची अनेक कारणं चर्चिली गेली. मला बारकाईनं महाराष्ट्रभर फिरताना विचार करताना एक गोष्ट ठळकपणानं दिसून आली आणि ती ही की, मराठा समाजाभोवतीच किंवा त्याच्या थोड्याफार जवळ फिरणारं आप्त-गणगोताचं जाती-जमातीचं राजकारण होतं. हे सत्ताकेंद्र होतं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातल्या, ज्यांना कधी राजकारणात स्थानच नव्हतं, अशा लहानलहान जाती-जमाती, समाज, गावकुसाबाहेरचेच नव्हे, तर थेट वाडी-वस्तीत भटकंतीत असलेले सगळे दुर्लक्षित घेऊन त्यांना बाळासाहेबांनी तिकिटं, सत्ता देऊन ग्रामपंचायत, नगर महानगरपालिका व आमदार-खासदार म्हणून राजकारण व समाजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणलं. मोठं केलं. या लहान जातींचंच मोठं संघटन झालं. वरपांगी हे दिसून येणार नाही. फार बारीक पद्धतीनं मी ते पाहिलं. म्हणून त्यांना एवढे बलवत्तर पुढारी व दीर्घकालीन राजकारण मोडता आलं. केवळ सामान्य लहान लहान दुर्लक्षितांना राजकारणात सामावून घेतल्यामुळे ही सगळ्यात मोठी परिवर्तनाची घटना मला वाटते जी बाळासाहेब ठाकरेंनी करून दाखविली. म्हणून खेड्यात व शहरातही ४५ टक्के दारिद्र्यरेषेखाली असलेला, एक वेळेला उपाशी राहणारा माणूस, कुटुंब यांसाठी त्यांनी एक-दोन रुपयात झुणका-भाकर दिली ही सामान्य गोष्ट नाही. ती नंतर नीट न राबवल्याने त्रुटी आल्या, परंतु ही फार मोठी गोष्ट.
राजकारणाची बेरीज वजाबाकी, यश-अपयश इत्यादी भरपूर चर्चा दररोज करणारे आहेत. बाळासाहेबांसंबंधी कडू बोलणारे, मधुमेह व्हावा इतकं गोड बोलणारे जवळून पाहिले. स्पष्टपणे मला वाटतं ते मी बोलीन, त्याचं सगळं अंगावर झेलीन असा स्वभावाचा भाग सर्वत्र ठामपणे जपणारे कठोर बाळासाहेब मी माझ्यापुरते जसे पाहिले, तसे लिहिले. थोडे दोन वेळा भेटण्याचे प्रसंग आले ते लिहिले. सामान्य जाती-जमातीतून महाराष्ट्राच्या डोंगरदर्‍यामधून अडाणी, कबाडी खेड्यांमधून माणसं आली. त्यांच्यासंबंधी त्यांनी स्नेह जतन केला. माझा दुरान्वयानेही संबंध नसताना मला आस्था दाखवली, याचं मला खूप नवल वाटलं व आनंदसुद्धा. कुठे तरी ते थोडक्या शब्दात मला सांगता आलं एवढंच.

(शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त निघालेल्या ‘सामना’च्या विशेषांकातून संकलित)

Previous Post

राजकीय शत्रूशीही मैत्री जपणारा नेता

Next Post

अडीअडचणीतील भक्कम आधारस्तंभ

Next Post
अडीअडचणीतील भक्कम आधारस्तंभ

अडीअडचणीतील भक्कम आधारस्तंभ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.