• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

काय तरी घडूक व्हया

- शिवप्रणव आळवणी (गावची गजाल)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
October 14, 2021
in गावची गजाल
0

पूर इलो आणि केळुरीतल्या सगळ्या घरादारात नांदून गेलो तेका आता दोन एक महिने होऊन गेलेले होते. पावसाचो जोरसुद्धा आता हळू हळू कमी होऊक लागलो होतो. केळुरी ग्रामस्थांचा आयुष्य ह्या आता पूर्वीसारखाच सुरळीत होऊक लागलेला होता. सगळ्यांच्यो नोकर्‍यो, धंदे, व्यवसाय हे पूर्वीसारखे सुरू झालेले होते आणि केळुरीतलो मुख्य उपक्रम म्हणजे ‘ऑल इज रेडी’ या भालवडकराच्या हॉटेलावर किंवा गावच्या पिंपळाच्या पारावर बसून पुरुष मंडळींच्यो चालणार्‍यो गप्पा-गोष्टी वजा एकमेकांच्यो उखाळ्यो-पाखाळ्यो किंवा मग केळुरेश्वराच्या प्रांगणात सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजेपर्यंत गावातल्या विविध घरांमधल्यो विविध अशा प्रौढ विषयांवर चालणारी बायकांची चर्चासत्रां आणि त्याहूनही आवडीचो विषय म्हणजे विसुभाऊ आणि मंडळींच्यो गाण्याच्यो मैफिली. ह्यो सगळ्यो गोष्टी अगदी पूर्वीप्रमाणे व्यवस्थितपणे सुरू झालेल्यो होत्यो. पण जेवणात मीठ नसल्यानंतर जेवण बेचव लागूक लागता तसाच आत्ताशी आमच्या केळुरी ग्रामस्थांका आपला आयुष्य ह्या जरा बेचव आसा असा वाटूक सुरुवात झालेली होती.
‘काय मजा नाय रवली आं जगण्यात पूर्वीसारखी. रोज आपला ताच ताच ताच ताच…’ धर्मा धाकणकर पिंपळाच्या पारावर बरोच वेळ बसून वळान इलेले पाय मोकळे करत म्हणालो. ‘आपल्या जगण्यातली मजा आपणंच शोधूची असता धाकणकर!’ दाजीकाका फडणीस आपल्या ‘टिंब टिंब आणि बरेच काही’ या काव्यसंग्रहामधून ‘कसं जगायचं, जगायचं कसं’ ही कविता शोधत म्हणालो, ‘आता म्हाका बघा म्या माझ्या कवितेतून माझ्या जगण्याची मजा शोधतंय, विसुभाऊ तेंच्या गाण्यातून जगण्याची मजा शोधतंत, केळुरीकर मास्तर तेंच्या पेटीवादनातून तर निरंजनपंत तेंच्या मनात आपल्या संस्कृतीबद्दल असलेल्या आदरातून, तर जनू नाडकर्णी… आपल्या… अजून खयच्यातरी गोष्टीतून जगण्याची मजा शोधतंत.’
वास्तविक जनू नाडकर्ण्याचा नाव अचानक दाजीच्या तोंडावर इल्यानंतर दाजीकाका जरासो ओशाळलो. कारण जनू नाडकर्ण्याच्या जगण्यातल्या मजेचा स्त्रोत खंयसर आसा ता कोणाकंच म्हायत नव्हता.कारण आजपर्यंत खयसरय कायोव झाला तरी जनू नाडकर्णी आपल्या अचरट पिंकोच टाकत इलेलो होतो. तेवढ्यात दाजी पुढे बोलूक लागलो, ‘म्या आता एक काम करतंय जेणे करून सगळ्यांचोच मूड जरा चांगलो होईत. तुमका सर्वांका एक कविता वाचून दाखवतंय. कवितेचा नाव हा…’
ह्या दाजी म्हणता ना म्हणता तोच खालच्या आळीतले ऐंशीच्या घरात असलेले जोशी मास्तर, ‘अरे वा, घ्या इलो सगळ्यांचो मूड परत, चला रे सगळे एकमेकांच्या घरी’ असे बोलताच दाजी काका म्हणजे भलतोच हिरमुसलो आणि लहान पोरां जशी खेळता खेळता रूसवो वैगेरे धरतात तसो त्या दाजीचो चेहरो थयसर झालेलो होतो.
तेवढ्यात पंढरी कामतान आपल्या वर्‍हाड्यात बसान ‘द रावडी केळुरीकर्स’ या आमच्या वॉटसॅप ग्रुपावर मेसेज टाकली, ‘या वर्षीच्या गांधी जयंतीचा काय करूचा? सरपंच?’ असो मेसेज टाकल्याबरोब्बर एवढे दिवस गप्प असलेल्या मास्क निषेध संघटनेच्या सदस्यांका चेव चढलो. त्या संघटनेच्या अध्यक्षांसकट सगळ्यांनी वॉटसॅपवरतीच विरोध प्रदर्शना सुरू केली. सुरुवातीक अतिउत्साहाच्या भरात जसं शत्रू देशाकडून आपल्या देशाबद्दल कायतरी आक्षेपार्ह वक्तव्य केला जाता आणि मगे कुणा बँकेतून रिटायर झालेल्या आणि समाजसेवेची आवड असलेल्या एखाद्या समाजसेवकाच्या नेतृत्वाखाली शत्रूदेशाविरोधात आपल्याच देशातल्या खयच्याशा बसस्टॉपावर वैगेरे उभे रावान निषेधसभा वेगेरे घेतल्यो जातंत तसाच मास्क निषेध संघटनेचे सदस्य हे आपल्याच प्राईवेट ग्रुपावरती सरपंचांविरुद्ध घोषणावजा मेसेजेस टाकत होते. नंतर जेव्हा तेंच्या हे लक्षात इला तेव्हा तेनात्योच मेसेजेस वजा घोषणा त्यांनी द रावडी केळुरीकर्सवर फॉरवर्ड केल्यो. ‘सरपंच हाय हाय’, ‘गांधीजयंती झालीच पाहिजे’, ‘केळुरीत आणूसाठी शांती, करा गांधीजयंती’ ह्यो अशा प्रकारच्या घोषणा वॉटसॅपवर पडूक लागल्यो.
वास्तविक सरपंचांनी गांधीजयंतीची प्लॅनिंग आधीच करून ठेवलेली होती. पण सरपंच ग्रुपावर मेसेज टाकणार तेवढ्यात पंढरी कामतान गांधीजयंतीचो विषय काढलो, आणि मास्क निषेध संघटनेन तेचो नको तितको अतिरेक केलो. पण त्यावर गप्प बसतील ते आमचे केळुरीतले सरपंच कसले! त्यांनीसुद्धा लगेच, ‘अरे गप रवा रे शिंच्यांनो! तुमी म्हणजे लग्न होऊच्या आधीच घटस्फोट घेऊन मोकळे! अरे मेल्यांनो, विचारा तरी काय तयारी केली हा की नाय हा म्हणान?’ तेवढ्यात पाच सेकंद सगळो वॉटसॅप ग्रुप गप्प. पुन्हा मगे सरपंचांनी गांधीजयंतीच्या कार्यक्रमाविषयी सांगितल्यान आणि गांधी जयंतीच्या दिवशी सगळ्यांनी ठीक सकाळी नऊ वाजता ग्रमपंचायतीच्या सभागृहात जमूक व्हया अशी सक्त ताकीद दिली.
दोन ऑक्टोबरचो दिवस उजाडलो. सगळे केळुरी ग्रामस्थ ग्रमपंचायतीच्या हॉलात जमत होते. पंचायतीचे काही सदस्य गांधीजींचो फोटो वैगेरे लावत होते, तेंच्या फोटोच्या आजूबाजूक फुलांनी सजवत होते. हॉलमधे शिरल्या शिरल्याच उजव्या बाजूक चहा आणि नाश्ता ठेवलेलो होतो. थय धर्मा धाकणकर रेंगाळत होतो आणि परत परत भांड्यांमधे आणि चिवड्याच्या वैगेरे डब्यात डोकावत होतो आणि हळूच एखाद्या लाडवाची किंवा थोड्याशा चिवड्याची कुणाच्याही नकळत तोंडाशी भेट घडवत होतो. एकदा निरंजनपंतांनी तेका विचारल्यान तेव्हा, ‘काय नाय हो जरा चाखून बघत होतो, मीठ–मसालो, साखर वैगेरे बरोबर हा की नाय म्हणान!’ दुसर्या बाजूला ‘एव्हरीडे विथ कृष्णा नाईक’चो संपादक कृष्णा नाईक तिथे बिनदिक्कतपणे नाश्त्यात असलेले पोहे हाणीत बसलो होतो आणि मधे मधे सुर्र सुर्र करून चहा पीत होतो. वास्तविक खयच्याय कार्याचो शुभारंभ किंवा सुरूवात ही श्रीगणेशाचा नाव घेऊन करतंत आणि ता कार्य संपताना श्रीकृष्णार्पणमस्तु असा म्हणतात. पण आमच्या केळुरीत उलटा होता. हय पंक्तीक सगळ्यात पहिलो मान ह्यो आमच्या कृष्णाकूच मिळयो. कारण तेका कारणंही तसाच झाला होता. एकदा केळुरीतल्या वार्षिक सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेत कृष्णाक जेवणाच्या पंक्तीत पापड मिळालेलो नव्हतो आणि म्हणान तेना त्या पापडाचो राग म्हणान कमल्या जवळकराकडून तेचो कॅमेरो घेऊन सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेच्या फोटोमधले सरपंचांचे फोटोच डेलीट करून टाकलेले होते. म्हणान तेव्हापासून सरपंचांच्या खास आग्रहावरून गावात खयचाय कार्य असो, अगदी कुणाचा बारसासुध्दा असो, कृष्णा झंय उभो रवायचो सहसा थयसूनच रांग किंवा जेवणाची पंगत सुरू व्हायची.
‘चला सगळे केळुरी ग्रमस्थ हंय येवा,’ सरपंचांनी हाक मारल्याबरोबर सगळे केळुरी ग्रामस्थ हॉलामधे एका ठिकाणी जमा झाले. गांधी जयंतीचो कार्यक्रम सुरू करण्याआधी सरपंचांनी येत्या पंधरा दिवसात केळुरीत लसीकरण होणार असल्याची घोषणा केली. सगळ्या केळुरी ग्रामस्थांनी तेका सहमती दर्शवली. ‘तर सगळ्यात आधी विसुभाऊ आणि मंडळी आपल्या मधुर अशा गाण्यान या कार्यक्रमाचो शुभारंभ करतील आणि मगे सगळ्यांनी ‘अहिंसेचा माणसाच्या आयुष्याला महत्व’ या विषयावर भाषण देऊचा हा,’ गांधी जयंतीच्या कार्यक्रमाचो सूत्रसंचालक असलेलो नाना देसायांचो मधू हरिभाऊ सहस्त्रबुद्देंच्या सुलोचनाकडे बघत म्हणालो. ठरल्याप्रमाणे मगे विसुभाऊ आणि मंडळींनी आपल्या गण्यान गांधीजयंतीच्या कार्यक्रमाचो शुभारंभ केलो. ह्या वेळेक खयचाच गणेशस्तवन किंवा नांदी न घेता विसुभाऊ आणि मंडळींनी गांधीजींच्याच ‘वैष्णव जन तो’ या भजनान गांधी जयंतीच्या कार्यक्रमाची सुरूवात केली. ही सर्व मंडळी भजन म्हणत असताना थयसून मोठमोठ्या ऑरकेस्ट्रामधे जशे तेंचे मास्तर पुढे उभे रवान छोट्यो काठ्यो घेऊन हातवारे वैगेरे करत आसतंत, तसाच दामलेबुवा जनू नाडकर्ण्याची कधीही बंद न होणारी छत्री हातात घेऊन थयसर त्या भजनाच्या तालावर हातवारे करूक लागलो. विसुभाऊ, बाबूराव गोखले वैगेरे मंडळी ‘मन अभिमान न आणे रे’पर्यंत पोहचले, मात्र तोच दामलेबुवांका अचानक काय झाला काय म्हायत, तेना म्हणजे अगदी तीच ओळ रेटून नाट्यसंगीतासारखी आलापी घेऊक सुरूवात केली. ‘ओ ओआ…’ आणि आलापी घेत असतानाच नरड्याची अशी काही करामत केली की वैष्णव जन तो वरून तेना म्हणजे अचानक ‘मिटता कमलदल, होई बंदी भृंग, परि सोडी ना ध्यास, गुंजनोत दंग, घेई छंद मकरंद’ ह्या अगदी वसंतरावांच्या चालीत म्हणूक सुरुवात केली. एवढा वेळ अगदी विलंबित लयीत चालत असलेल्या ‘वैष्णव जन तो’ भजनान आता म्हणजे वेगळाच रूप धारण केलेला होता. एवढा वेळ विलंबित लयीत वाजत असलेल्या तबल्यान आता द्रूत गतीपेक्षाही जास्तंच वेग धरलेलो होतो आणि तबल्यावर असलेलो केळुरीकर मास्तराचो एकुलतो एक झिल सुबल तबलो वाजवता वाजवता सगळोच हालत होतो. ‘अहो मकरंद, करा तुमचा गाणं बंद!’ दाजी काका टिंब टिंब आणि बरेच काही हो आपल्या हातात असलेलो काव्यसंग्रह दामलेबुवाच्या पाठीवर मारत तेका गप्प बसण्याचो सल्लो देऊक लागलो. तेवढ्यात विसुभाऊ, ‘मेल्या तू म्हणजे दर वेळेक असाच कायतरी करतंस आणि वाट लावून टाकतंस कार्यक्रमाची. मकरंद खयसून इलो अता हय?’
‘अंह म्या ता जरा एक जरा व्हेरिएशन घेऊ या!’ तोंडात उजव्या बाजूक असलेला पान कुरवाळीत दामले बुवा म्हणाले.
‘असला कसला पण ता वेरिएशन, अरे तेका कायतरी ठेहराव तरी आसूक नको? कसला रे वेरिएशन!’ बाबूराव म्हणजे पेटलोच.
करता करता गाण्याशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेले जनू नाडकर्णी, धर्मा धाकणकर वैगेरे मंडळी त्या चर्चेत उतरूक लागली. करता करता त्या चर्चेन भांडणाचा रूप घेतल्यानी होता. तेवढ्यात सरपंचांनी थयसर मध्यस्थी करून ता भांडण मिटवला आणि मगे ठरलेल्या कार्यक्रमानुसार सगळे आमचे केळुरी ग्रामस्थ ‘माणसाच्या आयुष्यातला अहिंसेचा महत्व’ या विषयावर एकएक करून भाषणा देऊक लागले.

– शिवप्रणव आळवणी

(लेखक प्रशिक्षित अभिनेते आहेत)

Previous Post

निलंगा राईस, बाजार आमटी आणि गोळ्यांची आमटी

Next Post

आठवणीतली कंदीलांची एकजूट!

Next Post

आठवणीतली कंदीलांची एकजूट!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.