ज्या चित्राची होळीपेक्षाही बोंबाबोंब चालली होती ते यश चोपडा यांचं ‘सिलसिला’ हे चित्र एकदाचं गेल्या शुक्रवारी मुंबईत झळकलं. यश चोपडा यांच्या नावातच यश असल्यामुळे त्यांच्या ‘यशराज’ संस्थेची सुरुवातीची चित्रं गाजली. ‘दीवार’ने यशाची नि पैशाची एक प्रचंड ‘दीवार’ उभी केली, तर कभी कभी प्यार की दास्तान भी कमजोर होने से भी पैसे दी जाती है. त्याप्रमाणे ‘कभी कभी’ चित्र भरपूर पैसा नि यश देऊन गेलं. ‘काला पत्थर’मध्ये अमिताभ, राखी, शशी कपूर, नितू सिंह, शत्रुघ्न सिन्हा, परवीन बाबी आणि इतर बाबी ष्टार काष्ट असूनही डोक्यात अचानक कुणीतरी पत्थर घालावा तसा घणाघाती घाव यश चोपडा यांना पडला. पिक्चर ‘मिझरेबल फ्लॉप’ गेलं. मग त्यांनी छोट्या कलावंतांना घेऊन ‘नुरी’ हे चित्र दिलं. ‘नुरी’ने धंदा चांगला केला पण ‘नाखुदा’ या छोट्या चित्रानं काय केलं ते एक खुदा जाने! आणि आता ‘सिलसिला’ हे अमिताभ, जया, रेखा यांच्या खर्याखुर्या प्रेमाच्या गौप्यस्फोटावर चित्र तयार करण्याचा हा त्यांचा मागाहून ठरलेला संकेत कारण या ष्टोरीवर प्रथम दुसर्या कलाकारांची योजना केली होती. पण अमिताभबरोबर रेखाची निवड करताना जयाने त्या चित्रात काम करण्याचा इरादा जाहीर केला नि मग या कथेला कलाटणी वेगळी देऊन या त्रिकुटाच्या भानगडीचा चित्राच्या यशाला हातभार लागेल असं यश चोपडाना वाटलं, म्हणूनच चित्र झळकल्याबरोबर ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड लागले आणि मग काय झालं ते मी तुम्हाला सांगायला हवं काय? ते जाऊ द्या. प्रथम तुमचे डोळे (येऊन गेलेले) ष्टोरी वाचण्याकडे लागले आहेत ना? मग घ्या…
शेखर एक लष्करातला पण तो भाकर्या भाजत असतो प्रेमाच्या. प्रेम करत असतो तो शोभावर तसंच भावासारख्या दोस्तावर अमितवर. अमित एक नाटककार. एका निर्मातीला भेटायला जातो. तिला भुरळ घालायला दोन-चार डायलॉग फेकतो. नजरेत नजर टाकतो आणि एका रात्रीत यशस्वी नाटककार बनतो. तसा हा नाटकंही खूप करतो. आपल्या प्रेमी संवादाची ‘कॅसेट’ चांदणीला देऊन तिच्या मशिनवर तो वाजवायला देतो. सोबत गुलाबाची फुलंही देतो. बस्स. चांदणी खूष! पडद्यावर नायिका लवकर फसतात नि फळतात तशी चांदणी फलते नि शोभा फळते. शेखर नि अमित लहानपणापासून नागड्याने एकत्र आंघोळ करणारे म्हणून त्यांचं प्रेम नि:सिम. शेखरने शपथ घेतलेली की, अमित तुझी शादी झाल्याशिवाय आपण नाही करणार!’ म्हणून अमित आपलं झटपट चांदणीशी जमवत असावा. पण एकाएकी कुठलं तरी युद्ध सुरू झाल्याचं ‘स्टॉक शॉट्सवरून समजतं आणि शेखर त्यात मरतो. (कॉन्ट्रॅक्ट संपतं) अमितला वाईट वाटतं. शोभाचं सांत्वन करणार कसा? कारण ती ‘बच्चे की मां’ बनणार असते. ती अमितला बाप बनण्याचं आव्हान करते नि अमित ते स्वीकारतो. चांदणी नकार दिलेल्या डॉक्टरचं तेथॉस्कोप गळ्यात अडकवून घेते. विचारचक्रात अडकलेला अमित शोभाला गाडीने घेऊन जात असताना अपघात होतो तो शोभाच्या पोटातलं शेखरचं पाप पाडण्यासाठी. आता कई वांदू नथी. पण छे! अमितचं पूर्वीचं प्रेम रॉजर्स सोड्यासारखं फस्कऽऽकन उफाळून बाहेर येतं. दोघंही एकमेकांना भेटू लागतात. होळीच्या दिवशी भांगेतून ते आपलं पूर्वीचं लफडं जाहीर करतात. शोभाला नि डॉक्टरला ते समजतं.
डॉक्टर मुंबईला येतो. अमित आपल्या बायकोला सर्व काही सांगून बॅग घेऊन चांदणीसह निघून जातो. तेथे डॉक्टरच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी समजते. अमित जळक्या विमानातून डॉक्टरला वाचवतो. तत्पूर्वी शोभा त्याला सांगते की माझ्या पोटात ‘मिनी अमित’ आहे. त्यामुळे तो सुखरूप घरी परततो. पुन: कधीही कुठल्याही बाईबरोबर न जाण्यासाठी. यहां सिलसिला खत्म.
अशी मामुली कथा. तीही आजकालच्या झपाट्याच्या फिल्मी दुनियेत इतकी ‘स्लो’ आहे की कोणालाही जुन्या जमान्यात वावरतोय असं वाटंल. कथेत फालतूपणा एवढा ठेवलाय की हे यश चोपडा यांचं चित्रच आहे का अशी शंका येते. गोष्टीचं स्थळ काश्मीर दिल्ली की फॉरेन हे कळायला मार्ग नाही. अमित शेखर यांच्या आंघोळीचा दाखला शेखर आपल्या बोलण्यात देतो मग तो सीन मोठेपणी उगाच दाखवण्यात काय साधलं? शिवाय त्यात एक साबणाचा पंजाबी जोक आहे तोही साबणासारखाच बुळबुळीत झालाय. इथल्या ‘पब्लिक’च्या तो डोक्यावरून सटकतो. कुणी हसत नाही. सर्वात कथा लेखकाचा बिनडोकपणा म्हणजे अमित घरातून न बोलता- म्हणजे कुठे जातो ते न सांगता निघून जातो. मग डॉक्टरच्या विमानाला अॅक्सीडेंट झालाय ते शोभा टेलिफोनवरून दूरवरच्या नेमक्या ठिकाणी कसं कळवते? आणि चांदणी नि अमित आपण बस पकडतो तसे हेलिकॉप्टर पकडून उडत अपघात स्थळी येतात. वाऽऽरे वा! काय ष्टोरी रायटरची उंच भरारीही? असो!
कलाकारात अमिताभ-रेखा हे चांगले कलावंत असले तरी जया बच्चनने आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना चांगल्या कामाची झलक दाखवलीय. संजीवकुमार हा तर उत्तम कलाकार आहे. के.जी. यांची फोटोग्राफी झकास आहे. रंगसंगती चांगली आहे. ज्या तर्हेनी शिवकुमार नि हरीप्रसाद यांच्या संगीताची पब्लिसिटी केली त्या मानाने म्हणायचे झाले तर त्यांनीही अपेक्षाभंगच केलाय. त्यांच्यासारख्या वादनकाराकडून रसिकांच्या अपेक्षा फार उंचावल्या होत्या. त्या चित्र जसं घसरलं तशा खाली आल्या. त्यांना या चित्रामध्ये भरपूर स्कोप होता की नव्यांना तो मिळत नाही.