गणपतीबाप्पाला निरोप देताना भक्तीची ओंजळ भरलेली असते; मग त्या ओंजळीत जनतेच्या पैशांची उधळण आणि निसर्गाची वेदना का असावी? दरवर्षी तोच खर्च करण्यापेक्षा एकदाच अशी व्यवस्था उभी करूया, जी पुढच्या अनेक वर्षांची गरज भागवेल…
गणेशोत्सवात घराघरांत आनंदाचे वातावरण निर्माण होते. आरतीचे स्वर, ढोल-ताशांचा नाद आणि भक्तीने भारलेले वातावरण यामुळे संपूर्ण महाराष्ट्र गणेशमय होतो. मुंबईपासून कोकणापर्यंत, ठाण्यापासून पुण्यापर्यंत आणि गावागावांत गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच गणेशोत्सवाच्या परंपरेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याऐवजी, या उत्सवाची व्यवस्था अधिक चांगली, शाश्वत आणि पर्यावरणपूरक कशी करता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवातील सर्वांत भावनिक क्षण असतो तो विसर्जनाचा. बाप्पाला निरोप देताना डोळ्यांत पाणी असते आणि मनात पुन्हा पुढच्या वर्षी लवकर या, अशी भावना असते. मात्र याच विसर्जनाच्या व्यवस्थेकडे आता वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज आहे. अनेक शहरांमध्ये दरवर्षी गणेश विसर्जनासाठी तात्पुरते कृत्रिम तलाव उभारले जातात. जागा निवडली जाते, खोदकाम केले जाते, पाणी भरले जाते, सुरक्षा व्यवस्था उभारली जाते. विसर्जन झाल्यानंतर तलाव रिकामा करणे, गाळ आणि कचरा काढणे आणि जागा पूर्ववत करण्यावर पुन्हा खर्च होतो. पुढच्या वर्षी पुन्हा तीच प्रक्रिया सुरू होते. दरवर्षी खणायचे, दरवर्षी भरायचे, वापरायचे आणि पुन्हा त्याच व्यवस्थेवर खर्च करायचा याला आता कायमस्वरूपी पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. प्रश्न असा आहे की, दरवर्षी लाखो रुपये खर्च करून तात्पुरते कृत्रिम तलाव उभारण्यापेक्षा काही प्रमुख ठिकाणी एकदाच कायमस्वरूपी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्था उभारता येणार नाही का? सार्वजनिक पैसा हा एका वर्षाची व्यवस्था करण्यापुरता मर्यादित न राहता भविष्यातील कायमस्वरूपी सुविधांसाठी वापरला गेला पाहिजे.
ठाणे शहरातील मासुंदा तलाव परिसरातील दत्त घाट हा अशा विचारासाठी एक संदर्भबिंदू ठरू शकतो. अर्थात, महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी त्याच स्वरूपाची रचना करावी असे नाही. प्रत्येक शहराची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. कुठे समुद्र आहे, कुठे खाडी आहे, कुठे नदी आहे, तर कुठे तलाव आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पर्यावरणीय आणि तांत्रिक अभ्यास करून कायमस्वरूपी ‘दत्त घाट’ किंवा त्यासारखी विसर्जन सुविधा उभारण्याचा विचार झाला पाहिजे. कायमस्वरूपी विसर्जन घाट म्हणजे केवळ दगड, सिमेंट आणि पाण्याची व्यवस्था नव्हे. भाविकांना सुरक्षितपणे मूर्ती विसर्जित करता आली पाहिजे. निर्माल्य वेगळे जमा झाले पाहिजे. प्लास्टिक, थर्माकोल आणि इतर कचरा पाण्यात जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. विसर्जनानंतर मूर्तींचे अवशेष आणि गाळ योग्य पद्धतीने बाहेर काढण्याची व्यवस्था असली पाहिजे. पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि परिसराची देखभाल यांचेही नियोजन झाले पाहिजे.
याच ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा विचार पुढे येतो. सध्या तात्पुरत्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन झाल्यानंतर ज्या पद्धतीने मूर्ती बाहेर काढल्या जातात, त्याच धर्तीवर कायमस्वरूपी कृत्रिम तलावाची रचना करता येईल का? विसर्जन झाल्यानंतर मूर्ती आणि त्यांचे अवशेष तलावातून सुरक्षितपणे बाहेर काढता येतील का? पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येईल का? गाळ वेगळा करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावता येईल का? या सर्व प्रश्नांचा जलतज्ज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ, स्थापत्य अभियंते, जलव्यवस्थापन तज्ज्ञ आणि स्थानिक प्रशासन यांनी संयुक्तपणे अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. ही कल्पना केवळ चर्चेपुरती न राहता तिचे वैज्ञानिक परीक्षण झाले पाहिजे. एखाद्या ठिकाणी कायमस्वरूपी कृत्रिम तलाव शक्य असेल तर त्याचे मॉडेल तयार करता येईल. त्याची क्षमता, खर्च, देखभाल, पाण्याची प्रक्रिया, मूर्ती बाहेर काढण्याची यंत्रणा आणि पर्यावरणीय परिणाम यांचा अभ्यास करता येईल. प्रयोग यशस्वी झाला तर महाराष्ट्रातील इतर शहरांसाठीही त्यातून मार्गदर्शक तत्त्वे तयार करता येतील.

या व्यवस्थेचा मोठा फायदा म्हणजे नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण कमी करणे. समुद्र, नदी, खाडी किंवा तलाव हे केवळ विसर्जनासाठीचे पाणी नाही. त्यामध्ये असंख्य जलचर, मासे, सूक्ष्मजीव आणि इतर जीवसृष्टी असते. किनारी भागात खारफुटीची परिसंस्था असते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात जलस्रोतांवर अतिरिक्त भार पडू नये, यासाठी नियोजनबद्ध पर्याय आवश्यक आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या महानगरांमध्ये हा विषय अधिक संवेदनशील आहे. वाढते काँक्रीटीकरण, कमी होत चाललेल्या मोकळ्या जागा आणि जलस्रोतांवरील वाढता ताण यामुळे प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागतो. समुद्र हा कचरा स्वीकारणारा अमर्याद परिसर नाही. नदी आणि तलाव हेही केवळ विसर्जनासाठीची ठिकाणे नाहीत. त्यांच्याशी संपूर्ण पर्यावरणीय व्यवस्था जोडलेली आहे.
कोकणातील गणेशोत्सवाची परंपरा घराघरांशी जोडलेली आहे. त्यामुळे तेथे स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून व्यवस्था उभारावी लागेल. पुणे आणि नाशिकसारख्या नदीकाठच्या शहरांमध्ये नदीचे संरक्षण लक्षात घेऊन पर्यायी विसर्जन केंद्रांचा विचार होऊ शकतो. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तलावांसाठीही स्थानिक गरजेनुसार वेगवेगळी मॉडेल्स तयार करता येतील. संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच पद्धत न लादता स्थानिक परिस्थितीनुसार कायमस्वरूपी विसर्जन धोरण तयार करणे अधिक योग्य ठरेल.
यात निर्माल्य व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. फुले, हार, दुर्वा, नारळ आणि इतर पूजेच्या वस्तू थेट जलस्रोतांमध्ये जाण्यापासून रोखल्या पाहिजेत. कायमस्वरूपी विसर्जन केंद्रांमध्ये स्वतंत्र निर्माल्य संकलन व्यवस्था असावी. जैविक निर्माल्यापासून कंपोस्ट तयार करता येईल, तर प्लास्टिक व इतर कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करता येईल. त्याचबरोबर शाडू माती आणि नैसर्गिक रंगांच्या पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर वाढवणेही आवश्यक आहे. भाविकांच्या भावनांचा सन्मान या संपूर्ण प्रक्रियेत सर्वांत महत्त्वाचा आहे. नागरिकांना दोष देण्यापेक्षा त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि श्रद्धेला अनुरूप पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. चांगली सुविधा दिली तर नागरिकही नक्कीच सहकार्य करतील.
आता गरज आहे ती केवळ गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या नियोजनाची नाही, तर पुढील अनेक वर्षांचा विचार करण्याची. प्रत्येक महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने दरवर्षी कृत्रिम तलावांवर होणारा खर्च, देखभाल खर्च, विसर्जनानंतरची स्वच्छता आणि पर्यावरणीय परिणाम यांचा अभ्यास करावा. त्यानंतर कायमस्वरूपी सुविधेचा खर्च आणि त्याचा दीर्घकालीन फायदा यांची तुलना करावी. जिथे कायमस्वरूपी सुविधा व्यवहार्य आहे, तिथे ती उभारण्याचा निर्णय घ्यावा. कारण दरवर्षी खर्च करणे ही व्यवस्था आहे; पण एकदाच खर्च करून अनेक वर्षे सुविधा देणे ही गुंतवणूक आहे. आज आपण एखादा कायमस्वरूपी विसर्जन घाट किंवा वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेला कृत्रमि तलाव उभारला, तर तो पुढील अनेक वर्षे उपयोगी पडू शकतो. त्याची देखभाल करता येते, सुधारणा करता येते आणि बदलत्या काळानुसार त्यात नवे तंत्रज्ञान जोडता येते. आज गरज आहे ती ‘दरवर्षीचा खर्च’ या मानसिकतेतून ‘एकदाची शाश्वत गुंतवणूक’ या मानसिकतेकडे जाण्याची. भक्तीला विज्ञानाची, परंपरेला पर्यावरणाची आणि उत्सवाला शाश्वत नियोजनाची जोड द्यायची आहे.
गणपती बाप्पा मोरया!
श्रद्धा जपू या, निसर्ग वाचवू या आणि जनतेचा पैसाही वाचवू या!
