केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अलिकडे खूप नाराज आहेत, हे लक्षात आल्यावर माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या त्यामागची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी त्यांना भेटला. पोक्या भेटायला गेला तेव्हा ते तुपात तळलेला समोसा खात पोक्याच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत होते. जुन्या दिवसांच्या आठवणी सांगत ते म्हणाले, पोक्या, अरे माझ्यासारखा रसिक खवय्या अख्ख्या दुनियेत सापडणार नाही. पूर्वी पक्षाचं काम करताना समोसा खाऊन झोपत होतो. त्यात समाधान होतं. आताचे कार्यकर्ते आणि नेते काय काय खातात आणि कुठल्या आलिशान हॉटेलात झोपतात हे सार्यांनाच माहीत आहे. रोज सकाळी अर्धा तास व्यायाम आणि योगासने करतो. कोरोना काळापासून जीवनाला एक शिस्त लावून घेतलीय. आजच्या जेन झी, झेन अल्फा पिढीला मी हाच सल्ला देईन की तुम्हीही माझं अनुकरण करा. तब्येत बिघडली तरी सत्ता, संपत्ती, सौंदर्य या सार्याचा काय उपयोग आहे? इथे बसला आणि एक मिनिटात हार्ट अॅटॅक आला की संपलेच सगळे. जन्माला एकटा आलेला माणूस एकटाच जाणार. सोबत घोडा नाही येणार, गाडी नाही येणार, बंगला नाही येणार, बायको नाही येणार, मुलं नाही येणार, कुणीच नाही येणार. खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलताही जायेगा… गडकरींच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले पाहताच पोक्याच्याही गालावरून अश्रू ओघळू लागले.
-गडकरी साहेब, कशाला अशी निरवानिरवीची भाषा करता? तुमच्यापुढे खूप मोठं आयुष्य पडलेय. अजून आपल्याला महाराष्ट्रातील आणि देशातील खड्डे बुजवायचेत, मोठमोठे मॉडर्न पूल बांधायचेत, इथेनॉलला राष्ट्रीय इंधन म्हणून मान्यता मिळवून द्यायचीय.
-पण लोकांचे माझ्याविषयीचे गैरसमज वाढत चाललेत, त्याचं काय! मी किती वेळा स्पष्ट केले की माझ्या मुलांच्या
इथेनॉल उद्योगाच्या भल्याचा विचार करत नाही तर देशाच्या भल्याचा विचार करतो. पण लोकांना ते पटत नाही. काहीतरी शंकाकुशंका काढत बसतात त्या मिथेनॉलविषयी.
-देशभरात ई-२० पेट्रोलविरोधात वाढलेला आणि दिवसेंदिवस ज्वालाग्राही होत चाललेला रोष. आंदोलने आणि वाहनधारकांच्या तक्रारीनंतर तुम्ही आपल्या भूमिकेत बदल करत गिअर बदलला अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे बोलले जातेय. याबाबत आपली भूमिका काय?
-वाटेल तसे वाटेल तेव्हा गिअर बदलण्याची सवय मला नाही. माझ्या बुद्धीला पटेल तेच मी करतो. मी आता थकलोय, पूर्वीसारखे जास्त काम करू शकत नाही, हेच खरे आहे.
-केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, संभाव्य खातेबदल यांच्या चर्चांना चांगलाच वेग आला होता, आताही तो तसाच आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही स्वत:च दोन पावले मागे घेण्याची तयारी केलीय का?
-मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात काय चालते, कसे चालते हे जगजाहीर आहे. मी त्यांना नको असेन तर त्यांनी तसे मला स्पष्ट सांगावे. तिथे अपमान सहन करत राहण्यापेक्षा आपल्या नागपूरला मायघरात येऊन मौजमजा आणि आराम करावा एवढीच माझी इच्छा आहे.
-ते ठीक असले तरी देशाच्या भवितव्याबद्दल तुम्हाला काय वाटते? विकासाबद्दल तुमची भूमिका काय? आणि सध्या एक ना धड भाराभर चिंध्या असे सरकारी प्रयोग, भ्रष्टाचाराचे तेल, तूप, लोणी लावून चाललेत, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?
-कुठे बोलू नका, पण तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असे चित्र वरिष्ठ नेतृत्वाच्या पातळीवर जनतेला दिसते. या माणसाचे काय चाललेय काय तेच समजत नाही. त्या कोवळ्या पोरांवर पॅलेट गन चालविण्याचे आदेश देणारे स्वत:चे समर्थन करतात तेव्हा लाज वाटते. आंदोलने आम्हीही केली आमच्या तरुणपणीच्या काळात. आणीबाणीत काय नाही सहन केले? त्यांतून ही अशी कुजलेली, नासलेली फळे मिळत असतील तर या विकासाला काय अर्थ? दोन माणसे देशाचे भवितव्य ठरवू शकत नाहीत. त्यासाठी विवेकबुद्धी शाबूत असावी लागते. सगळा पोरखेळ चाललाय. लोकांच्या खूप अपेक्षा होत्या भाजपाकडून. काहीतरी वेगळे चित्र पाहायला मिळेल देशात असे वाटले होते. पण निवडणुकीत फक्त खोटी आश्वासने, पचणार नाहीत अशा थापा, देशाला कर्जाच्या खाईत लोटण्याचे पाप आणि सामान्य माणसाचे जिणे हराम होईल, अशी महागाई यापलिकडे काय दिलं या सरकारने?
-पण त्यात तुमचाही वाटा होताच ना. तुम्ही जाब विचारायची हिंमत दाखवली नाही आणि आता त्रागा करताहात.
-खरं आहे ते. सत्तेला मुंगळा एकदा चिकटला की त्याला तिथून बाहेर पडणे मुश्कील असते. त्यात त्याचीही सोय असते. आज ना उद्या परिस्थिती सुधारेल या आशेवर तो दिवस ढकलत असतो. पण पदरी निराशा आली की हतबल होतो. गड्या आपला गाव बरा असे वाटू लागते. पुढचे सारे जीवन आरोग्यदायक विधायक खाण्यासाठी वेचणे हा एकच पर्याय आपल्यासमोर आहे.
-तुम्ही राजकारण्यांना काय संदेश द्याल?
-मी म्हणेन, माणसे ओळखायला शिका. पक्ष फोडण्याचा नारा देऊ नका. उठसूट जिकडे तिकडे एकच गेंगाणा आवाज ऐकून लोकांचे कान किटले आहेत. देश फक्त स्वत:च्या प्रसिद्धीसाठी ही भावनाच मुळात चुकीची आहे. देशासाठी बलिदान करणार्या वीरपुरुष आणि वीरांगनानी ही अपेक्षा कधीच केली नव्हती, पण धार्मिक द्वेषाला चालना देऊन दंगेधोपे घडवणे आणि आपली व्होट बँक मजबूत करणे हेच ज्यांचे एकमेव ध्येय असेल त्यांच्याकडे कसली अपेक्षा करणार?

