पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंतर मंतरवरील जेन झी आंदोलनानंतर काही दिवस रात्रीबेरात्री इन्स्टाग्रामवर येऊन, तरुण मुलांना ‘फ्रेंड्स’ असं संबोधून जेन झी पिढीशी ‘संवाद साधण्या’चा प्रयत्न केला, असं त्यांच्या भक्तगणांना वाटतं… संवाद दोन बाजूंनी होतो, एकतर्फी प्रवचनबाजीला संवाद म्हणत नाहीत, हे बाबा वाक्यम् प्रमाणम् पद्धतीच्या बौद्धिकांवर पोसलेल्यांना ठाऊक कसे असणार म्हणा! पण, मोदींच्या या तथाकथित अनौपचारिक ‘संवादसत्रा’तून जेन झीला(ही) एवढंच कळलं की पंतप्रधानांना कशावरून तरी वाचून दाखवल्याशिवाय कुणाशी अनौपचारिक संवादही साधता येत नाही… त्यांच्या चष्म्यातच प्रतिबिंब उमटलं होतं कागदांचं!
या तथाकथित संवादात मोदींनी ‘मला आणि माझ्या आईला खूप शिव्या दिल्या हो’ हे नेहमीचं रडगाणं गाऊन दाखवलं आणि त्याबद्दल कोणीही माफी मागितलेली नसताना त्यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या मनाने माफ केल्याचाही आव आणला. पंतप्रधानांना किंवा त्यांच्या आईला उद्देशून कोणीही शिवीगाळ करणं गैरच आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही- पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे ‘इतरांनाही आई असते हो!’ आणि आई कुणाचीही असो, ती पूजनीयच असते. आईचा अपमान व्हायला ती मोदींचीच आई असली पाहिजे का? एखाद्याच्या आईला ‘काँग्रेस की विधवा,’ ‘पचास करोड की गर्लफ्रेंड,’ किंवा ‘शूर्पणखा’ म्हटल्यावर तिचा सन्मान होतो का? आणि स्वत: इतरांच्या आईबद्दल या भाषेत बोलणार्यांना ‘माझ्या आईला शिव्या दिल्या हो’ म्हणून भोकाड पसरण्याचा अधिकार आहे का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिव्या देणे हे जर वाईट आहे तर त्या कोणीही कोणालाही देऊ नयेत, पंतप्रधानांचा अपवाद कशाला? शिवाय पंतप्रधानांनी आठवावं, आपण कधीतरी एका समुदायाला गाडीखाली आलेल्या कुत्र्याची उपमा दिली होती, एका समुदायाला मंगळसूत्रचोर, एका पक्षाला गायचोर असं काहीही ठरवून मोकळे झालो होतो, दीदी ओ दीदी अशी सडकछाप हाक आपण विरोधी पक्षातल्या एका महिला मुख्यमंत्र्यांना उद्देशून दिली होती… या सगळ्याची आठवण पंतप्रधानांनी स्वत:ला करून दिली, तर आपण जेन झींना फारच सिनियर आहोत, हे त्यांना कळून जाईल. त्याचबरोबर त्यांनी आपल्या आयटी सेलच्या आणि ट्रोल सेनेच्या गलिच्छ सोशल मीडिया पोस्टींवर एक नजर टाकली तर या सगळ्या गटारघाणीचे उगमस्थान आपला पक्ष आणि विचारधारेने जाणीवपूर्वक जोपासलेल्या विकृत शिवराळपणातच आहे, हेही त्यांच्या लक्षात येईल. देशाला खरा कल्चरल शॉक देणारा हा भस्मासुर त्यांनीच गेल्या १२ वर्षांत पोसून ठेवलेला आहे, आता त्याने त्यांच्याही डोक्यावर हात ठेवला आहे, इतकेच! त्यामुळे कदाचित इतरांना माफ करण्याआधी आपणच सगळ्या देशाची माफी मागितली पाहिजे, असाही उदार विचार त्यांच्या मनात येऊ शकतो.

पंतप्रधानांनी मोठ्या मनाने जेन झी विद्यार्थ्यांना माफ करण्याचा आव आणला, त्याचवेळी त्यांना पुरेपूर ओळखून असलेल्या राजकीय अभ्यासकांना कळलं की आता जेन झी आंदोलकांवर खरं अत्याचारसत्र सुरू होणार आहे. बोलायचं एक आणि करायचं दुसरंच, ही त्यांची दुतोंडी नीती नवी नाही. मोदींनी तरुणांना माफ केल्याचं सांगितलं, हा जणू त्या तरुणाईवर हल्ला चढवण्याचा इशाराच होता. मोदींनी माफ केल्याबरोबर ठिकठिकाणच्या मस्तवाल पोलिसांनी आणि अन्य कायदा सुव्यवस्था यंत्रणांनी आंदोलक विद्यार्थ्यांना शोधून शोधून त्यांची छळवणूक सुरू केली. गुजरातेत एका मुलीवर आरोपही न ठेवता तिच्याकडून २५० प्रश्नांची लेखी उत्तरं घेतली गेली. रुचिका या मुलीने आणि तिच्या आईने तिच्या कृत्याबद्दल वारंवार माफी मागितल्यानंतरही नाझी गेस्टापो असल्यासारखे पोलिस गाड्या भरभरून त्यांच्या घरी जाऊन धमक्या देत आहेत आणि आता त्यांची छळवणूक टाळण्यासाठी आम्ही आणखी काय करायला हवंय, असा प्रश्न तिच्या आईला पडला आहे.
मोदींच्या आईच्या अपमानाने खवळून उठलेले त्यांचे बैलबुद्धी भक्तगण आता जेन झी मुलींना बलात्काराच्या धमक्या देत आहेत, त्यांच्या आयांनाही तेच बोलत आहेत, उठसूट कोणाही मुलीला वेश्या म्हणून संबोधत आहेत आणि लहान मुलींचे दरपत्रक जारी करत आहेत. हे करताना आपणही ज्यांच्याबद्दल बोंबटतो आहोत, तेच कुसंस्कार आणखी हिंस्त्र स्वरूपात दाखवतो आहोत, याचे त्यांना भानही नाही. हा नंगानाच गृहखात्याला आणि राज्योराज्यीच्या पोलिसांना दिसत नाही, त्यावर कारवाई करण्याची हिंमत त्यांच्या सत्तेकडे गहाण पडलेल्या दंडुक्यात नाही. गेली १२ वर्षे महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्यापासून ते महाराष्ट्रात ठाकरे, पवार परिवाराची गलिच्छ भाषेत मानहानी करण्याचा कुटिरोद्योग सोशल मीडियावर निर्वेधपणे सुरू आहे. असल्या दळभद्री गणंगांना साक्षात पंतप्रधानच फॉलो करतात. त्यांच्यावर आजवर किती खटले दाखल झाले?
अभिजीत दिपकेच्या वडिलांचं उत्पन्न किती, त्यांनी मुलाला अमेरिकेत शिकायला कसं पाठवलं, याच्या उठाठेवी करणार्यांना आणि जंतर मंतरवर स्विगी-झोमॅटोच्या माध्यमातून अन्न पाठवणार्यांच्या उत्पन्नाची सखोल चौकशी करायला निघालेले निलाजरे खासगी असूनही सरकारी असल्याचा बनाव रचणार्या पीएम केअर फंडाचा हिशोब मागत नाहीत. संपूर्ण देशाचं श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिरातल्या घोटाळ्यानेही ते व्यथित झालेले दिसत नाहीत. देशातल्या तरुणाईच्या आंदोलनामध्ये पाकिस्तानी आणि चिनी कारस्थान शोधणारा गांडूळ छाप गोदी मीडिया काश्मीरमध्ये सरकारच्या सोयीने पोलिसांच्या वेषात दहशतवादी कसे उगवतात, गुजरातचा बनावट पोलादपुरुष गृहमंत्रीपदावर असताना बांगलादेशी घुसखोर एवढ्या मोठ्या संख्येने देशभर कसे पसरतात आणि चीन भारतीय भूमीवर गावं कशी वसवतो, त्याने नेमकी किती जमीन बळकावली आहे, हे प्रश्न सत्तेला विचारू धजत नाही. तिथे त्याची जीभ लुळी पडते.
गेल्या १२ वर्षांत देशात फक्त अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असंस्कृत मंदभक्तच निर्माण व्हावेत, अशा प्रकारे शिक्षणाचं जाणीवपूर्वक वाटोळं करण्यात आलेलं आहे. त्याचीच फळं देश भोगतो आहे. त्याबद्दल भाजप देशाची माफी कधी मागणार?
