झुरळ पाहून बायका घाबरतात, काही वेळा पुरुषही घाबरतात, हे मी पाहिलेलं आहे. पण, झुरळ पाहिल्यावर बैल बिथरलेले पहिल्यांदाच पाहिलं गेल्या आठवड्यात. असं कसं झालं असेल?- विनायक जोशी, पाटण
याचे उत्तर त्याच सुप्रीम बैलाला विचारा, ज्याला आता झुरळाला पण झुरळ बोलायची भीती वाटत असेल. (पण तुम्ही निगेटिव्ह बोलू नका… नशीब समजा कोणी झुरळाला मच्छर बोलले नाही. कारण एक मच्छर आदमी को क्या बनाता है, हे झुरळांना घाबरणार्यांना माहित असावं.)
आमच्याकडे हल्ली दर रविवारी कुठल्या ना कुठल्या रस्त्यावर एक धार्मिक संमेलन आयोजित केलं जातं आणि त्यात इतर धर्मांची भीती घालणं, त्यांची नालस्ती करणं, हा सगळा उपक्रम चालतो. ज्यांना धड माणूस बनणं जमत नाही, ते स्वत:ला धार्मिक कसे म्हणू शकतात?- सायली शेंडे, घाटकोपर
माणूस बनण्यासाठी किती व्याप आहेत आणि धार्मिक बनणं किती सोपं आहे, हे तुम्हाला माहित नाही का? आणि जे सोप्पं असतं तेच माणूस करतो… आणि तेच करणार्यांना तुम्ही म्हणता की ज्यांना माणूस बनता येत नाही ते धार्मिक कसे बनतात? सायली जी, आप बायोलॉजिकल नहीं हो क्या?
मध्यंतरी एक प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणाले की ते ज्यांची भक्ती करतात ते सत्पुरुष इतके ताकदवान आहेत की ते एखाद्या घृणास्पद गुन्ह्यातल्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा देऊ शकतात. हे सत्पुरुष इतके ताकदवान असतील, तर मुळात ते एखादा घृणास्पद गुन्हा घडू का देतात? – अमोल शेळके, निलंगा
प्रमोशनसाठी दुसरं काय करावं मग सेलिब्रिटींनी? आणि समजा हे प्रमोशन नसेल तर, घृणास्पद गुन्हे रोखणं, गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करणं हे ज्यांच काम आहे, त्यांच्याकडून ते काम होत नसेल, असं त्या सेलिब्रिटीना सांगायचं असेल. पण, ते सांगायची भीती वाटत असेल. कारण ज्या सत्पुरुषांची ते भक्ती करतात ते सत्पुरुष आपल्या पाठीशी नाही असं त्यांना वाटत असेल. किंवा आता देश चालवण्यासाठी सत्पुरुषचं येतील असंही ते सेलिब्रिटी म्हणतील, याची तुम्हाला भीती वाटत असेल.
आपल्या देशाची जेव्हा जेव्हा परदेशात बदनामी होते, तेव्हा तेव्हा आपल्या देशाच्या अधिकार्यांना (देशाचे नेते तर टेलिप्रॉम्प्टरशिवाय दोन शब्द बोलू शकत नाहीत) हा देश गांधींचा आहे, असं सांगून बचाव करायला लागतो… ज्यांचा वारसा इथे संपवायला निघालेत, त्यांचाच हवाला बाहेर द्यावा लागतो… काय ही केविलवाणी स्थिती!- विश्राम शिंदे, प्रभादेवी
जशी तुम्हाला ही स्थिती केविलवाणी वाटते, तसेच काहींना हा बेशरमपणा वाटतो. ज्यांना यातलं काहीच वाटत नाही त्यांच्यासाठी गांधींचं नाव घेणे ही चाणक्यनीती असते. म्हणूनच गांधींना मारूनही गांधी जिवंत ठेवावा लागतो आणि तुमच्यासारखे लोक म्हणतात गांधी कधी मरत नाही… असं काही लोकांना वाटतं…
उत्तर प्रदेशासारख्या सतत विकासाचे आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेचे ढोल बुलडोझरवरून पिटत असलेल्या राज्यात वादळ आणि वीजप्रपाताचे १००हून अधिक बळी गेले, ही बातमी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधानांना शोकसंदेश लिहिला, तेव्हा कळावी? सरकार, पत्रकार, माध्यमं झोपली आहेत की अंमली पदार्थाच्या नशेत आहेत! – परशुराम पाटील, अलिबाग
मग ही गोष्ट सुद्धा मेलोनीने सांगायला हवी होती का? कोणी, कितीही, काहीही सांगो, आम्हाला फरक पडत नाही, हे बघा ना… एवढी बातमी त्या पुतीनने सांगूनही आपल्या माध्यमांना पत्रकारांना त्यांच्या मालकांना,, त्या मालकांच्या नोकरांना काही फरक पडलाय का? आपण त्या पुतीनला काही किंमत दिली नाही हे समजून घ्या. त्याला कळलंच पाहिजे की त्याने आपला देश बघावा, आमच्या देशाला आग लावण्याचा प्रयत्न करू नये. आमचे आम्ही समर्थ आहोत. आला मोठा आम्हाला बातमी सांगणारा… शोकसंदेश पाठवण्याची त्याला काय गरज आहे? जे मेले ते काय त्याच्यासाठी मेलेत का? असा विचार ज्याला करता येत नाही तो कसला राष्ट्राध्यक्ष?
देशातला युवकांचा आक्रोश दडपण्यासाठी केंद्र सरकारने काय उपाय योजले पाहिजेत? तुमच्या सूचना काय आहेत?- दिनेश सुर्वे, मालवण
मेलडी खाओ… खुद जान जाओ. थोडक्यात काय तर तुम्ही स्वतः आक्रोश करा, तो दडपण्यासाठी सरकार काय उपाय करते ते तुमचं तुम्हाला कळेल…

