३ मार्च १९८५ या तारखेच्या अंकाचं हे मुखपृष्ठ… म्हणजे ४१ वर्षांपूर्वीचं. त्यात मराठी माणसाला तारेच्या कुंपणाने बांधून ठेवणार्या एकेका खुंटीचा मुद्दा पाहा. ४१ वर्षांत फक्त एक झालेलं आहे… बॉम्बेचं मुंबई झालेलं आहे… बाकीचे सगळे मुद्दे तसेच होते… कारण, बॉम्बेचं मुंबई होणं ही एक कागदोपत्री बदलायची गोष्ट होती, सोपी होती. बाकीच्या गोष्टी मात्र महाराष्ट्राच्या सरकारने, मुंबईतल्या सत्ताधीशांनी आणि मराठी माणसाने मिळून बदलायच्या होत्या. त्या जशाच्या तशा आहेत, अगदी उत्तर भारताची, दिल्लीची आणि परप्रांतीयांची लाचारीसुद्धा! महाराष्ट्रात मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, या साध्याशा मागणीचा धड पाठपुरावा इथल्या मंत्र्याला करता येत नाही. इथे कोणीही टिनपाट उठून महाराष्ट्राच्या राजधानीत महाराष्ट्राची भाषा बोलणार नाही, असं बेधडकपणे सांगतो आणि त्यासाठी संविधानाच्या कलमांचा दाखला देतो. हे होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यात हिंदी भाषा आपोआप सक्तीची कशी होईल, यासाठी युत्तäया शोधण्यात मग्न असतात. दिल्लीत सर्वोच्च सत्तास्थानी जाण्याचे डोहाळे लागलेले असले की उत्तर भारताची लाचारी पत्करावी लागतेच! व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपायी मराठी भाषेची, मराठी अस्मितेची पदोपदी पायमल्ली झाली तरी बेहत्तर. कधीकाळी शिवसेनेचं बोट धरून हा भस्मासुर मोठा झाला, याचे वैषम्य आज बाळासाहेबांनाही वाटलं असतं… त्यांनी केलेल्या आवाहनानुसार आता तरी मराठी माणूस जागा होईल का? आणि आता तो जागा होऊन काही फरक पडेल का? महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मराठी माणसाने कुर्हाडीच्या दांड्यामागे बळ उभं केलं आहे… ते पाहता आता हे बंध आणखी करकचून आवळले जाणार आहेत असेच दिसते.
