१३ नोव्हेंबर १९६० रोजीच्या मार्मिकवर रेखाटलेल्या या मुखपृष्ठचित्रात बाळासाहेबांनी भारताचे प्रथम पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर किंचित वक्र दृष्टिक्षेप टाकला आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेच्या प्रेमात पडलेले नेहरू देशांतर्गत प्रश्नांवर मार्ग काढण्यात कमी पडत आहेत, अशा आशयाची टीका व्यंगचित्रकार बाळासाहेबांनी केलेली दिसते. मात्र आज हे मुखपृष्ठचित्र पाहताना लक्षात येतं की नेहरूंना वास्तविक आंतरराष्ट्रीय ओळख होती, त्यामुळे या नवोदित गरीब देशालाही आंतरराष्ट्रीय मंचावर स्थान मिळालं होतं. अमेरिका आणि रशिया या दोन ध्रुवांमध्ये चिरफाळत चाललेल्या जगात दोन्ही महासत्तांपासून सुयोग्य अंतरावर राहणार्या अलिप्त देशांची चळवळ नेहरूंनी उभी केली होती आणि तिचे ते निर्विवाद नेते होते. म्हणूनच ते युरोपात असताना अमेरिकेने खास विमान पाठवून त्यांना आपल्याकडे बोलावले होते. त्यांना रिसीव्ह करायला अमेरिकेचे अध्यक्ष त्यांच्या विमानात आत गेले होते, सोबत घेऊन बाहेर आले होते. त्यांची दोन वेळा न्यूयॉर्कमध्ये मिरवणूक निघाली, तिला लाखो अमेरिकनांनी हजेरी लावली. याचीच पुनरावृत्ती जपानमध्येही झाली होती. कुणालाही मिठ्या वगैरे न मारता नेहरूंनी त्यांची विद्वत्ता, व्यक्तिमत्त्व आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष यांच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली होती. ते काय म्हणतात, याला जगात काही महत्त्व होतं. जगाला महत्त्वाचं वाटावं असं काही बोलण्याइतके ते प्रगल्भही होते… त्यांनी आणि नंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या त्यांच्या उत्तराधिकार्यांनी घडवलेली भारताची प्रतिमा आज कुठे आहे? आज विश्वगुरू हे आपण स्वत:च स्वत:ला चिकटवलेलं संबोधन जगात विनोदाचा विषय का बनलं आहे?

