मध्यंतरी कार्तिकी एकादशीच्या दरम्यान काही सामान घ्यायला नेहमीच्या दुकानात गेलेलो. मोठा उपवास जवळ आलाय हे लगेच जाणवलं, वेगवेगळे साबुदाणा, बटाट्याचे पापड, नाना प्रकारची पिठं, राजगिर्याचे लाडू-वड्या, वेफर्स यांच्या मधोमध काही चपट्या प्लास्टिकच्या पारदर्शक डब्यांमध्ये तसेच पिशव्यांमध्ये नेटकेपणानी बसवलेले खजूर रोल होते. उपवास केलाच पाहिजे असं बंधन नसलेली मंडळीही या सगळ्यांकडे कुतूहलाने बघत होती. बाकी तळकट तेलकट वगैरे पदार्थ असले, तरी पौष्टिक म्हणून खजूर रोल पटकन उचलले जात होते.
नैसर्गिक गोडवा व लोहासहित इतर जीवनसत्वांचे भांडार असलेले खजूर तसे आपल्या पूर्वापार परिचयाचे, मात्र त्यांचा चिकटपणा किंवा मध्ये असणारी बी, अशा निरनिराळ्या कारणांमुळे खजूर न आवडणारे माझ्यासारखे बरेच! अर्थात आजकाल बिनबियांचे खजूर सहज मिळतात आणि लाल खजुरांपेक्षा काळे, तसे कोरडे खजूरही उपलब्ध असतात. या खजूर रोलना बाजारात येऊन फार काळ नाही झाला, साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी जास्त बोकाळला हा प्रकार माझ्या आठवणीप्रमाणे. नवीन मिळायला लागले तेव्हा चव तर आवडलीच, पण खजुरांच्या चिकटपणापासून सुटका झाल्याचा आनंद जास्त झालेला मला!! येताजाता सहज मिळणारे हे रोल कसे बनवायचे हेही तेव्हा पेपरमध्ये वाचल्याचे व लगेच बनवून बघितल्याचे स्मरतेय.
वाटीभर बिनबियांचा खजूर घेऊन थोडा चेचायचा. मग चमचाभर साजूक तुपावर परतायचा, सतत चमचा फिरवावा लागतो बरं, जळका वास नको लागायला. खजूर गार होईपर्यंत भाजलेल्या काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड यांची, अर्थात जे आवडत असेल व उपलब्ध असेल ते घेऊन, भरड पूड करायची. परतवलेला खजूर मिक्सरवर थोडा फिरवून एकजीव गोळा झाला की पोळपाटाला तुपाचा हात लावून त्यावर जमेल तेवढा पातळ लाटून घ्यायचा. थोडा वाटलेला खजुराचा गोळा व सुक्यामेव्याची भरड एकत्र करून ते लाटलेल्या खजुराच्या पोळीवर एकसारखे पसरवायचे आणि हाताने हलका दाब देत ती पोळी गुंडाळायची. एकदा का एकसारखी गुंडाळी झाली की ती साधारण तासभर प्रâीजमध्ये ठेवायची. नंतर धारदार सुरीने गुंडाळीचे काप केले की खजूर रोल तयार! बनवायला फार काही कठीण नाहीये हा प्रकार आणि पौष्टिक तर नक्कीच आहे; त्याचबरोबर मला आवडते ती यातल्या प्रत्येक घटकाची लागणारी स्वत:ची चव! खजुराच्या माफक गोडव्यात गुंडाळलेल्या काजू बदामादी घटकांची आपापली चव वेगळी तर लागतेच, पण या निरनिराळ्या चवी परस्परपूरकही ठरतात, नाही का?
कुटुंबामध्ये, समाजामध्ये वावरताना आपण सगळेही निरनिराळे असतो, व्यक्तिमत्व, स्वभाव, आवडीनिवडी सगळंच वेगवेगळं! व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरं! अर्थात एकत्र राहताना नकळत सगळेच जण कमीजास्त प्रमाणात आपापल्या वैयक्तिक वेगळेपणाला बाजूला ठेवतोच. ते गरजेही असतेच, मात्र प्रत्येकात एक स्फुल्लिंग असते, खास असा पैलू असतो जो नक्कीच स्वत:बरोबर इतरांनाही उपयोगी ठरतो, जसे एखाद्यातली सकारात्कता, धडाडी, सर्वांना घेऊ चालण्याची वृत्ती, निर्भयता, करुणा असे अनेक. ते आपापले सकारात्मक वेगळेपण मात्र नक्कीच जपले आणि जोपासले पाहिजे!!
या स्वभाववैशिष्ट्यांप्रमाणे किंवा बाह्यरूपांप्रमाणे प्रत्येकाच्या अंतरंगीचा भावही भिन्न. कोणी भक्तिमार्गी तर कोणी कर्ममार्गी तर कोणाला ज्ञानमार्गाची ओढ! काय श्रेष्ठ किंवा काय कनिष्ठ हा भागच नाही, मुळात प्रत्येक मार्ग जर एकाच ध्येयाप्रत पोहोचवत असेल तर तो प्रत्येकच तेवढाच प्रबळ! कुणाचा भाव बदलवायला जाऊ नये, मात्र कौटुंबिक किंवा सामाजिक एकसंधता टिकवण्यासाठी परस्परांमधील प्रेमादराचा, सामंजस्याचा गोडवा नक्कीच आवश्यक असतो! एकदा का हे सामंजस्य आले की सहजीवन, समाजजीवन नक्कीच सुखकर होते.
माताजी श्री सारदादेवींच्या निस्सीम भक्त व सहचरी असलेल्या गोलापमाँ बोलायला अतिशय फटकळ होत्या. माताजी जेवढ्या मृदू, तेवढ्याच गोलापमाँ वरकरणी कठोर भासत. अर्थात त्यांच्या या स्वभावाला बदलवणं माताजींना सहजशक्य होतं, पण तसं न करता त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आब राखल्याने माताजींच्या जीवनात गोलापमाँच्या या फटकळपणाचा फायदाही झाल्याचे आढळते. वेळीअवेळी येणारे लोक, माताजींच्या सहृदयतेचा अवाजवी फायदा करून घेणारे अनेक भक्त म्हणवले जाणारे लोक यांना योग्य अंतरावर ठेवताना गोलापमाँचा फटकळपणा कामी येत असे. त्याचबरोबर एखाद्या वेळी विनाकारण करवादणार्या गोलापमाँना माताजींनी हळुवारपणे का होईना समज दिल्याची पण उदाहरणं आहेतच की. एकदा का हे स्वत:बरोबर इतरांचं विशेषत्व समजून घेतलं व स्वीकारलं की आपोआप प्रत्येक क्षण मधुर होत जातो, गोडमिट्ट नसलेल्या पण हवाहव्याश्या वाटणार्या खजूर रोलच्या माफक गोडीसारखाच, हे नक्कीच.