हिंदू जनांचा र्हास आणि अध:पात हे प्रबोधनकारांचं पुस्तक हा एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. त्याचा काही भाग प्रबोधनचे सहसंपादक बापूसाहेब चित्रे यांनी भाषांतरित केला आहे. प्रबोधनकारांच्या, विशेषतः पुण्यातल्या संघर्षाच्या काळात बापूसाहेबांचं योगदान महत्त्वाचं होतं. त्यांच्या अकाली निधनानंतर प्रबोधन कधीच सावरलं नाही.
– – –
हिंदू जनांचा र्हास आणि अध:पात हे प्रबोधनकारांचं एक गाजलेलं पुस्तक. प्रबोधनकार पुण्यात असतानाच १ डिसेंबर १९२६ला त्यांनी हे प्रकाशित केलं. हा त्यांना आवडलेल्या एका पुस्तकाचा अनुवाद आहे. बॅ. एस. सी. मुखर्जी यांच्या डिक्लाईन अँड फॉल ऑफ द हिंदूज हे ते पुस्तक. प्रबोधनकारांच्याच भाषेत, `मराठी पेहरावात मर्हाठ्यांच्या हाती पडणारा हा निबंध प्रथम इंग्रजी भाषेत कोलकत्त्याच्या इंडियन रॅशनलिस्टिक सोसायटीच्या सभेत तारीख ७ सप्टेंबर १९१९ रोजी लेखक श्रीयुत एस. सी. मूकरजी, बार-अट-लॉ यांनी वाचला. सोसायटीच्या मासिक बुलेटीनच्या नोव्हेंबर १९१९च्या अंकात तो छापून प्रसिद्ध झाला. `पुढे इंडियन डेली न्यूज या कोलकाताच्या दैनिकात हा दीर्घनिबंध क्रमश: प्रकाशित झाला. त्या काळात तो फारच गाजला. त्यामुळे इंडियन रॅशनलिस्टिक सोसायटीने हा निबंध पुस्तकरूपाने प्रकाशित केला.
प्रबोधनकारांना रॅशनलिस्टिक सोसायटीची ओळख करून दिली ती छत्रपती शाहू महाराजांनी. त्यांनी अमेरिकेच्या रॅशनलिस्टिक सोसायटीचे ग्रंथ प्रबोधनकारांना दिले होते. त्यानंतर प्रबोधनकार भारतात अशी विवेकवादी संस्था कुठे आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. तो शोध समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे यांच्यामुळे संपला. रघुनाथराव कर्वेंशी प्रबोधनकारांचा स्नेह असावा याचा दाखला प्रबोधनमधील कुटुंब नियोजनावरच्या लेखांमुळे मिळतो. त्यांना भेटायला गेलेले असताना त्यांनी प्रबोधनकारांना कोलकात्याच्या इंडियन रॅशनलिस्टिक सोसायटीचा पत्ता दिला. योगायोग म्हणजे कर्वेंची भेट घेऊन परतत असताना दादरच्या व्हीलरच्या स्टॉलवर त्यांना रॅशनलिस्टिक सोसायटीने छापलेलं एस.सी. मुखर्जींचं डिक्लाईन अँड फॉल ऑफ द हिंदूज हे पुस्तक दिसलं. त्यांनी ते लगेचच विकत घेतलं. हे प्रबोधन सुरू होण्याच्या आधी १९२० साली घडल्याचं अनुवादाच्या मनोगतात लिहिलं आहे.
या अंकात रॅशनल बुलेटिन या सोसायटीच्या मुखपत्राची जाहिरात होती. प्रबोधनकारांनी तातडीने सोयायटीचे नियम मागवून घेतले आणि ते सोसायटीचे सभासद तसंच बुलेटिनचे वर्गणीदार झाले. हे बुलेटिन मूळ इंग्लंडमधल्या `रॅशनलिस्ट प्रेस असोसिएशन`शी संबंधित होतं. प्रबोधनच्या १९२१ सालच्या सुरवतीच्या अंकांमध्ये इंडियन रॅशनलिस्टिक सोसायटीची जाहिरात येत असे. त्या सोसायटीच्या माहितीचा मजकूरही छापलेला होता आणि त्यातल्या विवेकवादी विचारांचा आग्रह यातून प्रबोधनकारांवर या संस्थेचा असलेला प्रभाव दिसून येतो. शिवाय बुलेटिनमधले मान्यवर बंगाली लेखकांचे लेख प्रबोधनकार विवेकवादी या टोपणनावाने भाषांतरित करून लिहित असावेत, असा अंदाज बांधता येतो.
डिक्लाईन अँड फॉल ऑफ द हिंदूज हे पुस्तक फारच महत्त्वाचं होतं. लोकहितवादींनी महाराष्ट्रातल्या ब्राह्मण समाजाच्या नैतिक अध:पतनाची चिकित्सा केली तसंच जन्माने ब्राह्मण असूनही बॅरिस्टर मुखर्जींनी या इंग्रजी ग्रंथातून हेच काम केलेलं आढळतं. त्यांनी या पुस्तकात केलेली चिकित्सा प्रबोधनकारांना आवडणारीच होती. प्रबोधनकारांनी लिहिलंय, प्रस्तुत पुस्तकातील निरूपण आणि विचार थेट माझ्या आचार विचारांशी जुळते मिळते असल्यामुळे त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याचा निर्धार केला. मुखर्जी तेव्हा बिहारमधल्या पाटण्यात राहायला होते. प्रबोधनकारांनी थेट त्यांच्याशी अनुवादाच्या परवानगीसाठी पत्रव्यवहार करायला सुरवात केली. ही परवानगी मिळवण्यासाठी त्यांना रामानंद चटर्जींची मदत झाली. रामानंदजी हे मॉडर्न रिव्यू मासिकाचे संपादक होते. दोघांची प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी पत्रव्यवहारामुळे दोघांचा अगदी घनिष्ट स्नेह जुळला होता. हा स्नेह इतका होता की परवानगी मिळवण्यासाठी रामानंद मुखर्जींनी एस. सी. मुखर्जींची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्याकडून अनुवादासाठी विनामूल्य लेखी परवानगी मिळवून पाठवून दिली.
परवानगी मिळाल्यानंतर प्रबोधनकारांनी भाषांतर करून एकेक भाग प्रबोधनच्या पहिल्या वर्षीच्या म्हणजे १९२१–२२ सालच्या अंकांमध्ये प्रकाशित होत होता. पुढे ही जबाबदारी प्रबोधनचे सहसंपादक रामचंद्र वामन म्हणजेच बापूसाहेब चित्रेंनी हाती घेतली. त्यांनी १९२२ साली प्रबोधनकारांना प्रबोधनच्या कामात मदत करायला सुरवात केली होती. प्रबोधनकार सातार्याला गेले तेव्हा ते पुण्यात एलएलबी करत होते. तेव्हा तर ते महिन्यातून दोनदा न चुकता प्रबोधनच्या कामासाठी पुण्याहून सातार्याला जात. प्रुफ तपासणं, मांडणी यात तर ते लक्ष घालतच. पण काही मजकूर स्वत:ही लिहित, तेही कोणता फायद्याचा विचार न करता केवळ स्वयंसेवक म्हणून. प्रबोधनकार दादरहून सातार्याला गेल्यानंतर मुंबईतून बापूसाहेबांनीच प्रबोधनचे चार अंक नीट प्रकाशित केले. सातार्यात अडचणीत आल्यावर प्रबोधनकारांना पुण्यात बस्तान बसवण्यात बापूसाहेबांनीच मदत केली.
प्रबोधनकार लिहितात, बापूसाहेब म्हणजे एक प्रेमळ मित्र, उमेदी लेखक, मनमिळाऊ व्यवस्थापक, उत्तम मुद्देसूद वक्ता आणि अक्षरश: सभ्य असा तरुण गृहस्थ… पुण्यातील माझे जीवन अत्यंत धडाडीचे आणि विरोधकांशी बोकडी टकरा देण्यातच खर्ची पडत असल्यामुळे, प्रबोधनाचे मासिक प्रकाशन वक्तशीर करण्याचे आणि छापखान्याची व्यवस्था पाहण्याचे काम बापूसाहेब चित्रे विलक्षण आपुलकीने पहात असत. शिवाय ते अगदी मनाने अगदी सरळ होते आणि छक्केपंजे त्यांच्या स्वप्नीही नसत, असंही प्रबोधनकारांनी नोंदवलेलं आहे. प्रबोधनमध्ये बापूसाहेबांचे विचार करण्यासारखे विचार, स्फुट लेख तसंच कलमबहाद्दरांस शेलापागोटे या सदरांत काही पुस्तक परीक्षणं असं लिखाण छापून आलं होतं. प्रबोधनकार सांगतात तसं त्यांचा मूळ पिंड अव्वल साहित्यिकाचा होता. त्यांचा बंगाली भाषेचा उत्तम अभ्यास आणि वाचन होतं. त्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्रा या काव्यनाटिकेचा मराठीत अनुवाद केला होता. तो प्रबोधनकारांनीच चित्रांगदा नावाने प्रकाशित केला.
पण त्यांचा ठसा उमटला तो हिंदूजनांचा र्हास आणि अध:पात या अनुवादाने. हे अनुवाद प्रकाशित होत असतानाच त्यांना अॅनिमियाने पछाडलं. त्यामुळे त्यांना पुणे सोडून कल्याणला जावं लागलं. तिथे उपचारांची पराकाष्ठा करूनही २८ मे १९२६ रोजी त्यांचा तिथेच मृत्यू झाला. तेव्हा त्यांचं वय अवघं २६-२७ वर्षांचं होतं. त्यांच्यामागे तरुण पत्नी आणि दोन लहान मुलं होती. जुलै १९२६च्या प्रबोधनमध्ये प्रबोधनकारांनी बापूसाहेबांवर श्रद्धांजलीपर टिपण लिहिलं आहे. त्यात त्यांनी बापूसाहेबांच्या प्रबोधनमधील योगदानाविषयी लिहिलं आहे, एखाद्या कार्याची धुरा आत्मस्फूर्तीने शिरावर घेणारा समानधर्मी सहकारी मित्र लाभणे, ही गोष्ट वर्तमानकाळी कठीण आहे. निदान, आमच्या प्रबोधन कार्यापुरतेच म्हणावयाचे तर अक्षरश: अशक्य आहे. प्रबोधन मुद्रणालयाच्या स्थापनेला व सुरवातीलाच त्यावर आलेल्या भटी गंडांतरांना ताड देऊन त्याच्या जोपासनेला जर कोणाची शांत, विचारी, धीरोदात्त आणि सहनशील वृत्ती खर्ची पडली असेल, तर ती एकट्या बापूसाहेबांचीच. व्यावहारिक बाबतीत आमच्या दोषांची स्थळे बापूसाहेबांनी आपल्या गुणांनी भरून काढलेली असत.
बापूसाहेब तेव्हा एलएलबीची परीक्षा देत होते. त्यांचा शेवटचा पेपर उरला होता. ते प्रबोधनकारांना नेहमी सांगत, या परीक्षेच्या त्रासातून मी मोकळा झालो की छापखाना व प्रबोधन या दोनहि जबाबदारीतून तुम्हांला मी मोकळा करीन. तुम्ही नुसते लेखन करा. इतर काहीही पाहू नका. पण हे प्रत्यक्षात घडलं नाही. प्रबोधनच्या धकाधकीत प्रबोधनकार एकाकी पडले. त्यांनी या धक्क्याचं वर्णन करताना म्हटलंय, माझ्या सार्या व्यवहारांचा नि सार्वजनिक धडपडीचा उजवा हातच तुटला. या धक्क्यातून प्रबोधन कधीच सावरलं नाही, असं म्हटलं तरी चालेल. बापूसाहेबांच्या मृत्यूनंतर पुढच्या १७ महिन्यांत मासिक प्रबोधनचे फक्त १० अंक कसेबसे निघाले आणि त्यानंतर प्रबोधन जवळपास दोन वर्षांसाठी बंदच पडलं. प्रबोधनकारांनी हिंदू धर्माचा र्हास आणि अध:पात हा ग्रंथ बापूसाहेबांनाच समर्पित केला आहे. त्याच्या अर्पणपत्रिकेत प्रबोधनकार लिहितात, अकाली तुटलेला तारा प. वा. रामचंद्र वामन ऊर्फ बापूसाहेब चित्रे, बी.ए. यांच्या दिव्यात्म्यास अर्पण.
या पुस्तकाच्या भाषांतराचं काम जवळपास पाच वर्षं रेंगाळलं होतं. बापूसाहेबांच्या मृत्यूनंतर प्रबोधनकारांनी ते मनावर घेतलं आणि पूर्ण केलं. अर्थातच त्याचा सुरवातीचा आणि शेवटचा बहुतांश भाग प्रबोधनकारांनीच केलेला असल्यामुळे त्यावर अनुवादक म्हणून त्यांचंच नाव होतं आणि त्यांच्या नावावर पुस्तक विकलं जाणार, हा व्यावहारिक विचारही असेलच. मुळात मुखर्जींचे विचार आजही क्रांतिकारी आणि बंडखोर ठरावेत असेच आहेत. हिंदू धर्माच्या अवनतीला ब्राह्मण जबाबदार असल्याचं अनेक ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे त्यात मांडलं आहे. ब्राह्मणी परंपरेच्या विषमतेवर त्यांनी फारच आक्रमकपणे प्रहार केला आहे. त्याला प्रबोधनकारांच्या तेजस्वी लेखणीचा साज चढल्यामुळे हे पुस्तक फारच जहाल झालं आहे. त्यामुळे यातले अनेक उतारे प्रबोधनकारांच्या विचारांचा दाखला म्हणून सातत्याने मांडले जातात. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर ते भरपूर व्हायरल होतात.
त्यावर अनेकजण बचावात्मक भूमिका घेऊन या पुस्तकातले विचार बॅ. एस. सी. मुखर्जी यांचे आहेत आणि त्याचा अनुवाद बापूसाहेब चित्रेंनी केला आहे, असं सांगून हे विचार प्रबोधनकारांचे नाहीतच असा दावा करतात. पण त्याला अर्थ नाही. प्रबोधनकारांना या पुस्तकातले विचार आपले वाटले, म्हणूनच त्यांनी त्याचा अनुवाद केला हे उघडच आहे. पुस्तकाच्या मनोगतात आणि माझी जीवनगाथेतही त्याचे दाखले आहेत. बापूसाहेबांनी त्यातला काही भाग अनुवादित केला असला तरी तो प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनातच झाला होता. तसंच प्रबोधनकारांनी स्वत:च्या नावानेच हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. या पुस्तकातल्या विचारांची सगळी जबाबदारी त्यांनी स्वत:वर घेतली होती. त्यामुळे या पुस्तकातले प्रक्षोभक विचार प्रबोधनकारांचे नाहीतच, असं म्हणणं प्रबोधनकारांनाच खोटं ठरवणारं आहे. ते कोणते विचार आहेत, हे पुढच्या भागात बघूया.