प्रबोधनकारांवर कोणत्या विचारवंतांचा सर्वाधिक प्रभाव होता, असा शोध घेतल्यास आपण लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुखांकडे पोचतो. प्रबोधनकारांच्या विचारांच्या क्रांतीची सुरुवातच त्यांच्या ग्रंथांपासून झाली. लोक त्यांचा विसर पडू नये म्हणून प्रबोधनकरांनी साप्ताहिक लोकहितवादीच्या रुपात त्यांचं जिवंत स्मारक उभारलं.
– – –
प्रबोधनच्या फायली चाळताना मे १९२५च्या अंकात आतल्या पानावरच्या एका कोपर्यात एक जाहिरात अचानक दिसते. त्याला मोठ्या आकारात लोकहितवादी असं शीर्षक दिलेलं आहे. खरं तर ती एक आवाहनवजा घोषणाच असते, नव्याने सुरू होणार्या नियतकालिकाची. त्यात लिहिलेला मजकूर असा आहे,
लोकहितवादी-प्रबोधनकार श्रीयुत ठाकरे यांच्या संपादकत्वाखाली लवकरच सुरू होईल. प्रचलित कोणत्याही पक्षभेदाच्या वितंडवादात कालक्षय न करता, जनहिताच्या शुद्ध व्यापक दृष्टीने नव्या मन्वंतराची ओळख पटविणारे व बहुजन समाजातील वरपासून खालपर्यंतच्या थरांत लोकसत्तात्मक हक्कांची जाणीव थरारविणारे विशेष स्पष्ट विचारच लोकहितवादी व्यक्त करील. मुख्यत्वे करून भांडवलवाले व मजूर, सहकारी चळवळ, महाराष्ट्रीय तरुणांची बेकारी, हिंदू मिशनरी सोसायटी, शेतकर्यांची सुधारणा, धार्मिक व सामाजिक स्वयंनिर्णय, अस्पृश्यता विध्वंसन, सात्त्विक राजकारण या विषयांवर निर्भीड स्पष्टोक्तीचे निर्णयात्मक सिद्धांत जनतेला पटविण्यात येतील. लोकहितवादी सर्वांना घेण्यास सुलभ जावा म्हणून टपालखर्चासह वार्षिक वर्गणी फक्त दोन रुपये ठेविली आहे. अर्धा आण्याचे तिकीट पाठवून पहिल्या खास अंकासाठी नाव नोंदवून ठेवा. ठिकठिकाणी विश्वसनीय एजंट व बातमीदार पाहिजेत. पत्ता : प्रबोधन मुद्रणालय, ३४५, सदाशिव पेठ, पुणे शहर.
आज शंभर वर्षांनंतर या घोषणेकडे पाहताना हाताशी माहिती म्हणून फारसं काहीच लागत नाही. लोकहितवादी या नियतकालिकाचं स्वरूप काय असणार आहे, दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक की प्रबोधनसारखंच मासिक? हे काहीच लक्षात येत नाही. प्रबोधन हे मासिक सुरू असतानाच ते आणखी एक मासिक काढणार नाहीत, हे स्पष्टच होतं. प्रबोधनचं स्वरूप आधी पाक्षिक होतं. त्यानंतर ते साप्ताहिक करण्याचा प्रयत्न प्रबोधनकारांनी केला होता. पण ते प्रयत्न गळ्याशी येऊन पाक्षिकाचं मासिक करावं लागलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा साप्ताहिक सुरू करण्याचे बातबेत असल्याचा अंदाज बांधता येतो. प्रबोधनकारांनी या काळातल्या बारीक सारीक घटनाही त्यांचं आत्मचरित्र ‘माझी जीवनगाथा`मध्ये नोंदवल्या आहेत. पण का कोण जाणे, `लोकहितवादी सुरू केल्याविषयी एक अवाक्षरही लिहिलेलं नाही. कदाचित हा प्रयोग अपयशी ठरल्यामुळे हे झालं असेल. रामभाऊ आणि श्रीधरपंत टिळकांच्या पुढाकाराने अस्पृश्यांच्या मेळ्याची सलामी गायकवाड वाड्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवासमोर झाल्याचा अहवाल `लोकहितवादी`त छापून आल्याचं सांगताना हे साप्ताहिक असल्याचा पुसट उल्लेख आहे. त्यापेक्षाही पुसट उल्लेख कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची माहिती `साप्ताहिक लोकहितवादी`त छापल्याचा आहे. `माझी जीवनगाथा`त हेच दोन उल्लेख आहेत.
मराठी वृत्तपत्रांचा इतिहास या ग्रंथात रा. के. लेले यांनी लोकहितवादी साप्ताहिकाविषयी माहिती देताना लिहिलंय, पुण्यात आल्यावर ठाकरे यांनी प्रबोधन मासिकाच्या जोडीला लोकहितवादी नावाचे साप्ताहिकही सुरू केले होते. आंग्लाईच्या प्रारंभ काळातील सर्वांगीण सुधारणेचा पुरस्कार करणारे लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख ह्यांच्या स्मरणार्थ हे साप्ताहिक काढले होते. या दोन वाक्यांतून लोकहितवादी हे साप्ताहिक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. रा. के. लेले हे दादरलाच प्रबोधनकारांच्या शिवाजी पार्कातल्या घरापासून जवळ अक्षीकर स्ट्रीट इथे राहत होते. त्यामुळे त्यांचा प्रबोधनकारांशी परिचय असावा. कारण प्रबोधनकारांशी संबंधित अनेक बारकावे या ग्रंथात आले आहेत. त्यामुळेच इतर फारसा कुठेही न आढळणारा केवळ साडेतीन महिने चाललेल्या `साप्ताहिक लोकहितवादी`चा उल्लेख यात आला आहे.
या ग्रंथातच ‘लोकहितवादी`च्या ३१ ऑगस्ट १९२७च्या अंकात छापून आलेल्या `लोकहितवादीचा पहिला मुजरा’ या लेखाचा काही भाग प्रसिद्ध झाला आहे. आज आपल्याकडे ‘लोकहितवादी`चा एकही अंक उपलब्ध नाही. त्यामुळे `लोकहितवादी`त छापला गेलेला हाच काय तो मजकूर आज आपल्याला वाचता येतो. त्यामुळे तो महत्त्वाचा आहे. यात प्रबोधनकारांनी `लोकहितवादी’ सुरू करण्यामागच्या प्रेरणा सांगितल्या आहेत. लेखांचं स्वरूप आणि मथळा बघता ३१ ऑगस्ट १९२७ ला ‘लोकहितवादी`चा पहिला अंक प्रसिद्ध झाला, हे स्पष्ट आहे. याची जाहिरात दोन वर्षं आधी मे १९२५च्या प्रबोधनात आली होती. हा उशीर का झाला, याचंही स्पष्टीकरण या उतार्यात सापडतं. ते असं, `साप्ताहिक सेवेचा जनतेचा आग्रह फार जुना आहे. ‘लोकहितवादी’ साप्ताहिकाची जाहिरात देऊन, मॅजिस्ट्रेट पुढे डिक्लेरेशन केल्यालाही दोन वर्षे होऊन गेली. परंतु ‘तुका म्हणे नाही चालत तातडी। प्राप्त काळ घडी आल्याविना।’ ती घडी आज आली.
लोकहितवादी काढताना प्रबोधनकारांनी पहिला मुजरा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर राजमाता जिजाऊंनाही केलाय, माझा पहिला मुजरा श्री शिवरायाला आणि मातोश्री जिजाबाईला. हे त्यांच्याच प्रसादाचे कलम आहे. महाराष्ट्राच्या लोकहितवादासाठी शिवरायाने दोन शस्त्रे दिली होती. एक कलम आणि दुसरी समशेर. चालू राजवटीत काळाने समशेर काढून घेतली. आता फक्त कलमास्त्र उरले आहे. त्याच्या बळावर गेली दहा वर्षे अनेक ग्रंथांनी आणि गेली पाच वर्षे ‘प्रबोधन’ मासिकाद्वारा यथामती यथाशक्ती महाराष्ट्राची सेवा बजावली आहे. ती त्याने गोड मानून घेतली. प्रबोधन मुद्रणालयाची स्थापना म्हणजे महाराष्ट्राने माझ्या वाग्लेखन सेवेचे केलेले सक्रिय कौतुकच होय.
लोकहितवादीच्या पहिल्या संपादकीयात प्रबोधनकारांनी दुसरा मुजरा महाराष्ट्राला केला आहे, माझा दुसरा मुजरा महाराष्ट्राला, त्याने मला ‘आपला’ म्हटले. म्हणूनच सरकारी सेवावृत्तीची चित्ताकर्षक रौप्यशृंखला तोडून आमरण जनसेवावृत्तीचे प्रतिज्ञा-कंकण मला मनगटावर चढविण्याचे धैर्य झाले. बाह्य व्यवहारात हिंदु-मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य वगैरे भेदांची कितीही तुफाने दणदणाट करीत असली, तरी प्रबोधन कार्याच्या आश्रयदात्यांत या भेदाचा लवलेशही नाही, हे ऐकून पुष्कळांना आश्चर्य वाटेल. प्रबोधनकारांनी महाराष्ट्राला म्हणजेच महाराष्ट्रातल्या लोकांना मुजरा केला आहे. त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी सरकारी नोकरी सोडून पूर्णवेळ प्रबोधनसाठी स्वत:ला वाहून घेतलं होतं. विशेष म्हणजे प्रबोधनला मदत करणार्यांमध्ये सर्व जातीधर्मातले लोक असल्याचं प्रबोधनकारांनी इथे आवर्जून सांगितलं आहे.
प्रबोधनकारांचा तिसरा मुजरा अर्थातच लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुखांना आहे. प्रबोधनकांवर सर्वाधिक प्रभाव लोकहितवादींचाच आहे, हे त्यांचं लिखाण वाचताना लक्षात येतं. ते लोकहितवादींविषयी वारंवार लिहीत राहिलेच, सोबतच त्या काळात दुर्मीळ झालेलं त्यांचं लिखाणही प्रबोधनमध्ये छापत राहिले. इथे लोकहितवादींविषयी लिहिताना त्यांनी त्यांचा उल्लेख गुरुवर्य असा केला आहे, हे महत्त्वाचं आहे आणि यात गोपाळराव आगरकरांचाही उल्लेख आहे.
प्रबोधनकार लिहितात, माझा तिसरा मुजरा गुरुवर्य ‘लोकहितवादी’ कै. सरदार गोपाळराव हरी देशमुख यांच्या स्वर्गस्थ आत्म्याला. वाग्लेखनाद्वारा विचार, उच्चार, आचाराची माझ्या मनाची व मताची जी कमावणी झालेली आहे, तिचे सारे श्रेय लोकहितवादींच्याच विपुल ग्रंथसामग्रीला मी कृतज्ञ भावनेने देत आहे. आज साप्ताहिक स्वरूपात बाहेर पडणारा ‘लोकहितवादी’ एक प्रकारे त्यांचेच चालते बोलते जागृत स्मारक होय. सरदार लोकहितवादींच्या स्मृती नष्ट होऊ पाहात असलेल्या नवमतवादी सनातन सिद्धान्तांचा परिचय महाराष्ट्राला करून देणे, हे तर मुख्य कर्तव्य आहेच; पण त्याबरोबर महाराष्ट्रात एक वेळ गाजलेल्या वैâ. आगरकरांच्या ‘सुधारक’ मताचा जीर्णोद्धार करणे हेही लोकहितवादीचे धोरण राहील.
आपल्याला आज उपलब्ध असलेल्या लोकहितवादीमधल्या या एकमेव उतार्यात शेवटच्या दोन ओळींत वाचकांना मदतीचं आवाहन केलं आहे. प्रबोधन मासिकाचा कार्यक्रम आहे तसाच कायम ठेवून, या नव्या साप्ताहिकाची जबाबदारी मी शिरावर घेत आहे. महाराष्ट्राने ही माझी सेवा पूर्ववत गोड करून घ्यावी, अशी साष्टांग प्रणिपातपूर्वक, मी त्यांच्या सक्रिय सहानुभूतीची याचना करीत आहे.
प्रबोधनमधून प्रबोधनकारांना फार आर्थिक उत्पन्न मिळत होतं, अशातला भाग नाही. तरीही त्यांनी एका मासिकाच्या बरोबरच साप्ताहिकाचाही भार घ्यायचं ठरवलं. कारण परिस्थितीच तशी होती. पुण्यात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद विकोपाला पोचला होता. रोज नव्या घडामोडी घडत होत्या. देशातलं वातावरणही स्वातंत्र्य चळवळीने पेटलं होतं. याविषयी दर आठवड्याला व्यक्त होणं आणि प्रसंग पडताच ठणकावून उत्तर देणंही आवश्यक होतं. प्रबोधनकारांना त्यासाठी साप्ताहिक हवंच होतं. प्रबोधनकारांची तशी इच्छा होती, शिवाय वाचकांचीही मागणी होती. प्रबोधनच्या मार्गात अडचणी येत होत्याच. त्यांच्यावर टीका झाली, शारीरिक हल्ले झाले, घरासमोर मेलेली गाढवं फेकण्यात आली, छापखान्यात आगीचे बोळे टाकून पेटवून देण्याचे प्रयत्न झाले, कायदेशीर खटल्यात फसवण्याचा प्रयत्न झाला, काहीही संबंध नसणारे आरोप लावण्यात आले, त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरवण्यात आल्या. तरीही प्रबोधनकार बधले नाहीत. कुणी अंगावर आलं की शिंगावर घ्यायचं हा त्यांचा बाणा होता. त्यामुळे संकटांच्या छाताडावर स्वार होत त्यांनी नवीन साप्ताहिक सुरू केलं. त्यात कोणते विषय घेणार हे त्यांच्या निवेदनातच स्पष्ट केलं होतं. त्यावरून ते ब्राह्मणी व्यवस्थेशी दोन हात करण्यासाठी उत्सुक असल्याचंही दिसून येतं.
आपण पाहिलं त्यानुसार लोकहितवादीचा पहिला अंक ३१ ऑगस्ट १९२७ रोजी प्रसिद्ध झाला. शनिमाहात्म्य या ग्रंथात प्रबोधनकार लिहितात की १० डिसेंबर १९२७ला लोकहितवादीचा शेवटचा तेरावा अंक प्रकाशित झाला. ३१ ऑगस्ट हा बुधवार आहे, तर १० डिसेंबर हा शनिवार आहे. तेव्हाच्या रीतीप्रमाणे आणि ‘माझी जीवनगाथा’मधील एका उल्लेखाप्रमाणे लोकहितवादी दर शनिवारी प्रसिद्ध होत होता. काही तांत्रिक कारणांमुळे ३१ ऑगस्टचा पहिला अंक बुधवारी प्रसिद्ध झाला असावा. हा काळ मोजल्यास १५ आठवड्यांचा भरतो. पण प्रबोधनकारांनी नोंदवलंय की लोकहितवादीचे फक्त तेराच अंक प्रकाशित झालेत.
साडेतीन महिन्यांतल्या तेरा अंकात लोकहितवादीचा प्रवास आटोपला असला, तरी पुण्यातली तेव्हाची परिस्थिती बघता हे मोठं धाडस होतं. प्रबोधनकारांचे सहकारी बापूसाहेब चित्रे यांच्या मृत्यूनंतर ते एकटे पडलेले दिसतात. पुढे ध्यानीमनी नसताना प्रबोधनकारांना पुणे सोडावं लागल्यानंतर तर मासिक प्रबोधन आणि साप्ताहिक लोकहितवादी अचानक बंद पडलं. त्यानंतर मुंबईत आजारपण आणि दारिद्र्यामुळे प्रबोधनकारांची परिस्थिती फारच बिकट झाली होती. एकामागून एक संकटांची मालिकाच सुरू होती. दोन वेळ जेवणाची आणि औषधोपचारांचीच भ्रांत होती, तिथे पुण्यात असलेले `लोकहितवादी`चे अंक जपून ठेवण्याची सवड प्रबोधनकारांना मिळाली असण्याची शक्यता कमीच. प्रबोधनचे बहुतांश अंक आज उपलब्ध आहेत. पण `लोकहितवादी`चा तेरापैकी एकही अंक पाहायला मिळत नाही. प्रबोधनकारांच्या विचारांचा महत्त्वाचा हा ऐतिहासिक ठेवा आज इतिहासाच्या अंधार्या कोपर्यात हरवला आहे.