मे महिन्याच्या सुरुवातीला आसपास काय सुरू होते ते आठवा… वृत्तवाहिन्यांवर धुमाकूळ सुरू होता… ऑपरेशन सिंदूर या मोहिमेअंतर्गत भारतीय सैन्याने लाहोरवर कब्जा मिळवला आहे, कराची बंदर उद्ध्वस्त झालं आहे, बलुचिस्तान स्वतंत्र झाला आहे, अशा ‘बातम्यां’वर बातम्या येऊन थडकत होत्या आणि देशात हर्षाच्या लहरी उसळत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला आणि धर्म विचारून पर्यटकांना मारले, याचा बदला मोदींनी घेऊन दाखवला, अशा प्रकारच्या प्रचाराला ऊत आला होता… आता पाकिस्तानव्याप्त काश्मीर काही दिवसांतच आपले होणार, या कल्पनेने अनेक जण रोमांचित झाले होते… कलम ३७० रद्द झाल्यानंतर ज्यांना काश्मीरात सफरचंदाच्या बागा फुलवून देखण्या काश्मिरी युवतींशी लग्न करायचं होतं, ते सगळे आता कुलदैवतांच्या दर्शनाला पाकिस्तानातल्या धार्मिक स्थळांच्या यात्रा आयोजित करण्याच्या योजना बनवत होते (काश्मीरात जमीन घेण्याच्या योजनेचं काय झालं, हे अशा मेंदूगहाणांना विचारून फायदा नसतो)…
आपल्या जिगरबाज सैन्यदलांच्या जवानांनी जीव धोक्यात घालून आखलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या आडून निर्लज्ज प्रचाराचा धूर धूर करून लोकांना भ्रमित करणारा फुगा प्रचंड फुगला होता…
त्याला पहिली टाचणी लावली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी. दोन्ही युद्धग्रस्त देशांना सोबतही न घेता त्यांनी परस्पर युद्धविराम जाहीर करून टाकला. त्याबाबतीत आपल्याकडून हूं की चूं झाले नाही. कुणी कनिष्ठ स्तरावरचे अधिकारी अधून मधून ‘नाही नाही, आमचा आम्हीच सीझफायर केला’ असं सांगत राहिले, पण देशाच्या प्रमुखांनी ५६ इंची छाती फुगवून माय फ्रेंड डोलांड खोटं बोलत आहेत, असं काही ठणकावून सांगितलं नाही.
दुसरी टाचणी लावली ती खुद्द आपलेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी. हे पडलं, ते जिंकलं, अमुक उद्ध्वस्त वगैरे सगळ्या सरकारपुरस्कृत गोदी मीडियाच्या भाकडकथा होत्या, हे त्यातून स्पष्ट झालं. पाकिस्तानला रीतसर कल्पना देऊन, आम्ही तुमच्या देशातल्या दहशतवादी तळावर हल्ले करणार आहोत, मध्ये येऊ नका, असं सांगून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं, असं त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं. पाकिस्तानने प्रतिकार केला आणि भारताची विमानं पाडल्याचा दावा केला. तेव्हा सैन्यदलाच्या प्रमुखांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हवाई दल प्रमुखांनी आपले सगळे वैमानिक सुरक्षित आहेत, एवढंच सांगितलं होतं; त्याचा अर्थ विमानं सुरक्षित राहिलीच असा होत नव्हता. पाकिस्तानचा पाचसहा राफेल विमानं पाडल्याचा दावा अतिरंजित असणारच होता, पण भारतीय हवाई दलाची हानी झाली असणार हे ज्यांना कळून घ्यायचं होतं त्यांना कळलं होतं. ज्यांनी डोळ्यांवर मोदीभक्तीची पट्टी बांधली आहे, त्यांच्या डोळ्यांच्या खाचा झाल्या तरी सत्याचा प्रकाश त्यात शिरणं कठीण!
आता सर्व लष्करी दलांचे प्रमुख, सीडीएस जनरल चौहान यांनी भारताची विमानं पाडली गेली, याची स्पष्ट शब्दांत कबुली देऊन तिसरी आणि सर्वात निर्णायक टाचणी लावली आहे. पण आपल्याकडच्या सर्वाधिक खपाच्या कणाहीन, बुळचट वर्तमानपत्रांनी ही बातमी कशी दिली आहे ते पाहा. विमाने पाडली गेली याचा हेडलाइनमध्ये उल्लेखच नाही- लाचारीची परिसीमा दिसते त्यातून. यांचे नेमके काय मोदींनी आपल्या टाचेखाली चेमटून ठेवले आहे? की यांनी स्वत:हूनच भोंगळे व्हायचे ठरवले आहे?
हे सगळं होत असताना अमेरिकेने उघडपणे भारताला धारेवर धरल्याचं दिसत होतं. ट्रम्प हे आपले मित्र आहेत, या गोड गैरसमजातून राजनैतिक तटस्थता बाजूला ठेवून त्यांचा प्रचार करायला गेलेल्या मोदींना आणि त्यांच्यामुळे भारताला अपमानित करण्याची एकही संधी ट्रम्पनी सोडली नाही आणि सैनिकी पोषाखांमध्ये स्वत:ची जाहिरातबाजी करणार्या मोदींनी ट्रम्पमधला ट सुद्धा उच्चारला नाही. आपले पंतप्रधान देशाचा पैसा उधळत जी काही जादू की झप्पी डिप्लोमसी करत फिरत होते, त्यातल्या त्यांच्या त्या बळे बळे मिठ्या मारण्याने एकही राष्ट्रप्रमुख भारताचा मित्र बनला नाही. संकटाच्या काळात, पाकिस्तानने कुरापत काढलेली दिसत असताना आपले सगळे शेजारी पाकिस्तानच्या पाठिशी उभे राहिले, एकाही मित्राने भारतापुढे मैत्रीचा हात पुढे केला नाही. उलट ज्याच्यावर आपला सगळ्यात जास्त भरवसा, तो रशियाही पाकिस्तानबरोबर काही हजार कोटींचे करार करून आपल्याला खिजवून दाखवतो आहे.
इतक्या पातळ्यांवर देशाची नालस्ती होत असतानाही भारतीय जनता पक्षाची निर्लज्ज प्रचारबाजी काही थांबत नाही. मोदींनी फार मोठा विजय मिळवला आहे, अशा थाटात विजयोत्सव साजरा करण्याचे घाट भाजपने घातले आहेत. तिकडे पाकिस्तानचे पंतप्रधान मित्रदेशांमध्ये फिरून त्यांची बाजू मांडत असताना आपले पंतप्रधान मात्र इकडे बिहारच्या आणि बंगालच्या निवडणूक लढायांमध्ये त्यांना जे एकमेव काम येतं, ते करण्यात मश्गुल झाले… धादांत खोटा, आवेशी प्रचार! रोज त्यांच्या प्रचारकी योजनांच्या चिंध्या होत आहेत आणि तरीही ते रोज पाकिस्तानला बेटकुळ्या काढून दाखवतायत. भाजपचे निलाजरे लोक पहलगामच्या हल्ल्यात पुसल्या गेलेल्या माताभगिनींच्या कुंकवाचाही बाजार मांडायला निघाले होते. घरोघर सिंदूर वाटण्याची योजना त्यांनी आखली होती. कुंकू हा अतिशय संवेदनशील विषय. ते लावायचं नवर्याच्या नावाने, ते देण्याचा अधिकारही त्याचाच. तिथे हात घातल्यावर तो पोळणारच होता. आधी तुमच्या बायकोला सिंदूर द्या, तिला गरज आहे; आमच्या कुंकवाची उठाठेव तुम्हाला कशाला, आमचे नवरे जिवंत आहेत; एक देश एक नवरा योजना लागू झाली आहे का, अशा शब्दांमध्ये बायकांनी निर्भर्त्सना सुरू केल्यावर भेदरलेल्या भाजपेयींनी अशी काही योजनाच नव्हती म्हणून पळ काढला.
इतक्या पातळ्यांवर मानहानी झाली तरी मोदी प्रचार करतच राहणार आहेत… आवेश आणून खोटं बोलतच राहणार आहेत… जनता मोदींच्या खिशात आहे, याची भाजपला खात्री आहे…
…सैन्यदलांच्या संवेदनशील कारवाईचेही राजकारण करणार्या या पक्षाच्या योग्य भागाखाली जाळ आणि धूर संगाटच काढण्याची जबाबदारी आता बिहार आणि बंगालच्या मतदारांवर आहे.