• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

या थडग्याखाली दडलंय काय?

- मर्मभेद

Nitin Phanse by Nitin Phanse
March 20, 2025
in मर्मभेद
0

गेल्या आठवड्यात काही बातम्या तुमच्या वाचनात आल्या असतील…
औरंगजेबाची कबर उखडून टाकू असा इशारा काही संघटनांनी दिला आहे. त्यातल्या एका संघटनेने औरंगजेबाचं चित्र म्हणून भारताचा शेवटचा मुघल बादशहा बहादूरशाह जफर याचं चित्र जाळलं… ज्याच्या नेतृत्त्वाखाली भारतातलं १८५७चं स्वातंत्र्यसमर लढलं गेलं, तो हा बादशहा आणि त्याच्या म्यानमारमधील मजारीसमोर कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही नतमस्तक झाले आहेत.
आता दुसरी बातमी.
(कठोर दारुबंदी असलेल्या आणि साक्षात रामराज्यच जिथे अवतरले आहे अशा) गुजरातेत एका तरुणाने दारूच्या नशेत चारजणांना उडवलं आणि त्याची गाडी थांबवली गेली, जमावाने त्याला घेरलं तेव्हा तो ‘ओम नम: शिवाय’च्या घोषणा देत होता… आपण सश्रद्ध हिंदू आहोत म्हटल्यावर जमाव हिंसक होणार नाही, आपल्याला मारहाण होणार नाही, याची त्याला खात्री होती… कदाचित पुढे जाऊन शिक्षेतही माफी मिळेल असा त्याचा तर्क नसेलच असे सांगता येत नाही…
तिसरी बातमी.
भारत सरकारची शिक्षणावरची तरतूद आहे एक लाख २८,६४९ कोटी रु. (कुंभमेळा, तीर्थक्षेत्र विकासासाठी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील हिमालयात बनवले जाणारे मार्ग, स्मारकं, पुतळे यांच्यावरची तरतूद स्वतंत्रपणे मोजून पाहायला हरकत नाही…) तामीळनाडू सरकारचा शिक्षणावरचा खर्च असणार आहे ५५ हजार २६१ कोटी रु. म्हणजे देशाच्या शैक्षणिक बजेटच्या निम्मं बजेट आहे शिक्षणाचं, एका राज्याचं. देशाच्या अर्थसंकल्पातली तरतूद जेमतेम अडीच टक्का आहे आणि तामीळनाडूची तरतूद तब्बल २१ टक्क्यांहून अधिक आहे…
चौथी बातमी
ही पण तामीळनाडूचीच बातमी आहे. एका दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतिसाठी नाव नोंदवलेली महिला प्रसूतिसाठी केंद्रात पोहोचलीच नाही, तेव्हा तिथल्या यंत्रणेने शोध घेऊन त्या महिलेला केंद्रात आणले आणि तिची सुखरूप प्रसूती होईल याची काळजी घेतली… तिथे सगळ्या महिलांची अशी नोंदणी असते आणि असा फॉलोअप असतो…
या बातम्या प्रातिनिधिक आहेत… पण, देशात, खासकरून उत्तर भारतात आणि त्या गोपट्ट्याचाच एक भाग बनू लागलेल्या महाराष्ट्रात काय सुरू आहे, दक्षिणेत काय सुरू आहे, हे त्या दाखवून देतात. एखाद्या सरकारचे प्राधान्यक्रम काय असले पाहिजेत, एखाद्या राज्याने आपला विकास कसा करून घेतला पाहिजे आणि आपली अस्मिता कशा प्रकारे जपली पाहिजे, याचं एक उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यासमोर कधीकाळी देशाला वैचारिक दिशा देणारा महाराष्ट्र खुज्या नेत्यांनी किती रसातळाला नेला आहे, याचं रोज घडणारं दर्शन विषण्ण करणारं आहे.
औरंगजेबासारखा शक्तिशाली सम्राट या महाराष्ट्रभूमीने नमवला. त्याला इथे झुंजवला आणि इथे देह ठेवायला भाग पाडलं. त्याची कबर हे काही त्याच्या पराक्रमाचं स्मारक नाही, ते छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचं, शंभूराजांच्या बलिदानाचं आणि त्यांच्यापश्चात मराठ्यांनी गाजवलेल्या शौर्याचं प्रतीक आहे. त्या औरंगजेबाचं थडगं महाराष्ट्रात कशाला पाहिजे, असा प्रश्न गद्दारांच्या शहेनशहाला पडावा? तुम्हाला इतिहास समजण्यासाठी कोणीतरी कादंबर्‍या लिहायला लागतात. त्यांच्यावर कोणीतरी भरपूर स्वातंत्र्य घेतलेले सिनेमे काढावे लागतात. असे सोयीचा इतिहास सांगणारे सोयीचे सिनेमे पाहून तुम्हाला सोयीच्या उचक्या लागतात? काही शतकांपूर्वी मरण पावलेला औरंगजेब त्या थडग्यात इतकी वर्षं होताच की. तेव्हा नाही आठवलं? बरं आता तुम्ही ते थडगं उकरून नेस्तनाबूत केलंत तरी औरंगजेब काही परत मरणार नाही आणि त्याची इतिहासातली ओळखही पुसली जाणार नाही. एकेकाळी औरंगजेबालाही नमवणारा आणि दमवणारा, पाठकणा ताठ असलेला महाराष्ट्र अस्तित्त्वात होता, याची खूण मात्र कायमची पुसली गेलेली असेल. दिल्लीश्वरांपुढे लोटांगणं घालून सत्तेत टिकून राहिलेल्यांना कदाचित तेच साध्य करायचं असेल. तोच आदेश असेल.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने औरंगजेबाचं नाव असलेल्या औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण झालं, उस्मानाबादचं धाराशिव झालं, अहमदनगरचं अहिल्यानगर झालं; उत्तर प्रदेशात अलाहाबादचं प्रयागराज झालं- पण, या थडगी उकरणार्‍या गँगचे परात्पर पिता आणि सर्वात मोठे आका जिथून येतात त्या गुजरातमधल्या अहमदाबादचं कर्णावती काही झालेलं नाही. ते का? त्यांना याचा जाब विचारणारा एक तरी भोंदुत्ववादी कुणी कधी पाहिला आहे का?
इतकी वर्षं होळीला पोळी आणि धुळवडीला नळी खाणार्‍या आणि ती कोणत्या पद्धतीने मिळाली आहे याची उठाठेव न करणार्‍यांच्या राज्यात उगाचच हलाल विरुद्ध मल्हार असे अस्तित्त्वात नसलेले वाद निर्माण करणारे मंत्री आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणी मुसलमानच नव्हता, असा दावा ते करू लागले आहेत. बालवाडी आणि प्राथमिक शाळेतलं शिक्षण न करताच हे परदेशात शिकायला गेले होते का?
मुळात देशासमोरचे आणि राज्यासमोरचे हे प्रश्न आहेत का? राज्यात ठिकठिकाणी गुंडाराज बोकाळलेलं आहे. तरुण मुलांमध्ये हिंसेचं विकृत आकर्षण निर्माण झालेलं आहे. छोट्या छोट्या टोळ्या बनवून एकेकट्याला गाठून जीव घेण्याचे प्रकार सुरू आहेत. मतं विकत घेण्यासाठीच्या योजनांनी राज्याला खंक करून टाकलेलं आहे. दिल्लीपतींच्या लाडक्या उद्योगपतीच्या घशात अख्खी मुंबई भरवण्याचा उद्योग जोरात सुरू आहे. राहणीमानाच्या एकाही निर्देशांकात आपली समाधानकारक स्थिती नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वत्त्वाचा मुडदा पाडून त्याला दिल्लीचा मांडलिक करून घेण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे…
…म्हणजे जे साक्षात औरंगजेबाला जमलं नव्हतं, ते आजचे दिल्लीश्वर सहजतेने करत आहेत…
…चहूबाजूंनी नाडला जात असतानाही चैतन्यहीन कलेवरासारखा लोळागोळा झालेला महाराष्ट्र निष्क्रीयतेच्या थडग्यातच पडून राहावा यासाठी औरंगजेबाचे थडगे उकरण्याचा सगळा खटाटोप आहे.

Previous Post

नाय, नो, नेव्हर…

Next Post

लोकमान्यांचा मुलगा, प्रबोधनकारांचा मित्र

Next Post

लोकमान्यांचा मुलगा, प्रबोधनकारांचा मित्र

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.