• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

महाराष्ट्रधर्माच्या लढाईचा खंबीर सेनापती!

- सुषमा अंधारे (विशेष लेख)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 25, 2024
in विशेष लेख
0
महाराष्ट्रधर्माच्या लढाईचा खंबीर सेनापती!

दिल्लीसमोर महाराष्ट्रात कधी झुकला नाही, झुकणार नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि अत्यंत सुसंस्कृत राजकीय इतिहासाला जेव्हा चूड लावण्याचा प्रयत्न सुरू झाला; सत्ता आणि पैशाच्या बळावर आपण काहीही करू शकतो या अघोरी सत्ताकांक्षेने पछाडलेल्या मोदी-शहा या अभद्र युतीने एकाच वेळी केंद्रातील सत्ता गुजरात-आसाम-गोवा या तीन राज्यांतील पोलीस यंत्रणा आणि चाळीस फुटीरतावादी यांना हाताशी धरून जेव्हा महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू केले, तेव्हा त्यांचा प्रत्येक मनसुबा उधळून लावण्यासाठी एकाकी निकराची झुंज देणारे नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे.
खरं तर माझा पिंड चळवळीचा आहे. माझ्यावरचा वैचारिक प्रभाव हा फुले-शाहू-आंबेडकर-चार्वाक-बसवेश्वर-कबीर ते प्रबोधनकारांपर्यंतच्या विचारवंतांचा आहे. सत्तास्थानी असणार्‍या लोकांची समीक्षा करणं, `नाही रे’ वर्गाच्या प्रश्नांसाठी लढत राहणं, हा माझा स्थायीभाव राहिलेला आहे. चार-पाच वर्षांपूर्वी जर मला कोणी म्हटलं असतं की मी भविष्यात कधीतरी शिवसेनेशी जोडली जाईन, माझ्या नावापुढे शिवसैनिक हे बिरूद लागेल, तर कदाचित मी वेड्यात त्याला काढला असतं!
कारण भारतीय जनता पक्षासारख्या प्रचंड जातीय आणि धार्मिक विषपेरणी करणार्‍या, देश-समाज समृद्ध करण्यापेक्षा जातीय ध्रुवीकरणालाच राजकारणाचा पाया मानणार्‍या पक्षासोबत शिवसेना असताना मी शिवसेनेशी स्वत:ला जोडून घेणे शक्यच नव्हतं. पण, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीच्या सरकारचे सक्षम प्रमुख असताना विरोधकांनाही व्याकुळ करणारी घटना फक्त महाराष्ट्रानेच नाही, तर संबंध देशाने बघितली… ज्यांना कुणी गल्लीतही ओळखत नव्हतं, त्यांचा वर्षा-सह्याद्री इथपासून ते दिल्लीपर्यंत वावर वाढवण्यासाठीची क्षमता ज्या शिवसेनेने तयार केली, त्याच शिवसेनेशी विश्वासघात करून ४० गद्दार, भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडली. उभा महाराष्ट्र आणि देश लोकशाहीचं वस्त्रहरण होत असताना पाहत होता. सत्ता आणि पैशाच्या बळावर भाजपाने आपल्या महत्त्वकांक्षेचा अजगरी विळखा चाळीस जणांभोवती जखडून ठेवला होता. वरवर कितीही मखलाशा केल्या आणि उठाव वगैरेसारखे शब्द वापरले तरी महाराष्ट्राला याची कल्पना होती की जे गेलेत त्यात कोणी समृद्धीची फाईल वाचवायला, कोणी मुंबई महापालिकेतला केलेला अपहार लपवायला गेला आहे तर कोणाला मंत्रिपदाचं चॉकलेट दिलेलं आहे… या चाळीसही लोकांचं हिंदुत्व हे ईडीच्या कार्यालयात जागृत झालेल हिंदुत्व होतं, हे महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोरालाही कळत होतं…
आपल्याच सहकार्‍यांनी आपल्या पाठीत विश्वासघाताचा खंजीर खुपसला आहे हे कळूनसुद्धा कुठलाही सत्तेचा हव्यास न करता वर्षा बंगल्याच्या पायर्‍या शांतपणे उतरत उद्धव ठाकरे लोकांचा निरोप घेत होते… अत्यंत नम्रतेने महाराष्ट्राच्या जनतेचे अभिवादन स्वीकारत होते… महाराष्ट्राच्या इतिहासातले क्वचित जे मोजके लोकप्रिय मुख्यमंत्री राहिले, त्यापैकी एवढं अलोट प्रेम विश्वास आणि जनतेची आपुलकी मिळवणारे उद्धव ठाकरे हे मला अव्वल स्थानी दिसले. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या अगदी विरोधकांच्या डोळ्यातही पाणी आणणारं हे दृश्य होतं… त्याला अपवाद मी कशी काय असणार?
उद्धव साहेबांचा शांत संयमी बाणा अधिक प्रभावित करणारा होता.
संविधानिक लोकशाहीची मोडतोड करून आपल्या आसुरी सत्ताकांक्षेसाठी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत, शालीन राजकारणाची लक्तरे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा काढत होती, तेव्हा कालपर्यंत शिवसेनेपासून कमालीची अलिप्तच काय, शिवसेनेच्या विरोधी ध्रुवावरच असणारी मी अस्वस्थ झाले होते… एवढ्या सरळमार्गी माणसाभोवती कटकारस्थानाचे चक्रव्यूह का बरे रचले गेले असेल? नेमके कुठे चुकले उद्धव ठाकरे?
कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी कुटुंबप्रमुख म्हणून आमची काळजी घेतली, या महाराष्ट्रातले प्रत्येक कुटुंब सुरक्षित, अबाधित आणि सुखरूप असायला हवं, यासाठी आवश्यक वैद्यकीय, आरोग्यसुविधांचं नियोजनबद्ध व्यवस्थापन केलं. एकीकडे उत्तर प्रदेशात कोरोनाबळींचे मृतदेह नदीवर तरंगत होते, गुजरातमध्ये स्मशाने फुल झाल्याने मृतदेह रस्त्यावर जाळले जात होते, तेव्हा महाराष्ट्रात मात्र प्रत्येक जातीधर्माच्या माणसाचे अंतिम संस्कार, सोपस्कार व्यवस्थित पार पडत होते. त्या अडीच वर्षांच्या काळात कुठेही जातीय किंवा धार्मिक कारणावरून दंगल झाली नाही. वारकरी किंवा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ले झाले नाहीत. जातीय ध्रुवीकरणाची भाषा झाली नाही. तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर या संकटाला सामोरे जाण्याची वेळ का आली?
मी जेव्हा जेव्हा याचा विचार करते तेव्हा तेव्हा तथागत बुद्धांचे तत्त्वज्ञान आठवते.
त्यांच्या शिष्यांनी त्यांना प्रश्न विचारला, `भगवंत, विष काय आहे?’
भगवंतांनी सांगितलं, `गरजेपेक्षा जे अधिक आहे ते विष आहे! मग ते चांगुलपण असलं तरी सुद्धा…!!’
उद्धव साहेबांना नेमकं काय नडलं? तर गरजेपेक्षा अधिक असलेला चांगुलपणा… सरळ सुस्वाभावी वागणं… आणि एकनाथ शिंदे यांच्यासारख्या माणसावर पोटच्या लेकरासारखा विश्वास टाकणं..!
मृत्यूशी झुंजत रुग्णशय्येवर असताना अत्यंत विश्वासाने सत्तेची सूत्रं त्यांनी ज्यांच्या हवाली केली, नेमके त्या कुंपणानेच शेत खाल्ले अशी गत झाली.
अडीच वर्षातल्या त्यांच्या कारकीर्दीतील एकेक घटना, आठवणी त्यांच्याबद्दलचा आदर वाढवत आहेत.
२१ ते २६ जुलै या काळात मी चळवळीतल्या अनेक सहकार्‍यांशी, समविचारी पत्रकार, साहित्यिक, विचारवंत लेखक मित्र-मैत्रिणींशी बोलत होते आणि महाराष्ट्रातला प्रत्येक बुद्धीजीवी विवेकी आवाज सांगत होता की उद्धव साहेबांवर अन्याय झाला आहे आणि यावेळी महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धव साहेबांना साथ द्यायला हवी. दिवसागणिक निर्धार अधिक पक्का होत गेला. २७ तारखेला उद्धव साहेबांचा वाढदिवस. या वाढदिवसाच्या दिवशीच महाराष्ट्राची लेक-बहीण म्हणून त्यांना ताकदीने साथ द्यायची ठरवली.
२७ जुलै २०२२ ते आजपर्यंत दोन वर्षे पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांच्या प्रत्येक कृती, निर्णय आणि सभांमधून फेकले जाणारे शब्दबाण यांचे मी निरीक्षण करते आहे. आपण ज्यांचं नेतृत्व स्वीकारले त्यांच्या संयमी लढवय्या आणि सृजनशील विचारांचा अभिमानच वाटत राहिला आहे.
खरंतर एखाद्या प्रचंड कर्तृत्ववान व्यक्तीच्या पोटी जन्माला येणं ही बाहेरून बघणार्‍यांच्यासाठी खूप भाग्यशाली बाब असली, तरी स्वत: त्या व्यक्तीसाठी मात्र एका अर्थाने कठोर परीक्षा असते स्वत:ला सिद्ध करत राहण्याची. कारण लोक पावलोपावली तुलना करत राहतात. उद्धव साहेबांची सुद्धा तुलना बाळासाहेबांशी झाली नसती तर नवलच. पण या दिव्यातूनही ते तावून-सुलाखून बाहेर पडले.
पक्षफुटीनंतरच्या नेस्को येथे झालेल्या गटप्रमुखांच्या पहिल्याच मेळाव्यात त्यांनी ठामपणे सांगितलं की २५ वर्ष भाजपसोबत राहून आम्ही युतीत सडलो. भाजपला इतक्या थेटपणे अंगावर घेण्याची ताकद त्यांनी दाखवली हे कदाचित स्वत: भाजपलाही अपेक्षित नसावं. २०१९च्या आधीच्या त्यांच्या भाषणांपेक्षा कितीतरी अधिक धारदार आणि प्रभावी भाषणं मागच्या दोन वर्षांत झाली आहेत. अगदी भंडारा, गडचिरोली, गोंदिया इथपर्यंतच्या लोकांच्या मनाचा ठाव घेणारी भाषणं लक्षणीय ठरली.
या भाषणांमध्ये एक विशेष गोष्ट होती. ती म्हणजे, `मी हरलोय, मी मोडून पडलोय, मी खचलोय’ या भावनेचा कुठेही लवलेश नव्हता. उलट पक्षात मोठे झालेले जरी विश्वासघात करून गेले असले, तरी आपण मागे राहून त्यांना मोठे करणारे सगळे मावळे माझ्यासोबत आहेत. मी पुन्हा तुम्हाला ते वैभव प्राप्त करून देईन. मी पुन्हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा करून दाखवेन, ही उमेद, ऊर्जा शिवसैनिकांना नवी चेतना देणारी ठरली.
हे होऊ शकलं त्याचं कारण भाजपाचे शिवसेनेबद्दलचे अंदाज सगळे चुकले होते. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला शिल्लक सेना म्हणून हिणवले. पण पहिल्या फळीतले बिनीचे शिलेदार आपण बाजूला केले तर उद्धव ठाकरे एकाकी पडतील हा भाजपचा अंदाजच मुळात सपशेल चुकला होता. कारण संवेदनशील मन असलेला मध्यमवर्गीयांना आपलासा वाटणारा चेहरा अर्थात उद्धव ठाकरे हे मुळात बाळासाहेबांच्या हयातीतच सक्रिय झालेले होते आणि ताकदीने त्यांनी दुसरी फळी उभी केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जेव्हा ४० लोकांनी पोबारा केला तेव्हा शिवसेनेचा गड कोसळला नाही उन्मळून पडला नाही. उलट उद्धवसाहेबांच्या कुशल संघटनकौशल्यामुळे घट्ट घट्ट रुजलेली पाळेमुळे पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी ताकदीने एकवटली.
२०२२च्या दसरा मेळाव्यामध्ये उभ्या महाराष्ट्राने शिवतीर्थावर एकाच वेळी प्रबोधनकारांचा सहिष्णू सर्वसमावेशक विचार आणि युतीतला तडफदार बाणा एकत्रितपणे उद्धव साहेबांच्या भाषणात अनुभवला. हे भाषण शिवसेनेला नवी पालवी फुटत आहे याचे सूतोवाच करणारे होते. शिवतीर्थावर गाईवर बोलणार्‍यांनी महागाईवर सुद्धा बोलावे, हे ठणकावतानाच बिलकीस बानोवर अत्याचार करणार्‍या आरोपींना पेढा भरवण्याची भाजपची भूमिकासुद्धा उद्धव साहेबांनी उघडी पाडली. जात, धर्म, लिंग याच्या पलीकडे जाऊन जो कोणी महाराष्ट्रहिताचा विचार मांडतो तो शिवसेनेचा मित्र आहे, असे म्हणत महाराष्ट्र धर्माची लाइन उद्धव साहेबांनी ठळकपणे अधोरेखित केली. राणे, राणा, शेलार या लोकांनी संस्कार आणि संयमाच्या सगळ्या पातळ्या ओलांडत अध:पतनाची सीमा गाठली, तेव्हाही त्यांचा संयम ढळला नाही.
लोकसभा निवडणुकीत नवीन पक्षचिन्हासोबत प्रचंड धनशक्तीच्या विरोधात महाराष्ट्राच्या जनशक्तीचा नारा त्यांनी बुलंद केला. महाविकास आघाडीचा धर्म पुरेपूर निभावत फक्त स्वपक्षाच्याच नाही, तर आघाडीतील घटक पक्षाचे सुद्धा उमेदवार निवडून यायला हवे यासाठी सबंध महाराष्ट्र पिंजून काढला. २२ जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिर, शरयू तीरावर महाआरती करतानाची त्यांची सपत्नीक छबी वंदनीय बाळासाहेब आणि मातोश्री मीनाताई ठाकरेंची आठवण करून देणारी… रुद्राक्षमाळांसह आपल्या प्रिय शिवसैनिकांना त्यांनी हात उंचावून केलेले अभिवादन हे त्वेषाने लढण्याची उर्मी देणारे आहे.
पक्षफुटीनंतर अंधेरीची पोटनिवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल किंवा पदवीधर शिक्षक मतदारसंघ किंवा काल-परवाची विधान परिषदेची निवडणूक… या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या संयमी शिस्तबद्ध आणि संघटनकौशल्य असणार्‍या नेतृत्वाची मोहर अधिकाधिक गडद होत गेली.
आज ते वयाच्या पासष्टीकडे वळत आहेत.
उद्धव साहेब, आपल्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
आम्ही सामान्य शिवसैनिक. या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला इतकाच शब्द देत आहोत, उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही . खचणार नाही. मागे वळून पाहणार नाही. महाराष्ट्रधर्माची ही लढाई लढताना कुठल्याही दबावाला मोहाला बळी पडणार नाही. ज्या विश्वासघातकी शक्तींनी कपटकारस्थान करून आपल्याला वर्षा बंगल्याच्या पायर्‍या उतरायला भाग पाडलं त्याच वर्षावर आपल्याला दहापट अधिक सन्मानाने स्थापित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून पुष्पगुच्छ हार तुरे नाही तर विधानसभेचा विजय असेल… अन् त्यासाठी कुठल्याही आव्हानांचा सामना करायला आम्ही कटिबद्ध आहोत.

(लेखिका शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.)

Previous Post

महाराष्ट्राचा लाडका नेता!

Next Post

आंब्राई – २७ जुलै २०२४

Next Post

आंब्राई - २७ जुलै २०२४

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.