• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सोहळा सत्संगाचा… हलवा दुधीभोपळ्याचा!!

- वैभव भाल्डे (सुग्रास)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 6, 2024
in खानपान
0

एक जुनी आठवण आहे. विनोद महाराजांना घेऊन सेवा समितीच्या कोणत्यातरी कार्यक्रमासाठी अलिबागला गेलेलो आम्ही. दोन-तीन दिवसांचा मुक्काम असावा. एका संध्याकाळी वेळ होता म्हणून महाराजांना साळावच्या बिर्ला गणेशाच्या दर्शनाला न्यायचे ठरवले, पुण्याला परत यायच्या आदल्या संध्याकाळचीच ही गोष्ट. ते मंदिर व तो परिसर हा एक स्वतंत्र विषय आहे लेखनाचा, तूर्तास एवढेच म्हणेन की हिरव्यागार पाचूंच्या राशीत एखादा शुभ्र हिरा लखलखावा, तसे खुलून दिसते ते श्वेतवर्णी मंदिर! दर्शन घेऊन परतताना अनेक पथारीवाल्यांनी मांडलेल्या निरनिराळ्या गोष्टी खुणावत होत्या, बाकी फार आकर्षण नसले तरी स्थानिक भाज्या, फळं वगैरे दिसले की नकळत थबकतातच पावलं, नाही का? अशाच एका जागी तांब्याच्या आकाराचे, पूर्वी चित्रात असायचे तसे ताजे दुधी भोपळे होते विकायला. इतर वेळी तर एखादा घेतला असता पण महाराज होते बरोबर, म्हटलं मठात पाठवूयात.
घरचा एक व मठासाठी मोठ्ठे दोन असे तीन भोपळे घेतले व कौतुकाने महाराजांना दाखवले तर त्यांनी डोक्याला हातच लावला! म्हणे, ‘अरे, दुधीभोपळ्याची भाजी खाऊन खाऊन सगळे कंटाळलो आहोत आम्ही, त्यात अलिबागहून इतर काही रानमेवा आणायचा सोडून भोपळे आणलेले बघून सगळे ओरडतील की आता.’
आता काय करावं? ‘महाराज, हलवा करून दिला तर आवडेल ना हो? मी विचारलं. हो म्हणाले महाराज आणि माझा जीव भांड्यात पडला! पुण्याला आल्यावर एक दोन दिवसांत सवडीनं दुधी हलवा करून तो मठात नेऊन दिला होता!!
सर्वसाधारणपणे पक्वान्नांच्या यादीत फार वरचं स्थान नसलं तरी कोकणात दुधी हलवा बरेचदा बनवला जातो. सहसा भाजी फारशी आवडत नसल्याने ताजा दुध्या मिळाला की गृहिणी खवा शोधायला लागते हलव्यात घालायला. अलिबागच्या विठोबाच्या यात्रेत हमखास मिळणारा दुधी हलवा घेतल्याशिवाय यात्रा पूर्णच होत नसे, आता तर ठराविक दुकानांत वर्षभर मिळतो तिथे दुधी हलवा.
घरी करायचा म्हटलं ना, तरी सोप्पा आहे बरं. गाजर हलव्यासारखा नुसता केला तर जरा पाणचट होतो, पण दुधीचा कीस पाण्यात उकळून पिळून घेतला आणि नंतर तुपावर परतून त्यात खवा व साखर घातले ना की मस्त बनतो हलवा. दुधीचा कीस उकळताना चिमूटभर सोडा घालायचा पाण्यात, रंग छान टिकून राहतो हिरवागार! खवा नसेल तर अर्थात दूध घातले तरी चालते, पण मग आटवण्याचे काम वाढते. जायफळ वेलदोड्याचा सुगंध, खव्याचा दाटपणा, सुक्यामेव्याची पखरण नी साखरेची गोडी मुळच्या साध्यासुध्या सात्विक दुधीला एकदम वलयांकित करतात की! मला व अनेकांना मनोमन आवडतं असला तरी सर्वसाधारणपणे पौष्टिकतेमध्ये अव्वल असलेला दुधी साध्या चवीमुळे व पाणीदारपणामुळे बरेचदा नाकारला जातो. पण या शाही संगतसोबतीमुळे त्याची मागणी सहज वाढते!
किती महत्वाची ठरते नाही का ही संगत? ‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’ हे ऐकत ऐकत मोठे होताना नकळतच या सुसंगतीचे महत्व अधोरेखित होते मनावर. आपल्यात असलेल्या मूळ गुणांना झळाळवण्याचे काम ही सुसंगत नक्कीच करते. एकमेकांचे पटणारे विचार, समान जीवनमूल्य व ध्येय अशा गोष्टी जुळून आल्या ना, की संगतीनं दोन्ही आयुष्यांचं सोनं होतं. माणसाला माणूस जसा साथसंगत करतो तसेच काम पुस्तकं, स्वत:चेच विचार व आजकाल ही समाजमाध्यमंही करतातच की. नीरक्षीरविवेक जागृत असला की माणूसपणाच्या मार्गावर नक्कीच प्रगती साधतो आपण, मात्र याच जोडीला सत्संग, संतसंग जेव्हा लाभतो ना, खरोखर सार्थकी लागतं आयुष्य!
किती व कोणते दाखले तरी आठवावे? तुकोबारायांच्या एका अभंगाचीच आठवण करायची तरी संगतीचा परिणाम म्हणून चंदनाच्या संगे सुगंधी झालेले बाकी वृक्ष, सागराला समर्पित होऊन विशालता पावलेली नदी, परिसस्पर्शाने सुवर्णात रूपांतरित झालेले लोह तसेच विठ्ठलाच्या संगतीने मनोमन विठ्ठलच झालेले अनेक भक्त, सगळं कसं डोळ्यापुढे येतं. तुकोबा विनवतात की आम्ही घडलोय तुम्ही बि-घडा! परमेश्वर संगतीची गोडी लागली की नकळतच बाकी गोष्टी दुय्यम ठरतात. गिरीशचंद्र घोषांची आठवण येणं क्रमप्राप्त आहे इथे, सगळी नको नको ती व्यवधानं, व्यसनं असलेला हा माणुस ठाकुर श्री रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात आल्याने अंतर्बाह्य बदललाच की.
आपली इच्छाशक्ती व परमेश्वरी कृपा यांचा संगम झाला की असंग नक्कीच टळायला लागतो व सत्संग वाढीस लागतो. आपल्याच मूळच्या निर्मळ स्वरुपाची खूण पटायला लागते व त्याचीच ओढही लागते जिवाला. साधना, जपतप वगैरे काहीशा अप्राप्य वाटणार्‍या गोष्टींपेक्षा ही सत्संगाची पायरी खचितच जवळची व सहजसाध्य वाटते नाही का? फार काही करावंच लागत नाही. केवळ दुधी जसा त्या साखर खव्यात मिसळून जातो ना, तसं स्वत्व बाजूला ठेऊन मिसळायचं फक्त, बाकी आपोआपच घडतं व आयुष्य कारणी लागतं की… म्हणूनच दत्त

परंपरेतील हे भजन खूप भावतं मनाला…
सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे।।
उपदेश ते न देती, परी ऐकाव्या त्या गोष्टी।।
तेची उपदेश होती, त्याही कष्ट नष्ट होती।।
वासुदेव म्हणे संत, संगे करिती पसंत।।

Previous Post

धाकटी पाती : सूर्यकांत

Next Post

स्क्रीन शेअर झाला अन् दोन लाख रुपये गेले…

Next Post

स्क्रीन शेअर झाला अन् दोन लाख रुपये गेले...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.