राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला नाव न घेता कानपिचक्या दिल्यामुळे अनेकांना आनंदाचे भरते आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आता आम्हाला संघाची गरज नाही, आम्ही आमची वाटचाल करायला सक्षम आहोत, अशा वल्गना लोकसभा निवडणुकीच्या काळात केल्या होत्या. त्याला भागवतांनी किती जोरदार उत्तर दिलं आहे, भाजपला आपली जागा दाखवून दिली आहे, अशीही अनेकांची समजूत आहे.
काय म्हणाले आहेत सरसंघचालक?
राजकारणात कोणी शत्रू नसतो, सहमतीने देश चालवला पाहिजे; काम करावे, पण मीच केले असा अहंकार ठेवू नये; देशात शांतता हवी, समाजात वाद नकोत; मणिपूर जळत असताना तिकडे लक्ष दिले पाहिजे, ते कर्तव्य आहे; निवडणूक लढवली पाहिजे, पण खोट्याच्या आधारावर ती लढवता कामा नये, तंत्रज्ञानाचा आधार घेऊन निव्वळ खोटे पसरवले गेले, अशी अनेक विचारमौक्तिके सरसंघचालकांनी त्यांच्या एका अंतर्गत कार्यक्रमात उधळली. ती सगळी फार मौलिक विचार मांडणारी आहेत, पण हा निवडणुकीचा बैल गेल्यावर केलेला झोपा व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होणार्या सुभाषितांइतकाच निरर्थक आणि निरुपयोगी आहे, हे दुर्दैव.
सरसंघचालकांच्या विधानांचा नेमका अर्थ काय असेल, हे तपासून घेण्यासाठी एक साधी गोष्ट करून पाहावी.
लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत आणि एनडीए तीनशेपार असा जनमताचा खणखणीत कौल आला असता, तर भागवतांनी ही उपदेशामृताची गाथा वाचली असती का?
कितीही कल्पनाशक्ती ताणली तरी या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी देता येणार नाही.
भाजप यशस्वी झाला असता, तर भागवतांनी काही छोटे छोटे सबुरीचे सल्ले दिलेच असते; पण संघ आता नाराज झाला आहे, तो भाजप आणि मोदींना झोडून काढतो आहोत, हा जो काही बनाव उभा केला गेला आहे, तो तेव्हा निश्चितच केला गेला नसता.
मोदींनी आणि भाजपने ज्या काही चुका केल्या आहेत, असा सरसंघचालकांना आत्ता साक्षात्कार झाला आहे, त्या चुका काही आजच्या नाहीत. निवडणुकांच्या प्रचारकाळातच त्या प्रस्थापित झाल्या होत्या. त्यातल्या अनेकांच्या आधारे निवडणूक लढवली जात होती. त्या चुका असतील तर त्यांच्यावरचं भाष्य निकालनिरपेक्ष असायला हवं होतं. तसं असण्याची शक्यताच नाही. भाजपला यश मिळालं असतं, तर अमुक गोष्टींमुळे लोकांनी भाजपला धडा शिकवला, असं मुळात म्हणताच आलं नसतं. त्या सगळ्यांमुळेच विजय मिळाला, मात्र हुरळून जाऊ नका, अशी गोड गोड मांडणी करायला लागली असती. गोम अशी आहे की संघाला भाजपचा विंचू आपल्या चपलेने ठेचायचा नाही, तर तो जनमताच्या काठीने ठेचतो आहोत, असं दाखवायचं आहे. ती काठी हाताशी नसती, तर मोदींचं आणि भाजपचं अहंकारी वर्तन, खोट्यानाट्याचा वापर, मणिपूरकडे दुर्लक्ष यातलं काहीही संघाला खुपलं असतं, असं मानायला फारशी जागा नाही.
कारण, बाकीच्या देशाने अटलबिहारी वाजपेयी या भाजपच्या आधीच्या पंतप्रधानांचे कितीही कौतुक केलेलं असलं, तरी संघाच्या दृष्टीने ते उदारमतवादी नेहरुवादाचा अंगीकार करणारे संघपठडीच्या बाहेरचेच नेते होते. त्यांच्या अतीव लोकप्रियतेमुळे त्यांना पंतप्रधान बनवण्यावाचून गत्यंतर नव्हतं. तशी लोकप्रियता अडवाणींना (रथयात्रा काढूनही) कधीच लाभली नाही आणि एनडीए सरकार चालवायला आवश्यक लवचिकता त्यांच्यापाशी नव्हती, म्हणून नाईलाजाने अटलजींना पंतप्रधानपदावर बसवलं गेलं होतं. संघाची मूळ उद्दिष्टं साध्य करण्यासाठी सामदामदंडभेद वापरून रेटा निर्माण करणारे संघासाठीचे आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होते, आहेत आणि नवा पर्याय निर्माण होईपर्यंत असतील. त्यांनी सर्व प्रकारची हत्यारं वापरून संघाच्या अजेंड्यावरचे अनेक विषय मार्गी लावले आहेत. त्याही वेळी ते अहंकारीच होते, धादांत खोट्या गोष्टी बोलतही होते, पसरवतही होते, तेव्हाही त्यांनी चीनच्या घुसखोरीपासून शेतकरी आंदोलन आणि महिला पैलवानांवरच्या अत्याचारांपर्यंत अनेक गंभीर गोष्टींकडे कानाडोळा करण्याचा प्रमाद केलाच होता… पण, तेव्हा भागवतांनी त्यांना खासगीतही कानपिचक्या दिल्याचे कधी कोणी ‘खास गोटांच्या हवाल्याने’ दिल्या जाणार्या बातम्यांमध्ये वाचलेलं नाही. जाहीरपणे तर मोदींनी संघाला गुंडाळून ठेवल्याचंच चित्र होतं आणि ते संघाने आनंदाने स्वीकारलं होतं.
आत्ताही सरसंघचालकांनी मणिपूरचा विषय काढला, तिथे अशांतता, जाळपोळ, खुनाखुनी एक वर्षापासून सुरू आहे. भाजप या पक्षापेक्षा ईशान्य भारतात संघाचं नेटवर्क अतिशय खोलवर गेलेलं आहे. तिथे मिशनरी वृत्तीने राबलेले अनेक संघ प्रचारक आजही आहेत. तिथल्या परिस्थितीमध्ये भाजपने, मोदींनी हस्तक्षेप करावा, अशी संघाची खरोखरच इच्छा असती, तर ते करण्यासाठी त्यांना मोदींचीही गरज भासली नसती. तसा तो केला गेला नाही. एक वर्षात भागवतांना मणिपूरची आठवण आली नाही, तेही तिथे गेले नाहीत, हा योगायोग नाही.
मोदींच्या काहीश्या मनोरुग्णतेकडे झुकलेल्या अहंमन्यतेने आणि सत्ताकांक्षेपोटी असंगांना पावन करून घेण्याच्या वृत्तीने अंमळ नाराज झालेल्या स्वयंसेवकांची वाफ काढण्यापुरत्याच या कानपिचक्या आहेत… भाजप-संघाचा मिला-जुला कुकर केक काही त्यामुळे करपणार नाही. विरोधकांनी भलत्या भ्रमात राहू नये.