• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

भाऊसाहेबांची खबर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 21, 2020
in मार्मिक हीरक महोत्सव
0
भाऊसाहेबांची खबर

‘सिने प्रिक्षान’ हे ‘शुद्धनिषाद’ यांचं सदर मार्मिकमध्ये अफाट लोकप्रिय होतं. त्या काळातल्या चित्रपट परीक्षणाच्या सगळ्या चौकटी, सगळे साचे मोडून सिनेमांची आणि सिनेमावाल्यांची गुळगुळीत ‘हजामत’ करून देणारं हे श्रीकांत ठाकरे यांचं सदर मार्मिकच्या पहिल्या अंकात ‘अंधेरनगरी’ या नावाने अवतरलेलं आहे आणि त्यात ‘अंतरीचा दिवा’ या चित्रपटाची चंपी करण्यात आली आहे. तिचा हा संपादित अंश.

‘अभ्यास करायला हवा’ हे अत्यंत मौलिक तत्त्व चिरंजिवांच्या मनावर बिंबवण्यासाठी विसूभाऊंनी त्याला समोर बोलावले आणि तो येऊन उभा राहताच विसूभाऊ म्हणाले, ‘बाळू, अर्जुन धनुर्धारी कसा झाला?’
बाळू अंगठा चावत म्हणाला,

‘ते मला काय माहीत? मी थोडाच अर्जुन आहे?’

विसूभाऊ या उत्तराने बिलकुल विचलित न होता पुढे म्हणाले, ‘ज्ञानेशांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्यामागे केवढा अखंड व्यासंग असला पाहिजे?’
‘कुणास ठाऊक बरं’, बाळूचे उत्तर.

‘समुद्र अखंड खळखळत न राहता परसातल्या डबक्यासारखा शांत झाला तर त्याचे रूप भव्य कुणाला वाटेल?’

‘काय की’, बाळूचे उत्तर‘न का वाटेना!’

`आणि बाळू’ वडील म्हणाले‘ सूर्य रोजचे उगवणे, मावळणे टाकून एकाच जागी गप्प राहिला तर त्याचे महत्त्व कितपत उरेल?’
‘नाही उरणार’, बाळूचे बेधडक उत्तर.

‘आता’ बाळूचे वडील ‘ड्रायव्हिंग द पॉइंट होम’ का काय असते ते करीत म्हणाले, ‘रोजच्या उगवण्याला सूर्य चुकला तर त्याचे सूर्य म्हणून महत्त्व राहणार नाही. समुद्र खळबळायचा बंद झाला तर त्याला कुणी रौद्र गंभीर म्हणणार नाही. अखंड व्यासंगाभावी ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी सुचली नसती. तात्पर्य काय? तू सांग बरं.

‘काय?’ बाळू बिलकुल उत्साह न दाखवता म्हणाला, ‘दुसरे काय? तुम्हाला विड्यांचे बंडल आणून हवे आहे. हं द्या एकदाचे पैसे.’

सारांश: रूपकांनी, दृष्टांतांनी प्रत्यक्षात कुणाच्याही डोक्यात हवा तो प्रकाश फारसा पडत नाही. क्वचित असलेलाच गडबडतो. परंतु चित्रपटात – त्यातही ‘अंतरीचा दिवा’ या चित्रपटात उपमा, उल्लेख, रूपके आणि दृष्टांत म्हणजेच प्रकाश आहे. या चित्रपटात पात्रे उठता उपमा आणि बसता दृष्टांत देतात ती रूपकात रडतात, उत्प्रेक्षेवर हसतात असे म्हटले तर फारसे विनोदी ठरणार नाही. आणि हा चित्रपट आहे म्हणून यात पात्रे बोलतात एवढे म्हणायचे झाले. खरे म्हणजे ती नुसतीच तोंडे हलवतात आणि भाऊसाहेब ऊर्फ वि.स.खांडेकर बोलतात. प्रत्येक पात्राच्या मुद्रेवर जागोजाग दिसणारा आज्ञाधारकपणा हा याचा पुरावा. क्वचित असेही वाटते की, दिग्दर्शक प्रत्येक पात्राला शॉटच्या आधी भीती घालत असावा, वाक्य नीट म्हण नाहीतर कॅमेर्‍यातून भाऊसाहेब बाहेर येतील.

असा हा आरंभापासून अंतापर्यंत भाऊसाहेबच झालेला चित्रपट, भाऊसाहेबांप्रमाणे आजच्या, अगदी उद्याच्यादेखील जळत्या समस्यांचा विचार कालपरवाच्या-त्यातही सन एकोणीसशे वीस ते चाळीस या दरम्यानच्याच दृष्टिकोनातून, भावनाप्रधान दृष्टिकोनातून अत्यंत तळमळीने करणारा म्हणून निष्फळ, निरर्थकपणा पण उदात्त!

`ष्टोरी’

उभे आयुष्य सत्प्रवृत्तपणे काढलेल्या एका शिक्षकाच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न या चित्रपटाच्या कथानकात तिच्या भावाच्या त्यागयुक्त गुन्हेगारी आयुष्याच्या सहाय्याने शेवटी एका न्यायमूर्तीशी तिचे लग्न लावून सोडवला आहे.

दिग्दर्शक माधव शिंदे वास्तविक ‘रशिया रिटर्न्ड’ दिग्दर्शक. विनायकरावांचे गुण दिग्दर्शनातल्या अभिनयाच्या अट्टहासाने गाळून दोष तेवढे यावेत हे साहजिकच. हा कथासंवादांच्या धाटणीइतकाच तंत्रातही हा चित्रपट १९३०-४० या काळात त्यांनी नेवून ठेवला आहे. जे इथे मागे कुठेतरी (याहून बर्‍या स्थितीत) पहिल्यासारखे वाटते. आणि सर्व घडले आहे असा भास होत राहतो.

साळवी, सूर्यकांत, सीमा, उमा, सुधा आपटे, बर्ची बहाद्दर, लाटकर ही या चित्रपटातली कळसूत्री बाहुली पात्रे. खांडेकरांच्या हातची एक-दोन पाने गफलतीने ढिली पडल्याने उमा या नटीला थोडाफार स्कोप मिळाला आहे. त्यामुळे ती अभिनेत्री या पदाला किंचित काळ पात्र होते आणि अनुभवापोटी जे काही करते ते बरे वाटते..

बर्ची बहाद्दर या इतिहासकालीन नावाने प्रसिद्ध असलेल्या सामाजिक नटाने या चित्रपटातला ‘व्हिलन’ थेट कलुषा कब्जीच्या ‘ष्टाइल’वर उभा केला आहे. नायक सूर्यकांत धर्मवीर संभाजीचा अभाव मुळीच भासू देत नाही ‘भुर्रर्र’ हा खांडेकरांच्या संवादातला सर्वात साधा नि सरळ उद्गारही तो, ‘जगासकट जगदीश्वराला’च्या दमछाकीने उच्चारतो. शिक्षकाची मध्यवर्ती भूमिका साळवीनी नाईलाजाने आणि असहाय्यतेने वठवली आहे. आणि हीच त्यांच्या भूमिकेची श्रेष्ठ वैशिष्ट्ये असल्याने ते यशस्वी झाले आहेत. सीमा ही तरी दिवसेंदिवस पारदर्शक होऊ लागली आहे. ती केवळ भूमिकेशीच नव्हे तर भोवतालच्या वस्तूंशीही तद्रूप होते. काही दिवसांनी पडद्यावर तिला शोधून मगच तिच्या अभिनयाचे मूल्यमापन करावे लागेल अशी भीती वाटते.

हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत हा या ‘सब कुछ भाऊसाहेब’ चित्रपटातला एकमेव बंडखोर भाग. अखंड चळवळ, वळवळ, धावपळ, उलटसुलट झुकांड्या हे याचे गुणधर्म. कोणत्याही तालावर, सुरावर, रागावर ते क्षणभरही स्थिर होत नाही व काशीपासून रामेश्वरपर्यंत नि अटकेपासून कटकेपर्यंत ते सारखे दौड मारीत राहाते. बहुधा मागे लागलेल्या भाऊसाहेबांना चुकवण्यासाठी! या गडबडीत प्रेक्षकांचे कान आणि शुद्ध मराठीही त्याने चुकवली आहे. उदाहरणार्थ : ‘अंतरीचा ज्ञान दीऽवा.’

Previous Post

‘मार्मिक’चं ऋण

Next Post

अस्वस्थ असंतोषाचा आक्रमक उद्गार!

Next Post
अस्वस्थ असंतोषाचा आक्रमक उद्गार!

अस्वस्थ असंतोषाचा आक्रमक उद्गार!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.