• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

- संजय डहाळे (तिसरी घंटा)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 13, 2023
in मनोरंजन
0

‘डॉक्टर ऑन वॉरफ्रंट’ ही कल्पनाच अंगावर शहारे आणणारी. चारही बाजूंनी हादरून सोडणार्‍या युद्धभूमीवर तिथल्या रुग्णांचे प्राण वाचवणार्‍या डॉक्टरांचं जगणं आणि रुग्णसेवा ही क्षणोक्षणी नवा, थरारक अनुभव. जिथे वैद्यकीय सेवा पोहचणंच महाकठीण आहे, तिथे एक ‘मिशन’ म्हणून काम करण्याचे हे तसे धाडसी पाऊल. युद्धंही संपता संपत नाहीत आणि संपल्यासारखी वाटली तरी त्यांच्यामुळे झालेला विनाश आवरता येत नाही. शेवटी कुठल्याही प्रश्नाला युद्ध हे उत्तर नाही.
नाशिकच्या राघव दीक्षित या अशाच एका तरुण, ध्येयवादी डॉक्टराची युद्धभूमीवरली सोडणारी एक डायरीच ‘देवमाणूस : माणूस होण्याची गोष्ट’ या नाटकातून आकाराला येते. ती माणसामाणसातील अस्तित्वाच्या एका जागतिक प्रश्नाला वाचा फोडते.
युद्धाच्या आखाड्यात थेट पोहचून तिथल्या परिस्थितीचे वार्तांकन करणे किंवा तिथल्या रुग्णांचे जीव वाचविणे, या दोन्ही सेवा या त्या त्या क्षेत्रातल्या आव्हानात्मक कामगिरी समजल्या जातात. कारण अशा धुमश्चक्रीत डॉक्टर आणि पत्रकार यांच्या जिवावरही बेतू शकते. हे तसे जोखमीचे काम. अनेकांनी आजवर यात प्राण गमावले आहेत. संभाव्य संकटे अन् धोक्यांच्या मालिकाच अशा वाटेवर उभ्या असतात.
या नाट्यातला डॉक्टर राघव यातून निघालाय. त्याने अशा वेदना, दुःख, जखमा या आयुष्यात कधी अनुभवाव्या लागतील, याची साधी कल्पनाही केली नव्हती. पहिल्या वळणावर तो सिरियात पोहचतो. बॉम्बस्फोट, गोळीबार यांच्या भडिमारात त्याला एलियट या सहकार्‍याची साथसोबत आहे. दोघेही रुग्णउपचार सुरू करतात. तिथल्या फिरोजची कथा कळते. त्याच्या शेजारी राहणारा मुलगा फुटबॉल खेळताना जखमी होतो. त्याचा जीव वाचतो, पण दोन्ही पाय कापावे लागतात. सीरियातलं मृत्यूशी खेळ खेळणारं जगणं त्यातून अधोरेखित होतं. फिरोजची मन:स्थिती तसेच दर्दभरी कथा युद्धाचे भयानक परिणाम सांगणारी.
सिरियानंतर डॉक्टर राघव हा रामथात पोहचतो. जिथला शोएब युद्धामुळे रक्ताळलेला. स्वतःची ओळखही ओळखपत्रापुरती शिल्लक राहिलेली. तेही रक्तात बुडालेलं. दस्तगीर ही युवती तिथे येते. आता जगणं मुश्कील आहे. खाणं नाही. आसरा नाही म्हणून मारून टाका, अशी मागणी ती डॉक्टरांकडे करते.
तिसरं मिशन हे झत्तारी. जी जगातली सर्वात मोठी निर्वासितांची छावणी. इथे शबाना ही मतिमंद तरुणी डॉक्टरांना भेटते. बॉम्बस्फोटाचा आवाज आला की नाचायचं, ओरडायचं, गाणं म्हणायचं असं तिला तिच्या अब्बूने शिकवलं होतं. त्यामुळे आपण अजूनही जिवंत आहोत, हे उभ्या जगाला कळेल, हे त्यामागलं लॉजिक! तिचा बाप छावणीतल्या उपचार केंद्रावर आणला गेला तोच मृतावस्थेत. अब्बू आणि शबाना या बाप-लेकीतलं हळुवार नातं यातून पुढे येतं, जे हेलावून सोडतं. आणखी एक फेरीवाला करीम आईस्क्रीमचा डबा घेऊन फिरतोय. युद्धापूर्वी या करीमचा जहाजांना आवश्यक यंत्रांचा कारखाना होता. पण आज त्याच्या नशिबी आइस्क्रीम विकण्याची वेळ आलीय. श्रीमंत उद्योगपतीचा गरीब, लाचार फेरीवाला बनलाय.
पुढे ‘येमेन’च्या उपचार केंद्रावरही अशीच परिस्थिती. शेवटचं शहर मोसूल. तिथे डॉक्टर पोहचतो. सारं काही जमीनदोस्त झालेलं. कोणे एकेकाळी इथे शहर होतं, हे न पटणारं. असा एका डॉक्टराचा सीरिया ते मोसूल हा प्रवास! जो प्रत्येक कामगिरीवर अनेक मुखवट्यांमागल्या अस्वस्थतेने भरलेला. माणसाला माणूस म्हणून बघता आलं पाहिजे. त्यात फरक झाला तर त्याची परिणती युद्धात होते आणि कोणतेही युद्ध हे कोणत्याही प्रश्नांवर उत्तर असू शकत नाही. उलट त्याचे परिणाम माणसाला माणसातून उठवतात. माणूस असण्याची लाज वाटायला भाग पाडतात, असा संदेश देण्याच प्रामाणिक प्रयत्न नाटककार शंतनू चंद्रात्रे यांनी केला आहे. युद्ध आणि रुग्ण याभोवती सफाईदारपणे गुंफलेलं कथानक खिळवून ठेवते.
दिग्दर्शक जयेश आपटे यांनी नाटकाच्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. ‘स्क्रीन’चा वापर करून बदललेल्या युद्धभूमीचे संकेत चांगले दिलेत. नाट्य कुठेही रेंगाळणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. प्रयोगाची तयारी चांगली केलीय. पानिवडीत नेमकेपणा दिसतोय. डॉ. राघव दीक्षितच्या मध्यवर्ती भूमिकेत श्रीपाद देशपांडे याने नाटक जणू एकखांबी पेलून धरलंय. भूमिकेतील सहजता नजरेत भरते. शेवटच्या प्रसंगातील काव्यात्मकता हेलावून सोडते.
डॉक्टर राघवव्यतिरिक्त अन्य दोन तीन भूमिका या कलाकाराने केल्यात. त्यात विविधता आणण्याचा देहबोलीतून प्रयत्न झालाय. शर्वरी पेठकर (हमीदा आणि झहीरा); दुर्गेश बुधकर (डॉ. एलियट, दस्तगीर आणि साहिर); प्रणव प्रभाकर (फिरोज, करीम, अब्दुल्ला आणि मुस्तफा); आशिष चंद्रचूड (शोएब, बंडखोर कवी आणि रेहमान); ऋतुजा पाठक (शबाना, शाहीन) या कलाकारांची टीम शोभून दिसते. अपूर्वा शौचे यांची वेशभूषा आणि सचिन वारीक यांची रंगभूषा या पात्रांच्या उभारणीत महत्त्वाची कामगिरी पार पाडतात. प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा दिसतो.
नेपथ्यरचनेत युद्धभूमीवरचा भास विलक्षणच. स्क्रीनच्या वापरात देश, वास्तू आणि उद्ध्वस्तता दिसते. लेव्हल्स आणि त्याच्या मोकळ्या फटीतून प्रकाश-धूर तसेच पडलेल्या इमारतींचे पसरलेले सांगाडे, वैद्यकीय तंबू, हे सारं काही दाद देण्याजोगे. प्रेक्षकांच्या गॅलरीतून प्रकाशझोत, अंगावर येणारा प्रकाश-अंधार, त्यामागली युद्धाची भयानकता नोंद घेण्याजोगी. हर्षद माने, विशाल नवाथे आणि अंकुश कांबळी यांचे नेपथ्य तसेच अमोघ फडके यांची प्रकाशयोजना चांगली जुळली आहे. शुभम जोशी व सायली सावरकर यांचे संगीत पूरक. बॉम्बस्फोट, गोळीबार, आक्रोश याची मांडणी उत्तम. एकूणच नाववाले कलाकार, दिग्दर्शक, नाटककार नसूनही व्यावसायिक रंगभूमीवर एका उंचीवर हा आविष्कार पोहचतो. जो वेगळ्या आशय, विषय, सादरीकरण यामुळे लक्षवेधी ठरतो.
‘देवमाणूस’ या गाजलेल्या मालिकेतला डॉक्टर आणि या नाटकातील डॉक्टर यात जमीनअस्मानाचा फरक आहे. ‘माणूस होण्याची गोष्ट’ या उपशीर्षकाची जोड इथे देण्यात आलीय. मालिकेच्या चाहत्यांची इथे जरा फसगत होईल. हा ‘देवमाणूस’ एका जागतिक विषयावर भाष्य करणारा आहे, हे महत्त्वाचे!
मालवणी बोलीभाषेला सातासमुद्रापार पोहोचविणार्‍या नटश्रेष्ठ मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ने गेल्या चाळीसएक वर्षात दर्जेदार नाटकांची पताका फडकवली. ‘वस्त्रहरण’ या नाटकाने नाबाद पाच हजार प्रयोगांचा जागतिक विक्रमही पार केलाय. प्रसाद कांबळी यांनी बाबूजींच्या निधनानंतर २००७पासून रंगभूमीवर विषयांची विविधता आणली. त्यात संगीत ‘देवबाभळी’ने ४४ पुरस्कार पटकाविले. व्यावसायिक गणितांचा विचार न करता आशयसंपन्न नाटकांची परंपरा ही पुढे सुरू आहे. दर्जेदार नाटकांची मालिकाच त्यातून साकार झालीय. ‘देवमाणूस’ ही भद्रकालीची ५८वी नाट्यकृती. आता लवकरच नाबाद ६०वी निर्मितीचे वेध लागले आहेत. ‘भद्रकाली’च्या वाटचालीत १८,००० प्रयोगांचा प्रवास हा विविधरंगी ठरलाय.
आजच्या वेगवान युगातही जगताना अध्यात्माची अनोखी सांगड मांडणारे संगीत ‘देवबाभळी’ आणि त्यामागोमागच युद्धपरिणामांचे दर्शन घडविणारे ‘देवमाणूस’ ही दोन्ही नाटके ‘भद्रकाली’ची माईलस्टोन ठरण्यासारखी आहेत. रसिकांच्या मानसिकतेत काही बदल होत आहेत हेच दर्शविणारी. दोन्ही नाटकांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद विषयाच्या ताकदीचे महत्त्व सांगणारा आहे.
एकेकाळच्या कुरुक्षेत्र, पानिपत, कलिंगा आणि आजच्या सीरिया, येमेन, इराक, रशिया, युक्रेन इथली सारी युद्धे ही भविष्यकाळ अंधारमय करून गेली. युद्धानंतरच्या परिणामांवर उत्तरे मिळत नाहीत. प्रश्न कायम अनुत्तरितच राहिले आहेत. रंगभूमीवर कॉमेडी नाटकांची चलती असताना ‘युद्ध नको, शांती हवी!’ हा संदेश युद्धभूमीवरल्या डॉक्टरांच्या चष्म्यातून टिपण्याचा चौकटीबाहेरचा एक प्रयत्न व प्रयोग या निर्मितीतून झालाय. मनोरंजनाऐवजी अंजन घालण्याचा त्या मागला प्रामाणिक हेतू आहे. जगापुढला गंभीर प्रश्न या निर्मितीतून मराठी रंगभूमीवर आलाय. जो ‘आशयप्रधान हृदयस्पर्शी नाट्य’ म्हणून समृद्ध करतोय!

देवमाणूस : माणूस होण्याची गोष्ट

लेखक – शंतनू चंद्रात्रे
दिग्दर्शक – जयेश आपटे
नेपथ्य – हर्षद माने, विशाल नवाथे, अंकुश कांबळी
संगीत – शुभम जोशी, सायली सावरकर
प्रकाश – अमोघ फडके
वेशभूषा – अपूर्वा शौचे
रंगभूषा – सचिन वारीक
व्यवस्थापक – श्रीकार कुलकर्णी
निर्माती – कविता मच्छिंद्र कांबळे
निर्मिती – भद्रकाली प्रॉडक्शन्स

[email protected]

Previous Post

ज्योत से ज्योत जलाते चलो

Next Post

कुच इलम है क्या बंटाय?

Next Post

कुच इलम है क्या बंटाय?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.