• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ज्योत से ज्योत जलाते चलो

- पुस्तकाच्या पानांतून

Nitin Phanse by Nitin Phanse
January 13, 2023
in भाष्य
0

संगीत हा आमचा ईश्वर आहे. लक्ष्मीजी देहरूपानं गेले पण ते आजही माझ्या मनात असतात. त्यांच्याशी मनसंवाद सुरू असतो. सतत वाटत राहतं, आता कुठूनही लक्ष्मीजी येतील, खांद्यावर हात टाकून म्हणतील, ’’चल प्यारे, कुछ नया कर लेते है ।’’… डॉ. नितीन दत्तात्रेय आरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतींच्या डिंपल प्रकाशन प्रकाशित नव्या पुस्तकातील ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांची मुलाखत… संपादित स्वरूपात.
– – –

माझे वडील पं. रामप्रसाद शर्मा (बाबाजी) हे विख्यात ट्रम्पेटवादक होते. गोरखपूर-बडोदा-कलकत्ता-कराची-मुंबई-पुणे-मुंबई असा प्रवास करत ते मुंबईत स्थायिक झाले. पाश्चात्त्य पद्धतीची नोटेशन करू शकणारी अगदी मोजकी माणसं त्या काळात होती, त्यापैकी एक बाबाजी होते. त्यांनी बाबुलाल नावाच्या बॅण्डमास्टरकडून प्रारंभीचे धडे घेतले होते. चित्रपटात ते रमत गेले. त्यांनी त्यांच्याजवळची नोटेशन लेखनाची विद्या मुक्तहस्तानं सर्वांना दिली. माझ्या वयाच्या आठव्या वर्षी केव्हातरी, एका सकाळी आठ वाजता त्यांनी मला समोर बसवलं व नोटेशन कसं करायचं ते अर्ध्या तासात सांगितलं. त्यानंतर, मी पुढचे तीन दिवस बारा बारा तास नोटेशन लेखनाचा सराव करत होतो. लगेच त्यांनी मला व्हायोलिन शिकवायला घेतलं. ’व्हायोलनिस्ट’ला भारतीय किंवा पाश्चात्त्य संगीतात मरण नाही,’ असं ते म्हणत. त्यांनी व्हायोलिन हाती दिलं, पण वाजवायला शिकवलं ते सहा महिन्यांनी! पाश्चात्त्य पद्धतीनं व्हायोलिन वाजवायला बसायची एक पद्धत आहे. व्हायोलिनवादक डावा खांदा व डावा पाय, काहीसा पुढे काढून ताठ व डौलदार बसतो. व्हायोलिन खांद्यावर जिथे ठेवायचा तो भाग कसा धरायचा, व्हायोलिन कसं पकडायचं, ते उजव्या हाताच्या अंगठ्यानं आणि तिसर्‍या चौथ्या बोटानं कसं व कुठे धरायचं या सार्‍याचं एक शास्त्र आहे. ते शास्त्र येईपर्यंत त्यांनी मला व्हायोलिन वादनाची कला दिली नाही.
संगीत ही उपजत लाभणारी कला असली तरी तिची आराधना अत्यंत कष्टदायी असते, याची जाणीव बाबाजींनी दिली. माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी बाबाजींनी, गांधीजींच्या पुतळ्यासमोर, ’आता मी वादन करणार नाही. माझ्या जागी प्यारेलाल वाजवेल,’ अशी शपथ घेतली. मी रणजित स्टुडिओत नोकरी करू लागलो. चंदूलाल शहा व त्यांची पत्नी गोहरबाईंना मी ’धीरे से आजा रे’सारखी गाणी गाऊन दाखवित असे. तिथेच बाबाजींनी मला अ‍ॅन्थनी गोन्साल्वीस यांच्या स्वाधीन केलं. त्यांनी माझे व्हायोलिनवादनातले न्यून सरते करून घेतले. (पुढे ’अमर अकबर अँथनी’ या चित्रपटात त्यांच्या नावे एक गाणं करून त्यांच्याविषयीचे ऋण आम्ही व्यक्त करू शकलो, त्यावेळी ते स्वत: हजर होते). मी मग एकेका संगीतकाराकडे वाद्य वाजवू लागलो. खेमचंद प्रकाश, बुलो सी. रानी, एस. महेंदर, हंसराज बहल, निसार बाज्मी, ज्ञान दत्त, सुधीर फडके यांच्यासोबत सी. रामचंद्र, नौशादसाहेब, नय्यरसाहेब, शंकर जयकिशन, मदनमोहन असे नव्या दमाचे संगीतकार आले होते. अशा दिग्गजांकडे मी काम करू लागलो. या प्रवासातच माझी ओळख लक्ष्मीजींशी झाली. ते माझ्यापेक्षा तीन-साडेतीन वर्षांनी मोठे होते. मेंडोलिन वादक म्हणून त्यांचं नाव झालं होतं. रेडिओ क्लबमधील एका कार्यक्रमात त्यांच्या मेंडोलिन वादनानं लता मंगेशकरजींचं लक्ष वेधून घेतलं आणि त्या लक्ष्मीजींची शिफारस करू लागल्या. आम्ही पहिलं संगीत सहाय्यकाचं काम केलं ते कल्याणजी-आनंदजी यांच्या राज कपूर अभिनीत ’छलिया’साठी. त्यानंतर शंकर-जयकिशन व ओ. पी. नय्यर सोडून सर्वांसाठी आम्ही काम केलं. त्याचं कारण त्या दोघांकडे सेबेस्टीअन नावाचे साहाय्यक होते व ते अद्भुत बारकाव्यानं काम करायचे. शंकर-जयकिशन यांच्या ऑर्वेâस्ट्राचं आम्हाला आकर्षण होतं. आम्ही त्यांचा खूप अभ्यास केला. त्यांचं सामर्थ्यस्थान व न्यून कोणतं ते शोधण्याचा प्रयत्न केला. ते प्रतिभाशाली होते, पण त्यांचं कोणतं गाणं जयकिशनजींचं व कोणतं शंकरजींचं हे कळून यायचं. मी उत्तम संगीत संयोजक होतो, लक्ष्मीजी उत्तम चाली बांधायचे. आम्ही दोघं चाली करायचो व संयोजनही करायचो. पण मी चाल दिलेलं गाणं कोणतं आणि लक्ष्मीजींनी चाल दिलेलं गाणं कोणतं हे सांगता येणार नाही, इतकं ते एकजीव व्हायचं. आमचे विचार एक झालेले होते. गाणं कोणतं, ते आठवत नाही, पण अंघोळ करताना मी त्याला चाल दिली व लक्ष्मीजींकडे गेलो. त्यांनीही त्यावर काम केलं होतं. त्यांची-माझी चाल एकसारखी होती. कोणीतरी आम्हाला, ’तुमचं रक्तपण सारखं असेल.’ आम्ही रक्ततपासणी केली, तर आमचा रक्तगट पण एकच- ’बी पॉझिटिव्ह’! वृत्तीसारखा रक्तगट!
आमचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट म्हणजे ’पारसमणी.’ त्याला प्रचंड यश मिळालं. नंतर आला ’दोस्ती.’ त्याचंही संगीत छान झालं होतं. लक्ष्मीजी म्हणाले, ’’दुसरं काही नाही तरी फिल्मफेअरसाठी आपल्याला संगीताचे नामांकन मिळायला हवं.’’ त्यावेळी कसले जबरदस्त चित्रपट समोर होते. शंकर-जयकिशन यांचा ’संगम’, मदनमोहनजींचा ’वह कौन थी’, नौशादसाहेबांचा ’लीडर.’ आम्ही काय केलं, खिशातून पंचवीस पंचवीस हजार रुपये काढले, सव्वा लाख रुपयांचं कर्ज काढलं. असं पावणे दोन लाखाचे ’फिल्मफेअर’ विकत घेतले आणि त्यातल्या कूपनांवर संगीत विभागासाठी ’दोस्ती’चं नाव लिहून पाठवून दिलं. आमचं नामांकन तर आलं. पण आम्ही तोकडे पडणार हे माहिती होतं. म्हणून आम्ही आमच्या कामात गढून गेलो. त्यावेळी आम्ही सांताक्रुझला एक फ्लॅट भाड्यानं घेतलेला. रात्री उशिरापर्यंत आमच्या बैठका चालायच्या. त्यामुळे उशिरा उठायचो. एका सकाळी नऊ वाजता फ्लॅटच्या खिडकीवर कोणीतरी जोरजोरात थाप दिली- ’’अरे, गाढवांनो, झोपताय काय? उठा, तुम्हाला फिल्मफेअर मिळालंय.’’ ते सी. रामचंद्र होते. त्यांच्यासारखा एवढा मोठा संगीतकार आमचं कौतुक करायला घरी आला होता. तो काळच तसा होता. स्पर्धा नव्हती, होता तो परस्परांविषयीचा आदर, स्नेह.
त्यानंतर मात्र आमची गाडी भरधाव वेगानं धावू लागली. वर्षाला १२-१५, कधी कधी २२-२३ चित्रपट आम्ही केले. लक्ष्मीजींनी ’पारसमणी’ बंगला बांधला, तर मी त्यांना म्हणालो, ’म्युझिक रूम रस्त्याच्या बाजूला हवी, त्याला लागून आपलं कार्यालय हवं.’ त्यांनी तसंच केलं. रविवार सोडून रोज आम्ही सकाळी ११.०० ते रात्री १०.३० पर्यंत काम करायचो. चाळीस वर्षं आमचा हा दिनक्रम असे. संगीताच्या वेळी फक्त संगीत. त्यामुळे सुमारे सव्वासहाशे चित्रपटांचं संगीत आमच्याकडून घडलं.
लोक विचारतात, ’चाल सुचते कशी?’ काय सांगू? तो क्षण विजेचा असतो. तो शब्दात नाही पकडता येत. पण काही वेळा बाह्य गोष्टी या चाल सुचण्याला प्रेरक ठरतात. ’मेरा गाव मेरा देस’ नावाच्या चित्रपटात एक प्रसंग असा होता की धर्मेंद्र, आशा पारेख यांना डाकूंनी बांधलंय व विनोद खन्ना सरदार आहे. त्या प्रसंगासाठी गाणं हवं होतं. या सर्वांच्या तारखा घेऊन ठेवल्या होत्या व गाणं तयार होत नव्हतं. दुसर्‍या दिवशी शूटिंग होतं आणि गाणं तयार नव्हतं. अचानक, त्या चित्रपटातला एक संवाद, लक्ष्मीजींना प्रेरणा देऊन गेला, ’मार दिया जाय, के छोड दिया जाय?’ पुढची ओळ त्यांना सुचली, ’बोल, तेरे साथ क्या सुलुक किया जाय…’ त्यापुढच्या ओळी लिहिल्या गेल्या, चाल झाली व गाणं रेकॉर्डही झालं! आम्हाला नावीन्याची आवड आहे. आम्हाला पुनरावृत्ती आवडत नाही. आम्ही, ’आन मिलो सजना’मध्ये संवादगीत (अच्छा, तो हम चलते है) आणलं, त्यानंतर तसा ट्रेंड सुरू झाला. आम्ही गाण्यात प्रारंभीच्या सुरावटीनंतर असा एखादा नवा दिलखेचक तुकडा देण्याचा प्रयत्न करतो की, तो लोकांच्या तोंडी त्या गाण्याबरोबरचा अविभाज्य घटक बनेल. ’परदा है परदा’ ही कव्वाली किंवा ’हाय हाय ये मजबुरी’ हे गाणं ऐका. ’परदा है’च्या मुखड्यानंतर लगेच क्लेरोनेट व व्हायोलिनचा असा काही तुकडा बनला की तो तुकडाही गुणगुणला जातो. ’हाय हाय ये मजबुरी’च्या मुखड्यानंतर बासरीचा तुकडा डोक्यात ’टॅटॅ टॅण टॅ’ असा येतोच.
’शागीर्द’च्या ’वो है जरा, खफा खफा’ या गाण्याच्या वेळी सकाळी अकरा वाजता ठरल्याप्रमाणे रफीसाहेब, लताजी, म्युझिशिअन सारे पोचले. पण लक्ष्मीजी मात्र नव्हते. आम्ही त्यांची वाट पाहत होतो. दुपारी अडीचच्या सुमारास ते पोचले. आल्या आल्या म्हणाले, ’सकाळी निघता निघता, आमची कामवाली बाई आली. तिच्या बोलण्याला छान हेल होता. काम करता करता ती बडबडत होती, ’आता मी काय करू? अय्या, आता मी काय करू?’ तिचं ऐकून माझ्या मनात कल्पना आली, तिच्या त्या हेलावर आधारित रचना करू या. बघा कशी वाटते? त्यांनी शब्द लिहून आणले होते. ’दिल विल प्यार व्यार, मैं का जानू रे…’ अय्याऽऽ ती ओळ त्यांनी गाऊन दाखवली, लताजींनाही ती कल्पना आवडली. त्यांच्यावर ’अय्या’ म्हणत त्या छान गायल्याही. तेही गाणं हिट झालं.
कोणतंही गाणं बनविताना आम्ही संगीतकार त्या चित्रपटाचं कथानक, ते गाणं कोणत्या प्रसंगासाठी आहे, कोणावर चित्रित होणार आहे, त्याचा मूड कसा आहे, ते कोणत्या पात्रावर चित्रित होणार आहे, ती व्यक्तिरेखा कशी आहे, कलावंत कोण आहे, त्याची शैली कशी आहे, तो हे सारं समजून घेतो. त्याबरोबरच साधी, सोपी, गुणगुणता यावी अशी चाल असावी, दिग्दर्शक/निर्मात्याचे दृष्टिकोन काय आहेत, बजेट कसं आहे हेही त्याला पाहावं लागतं. बजेटप्रमाणे वादकसंख्या, गायक ठरवावे लागतात.
आम्ही नेहमी, आमच्याच अटींवर काम केलं. बॉबीच्या वेळी राज कपूरजी खिशात एक चाल घेऊन आले होते. लक्ष्मीजी काही बोलू शकले नाहीत. पण मी स्पष्टपणे राजजींना सांगितलं की, ’’आज तुम्ही आमच्याकडे आलात, पुढच्या वेळी आम्ही तुमच्याकडे आमची चाल घेऊन येऊ.’’ काही दिवसांनी आम्ही, त्यांच्याकडे चाल घेऊन गेलो. तिलाच त्यांनी मान्यता दिली. ते गाणं होतं, ’मैं शायर तो नहीं…’ खिशातून त्यांनी सोन्याचं नाणं काढलं व आम्हाला भेट दिलं. त्यांना चाल पहिल्या फटक्यात पसंत पडे. तर, एल. व्ही. प्रसादना पाच पाच चाली ऐकवायला लागत व शेवटी ते म्हणत, ’सर्व चाली छान आहेत. तुम्हाला हवी ती ठेवा.’ आम्ही निर्माता-दिग्दर्शकाला आमच्या कामात ढवळाढवळ करू देत नाही. त्याचं मत, महत्त्वाचं मानतो, पण अंतिम शब्द आमचाच असायला हवा. अनेक हिट दिल्यानंतर घईसाहेबांचा हस्तक्षेप वाढल्यावर ’त्रिमूर्ती’नंतर आम्ही त्यांचं काम सोडून दिलं. पण काही वेळा, काही मित्रांचं ऐकावं लागतं. अमितजींनी ’हम’च्या वेळी एक चाल आणून दिली व म्हणाले, ’’या चालीवर एक गाणं करा.’’ त्यावेळी आम्ही ’जुम्मा चुम्मा’ हे गाणं केलं. तसे प्रसंग फारसे आले नाहीत व ते येऊही दिले नाहीत.
आम्ही अनुकरणही कोणाचं केलं नाही. शंकर-जयकिशन आमचे आदर्श होते, पण त्यांची छाया आमच्या संगीतावर नाही. राजजींच्या ’सत्यम शिवम सुंदरम’ची गाणी उत्तम बनली होती. त्यांच्या शीर्षकगीतामध्ये आम्ही १५०हून अधिक वादक वापरले होते. ’सत्यम शिवम सुंदरम’च्या रेकॉर्डिंगच्या वेळी ताडदेवच्या मिनू कात्रक स्टुडिओत बाहेरपर्यंत वादक बसले होते. आम्ही पडदे लावलेले. सकाळी ९ ते रात्री ११पर्यंत रेकॉर्डिंग सुरू होतं. त्यात वापरलेल्या घंटा ’नवरंग’मध्ये व्ही. शांतारामजींनी वापरलेल्या घंटा होत्या. त्या मी स्वत: जाऊन आणल्या होत्या. त्या उंच स्टुलावर लोखंडी कांबीला अडकवलेल्या. तबला लावायच्या स्टीलच्या हातोडीनं दोन वादकांनी, त्यांच्या दोन बाजूला उभं राहून, त्या एकाच वेळी वाजवल्या होत्या. हा प्रचंड वाद्यमेळ मी, लक्ष्मीजी, गोरख, शाम, दिलीपभाई अशा आम्ही पाच जणांनी संयोजित केला होता. तरीही लताजींनी, ते गीत अप्रतिमरीत्या गाताना, स्वत: हातानं सूचना देत सांभाळलं होतं. त्या गीताची प्रक्रिया विसरणे अशक्य.
’जब भी जी चाहे’ हे गीत साहीर लुधियानवींनी तयार हातात ठेवलं व चाल करायला सांगितली. त्या शायरीतली सामाजिकता व अर्थ समजून घेऊन आम्ही त्याची रचना जरा वरच्या पट्टीत केलेली. लताजीही गाताना तीक्ष्ण स्वरात गायल्या. लताजी, रफीसाहेब, आशाताई, किशोरदा, मन्नादा यांच्यासारखे अव्वल कलाकार आमच्या गीतांसाठी आम्हाला लाभले, हा भाग्ययोग. हे सारे सर्वार्थानं आमच्यापेक्षा श्रेष्ठ होते, पण त्यांचा चांगुलपणा एवढा, की चाल समजून घेतानाही, त्यांनी त्यांचं मोठेपण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही. एखाद्या विद्यार्थ्यासारखे ते समजून घेत.
आमच्या ’कर्ज’चं संगीत वेगळं होतं. रफीसाहेबांना ’दर्द ए दिल’ गायचं होतं. ते छान हळवं गाणं त्यांनी समजून घेतलं व मुखडा संपताना नेहमीच्या तबला, ढोलकीऐवजी त्यांना ड्रमचा बीट ऐकू आला. ते थांबलेच. लक्ष्मीजींना त्यांनी विचारले, ’’हे काय आहे?’’ आम्ही त्यांची समजूत काढली. त्यांनी आमची बाजू समजून घेतली, तालीम करून झाल्यावर, प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण झाल्यावर, त्या प्रयोगासाठी त्यांनी शाबासकी दिली. याच चित्रपटाची श्रेयनामावली येताना आम्ही किशोरदांच्या आवाजात ’पैसा, यह पैसा’ हे गाणं केलं. त्याची रचना लक्षपूर्वक ऐका, तीन धून एकत्र गायल्याशिवाय त्याचा मुखडा बनत नाही. हा एक वेगळा प्रयोग विचारपूर्वकतेनं केला होता.
आमच्या कव्वाल्यांनाही लोकप्रियता लाभली. त्याच्यामागचं एक सूत्र आज पहिल्यांदा उलगडतो. आम्ही नेहमी मुख्य गायकासोबत प्रत्यक्ष कव्वाली गाणारे कव्वाल व प्रत्यक्ष कव्वालीत बुलबुलतरंग, क्लेरोनेट, मेंडोलिन वाजवणारे वादक दिले. त्यामुळे त्याची श्रवणीयता वाढली. ’सूरसंगम’च्या वेळी आम्ही राजन साजन मिश्रांना गायनासाठी निमंत्रण दिलं. शास्त्रीय संगीत गाणार्‍या गायकांना चित्रपटाचा बंदिस्त अवकाश आवडत नाही, पण ’सूरसंगम’मध्ये ते जमून गेलं. प्रत्येक गायकाची स्वतंत्र शैली असते. ती शैली डोळ्यासमोर ठेवून गाणी बांधावी लागतात. मन्नादांना दिलेली ’शाम ढले जमुना किनारे’ किंवा ’दर्पन झूठ ना बोले’ ही गाणी आठवा. त्यांनी त्या गाण्यांचं सोनं केलंय. किशोरदा हे तसं विनोदी रसायन मानलं जातं. पण त्यांच्या मनात कारुण्याचा झरा होता. तो ओळखून आम्ही त्यांना ’मेरे मेहबूब कयामत होगी’ किंवा ’मेरे नसीब में ऐ दोस्त’सारखी गाणी दिली व त्यातून त्यांच्या अंतरीचं दु:ख बाहेर आलं.
आमच्याकडे वाद्य वाजवणारी कलाकार मंडळी सगळीकडे वाद्यं वाजवत. पण आमच्याकडे त्या वाद्याचा नाद वेगळा यायला हवा, याची आम्ही काळजी घेत असू. इतरांकडे वाजणारा दाया-बाया (तालवाद्याच्या दोन बाजू) हा आमच्याकडे आमच्याचसारखा वाजायला हवा. आमच्या कोणत्याही गाण्यात तीन ढोलक व तीन तबले ऐकू येतील. त्यापैकी दोन पुढे व एक मागे असं त्यांचं बॅलन्सिंग करणं हे महत्त्वाचं असे. ’मोरा नादान बालमा’ ऐका. त्यात अब्दुल करीम साहेबांनी काय अप्रतिम ढोलक वाजवलाय. त्याची थाप, लताजींच्या सुरात आपसूक मिसळून जाते. काही वेळा आम्ही २८ जणांचा र्हिदम वापरलाय. ’बडा दुख दिना’ या गाण्यात आम्ही तो वापरलाय. ’सरगम’मधल्या ’डफलीवाले’ गाण्यात एकावेळी १८ डफ वाजवले गेले आहेत. पण त्यांचा नाद एकच येतो.
’चोली के पिछे क्या है’ या गाण्यात आम्ही ’सुंदरी’ हे वाद्य वापरलं. त्याच्या वादकाला कितीही समजावून सांगितलं तरी तो त्याला येत होतं, तसंच वाजवत राहिला. शेवटी ते तसंच ध्वनिमुद्रित केलं, पण ते हिट झालं. लोकांना काय आवडेल, याचा अंदाज बांधता येत नाही. ’हिरो’मधली बासरी धून किती गाजली? पण ती धून बनत नव्हती. मी पियानोवर बांधायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात समोरून पान खात खात हरीजी आले. मी त्यांना त्यांची बासरी काढायला लावली आणि अर्ध्या तासात ती अवीट धून बनलीसुद्धा.
आम्ही ’संत ज्ञानेश्वर’ चित्रपटाचं संगीत करत होतो. त्यावेळी आम्ही प्रत्यक्ष माउलींच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलो होतो. गोरख, लक्ष्मीजी, भरत व्यास असे सारे थेट दर्शन घेऊन आले, पण मी रांगेत उभा राहिलो. सोबत शिर्के, लाड असे वादकसोबतीही होते. जाळीपलीकडे काही स्त्रिया जात्यावर धान्य दळत होत्या व सुंदर आवाजात ओव्या गात होत्या. त्यांचं नोटेशन मी करून घेतलं. दर्शन घेऊन आल्यावर ते नोटेशन मी लक्ष्मीजींकडे दिलं. त्यांना म्हटलं, ’’माउलींनी प्रसादच दिलाय, यावर काही तरी करू या.’’ त्यांना लगेच चाल स्फुरली, ती त्यांनी भरत व्यासजींकडे दिली. भरतजींनी दुसर्‍या दिवशी पहाटे गाणं लिहून दिलं, ’ज्योत से ज्योत जगाते चलो.’
आम्ही स्वराला स्वर जोडत गेलो, त्यातून आमचा छोटासा संगीतप्रवाह जन्माला आला. संगीत हा आमचा ईश्वर आहे. लक्ष्मीजी देहरूपानं गेले पण ते आजही माझ्या मनात असतात. त्यांच्याशी मनसंवाद सुरू असतो. सतत वाटत राहतं, आता कुठूनही लक्ष्मीजी येतील, खांद्यावर हात टाकून म्हणतील, ’’चल प्यारे, कुछ नया कर लेते है ।’’

Previous Post

मैफिल मद्यरात्रीची

Next Post

एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

Next Post

एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.