• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

श्री गणेशाचा महिमा अगाध!

- घनश्याम भडेकर

Nitin Phanse by Nitin Phanse
August 25, 2022
in शूटआऊट
0
श्री गणेशाचा महिमा अगाध!

संकटसमयी शरण जाणार्‍या प्रत्येक भाविकाला बाप्पा आशीर्वाद देणेच असे म्हणतात. तो नवसाला पावला आणि पंधरा दिवसांतच अस्लमला ग्रॅन्ट रोड येथील बाळाराम स्ट्रीटमध्ये दुसर्‍या मजल्यावर मनासारखे घर मिळाले. त्यामुळे अस्लम इतका गणेशभक्त झाला आहे की स्वत: गणपती कारखान्यात जाऊन डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन घरी येतो.
– – –

तो येणार, येणार म्हणून किती उत्कंठा त्याची. घरातील बाळगोपाळांपासून तीर्थरूप आणि आजोबापर्यंत सर्वच त्याची आतुरतेने वाट पाहात आहेत, त्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अगदी जवळ येऊन ठेपले आहे. कोणत्या रुपात कुठे असेल तो बाप्पा, म्हणून त्याच्या शोधार्थ आम्ही अनेक गणपती कारखाने शोधले. मूर्तिकार प्रदीप मादुस्कर, खातू, रावले, कांबळी यांच्याकडे नटूनथटून तयार झालेल्या अनेक मूर्ती सर्वजण फोटो, मुलाखती देतील पण वसईचे दुष्यंत हाटकरांची मुलाखत घेऊन दाखव, त्यांचा एक फोटो तरी घेऊन दाखव. ते तुला दाराशी उभे करायचे नाहीत. गणपती बनवीत असताना ते कुणालाही आत येऊ देत नाहीत. प्रसिद्धीपासून दूर असलेला अतिशय मनस्वी मूर्तिकार आहे तो.
कोण हे दुष्यंत हाटकर, का कुणाला फोटो काढून देत नाहीत, म्हणून त्यांच्याबद्दल उत्सुकता वाटू लागली. मी लोकल ट्रेनने वसईला गेलो. हाटकर कोठे राहतात विचारले तर प्रत्येकाला त्यांचा पत्ता तोंडपाठ. त्यांच्याबद्दल अनेकांनी आपले अनुभव सांगितले. कमालीचा लोकप्रिय मूर्तिकार. हाटकरांच्या कारखान्याचा एक दरवाजा उघडा होता. नमस्कार! तुम्ही हाटकरजी का? तर हो म्हणाले. अन् कामाला लागले. किती सुंदर मूर्ती ते घडवीत होते. मीही एक कलाकार असल्यामुळे कॅमेरा मांडीवर घेऊन तेथेच बसलो. माझी ओळख दिली. फोटो आणि मुलाखत हवी म्हणालो, पण ढुंकून बघेनात. मी थोडा वेळ जाऊ दिला. त्यांच्या चेहर्‍यावरचा मूड पाहिला आणि त्यांच्या कलेकलेने घेतले.
आणि तेही बोलू लागले.
त्यांच्या उमेदीच्या काळात एकही पत्रकार तेव्हा इथे फिरकला नाही आणि सत्तरी झाल्यावर म्हातारपणी प्रसिद्धी घेऊन काय करायची म्हणाले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये स्कॉलरशिपवर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्ही. शांताराम यांच्या प्रभात टॉकीजमध्ये कनू देसाई यांच्या बरोबरीने पिक्चरसाठी काम सुरू केले. ‘गीत गाया पत्थरो नें’, ‘बैजू बावरा’, ‘रामराज्य’ इत्यादी चित्रपटांत दिसणारी शिल्पं हाटकरांनी उभारलेली. भारतात चित्रकलेत रविवर्मांनी जे केलं ते हाटकरांनी गणेशमूर्तीत साकारलं. पार्वती व गणेशातील मातापुत्राचं नातं, त्यातील प्रेम आपण गृहीत धरतो ते त्यांनी प्रत्यक्षात दाखवलं. प्रत्येक मूर्तीत ते जीव ओतून काम करत. मातीच्या मूर्तीचा जिवंतपणा वाढवत. अंगावरील दागिने, कपड्यांना पडलेल्या चुण्या, हातापायांची लयदार सुटी बोटं आणि चेहर्‍यावरील उत्कट भाव हे फक्त हाटकरच समर्थपणे दाखवू शकत.
वर्षभरात बाराशे गणेशमूर्ती ते बनवीत. ते ८० वर्षांचे वयोवृद्ध झाले तेव्हा कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला, पण अनेकांनी त्यांची मनधरणी करून तो पुढे चालवण्याचा आग्रह केला. या वयात तुम्ही गणपती बनवत नसाल तर आमच्या पाटावर तुमच्या हाताने मातीचा गोळा ठेवा, आम्ही त्याला गणपती समजून पूजा करू, असेही अनेक गिर्‍हाईकांनी हाटकरांना विनवले.
वीस वर्षांपूर्वी हाटकरांचे निधन झाले. आता त्यांची मुले कारखाना चालवतात. बोलण्याच्या ओघात त्यांची मी घेतलेली मुलाखत आणि फोटो माझ्या चिरंतन स्मरणात राहिले. हाटकर गणपतीची मूर्ती साकार करतानाचा फोटो काढणारा मी एकमेव फोटोग्राफर आहे हे विशेष.

अस्लमचा गणपती

नंतर एकदा मूर्तिकार प्रफुल्लचंद्र बिलये यांच्या कारखान्यात गेलो, तेथे वेगळा किस्सा ऐकायला मिळाला. त्यांच्याकडून गणेशमूर्ती घेऊन जाणारा अस्लम सिद्दिकीची कथा ऐकण्यासारखी आहे. अस्लमचे एका गुजराती मुलीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांनी त्यांनी लग्न करून संसार थाटायचा विचार केला. त्यासाठी त्यांच्या बजेटमध्ये मिळणारे घर ते शोधू लागले. वृत्तपत्रात जाहिरात दिली. इस्टेट एजंटांना भेटले. अनेक महिने लोटले, पण मनाजोगे घर मिळेना. काही फ्लॅट दक्षिण उत्तर दिशेला, काही ठिकाणी हवा उजेड नाही, तर चौथ्या मजल्यावरचे घर आवडले, पण इमारतीला लिफ्ट नाही. सगळी मुंबई पालथी घातली, पण पैसे देऊनही हवे तसे घर मिळेना. अस्लमची बायको गणेशभक्त होती. तिने गणपतीला नवस केला. बाप्पा, गेल्या महिनाभरात तू मला चांगले घर शोधून दिलेस तर दरवर्षी माझ्या घरी तुझा उत्सव साजरा करीन. त्यासाठी ती अस्लमलाही एका गणेश मंदिरात घेऊन गेली आणि दोघे नतमस्तक झाले.
संकटसमयी शरण जाणार्‍या प्रत्येक भाविकाला बाप्पा आशीर्वाद देणेच असे म्हणतात. तो नवसाला पावला आणि पंधरा दिवसांतच अस्लमला ग्रॅन्ट रोड येथील बाळाराम स्ट्रीटमध्ये दुसर्‍या मजल्यावर मनासारखे घर मिळाले. त्यामुळे अस्लम इतका गणेशभक्त झाला आहे की स्वत: गणपती कारखान्यात जाऊन डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन घरी येतो. पाच दिवस पूजाअर्चा करतो आणि शेवटच्या दिवशी स्वत:च्या हाताने समुद्रात जाऊन बाप्पाचे विसर्जन आवडीने करतो.
गणेशाचा महिमा अगाध आहे. त्याचा मलाही सुखद अनुभव आलाय. माझ्या घरी दहा दिवसाचा गणपती येतो. मी रोज टाळ पिटत बसत नाही, पण दोनचार आरत्या म्हणतो आणि कामाला निघतो. बाकी पाहुण्यांचे स्वागत, प्रसादाचे जेवण, उकडीचे मोदक आणि ऋषीपंचमीची स्वादिष्ट भाजी वगैरे पंचपक्वान्न बायको आणि मुलगी पाहते. माझ्या घरातच गणेशाचे वास्तव्य असताना इतर सार्वजनिक गणपतींचे काय महत्त्व असणार? घरचा काय आणि दारचा काय गणपती एकच, अशी माझी भावना. लालबागचा गणपती नवसाला पावतो अशी त्याची ख्याती. त्याच्या अनेक दंतकथा लोक सांगत. पण माझा विश्वास नसायचा. याउलट माझी बायको दिसला गणपती की कर नवस. तिने इतके नवस केले की नंतर कोणत्या गणपतीला काय देण्याचे कबूल केले ते विसरून जायची. तिची चेष्टा करत एक दिवस माझ्यावरच वेळ आली हात जोडून नवस करण्याची.
नवशक्ती दैनिकात मी तीस वर्षे नोकरी केली. फ्री प्रेस जर्नल आणि बुलेटिनचे कामही मला करावे लागे. संपादक अरूण साधू, रजत शर्मांपासून पु. रा. बेहरे आणि त्यानंतर डझनभर संपादक येऊन गेले. तुकाराम कोकजे, आत्माराम सावंत, अशोक पडबिद्री, ह. मो. मराठे, भाऊ जोशी, वसुंधरा पेंडसे-नाईक, प्रकाश कुलकर्णी, सचिन परब, तुषार नानल, महेश म्हात्रे, पात्रुडकर, नंदकुमार टेणी अशा मान्यवर संपादकांसोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले. आणि त्यांनीही उदार मनाने मला सांभाळून घेतले. यात एका संपादकांशी ४० वर्षांचा संबंध असूनही अतिपरिचयात् अवज्ञा म्हणतात तसे झाले. एक दिवस त्यांनी फर्मान काढले. रोज पाच फोटो मी आणलेच पाहिजेत. तेही महत्त्वाच्या बातमीचे. त्यांना हवे तसे फोटो मला काही लवकर मिळेनात. ते शोधत मी स्कूटरवरून नरीमन पॉइंट ते भाईंदर उत्तनच्या समुद्र किनार्‍यापर्यंत जाऊन यायचा. योगायोगाने चांगले फोटो मिळाले. पाच काय रोज सात फोटो मी शोधून आणायचा. खूप दमछाक व्हायची. पण संपादकांची बॉसगिरी दिवसेंदिवस वाढू लागली. ते कोणत्याही कारणावरून तोंडसुख घ्यायचे. माझ्या त्रासाला तुम्ही कंटाळले असाल ना, असेही बोलून दाखवायचे. माझे मानसिक खच्चीकरण होऊ लागले. त्यांच्या जाचाला मी पार कंटाळून गेलो. नोकरी सोडण्याचा विचार केला. एका नव्या वर्तमानपत्रात मुलाखत देऊन आलो. त्रास देणार्‍या संपादकांचा आवाज कसा बंद करायचा, असा विचार करत असताना त्यांनी लालबागच्या गणपतीचा फोटो काढून आणण्याचे फर्मावले. मी त्या संधीचे सोने केले. प्रचंड गर्दी असतानाही त्यातून वाट काढीत मी गणपतीच्या पायाशी पोहोचलो. पायावर डोकं ठेवलं आणि नवस केला. बाप्पा हा संपादक भयंकर त्रास देतोय. त्याचं तोंड बंद केलंस तर तुला २१ मोदकांचा प्रसाद देईन. त्याचा फोटो काढला आणि त्यांना आणून दिला. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका या गोष्टीला आज पंधरा वर्षे होतील, त्या दिवसापासून त्या संपादकांचे तोंड कायमचे बंद झाले आणि ते माझ्याशी प्रेमाने वागू लागले. माझे आनंदाचे दिवस पुन्हा आले. एक दिवस त्यांचेशी गुडीगुडी बोलत असताना मला आलेला गणपतीचा अनुभव त्यांना सांगितला. ‘साहेब लोक उगाच नाही त्या गणपतीला गर्दी करतात. तो खरोखर नवसाला पावतो. मलाही त्याचा अनुभव आला. त्यावर ते म्हणाले हो ते खरंय! त्याला स्थळमहात्म्य म्हणतात. त्या स्थळाला महत्त्व आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नतमस्तक होता हे महत्त्वाचं आहे. त्यांना हे माहीतच नव्हते की त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मी नवस केला होता. असो. श्री गणेशाचा महिमा असा अगाध आहे.

Previous Post

नारी सन्मानाचा डंका आणि बलात्कारी खुन्यांची सुटका!

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

टपल्या आणि टिचक्या

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.