गेल्या गणपतीच्या तयारीतला एक भाग म्हणून काका हलवाईच्या दुकानात फेरी झाली. वर्षभरच रंग, चव व सुगंधाची उधळण करणारी काचेची कपाटं, बाप्पा व गौराईच्या आगमनासाठी जास्तच सजून बसली होती जणू! काय घ्यायचे हे ठरलेले नसते तर नक्कीच गरजेपेक्षा खूप जास्त गोष्टी घेऊन बाहेर पडलो असतो मी. एका बाजूला खव्याचे तर दुसरीकडे काजूच्या मिठाईचे निरनिराळे प्रकार मांडलेले होते. खारा माल वेगळ्या विभागातून खुणावत होताच!!
लहानपणापासून मिठाई म्हटलं की खव्याची हे समीकरण पक्कं डोक्यात बसल्याने, मला काजूचे ठरावीकच प्रकार आवडतात! खव्याचं म्हणाल तर सगळंच! अगदी ताज्या नुसत्या खव्यापासून पेढे, बर्फीचे सगळेच प्रकार तसेच इतरही खव्याची पक्वान्नं जसे गुलाबजाम किंवा खवापोळी… अहाहा! नुसत्या आठवणींनीच काय आनंद होतोय म्हणून सांगू?
अलिबागला हलवायाच्या दुकानात तर मिळायचाच खवा, पण दारावर येणाऱ्या भाजीवाल्या मावशापण घरी बनविलेला खवा विकायला आणायच्या. पळसाच्या मोठ्या पानात बांधलेला तो फिक्कट बदामीसर रंगाचा तुपकट खवा घ्यायचा मोह व्हायचाच! त्यापासून लगेच काही बनवायचे असो वा नसो! अर्थात तो मऊ मुलायम खवा बराचसा नुसताही गट्टम व्हायचा तेव्हा!
अकोल्याला असताना रेल्वे स्टेशनवर भरणारा नांदुऱ्याहून येणाऱ्या खव्याचा लिलाव बघायला एकदा मुद्दाम गेलेलो आम्ही. पाच-पाच किलोचे मोठे ताज्या खव्याचे गोळेच्या गोळे घेऊन रेल्वेनेच लोक यायचे आणि शहरातील दुकानदारांनी योग्य मोबदला दिला की पुढच्या गाडीने परत जायचे. अर्ध्या पाऊण तासात त्या काळात पाच-सात हजाराचे रोखीचे व्यवहार व्हायचे म्हणे तिथे! मूळ खवा एकदा का शुद्ध व ताजा असला नं की आपोआपच त्यापासून जे काही बनेल ते छानच बनते. साखर, वेलदोडे, जायफळ आणि केशरासारखे सुगंध आणि अर्थातच बाजारात बघितलं तर खाद्यरंग घातले की रुपडं आणखीन खुलतं या मूळच्याच गोडसर गोळ्याचं!!
पारंपरिक पद्धतीने म्हणाल तर जाड बुडाच्या पसरट लोखंडी कढईत पूर्ण स्निग्धांश असलेलं म्हशीचं किंवा गायीचं दूध मोठ्या आचेवर आटवले की खवा बनतो. अर्थात इथे फक्त एका ओळीत लिहिलेली असली तरी प्रत्यक्षात ही कृती पूर्ण व्हायला बराच अवधी लागतो. आटताना दूध खाली लागू नये म्हणून काळजी घ्यावी लागतेच आणि ते उतू जाणार नाही हे पण सतत बघावे लागते. दुधामधला पाण्याचा अंश हळुहळू कमी होत जातो आणि उरलेल्या दुधाचा जो घट्ट गोळा बनतो तोच हा खवा! नुसत्या दुधापासूनच बनलेला असला तरी कैकपटीने जास्त टिकाऊ आणि मौल्यवान!!
एकदा का हे फारसं मूल्यवर्धन न करणारं, कमी गरजेचं असार सोडून द्यायला जमलं की नकळतच विचारांना आणि व्यक्तिमत्वाला आपोआप वेगळीच झळाळी मिळते, नाही का? असार म्हणजे नेमकं काय, तर विचारांमधली नकारात्मकता, अनाठायी भीती, राग, द्वेष, मत्सर असे अनेक स्वाभाविकपणे अंगीभूत असलेले दोष!! एकदा का अनुभवांकडून शिकत आणि मनाची कवाडं सताड उघडी ठेवून आयुष्याकडून शिकायला आरंभ केला की या सगळ्या गोष्टींचं फोलपण जाणवतं. रागाचा, भीतीचा कोणत्याही नकारात्मक भावनेचा सर्वात जास्त वाईट परिणाम होतो तो स्वत:वरच! आजूबाजूची मंडळीही भरडली जातात, असह्य झालं सगळं, तर ती मनाने हमखास आणि कधीकधी शरीरानेही दूर जातात. गुणदोषांचा लेखाजोखा मांडायचा म्हटला तर प्रत्येकातच दोन्ही बाजू असतातच की. मात्र माणूसपणाच्या या सुंदर प्रवासात काय धरायचे, काय सोडायचे हे स्वानुभवातून शिकवतो नाही का, हा खवा?
एका मूर्तिकाराने म्हणे दगडात अतिशय सुंदर मूर्ती घडवली. अचूक बारकाव्यांसहित प्रमाणबद्ध असलेली ती भव्य मूर्ती बघून सगळेच अचंबित झाले! कसं काय रे म्हणे जमलं तुला हे? काय गमक आहे या सुंदर शिल्पकलेचं? क्षणभर उसंत घेऊन तो मूर्तिकार उत्तरला, तसं बघायला गेलं तर मी मूर्ती नाही घडवली. दगडाचा नको असलेला भाग मात्र मी काढून टाकला आणि त्या दगडातच असलेली ही मूळ मूर्ती बाहेर आली जणू!! स्वत:ला माणूस म्हणून घडवतानाही हेच तत्व वापरले तर नक्कीच प्रत्येकाचेच मूळचे सकारात्मक व सात्विक रूप नक्कीच प्रकटते!
कितीही चटके सोसावे लागले तरी दूध जसे मूळचा गोडवा सोडत नाही, उलट असाराला मागे सारल्याने तो गोडवा केंद्रित होत जातो आणि खव्याला, त्याच्या रंगरूपाला साजेशी मधुर चव देतो तसेच सर्वार्थाने मानवजन्माचे सार्थक व्हावे म्हणूनच ही आळवणी… ‘तव पदी अर्पु असार संसाराहीत हा भार, परिहरीसी करूणासिंधो तू दिनानाथ सुबंधो!’