• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बगिचा परिषदेने गवर्नर गोरामोरा

- सचिन परब (प्रबोधन १००)

सचिन परब by सचिन परब
July 28, 2021
in प्रबोधन १००
0

प्रबोधनकार काय वल्ली होते आणि त्यांचा वल्लीपणा अगदी वीस बावीसाव्या वर्षीच कसा बहराला आला होता, हे समजून घ्यायचं असेल तर तेव्हाच्या गवर्नरने बोलावलेल्या संपादकांच्या प्लेग परिषदेचा हा किस्सा वाचावाच लागेल.
—-

सर्वोत्तम आरोग्य सुविधा आणि तंत्रज्ञान पायाशी लोळण घेत असतानाही आज कोरोनाने आपली दाणादाण उडवली. मग जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेग आला असेल तेव्हा काय झालं असेल? जवळपास दहा वर्षांत एक कोटी लोक मेले असावेत, असं इतिहासाच्या नोंदी सांगतात. पण तेव्हाही आजच्यासारखीच लसीकरणाची मदत झाली. त्यासाठी परळची हाफकिन इन्स्टिट्यूट धावून आली. १८९९मध्ये प्लेगवर संशोधन करण्यासाठी रशियन शास्त्रज्ञ डॉ. डब्ल्यू. एम. हाफकिन यांच्या नेतृत्वात ही संस्था सुरू करण्यात आली.
हाफकिन इन्स्टिट्यूटने प्लेगच्या लसीचे प्रयोग केले. सुरुवातीला गावोगाव झालेली लसटोचणी यशस्वी झाली नाही. लस टोचून मरण्यापेक्षा प्लेगने मरू, असं लोक म्हणू लागले. त्यामुळे ब्रिटिश सरकार आणखी जोरात कामाला लागलं. हाफकिन इन्स्टिट्यूटने ९५ टक्के यशस्वी चाचणी झालेली लस आणली. पण लोकांच्या मनात पूर्वग्रह असल्याने जबरदस्तीने लसीचा प्रचार करणं शक्य नाही, हे सरकारच्या लक्षात आलं. त्यामुळे मुंबईचे गवर्नर जॉर्ज सिडनहॅम क्लार्क यांनी संपादकांची परिषद घेण्याचं ठरवलं. गवर्नरपदाच्या सहा वर्षांच्या काळात त्यांनी मुंबईकरांच्या हिताच्या अनेक उपाययोजना केल्या. त्यात प्लेगचा बर्‍यापैकी बीमोड हे त्यांचं महत्त्वाचं यश होतं. त्यामुळे आताच्या महंमद अली रोडला आधी त्यांचंच नाव देण्यात आलं होतं. सिडनहॅम कॉलेज तर त्यांच्या नावाने आजही ओळखलं जातं.

तर या गवर्नर साहेबांनी स्वतः मुंबई इलाख्यातल्या सगळ्या छोट्या मोठ्या संपादकांना प्लेग परिषदेसाठी निमंत्रणं पाठवली. प्रवासासाठी जाण्यायेण्याचं फर्स्ट क्लासचं रेल्वे तिकीट, शिवाय दिवसाला ३ ते ५ रुपये भत्ता खर्चासाठी देण्याची घोषणा झाली. त्यातल्या बहुतेक संपादकांनी ना कधी फर्स्ट क्लासने प्रवास केला होता, ना कधी मुंबई बघितली होती. त्यामुळे सगळ्यांनी लगेच आमंत्रणाचा स्वीकार करणारी पत्रं धाडून दिली. परिषद जवळ येताच मुंबईत संपादक मंडळी पोचू लागली. तेव्हाच्या मुंबईचं वर्णन प्रबोधनकारांनी जुन्या आठवणी या पुस्तकात केलंय, `भाऊचा धक्का, बोरीबंदर आणि कुलाबा स्टेशनांवर कावर्‍याबावर्‍या अनोळखी एडिटर महाशयांच्या पलटणी उतरू लागल्या. हॉटेलवाल्यांनी कित्येकांना घेरून दामदुप्पट दरात सर्व व्यवस्था चोख लावण्याचा विमा घेतला. कित्येक इष्टमित्रांकडे शोध करत करत गेले. काही सरदारगृहात प्रवेशले. रेकलेवाल्यांची नि विक्टोरियावाल्यांची चंगळ उडाली. नवखे एडिटर ममई पहायला बाहेर पडले. स्थानिक एडिटरांना मात्र दक्षणा नव्हती. त्यांना रेकला किंवा विक्टोरियाचे फक्त भाडेच मिळायचे होते आणि तेसुद्धा मागावून संमेलनात हजेरी लावल्यानंतर. मला वाटते ते तसे कोणीच मागितले नाही.’
`माझी जीवनगाथा’ या आत्मचरित्रामध्ये प्रबोधनकार म्हणतात की त्यांच्या जळगावच्या सहा महिन्यांच्या मुक्कामानंतर ही परिषद झाली. त्यामुळे परिषदेचा काळ १९०६नंतरचा असावा असा अंदाज बांधता येतो. पण `जुन्या आठवणीं’त ते लिहितात की परिषद १९०४-०५लाच झाली आणि परिषदेच्या काळात त्यांना एडिटरकीचा शिक्का मिळालेला नव्हता. हे जीवनगाथेतल्या माहितीशी जुळत नाही. कारण जळगावातच त्यांनी सारथी हे मासिक सुरू केलं होतं. शिवाय ज्या गवर्नरच्या पुढाकाराने ही परिषद झाली ते जॉर्ज सिडनहॅम क्लार्क यांची मुंबई गवर्नरपदाची कारकीर्द ऑक्टोबर १९०७पासून सुरू झालीय. त्यामुळे परिषद १९०६नंतर झाल्याचा जीवनगाथेच्या आधारे बांधलेला अंदाज खरा मानावा लागतो. तेव्हा प्रबोधनकारांकडे संपादकपदाचा शिक्का नव्हता. कारण तोवर सारथी बंद पडलं होतं.
शिक्का नसला तरी प्रबोधनकारांना संपादक म्हणून परिषदेत जायचं तर होतंच. त्यासाठी केलेले उपद्व्याप त्यांनीच लिहून ठेवलेत, `संमेलनाला आपण जायचे, हा माझा निश्चय. पोरसवदा त्या वेळी मी. मिसरूडही नव्हते फुटलेले. पण ओळखी फार. इंदूप्रकाशात मी लिहित असे. पण त्याचे तीनही एडिटर संमेलनाला जाणार. मला पास शिल्लक नाही. अखेर ठाण्याच्या जगत्समाचार पत्राचे संपादक कै. वासुदेव गणेश उर्फ आबासाहेब देशपांडे यांनी मला असिस्टंट एडिटर, जगत्समाचार म्हणून बरोबर न्यायचे ठरविले. कारण त्या वेळी अग्रस्फुटादि सर्व लेख पनवेलींहून पाठवून मीच ते साप्ताहिक पत्र भरून काढीत असे.’
अखेर संपादकांच्या प्लेग परिषदेचा दिवस उजाडला. संध्याकाळी चार वाजता परळच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये परिषद भरणार होती. त्याच्या पोर्चला लागूनच मोठा शामियाना उभारला होता. उंचावर गवर्नरांसाठी खुर्ची टेबल मांडलं होतं. संपादकांसाठी खास गादीच्या खुर्च्या वर्तुळाकार मांडल्या होत्या. इतरांसारखे शिस्तीत वेळेत जातील, तर ते प्रबोधनकार कसले! त्यांनी त्यांचा शाळासोबती केशव गणेश गुप्ते उर्फ दादूमियां यांचा वशिला लावला. ते तिथे कारकून होते. प्रबोधनकारांनी सकाळी दहा वाजता गुपचूप जाऊन सगळी व्यवस्था बघितली. तेव्हा त्यांच्या डोक्यात एक वेगळीच योजना शिजत होती.
तेव्हा परळ पोयबावडीच्या नाक्यावर वाडिया हॉस्पिटल वगैरे इमारती नव्हत्या. रस्ता रिकामाच असायचा. एका पारशाचा बंगला होता आणि एक मोठा बगीचा होता. हाफकिनकडे जायचं तर बगिच्यावरूनच जावं लागे. त्यामुळे प्रबोधनकारांनी दुपारी दोन वाजताच या बगिच्यात जाऊन ठाण मांडलं. त्यांच्याबरोबर खानदेशातले `देशकालवर्तमान’ नावाच्या ज्योतिषविषयक साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांच्याशी प्रबोधनकारांची ओळख जळगावच्या मुक्कामात झाली होती. त्यामुळे हे शास्त्रीबुवा प्रबोधनकारांच्याच बिर्‍हाडी मुक्कामाला होते. त्यांचा पेशवाई थाटाचा जामनिमा लक्षवेधी होता. प्लेग परिषदेसाठी येणार्‍या सगळ्याच संपादकांचं लक्ष हे ज्योतिषी संपादक वेधून घेत होते. प्रबोधनकारही येणार्‍या प्रत्येक संपादकाला बगिच्याच्या दारावरच थांबवत. सांगत, `इथेच बसा, अजून परिषद सुरू व्हायला खूप अवकाश आहे.’ आला एडिटर की बसव त्याला बगिच्यातल्या ओट्यावर असं त्यांनी सुरू केलं. तेव्हा गाजत असलेले संस्कृत विद्वान आणि `सुनृतवादिनी’ नावाच्या लोकप्रिय संस्कृत साप्ताहिकाचे संपादक आप्पाशास्त्री राशिवडेकर यांनाही बगिच्यात रोखण्यात प्रबोधनकार यशस्वी झाले. दहा पंधरा संपादक गोळा झाल्यावर इतरांना वेगळं थांबवावं लागलं नाही. आपसूकच सगळे येऊ लागले. बगिच्यातल्या संपादकांची संख्या दीडदोनशे झाली. एकमेकांशी गप्पा सुरू झाल्या. गुजराती एडिटर परस्पर जाऊ लागले. तेव्हा प्रबोधनकारांनी त्यांना थाप मारली की तिथे वेळेआधी कुणाला घेत नाहीत. पोलिस उभे आहेत. त्यामुळे गुजराती संपादकही मिनी बगिचा परिषदेत मिसळले. तेवढ्यात लोकमान्य टिळक तिथे आले. त्यांच्यासोबत ठाण्याचे फडके बंधूंचा कंपू होता, असं प्रबोधनकार सांगतात. ते फडके बंधू म्हणजे `अरुणोदय’ साप्ताहिकाचे संपादक धोंडो काशिनाथ फडके आणि `हिंदूपंच’चे संपादक कृष्णाजी काशिनाथ उर्फ तात्या फडके. ते टिळकपंथी असल्यामुळे टिळकांसोबत असणं स्वाभाविकच होतं. तर प्लेग परिषदेच्या वाटेवर असताना टिळकांचंही लक्ष मिनी बगिचा परिषदेकडे गेलं. त्यांनी विचारलं, `सभा इथे आहे की काय?’ त्यावर मिनी परिषदेचे यजमान म्हणून प्रबोधनकार सामोरे गेले. त्यांनी त्यांचं कारण सांगितलं, `सभास्थान जवळच आहे. पण आधी जाऊन काय करायचे? नेमक्या वेळेला गेलेले बरे. शिवाय अजून गवर्नराची गाडी जायची आहे. ती इथून गेली की आपण सगळे निघू. आपण आधी गेलो तर आपल्याला गवर्नरचे स्वागत करावे लागेल. तोच आधी गेला नि आपण मागावून जमावाने गेलो, तर त्याला आपले स्वागत करणेच भाग पडेल.’
प्रबोधनकारांची योजना टिळकांना आवडली. ते पगडी काढून आणि उपरणं कंबरेला बांधून निवांत बसले. त्यांनी सगळ्या संपादकांची ओळख करून घेण्याचा कार्यक्रम सुरू केला. प्रबोधनकार सांगतात, `टिळकांना मनमोकळेपणाने हास्यविनोद कोट्या करताना मी याच वेळी पाहिले.’ गवर्नरची गाडी गेल्यावर टिळकांनी परिषदेकडे जाण्याची सूचना केली. त्याविषयीही प्रबोधनकारांकडे वेगळी शक्कल होती, `चलायचं तर जरा लष्करी थाटाने म्हणजे चाराचारांची रांग धरून जाऊया.’ टिळकांना तेही आवडलं. चार वाजत आले तरी एकही संपादक नसल्यामुळे गवर्नर गोरेमोरे झाले. संपादकांचं टोळकं आपलं स्वागत करेल ही त्यांची अपेक्षा फोल ठरली. उलट त्यांनाच संपादकांचं स्वागत करावं लागलं. टिळकांशी तर हस्तांदोलन करावं लागलं.
प्रत्यक्ष परिषदेत गवर्नरनी स्वागताचं भाषण केलं. लसीची माहिती दिली. प्लेगची लस कशी तयार करतात याचं प्रात्यक्षिक दाखवण्याची व्यवस्था केली. नव्या लसीची संपादकांनी आपापल्या वर्तमानपत्रांतून शिफारस करावी, अशी विनंतीही केली. तिथे लस देण्याचीही व्यवस्था केली होती. `गुजराती केसरी’चे संपादक डॉ. चांदलिया आणि काही गुजराती पारशी संपादकांनी ती टोचून घेतली. मराठी संपादकांचे म्होरके असणारे टिळक मात्र शांत बसून होते. गवर्नरनी त्यांना बोलण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी अस्खलित इंग्रजीत भाषण केलं. त्यात लसीच्या प्रसाराचं आश्वासन दिलं. असाच जनहिताच्या प्रत्येक गोष्टीत सरकारने संपादकांचा सल्ला विचारला तर प्रशासनाच्या अनेक कटकटी विनात्रास मिटतील, असंही सांगायला ते विसरले नाहीत. थोडक्यात या परिषदेवर संपादकांचा वरचष्मा राहिला. त्याची तयारी प्रबोधनकारांनी केलेली होती.
विशेष म्हणजे परिषदेनंतर संपादकांसाठी अल्पोपहाराची गार्डन पार्टी होती. टिळक आणि `काळ’कर्ते शिवरामपंत परांजपे यांनी फक्त लेमनेड घेतलं. प्रबोधनकारांसह बाकीच्या सगळ्यांनी आडवा हात मारला. प्रबोधनकारांचे मित्र पेणचे रामभाऊ मंडलिक यांनी त्या पार्टीत परदेशी साखरेच्या पक्वानांवर कोण ताव मारणार्‍यांची नावंच गोळा केली. कारण हीच संपादक मंडळी तेव्हा स्वदेशीच्या चळवळीत परदेशी साखरेवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करत होती.

– सचिन परब

(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)

Previous Post

३१ जुलै भविष्यवाणी

Next Post

आभाळ फाटलं की आपणच ते फाडलं…?

Next Post
आभाळ फाटलं की आपणच ते फाडलं…?

आभाळ फाटलं की आपणच ते फाडलं...?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.