अनेकदा महानायक क्रीडाप्रकारांना मोठं करतात. फुटबॉलमध्ये जसे पेले, मॅराडोना, मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो हे महानायक. तशीच भारताची सुद्धा क्रीडा क्षेत्रात, खासकरून क्रिकेटमध्ये महानायकांची परंपरा आहे. देशोदेशीच्या महानायकांनी या खेळालाही लोकप्रियतेच्या शिखरावर नेलंय. पण, विराट कोहलीनंतर नवा महानायक क्रिकेटला मिळेल का, या विचाराने साक्षात देवलोकही चिंतेत सापडला आहे… पाहू या तिथे काय चर्चा सुरू आहे ती.
– – –
(क्रोधानं डोळे लालबुंद झालेल्या महादेवाचं पर्वतावर तांडव नृत्य सुरू होतं. देवलोकीच्या दरबारात सिंहासनावर देवांचा राजा इंद्र विराजमान होता. पण, त्याच्या कपाळावर असंख्य आठ्या होत्या. इतकंच नव्हे, तर सृष्टीचा निर्माता ब्रह्मा, विष्णू, अग्नी, वायू, इत्यादी सार्याच देवांना चिंता सतावत होती.)
इंद्र : देवहो, भारत देशाच्या क्रिकेटनकाशावर नायक तर असंख्य आहेत; पण भारतीय क्रिकेटचा पुढील महानायक कोण असणार? लिटिल-मास्टर सुनील गावस्कर, विश्वविजेता कपिल देव, वंडरबॉय सचिन तेंडुलकर, विश्वविजेता महेंद्रसिंह धोनी, किंग विराट कोहली यांच्यानंतर हा महानायकाचा वारसा चालवू शकेल, असा क्रिकेटपटू सहज स्पष्ट होत नाही. याच कारणास्तव जसे आम्ही आणि तुम्ही सर्व चिंतेत आहात, तसेच भगवान शंकरही अस्वस्थ आहेत.
वायू : महाराज, भविष्यात कोणी महानायक नसेल, ही सल जशी क्रिकेटमध्ये बोचतेय, तसाच रितेपणा हिंदी सिनेमातही आला आहे. खानत्रयी साठीची झाली आहे. आमीर, शाहरुख, सलमान हे त्रिकूट अजूनही करिश्मा दाखवतंय. पण, त्यांची जागा घेऊ शकेल नवा तारा लुकलुकताना दिसत नाही. त्यातल्या त्यात त्या कपूर घराण्यातला रणबीर अधूनमधून किमया दाखवतोय.
अग्नी : वायूदेव, विषयांतर होतंय. तुम्ही सिनेसृष्टीत हरवलात. समस्या क्रिकेटची आहे.
वायू : क्षमा असावी महाराज!
ब्रह्मा : (अवकाश मंडलातील ग्रह-तार्यांकडे पाहात) कठीण, कठीण, कठीण किती?
इंद्र : ब्रह्मदेव काय कठीण?
ब्रह्मा : सगळंच कठीण आहे इंद्रदेवा. तरुण मंडळी भारतीय क्रिकेट गाजवतील, हे नक्की. त्यांच्या यशाचा वारू रोखणंही कदाचित प्रतिस्पर्ध्यांना कठीण जाईल, हेही मान्य. पण, दीर्घकाळ टिकणं, सातत्यपूर्ण कामगिरी करीत राहणं आणि किमान दोन दशकं क्रिकेटरसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करणंष्ठ खरंच अवघड!
(तेवढ्यात पृथ्वीवरून फेरफटका मारून नारदमुनी इंद्राच्या दरबाराकडे परतले. नेहमीप्रमाणेच यावेळी त्याच्याकडे खास वार्ता होती. त्यामुळे स्वारी एकदम खुशीत होती. परंतु दरबाराचा रागरंग पाहून तो उसनं अवसान आणतो.)
नारद : नारायण, नारायण, मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना? नेपाळला कसोटी क्रिकेटचा दर्जा तर मिळाला नाही ना? (इंद्र नारदाकडे एक कटाक्ष टाकतो. सारा दरबार स्तब्ध होतो. इंद्र खुणेनंच नारदाला आपल्याकडील माहिती सांगायचा इशारा देतो.)
नारद : नारायण, नारायण… महाराज, शुभ वर्तमान! तुम्हा सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. (दरबारातील सारे एकमेकांकडे पाहतात.) आताच सातासमुद्रापार इंग्लंड देशीच्या दौर्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधाराची घोषणा करण्यात आलीय. हा मुकुट पंजाबचा तरणाबांड गडी शुभमन गिलकडे सोपवण्यात आलाय. तेव्हा पुढील महानायक अर्थात शुभमनच!
विष्णू : शुभमनच नव्हे, तर भारतीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमरा, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, नवा तारा वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे आदी काही आशेचे किरण दिसतायत. पण, या तार्यांमध्ये ध्रुवतार्याचं तेज आहे का?
ब्रह्मा : विष्णुदेव, तुमचा प्रश्न रास्त आहे. या तारांकित क्रिकेटपटूंची कारकीर्द दीर्घकाळ टिकेल का?
नारद : हं… बरोबर आहे ही शंका. कारण, महानायक होण्याची क्षमता असलेले काही तारे अवचित लुप्त होतायत.
इंद्र : दक्षिण आप्रिâकेचा एबी डीव्हिलियर्स, हा किमयागार क्रिकेटपटू. त्याची फलंदाजी अचाट, सामर्थ्यवान. गोलंदाजी कामचलाऊ. पण क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षक हनुमानानं सूर्य गिळावा तितकंच प्रेक्षणीय. डोळ्यांची पारणं फेडणारं. पण या अवलियाला क्रिकेट सोडायची घाई झाली. तशीच काहीशी तर्हा त्याच्याच देशाच्या जॅक कॅलिसची.
ब्रह्मा : महाराज, वडिलांच्या शब्दाखातर वनवासात सहज गेलेल्या रामाप्रमाणं विराट कोहली कसोटी क्रिकेटचा त्याग करेल असं कुणाच्याच ध्यानीमनी नव्हतं.
वायू : रामायणात रामासोबत लक्ष्मण गेला. इथे रोहितनं त्याच्या आठवडाभर आधीच कसोटी क्रिकेटला अलविदा केला. त्यामुळे इथे अयोध्या पोरकी झालीय.
नारद : माझ्या विश्वासू दूतांनी आणलेल्या माहितीनुसार, गुरुवर्य गौतम गंभीर यांनी घात केला. त्यांना ही तारांकितांची संस्कृती संपवायची होती.
विष्णू : विराट हा काही साधारण क्रिकेटपटू मुळीच नव्हता. जागतिक फुटबॉलची शिखर संघटना ‘फिफा’ने नुकताच समाजमाध्यमांवर विराटचा गौरव करताना त्याची आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या कारकीर्दीची तुलना केली. केवढा हा मोठेपणा!
ब्रह्मा : पण, विराटची गेल्या काही वर्षांतली आकडेवारी चिंताजनक होती. म्हणूनच त्याला आणखी काही काळ खेळणं यथोचित वाटलं नसावं.
इंद्र : कांगारूंच्या देशातल्या कटू स्मृती अद्याप पुसल्या गेल्या नाहीत. आता इंग्लिश भूमीवर तितकंच कडवं आव्हान. त्यामुळे विराटनं किमान ही मालिका तरी खेळायला हवी होती.
विष्णू : महाराज, बरोब्बर इंग्लंड दौरा कमालीचा आव्हानात्मक. काल शेषनागावर पहुडलेलो असताना निद्रादेवी प्रसन्नच होईना. तेव्हा फणा काढलेल्या नागांच्या जागी मला भारतीय फलंदाजांवर आक्रमणासाठी सज्ज झालेले तेजतर्रार इंग्लिश गोलंदाज दिसू लागले. मला दरदरून घाम फुटला आणि तडक उठून येरझार्या घालू लागलो.
इंद्र : अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे २०२८मध्ये होणार्या ऑलिम्पिकची मला काळजी वाटतेय. ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर क्रिकेट प्रथमच अवतरतंय. पण विराटसारखे महानायक तिथे नसतील.
नारद : आपण सारेच अगतिक, कसं होणार क्रिकेट जागतिक? विश्वचषक क्रिकेटमध्ये आतापर्यंत २० संघ खेळलेत. परंतु ऑलिम्पिकमध्ये दोनशेहून अधिक देशांचा सहभाग. म्हणजेच जगाच्या कानाकोपर्यात क्रिकेट पसरण्याची हमी. पण लोकांनी खेळ पाहण्यासाठी त्यात महानायक तर हवेत!
ब्रह्मा : तेहत्तीस कोटी देवांनो, महानायक नाही म्हणून काय झाले? असंख्य नायक तर आहेत. ते संघाला जिंकून देतील, प्रेरणादायी कामगिरी बजावतील.
वायू : हो, आता हिंदी सिनेमातही जमाना बहु-नायकांचा आहे. वृद्धत्वाकडे झुकलेले महानायक रंगरंगोटी करून मोजकीच अदाकारी पेश करतायत. पण इतर अनेक नायक अधूनमधून चमकतात आणि छाप पाडतात.
इंद्र : वायूदेव, तुम्ही विद्युल्लतेपेक्षा वेगानं फिल्मी दुनियेत वावरतात. तुम्ही सर्वच सिनेमांवर लक्ष ठेवून असता वाटतं?
वायू : नव्हे, महाराज. माझ्या प्रवासातच हे चित्रपटग्रहण होऊन जातं. पण, हे भारतीय क्रिकेटचं ग्रहण सुटायला हवं.
ब्रह्मा : ‘अतिक्रिकेट’ घेई, क्रिकेटपटूंची विकेट. आता क्रिकेट बरंच वाढलंय. खेळाचा दृष्टिकोनही बदललाय. पृथ्वीलोकात फास्ट फूडचा जमाना आहे. क्रिकेटपटूंची कारकीर्दही औंटघटकेची ठरतेय. ट्वेन्टी-२०चा विश्वचषक, मालिका आणि लीग यांची संख्या अगणित. कसोटी क्रिकेट जागतिक अजिंक्यपदाची गदा आल्यामुळे टिकलंय. एकदिवसीय क्रिकेट जेमतेम. या ट्वेन्टी-२०च्या युगात हार्दिक पंड्यासारखे अनेक नायक तरून जातात. पण ते महानायक ठरत नाहीत. गेल्या दोन-तीन दशकांत वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, रोहित शर्मा, सौरभ गांगुली असे दिग्गज क्रिकेटपटू गाजले. पण ते तारांकित क्रिकेटपटू; महानायक नव्हेत!
इंद्र : म्हणजे आता महानायक घडणे दुरापास्त. वास्तव स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही!
(इतक्यात सर्वांना चाहूल लागते, ती आकाशवाणीची.)
काळ : सावधान, तूर्तास भावी महानायक कोण? इंग्लंड दौरा कसा जाईल? या चर्चा थांबवा आणि लक्ष देऊया ‘आयपीएल’च्या प्ले-ऑफ सामन्यांकडे. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या चौघांपैकी कोणता संघ यंदा जेतेपदाला गवसणी घालतो, ते पाहूया! (सर्वच देव ‘आयपीएल’ सामन्यांकडे मोर्चा वळवतात. अर्थात महादेवही तांडव नृत्य थांबवून त्यात सामील होतात.)
नारद : हे सूर्यदेवा, तुझी कृपादृष्टी राहो. २०२३मध्ये अहमदाबादेत पावसामुळे जेता संघ मिळण्यास क्रिकेटचाहत्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागली. तशी कोणतीही विघ्नं यावेळी नकोत!
सूर्य : तथास्तु!