सोमीताई म्हणजे सोशल मीडिया ताई. सगळ्या जगाला व्यापून दशांगुळे वर उरलेल्या सोशल मीडियाच्या संदर्भात जे काही प्रश्न पडतील, ते आमच्या सोमीताईंना विचारा… त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात… ‘सोमी’तज्ज्ञ आहेत ना त्या!
– – –
मी बॉयकॉटबाज देशभक्त!
प्रश्न : सोमी, तू दिवसभर आणि मोकळ्या वेळात सोशल मीडियावर काय काय करतेस?
उत्तर : प्रिय सख्या, सोशल मीडिया हा माझ्यासाठी जणू श्वास आहे. मी एकतर दिवसभर तिथेच असते आणि त्यातून थोडा वेळ मिळाला की मग रात्री जरा झोपते आणि सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा लॅपटॉप उघडते. आज कोणता वार आहे आणि माझ्या राशीत काय वाढून ठेवले आहे ते मला कळते आणि मग मी आज कोणत्या देवाची आराधना करावी, कोणता रंग घालावा याचे ज्ञान मी प्राप्त करून घेते. देशात मिळणार्या सर्व टूथपेस्ट, दंतमंजन हे नकली असून, त्यात हाडे आणि बरेच विषारी पदार्थ घालतात याबद्दल मला सोशल मीडियाने जागृत केलेले असल्याने मी राखुंडीने दात घासते. सकाळी उठल्यावर आधी पाणी प्यावे, चहा प्यावा, दूध प्यावे की फळांचा रस याबद्दल सोशल मीडिया ठामपणे काही सांगत नसल्याने मी सरळ नारळपाणी पिते आणि शुचिर्भूत होते. त्यानंतर मी पुन्हा लॅपटॉपकडे वळते. आज दिवसभरात कोणाला बॉयकॉट करायचे आहे, कोणत्या ब्रँडला शिव्या घालायच्या आहेत, कोणत्या ब्रँडला स्वदेशी म्हणून सपोर्ट करायचा आहे, कोणत्या नेत्याचे किंवा कलाकाराचे विधान देशद्रोही आहे आणि त्याचा आपण निषेध करायचा आहे, कोणत्या कलाकाराचा कोणता शो, चित्रपट, जाहिरात बॉयकॉट करायची आहे, कोणाचे समर्थन करायचे आहे, सोशल मीडियावर नवे देशद्रोही कोण आले आहेत आणि त्यांच्या वॉलवर जाऊन काय तमाशे करायचे आहेत इत्यादी सगळ्याची मी नीट माहिती घेते आणि टिपणं करून ठेवते.
एकदा का माझी सपोर्ट बायकॉटची एक्सेल शीट तयार झाली की मग दिवसभर मी स्वत:ला त्या कामात झोकून देते. अध्येमध्ये माझ्या वॉलवर येऊन कोणीतरी टीका करून जाते, मग मी माझा कंपू गोळा करून त्या टीकाकाराची पार नांगी ठेचते. बॉयकॉट जास्त महत्त्वाचा असल्याने दुपारच्या जेवणापर्यंत ते उरकून घेते. सध्या मी डाएटवर असल्याने दुपारी चार फुलके, सुकी आणि पातळ भाजी यासोबत थोडा वरणभात खाते. दुपारी झोपावे की नको यावरही सोशल मीडियावर दुमत असल्याने, मी दुपारी थोडा टीव्ही बघते आणि मधल्या काळात कोणी काही बरळले आहे का याची बातम्यांमधून माहिती घेते.
चारनंतर मग सपोर्टचे काम जोमाने सुरू होते. कोणती उत्पादने स्वदेशी आहेत, देशाचा पैसा देशात ठेवणारी आहेत, कोणत्या ब्रँडचा मालक हिंदू आहे आणि त्याचं उत्पादन आपण का खरेदी केले पाहिजे, कोण कलाकार, दिग्दर्शक देशप्रेमी आहे आणि त्याचा चित्रपट बघणे हे एक देशवासी म्हणून आपले कसे कर्तव्य आहे याचे ज्ञान वाटत फिरते. संध्याकाळी नाष्टा करावा का सरळ जेवण करावे यावर देखील अजून सोशल मीडियाने ठाम मत बनवलेले नसल्याने आणि समाजाच्या प्रत्येक अंगाला काम मिळाले पाहिजे या भावनेने मी मग फूड डिलिव्हरी अॅपवरून छोटासा पिझ्झा, बर्गर वगैरे मागवते. हे पदार्थ मूळ कांदा टमाटर उत्तपम आणि वडा पाव या स्वदेशी पदार्थांची नक्कल असल्याने ते खाल्ले तरी चालतात. देशाला वाईट वाटत नाही.
संध्याकाळी चार घास पोटात गेले की मग मी मला दिवसभरात खटकलेल्या पोस्ट, फोटो, प्रतिक्रिया या कशा चुकीच्या आहेत, देशविरोधी आहेत, इतर धर्मांची लांगूलचालन करणार्या आहेत याबद्दलच्या शंका माझ्या कंपूच्या ग्रुपात सोडून देते आणि झोपायला जाते. कंपूत रात्रपाळी करणारे अनेक विद्वान लोक असल्याने, ते माझ्या व इतर सदस्यांच्या शंका यावर चर्चा विचरण करतात आणि मग सकाळी कोणाला सपोर्ट करायचा, कोणाला बॉयकॉट करायचे याचे नियोजन आखले जाते, जे सकाळी आम्हाला मिळते.
– २४ तास व्यस्त देशप्रेमी सोमी
इतिहासाचे गडबडलेले वर्तमान
प्रश्न : सोमीताई, सोशल मीडियावर आजकाल इतिहासकाळातील अनेक घटना वाचायला मिळत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवावा का?
उत्तर : हे लाडक्या बंधो, व्हॉट्सअप विश्वविद्यालयाच्या कृपेने सध्या सोशल मीडियावर अनेक इतिहासतज्ज्ञ, डॉक्टर्स, भविष्य सांगणारे, जगाचे अर्थकारण आणि राजकारण कोळून प्यायलेले महानुभाव उत्पन्न झालेले आहेत. इतिहासातून माणसाने शिकावे आणि नवा इतिहास घडवावा. सध्या मात्र इतिहास तुडवला जात आहे. प्रत्येकाचा इतिहास वेगळा आहे. अगदी प्रत्येकाचे शिवाजी महाराजही वेगळा इतिहास घडवणारे आहेत. कोणाच्या इतिहासात महाराजांनी मशिदी उभारल्या आहेत, तर कोणाच्या इतिहासात त्या तोडल्या आहेत. कोणाच्या इतिहासात महाराज सर्वधर्मसमभाव ठेवणारे होते, तर कोणाच्या इतिहासात ते कट्टर हिंदू आहेत. महाराजांच्या तलवारीचे वजनही प्रत्येकासाठी वेगवेगळे आहे. या नाकर्त्या आणि मूर्ख लोकांना स्वत:ला इतिहासकार म्हणवताना बघून महाराजही डोक्याला हात लावत असतील. एक इतिहासकार म्हणून काय जबाबदारी असते याचे साधे ज्ञान देखील या लोकांना नसते. इंटरनेटवर कुठेतरी काहीतरी वाचायचे, त्याला आपल्या (अ)ज्ञानाची फोडणी द्यायची, दोन चार इंग्रजी वाक्ये आणि फारसीमधला एखादा जीर्ण कागद दाखला म्हणून दिला की यांचा जाज्वल्य इतिहास तयार होतो. या इतिहासाच्या खरेपणावर प्रश्न विचारणार्यांना एकदा ब्लॉक केले किंवा देशाचे शत्रू म्हणून घोषित केले की झाले.
आज अमेरिकेची नासा अन् इस्रोसारखी आपल्या देशाची महान अंतराळ संस्था या चंद्र कवेत घेत आहेत, मंगळाला टप्प्यात आणत आहेत आणि आपले दळभद्री अजून औरंग्याच्या कबरीत पाय अडकवून बसले आहेत. जर तुम्ही महाराजांचा इतिहास जाज्ज्वल्यपणे तरुणांसमोर मांडलात, महाराजांची बुद्धिमत्ता, पराक्रम, समयसूचकता, निर्धार, धाडस, संस्कार, विचार-आचार, माणसे जवळ करण्याची हातोटी, पत्रलेखन, अर्थभान, समाजभान हे जर शालेय शिक्षणात नीटपणे समाविष्ट केलेत तर महाराज काय उंचीचे होते आणि ज्यांच्याशी ते लढले ते किती खुजे होते हे आपोआप समोर येईल आणि अशा करंट्या इतिहासकारांची दुकाने आपोआप बंद पडतील.
– ऐतिहासिक सोमी
जैसी ज्याची दृष्टी तैसे…
प्रश्न : सोशल मीडिया म्हणजे चिखल झाला आहे. शहाण्या माणसाने तिकडे फिरकायला देखील नको. नालायक, निर्लज्ज आणि गुंडांनी हाहाकार माजवला आहे सगळीकडे. सोशल मीडिया वापरणारा प्रत्येक जण मला महामूर्ख वाटायला लागलेला आहे. सोमी, तुझे मत काय आहे?
उत्तर : काका, शेवटी प्रत्येकजण त्याला आलेल्या अनुभवानुसार मत बनवत असतो. पण असे एकदम टोकाचे मत पाहिले की मला महाभारतातील एक गोष्ट आठवते. युधिष्ठिराने इंद्रप्रस्थाची स्थापना केली आणि त्यावेळी राजसूय का अशाच कोणत्या तरी प्रकारचा मोठा यज्ञ सोहळा आयोजित केला. पांडवांच्या कार्याला कौरवही उपस्थित होते. भगवान श्रीकृष्णाने एकशे पाच भावंडांना एकेक काम वाटून दिले होते. कोणाला स्वागताचे, कोणाला भोजनव्यवस्था बघण्याचे, कोणाला पाहुण्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था ठेवण्याचे तर कोणाला यज्ञसामुग्रीची व्यवस्था बघण्याचे काम दिले होते. या यज्ञात येणार्या याचकांना दक्षिणा देण्याचे महत्त्वाचे कार्य श्रीकृष्णाने दुर्योधनाकडे सोपवले होते. सोहळा अत्यंत सुंदर पार पडला आणि संध्याकाळी युधिष्ठिर स्वत: श्रीकृष्णाच्या जोडीने सर्व व्यवस्थेची पाहणी करण्यास निघाला. एकेक व्यवस्था पाहत, हवी तिथे सुधारणा सुचवत दोघेही याचकांच्या मांडवापाशी पोहोचले. पाहतात तो सर्व याचक दीन मुद्रेने बसलेले. कोणाच्याही अंगावर दान मिळालेले वस्त्र, अथवा धन, अलंकार असे काही दिसत नव्हते.
हे दृश्य पाहून युधिष्ठिराला फार आश्चर्य वाटले, पण कृष्ण मात्र मंद हसत होता. दोघेही लगबगीने दुर्योधनाचा निवास असलेल्या महालाकडे निघाले. आत जाताच युधिष्ठिराने काळजीच्या स्वरात विचारले, ’हे बंधो, याचक अजून ताटकळलेले का आहेत? आपण तर दानाची मोठी व्यवस्था केलेली आहे. वस्त्र, अलंकार, मोहरा, धान्य, पशू सगळे काही तुझ्यापर्यंत पोहोचवले तर गेले होते ना?’
दुर्योधन संतापाने वदला, ’श्रीकृष्णाने मला सांगितले होते की योग्य याचक ओळख आणि त्याप्रमाणे योग्य ते दान त्याला दे. मला तर बाहेरचे सगळे भिकारी आणि चोर दिसत आहेत. दिसला मोठा सोहळा की झाले, लगेच हजर हात पसरायला. मला यातली एकही व्यक्ती ज्ञानी, विचारी आणि याचक दर्जाची वाटली नाही आणि त्यामुळे मी कोणतेही दान केले नाही.’
श्रीकृष्ण पुन्हा मंद हसला आणि युधिष्ठिराला म्हणाला, ’राजन, आता तू जा आणि एकदा पुन्हा सगळ्यांचे निरीक्षण कर, वाटले तर त्यांच्याशी संवाद साध आणि योग्य याचक कोण आहेत, कोण नाहीत ते ठरव.’ कृष्णाची आज्ञा होताच युधिष्ठिर त्वरेने याचकांच्या मांडवाकडे गेला. काही वेळातच परत येऊन तो श्रीकृष्णाला म्हणाला, ’वासुदेवा, अरे हे सगळेच लोक याचक आहेत. त्यात ज्ञानी आहेत, गुणवान आहेत आणि काही लाचारही आहेत. पण सर्वजण गरजवंत आहेत हे नक्की, मला तर आपण दानासाठी बाजूला काढलेली रक्कम, वस्त्र, आभूषणे कमी पडतील असे वाटते आहे. मी तातडीने जातो आणि अधिक धनधान्याची व्यवस्था करतो.’
एका बाजूला उभा राहून शांतपणे हे सगळे बघणारा सहदेव कृष्णाकडे गेला आणि नम्रतेने म्हणाला, ’प्रभो, माझ्या एका मोठ्या भावाला एकही याचक हा गरजवंत वाटला नाही आणि दुसर्या मोठ्या भावाला सर्व गरजवंत वाटले, त्याला तर दानधर्माची वाढीव व्यवस्था करावीशी वाटली. हा असा विचित्र विरोधाभास कसा काय?’
भगवन प्रेमळपणे सहदेवाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, ’माणूस जसा विचार करतो, त्याची जशी वृत्ती असते तसे त्याला आजूबाजूचे जग दिसत असते.’ मथितार्थ तुम्हाला कळला असेलच.
– तर्कतीर्थ सोमी