आम्ही अमुक वाजून अमुक मिनिटांनी तुमच्या देशात अमुक ठिकाणी हल्ला करणार आहोत, तुम्ही मध्ये पडू नका, असं शत्रूदेशाला सांगून युद्ध करण्याची पद्धत याआधी कधी ऐकली होती का तुम्ही?
– वीणा शेंडे, मूल, चंद्रपूर
हो, हल्लीच ऐकली आहे… बोला आता त्याला काय करणार तुम्ही किंवा आम्ही तरी… आपल्या हातात कुठे काय आहे? पण हातात काही नसतं तेव्हा, ‘आमच्या हातात असतं तर आम्ही यांव केलं असतं त्यांव केलं असतं’ असं बोलणं सोपं असतं. पण हातात आल्यावर जेव्हा ती वेळ येते तेव्हा मात्र कळतं की भुंकता येतं पण चावता येत नाही, कारण मालक गप म्हटला की गप बसावं लागतं… ग्रामीण भागातलं उदाहरण आहे, हे सुद्धा हल्लीच ऐकलंय. शिवाय ज्यांचे बापजादे कधी प्रत्यक्ष युद्धावर गेलेले नसतात, त्यांनीच युद्धावर बोलायचा असतं, त्यामुळे आम्ही न बोललेलेच बरं; कारण आमच्या बापजाद्यांनी युद्धाशिवाय काही केलेलंच नाही.
गुजरातमध्ये एका दलिताने एका दुकानदाराच्या मुलाला बेटा म्हटलं म्हणून त्या दुकानदाराने त्याला जीव जाईपर्यंत मारहाण केली, असं वाचलं. हा असा कसा समाज आहे आपला?
– तानाजी कानडे, श्रीरामपूर
सध्या आपल्या समाजात दुसर्याचा बाप चोरण्याची पद्धत आली आहे असं दुकानदाराला वाटलं असेल… त्याच धर्तीवर आपल्या गुजरातमध्ये मुलं चोरणारी टोळी आली आहे की काय असंही त्याला वाटलं असेल… आणि महत्त्वाचं म्हणजे आपण गुजरातमधले आहोत, त्यामुळे आपण ‘वाट्टेल’ ते केलं तरी आपल्या वाटेला कोणीही जाणार नाही असंही त्याला वाटलं असेल… हे उत्तर विनोदाने घेऊ नका… नाहीतर एखाद्याचा जीव गेल्यावर त्याच्यावर विनोद कसे करता? असं आम्हालाच विचाराल. ‘तशा’ समाजातील आम्ही नाही हे तुम्हाला समजावं म्हणून समजावलं…
संतोषराव, तुमचं रक्त सर्वसामान्य माणसांसारखं आहे की तुमच्या रक्तातून नाटकासाठी चेहर्याला फासायचा रंग वगैरे वाहतो आहे?
– अनामिका पवार, भोकरदन
असं का विचारताय? आमच्या बोलण्यावर विनोद करायचेयत की त्यावर मीम्स बनवून ते व्हायरल करायचे आहेत? ‘कोणी’ काहीही बोललं म्हणून तुम्हीही काहीही विचारणार का ताई? चेहर्याला रंग फासणारे कलाकार भूमिका गंभीर असो वा कॉमेडी, ती गंभीरपणेच करतात, भाव खाण्यासाठी गंभीरतेचा आव आणून कॉमेडी करत नाहीत. जे आहे तुमच्या मनात ते तुम्ही स्पष्ट बोलू शकत नाही जनात; म्हणून तुम्ही स्पष्ट न विचारता समजेल अशा भाषेत प्रश्न विचारलात… हे आम्हाला समजलं म्हणून तुम्हाला समजेल अशा भाषेत उत्तर दिलंय बाकी तुम्ही समजून जा.
ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून हिणवलं, ज्यांना जेलमध्ये टाकलं, ज्यांना आता आयुष्यभर चक्की पिसायला लावतो, अशा गमजा केल्या, त्यांना आपल्याच मंत्रिमंडळात सहकारी म्हणून घेऊन त्यांच्यावर स्तुतिसुमनांची उधळण करण्याइतका निलाजरेपणा राजकारण्यांच्या अंगात येतो कुठून?
– विद्याधर पोंक्षे, विलेपार्ले
का? तुम्हालाही राजकारणात जायचं आहे का? नाही तर ज्या गावी जायचं नाही त्या गावचा पत्ता विचारायचा कशाला? आणि जायचंच असेल त्या गावाला, तर ‘त्या’ गाववाल्यांवर स्तुतीसुमनांची उधळण तुम्हीही करा. मग बघा ‘ते गाववाले’ तुम्हाला वाजत गाजत त्यांच्या गावाला घेऊन जातील… आणि मग ज्याला तुम्ही निलाजरेपणा म्हणताय, तोच हल्लीच्या राजकारणातला यूएसपी आहे हे तुम्हाला कळेल… आणि असा निलाजरेपणा कुठून येत नाही, तर तो मुळातच अंगात असतो हे सुद्धा जाणवेल… नाहीतर आत्ता आपलं चाललंय ते चालू दे, तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही उत्तर देतो. आता असा निर्विकारपणा कुठून येतो, असे विचारू नका म्हणजे झालं…
महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबईत दोन अनोळखी मराठी माणसं एकमेकांना भेटतात तेव्हा मराठीत नाही तर हिंदीत बोलतात. नंतर कळतं की दोघेही मराठी आहेत. अशाने इतर प्रांतीयांना मराठी बोलायची गरज काय पडणार?
– राजेश सातपुते, चिंचपोकळी
मग तुमचं म्हणणं काय आहे राजेश राव? दोन मराठी माणसांनी एकमेकांशी मराठीत बोलून एकमेकांच्या मराठीतल्या चुका काढून घ्यायच्या? त्यापेक्षा हिंदी परवडते… हिंदीत बोलताना हजार चुका केल्या तरी कोणी कोणाची चूक काढत नाही. कारण प्रत्येकाला आपापल्या हिंदीची लायकी माहिती आहे. पण या विषयाची दुसरी बाजू बघा… आपण आपल्या हिंदीत बोलून परप्रांतीयांना आपल्या हिंदीच्या लायकीवर आणलं आहे. तेवढं क्रेडिट तरी मराठी माणसाला द्या… हळूहळू परप्रांतीयांना त्यांच्या हिंदीची लायकी कळेल आणि ते झक मारत मराठी बोलायला लागतील… थोडा धीर रखने का… घाई नहीं करनेका…