कुठल्याच विशिष्ट प्रवाहात अडकून न पडता वा वाहून न जाता हसरत शब्दांना एखाद्या कुंभारासारखा घडवित असे व नवनवीन प्रयोगही करत असत. लोककथेतील अनेक धागे पकडून ते सहजपणे ‘ईचकदाना बिचकदाना’ लिहू शकत होते.
– – –
शिवाजी, इक्बाल आणि बद्रुद्दीन या तीन नावांमध्ये काय साम्य असू शकेल? काहीच साम्य नाही… मग शिवाजी गायकवाड, इक्बाल हुसेन आणि बद्रुद्दीन काझी… यांच्यात काय साम्य असेल? याचे उत्तर अनेकजण देऊ शकतात. कारण ही तीनही नावं चित्रपटक्षेत्रात येऊन प्रसिद्धी मिळालेल्या प्रतिभावंताची आहेत. शिवाजी गायकवाड अर्थात रजनीकांत आणि बद्रुद्दीन काझी अर्थात जॉनी वॉकर हे दोघेही सतत पडद्यावर दिसणारे अभिनेते असल्यामुळे सर्वांनाच परिचित आहेत. मात्र इक्बाल हुसेन यांना ओळखणारे कमीच…
चित्रपट हा मुळात अनेक कलांचे एकत्रीकरण असलेला एक सजवलेला छानसा गुलदस्ताच. त्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतात ती रंगीबेरंगी सुंदर फुलं. नंतर लक्ष जाते आकर्षक पद्धतीने रचलेल्या पानांकडे. यातील फुले म्हणजे मुख्य अभिनेते व अभिनेत्री, पाने म्हणजे सह कलाकार… हे दोन्ही घटक पडद्यावर आपण बघत असल्यामुळे लक्षात राहतात व त्यांची लवकर ओळख होते. मात्र गुलदस्ता सजविण्यासाठी एक मूळ फ्रेम तयार करावी लागते, जी त्यात कुठेच दिसत नाही. ती फ्रेम म्हणजे पडद्यामागचे साहित्यिक, कलावंत व तंत्रज्ञ… ज्यांची फक्त नावं आपण ऐकून असतो… ते प्रत्यक्षात अभावानेच दिसतात. त्यांना आपल्या कामाद्वारेच स्वत:ची ओळख पटवून द्यावी लागते… दुसरा कोणताच पर्याय नाही… त्यामुळे इक्बाल हुसेन पटकन आमच्या स्मरणात येत नाही.
वर मी ज्या शिवाजी, इक्बाल आणि बद्रुद्दीन यांच्याबद्दल बोललो, त्यांच्यातील साम्य हे की हे तिघेही चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी बस कंडक्टर होते. आज मी त्यांच्यातल्या तिसर्याविषयी म्हणजे इक्बाल हुसेनविषयी सांगणार आहे. १५ एप्रिल १९१८ रोजी जयपूर येथे जन्मलेल्या इक्बालचे आजोबा फिदा हुसेन हे एक नामवंत शायर होते. शायरीचा ठेवा इक्बालला लहानपणीच मिळाला. ही शायरी नावाची खुबसूरत बला भारी चंचल. अगदी प्रेयसीसारखी… ती एका जागी टिकणे तसे अवघडच… मात्र हे सूत्र इक्बालला फार लवकर समजले. या प्रेयसीला इक्बालने आयुष्यभर आपल्याशी जखडून ठेवले. मात्र यासाठी त्यांना भरपूर प्रयत्न करावे लागले. अगदी स्वत:च्या इक्बाल हुसेन या नावाचा त्याग करून ‘हसरत जयपुरी’ हे नावही धारण करावे लागले.
इक्बाल माध्यमिक स्तरापर्यंत इंग्रजीतच शिकला. नतंर मात्र उर्दू आणि फारसी भाषेत तालीम घेतली. विशीत पोहचेपर्यंत लिखाणही करू लागला. या वयाचा आग्रह म्हणून शेजारी राहणार्या एका मुलीच्या प्रेमातही पडला. राधा हे तिचे नाव… ती भिन्न धर्माची असल्यामुळे भावना व्यक्त करणेही अवघड… मग या पठ्ठ्यानं एक प्रेमपत्र लिहिलं. हे प्रेमपत्र राधाला पोहचलं की नाही माहित नाही, मात्र चित्रपटसृष्टीतल्या एका प्रतिभावंत अभिनेता-दिग्दर्शकाच्या हाती ते पत्र पडलं आणि त्याचं सोनं झालं. हे प्रेमपत्र आजही धुमशान करतं. कळलं ना हे प्रेमपत्र कोणतं ते?
हसरत म्हणजे हार्दिक इच्छा, कामना, लालसा, अरमान… या सर्व स्वप्नांचे गाठोडे घेऊन इक्बाल हुसेन १९४०मध्ये मुंबईला आला खरा, पण हे गाठोडं टेकवायचं कुठे? सांभाळायचं कसं? हे ओझं हलकं कसं करायचं? एक ना दोन प्रश्न. शायर झाला म्हणून काय झालं? वहीच्या पानांच्या भाकरी नाही थापता येत… आणि शाईची डाळही नाही होत… मग!! नोकरी मिळाली. बस कंडक्टरची. महिना पगार ११ रुपये. जवळपास आठ वर्षं त्यांनी ही नोकरी केली. नंतर आपल्या प्रत्येक मुलाखतीत इक्बाल या नोकरीचा आवर्जून उल्लेख करीत. दिवसभर बसची रटाळ घंटी वाजवायची आणि रात्री रसाळ शायरी करायची. दिवसभर या बसप्रवाशांमध्ये ते आपल्या राधेचा चेहरा शोधत असत. मग रात्री त्यांची राधा कधी गझल तर कधी कवितेच्या रुपात त्यांना शब्दांचा नजराणा देऊन जाई.
मुशायरा हा हसरतचा जीव की प्राण. खरं तर चित्रपट गीते लिहिण्यापूर्वी ते एक मुकम्मल शायर होते. अशा मुशायर्यांना आवर्जून उपस्थित राहणारी चित्रपट दुनियेतली एक नामवंत हस्ती म्हणजे पृथ्वीराज कपूर. गीतकार, लेखक हेरण्यात ते पटाईतच होते. स्वत: १५० कलावंतांचा ताफा घेऊन भारतभर नाटकांचे प्रयोग करीत असत. त्यांनी एका मुशायर्यात हसरत यांची ‘मजदूर की लाश’’ ही कविता ऐकली आणि ते प्रचंड प्रभावित झाले. त्यांनी हसरतला पृथ्वी थिएटरला येण्याचे आमत्रंण दिले आणि राज कपूरची भेट घडवून दिली. राज तेव्हा ‘बरसात’ या आपल्या दुसर्या चित्रपटाच्या तयारीत मग्न होता. हसरत यांनी ‘मैं बाजारों की नटखट रानी’ हे गीत त्याला ऐकवलं आणि राज कपूरला त्याच्या संगीताचा एक सूर मिळाला. लता मंगेशकर, मुकेश, शैलेंद्र, शंकर जयकिशन, राघू कर्मकार (छायाचित्रकार) आणि अल्लाऊद्दीन (ध्वनी संकलक) असे सातही सूर आरकेच्या खजिन्यात जमा झाले आणि एका अनोख्या पर्वाची सुरुवात झाली. या सातही जणांना वेगळे केले ते मृत्यूनेच…
राज कपूरने हसरतला १५० रू. प्रति महिना वेतनावर रूजू करून घेतले. बस कंडक्टरच्या रुपये ११ प्रतिमाह वेतनावरून चक्क १५० रूपये महिना!! १४ पट वाढ… हसरतने शायरीचा हात गच्च धरून ठेवला त्याचेच हे फळ होते. शंकर जयकिशन यांनी एक धुन हसरतला ऐकवली आणि तिच्यावर शब्द बांधायला सांगितले. त्या धुनमधले शब्द काहीसे असे होते, ‘अंबुआ का पेड है वहीं मुंडेर है आजा मेरे बालमा काहे की देर है’ मग हसरतने लिहले, ‘जिया बेकरार है छाई बहार है, आजा मोरे बालमा तेरा इंतजार है..’ १९४९मध्ये बरसात प्रदर्शित झाला आणि हे गाणे प्रत्येकाच्या ओठावर आले. याशिवाय छोड गए बालम (हसरतचे पहिले द्वंद्वगीत), बिछडे हुए परदेसी, हवा में उडता जाए, मुझे किसीसे प्यार हो गया, मेरी आंखों में बस गया कोई रे, अब मेरा कौन सहारा… अशी हसरतची सर्वच्या सर्व गाणी तुफान गाजली. दिवसभर बेस्ट बसची किरकिरी बेल वाजवणारा हसरत एका रात्रीत प्रेक्षकांच्या हृदयातील तारा छेडू लागला. बरसात ही एक प्रेमकथा… स्वत: हसरत आपली प्रेयसी जयपूरला ठेवून मुंबईत आला खरा, पण त्याच्या रोमारोमात ती मुरलेली होती आणि लेखणीद्वारे झरतही राहिली… आयुष्यभर…
हसरतच्या लेखणीतून प्रेमाच्या विविध छटा असणारी शेकडो गाणी सहजपणे उतरत असत. सोबत शैलेंद्रसारखा प्रतिभावान गीतकार असल्यामुळे गीत, गजल, नज्मची एकावर वरचढ एक अशी दौलत प्रेक्षकांवर उधळली जाई. १९७१पर्यंत हसरत यांनी शैलेंद्रसोबत राज कपूरच्या सर्व चित्रपटातील गीते लिहिली. बरसातनंतर राजचा ‘आवारा’ १९५१मध्ये प्रदर्शित झाला. यातील हम तुझसे मोहब्बत करके सनम (मुकेश), एक बेवफा से प्यार किया, अब रात गुजरनेवाली है, जब से बलम घर आए (लता) ही सर्व विरहगीते हसरतची. बाकीची शैलेंद्रची. १९५३मधील ‘आह’मधील जाने ना नजर, आजा रे अब मेरा दिल पुकारा… ही गाणी आजही मनात रुंजी घालतात. नंतर आला श्री ४२०. यातील ‘इचक दाना बिचक दाना’’, ‘ओ जानेवाले’ आणि ‘शाम गयी रात आयी’’ ही तीन गाणी हसरतची.
उर्दूत एहसानमंद आणि गैरतमंद असे दोन शब्द आहेत. ज्याचा अर्थ आहे उपकाराची जाण ठेवणारा व अत्यंत विनयशील. या दोन्ही गुणांचा एकत्रित संगम म्हणजे हसरत जयपुरी. जयपूरच्या बालपणीच्या मित्रांशी व राज कपूर यांच्याशी त्यांनी कधीच प्रतारणा केली नाही. बालपणीच्या मित्रांनी हसरतला मुंबईला जाण्यासाठी हरप्रकारे मदत केली होती. अगदी चपलेपासून कपडे घेण्यापर्यंत. या उपकाराची जाण हसरतने योग्य वेळी या शब्दात मांडली आहे…
‘यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया
सौ बार शुक्रिया अरे सौ बार शुक्रिया
बचपन तुम्हारे साथ गुजारा है दोस्तो
ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों‘’
सुनील दत्त या अभिनेत्यावर चित्रित झालेले ‘गबन’’ या चित्रपटाचे हे गाणे आजही मित्रांचे ऋण स्मरण्यासाठी ओठी येते. हसरतच्या विनयशीलतेचा आणखी एक किस्सा म्हणजे राज कपूरने आपल्या मृत्यूपूर्वी त्यांच्यासाठी निर्धारित केलेले ५०हजार रुपयांचे दरमहा वेतन त्यांनी नम्रपणे नाकारले होते.
चित्रपट गीत लिहिण्यापूर्वीच्या हसरत यांच्या अनेक गजला आणि शायरी नंतर चित्रपटात वापरण्यात आल्या. शंकर जयकिशन इतर बॅनर्सच्या चित्रपटांसाठीही हसरत आणि शैलेंद्र यांच्याच गाण्यांचा आग्रह धरत असत. त्यामुळे आरके बॅनरशिवायही त्यांची अनेक गीते प्रचंड लोकप्रिय झाली.
तकदीर का फसाना
जाकर किसे सुनाएँ
इस दिल में जल रही हैं
अरमान की चिताएँ…
ही गजल शांताराम बापूंच्या ‘सेहरा’ चित्रपटात सामावली गेली. रफी साहेबांनी ती अप्रतिम गायली आहे. हसरत यांची राधा यातल्या प्रत्येक ओळीत स्पष्ट दिसते. शांताराम बापूंचा आणखी एक सुपरहिट संगीतमय चित्रपट म्हणजे ‘झनक झनक पायल बाजे.’’ संपूर्णत: भारतीय शास्त्रीय नृत्य व संगीतावर आधारलेल्या या चित्रपटातील प्रासादिक गीते भरत व्यास यांनी लिहिली असावीत असाच माझा समज होता, पण ही गाणी हसरत यांनी लिहिली आहेत.
‘उनसे मिली नजर के मेरे होश उड गए’ (झुक गया आसमान), ‘इस रंग बदलती दुनिया में, इन्सान की नीयत ठीक नहीं’ (राजकुमार), ‘इब्तिदा-ए-इश्क में हम सारी रात जागे, अल्ला जाने क्या होगा आगे’ (मनोज कुमारचा हरियाली और रास्ता), ‘इक बुत बनाऊँगा तेरा और पूजा करूँगा’ (देव आनंदचा असली नकली), ‘तेरे घर के सामने इक घर बनाऊंगा’ (तेरे घर के सामने), ‘तुमको हमारी उमर लग जाए, तुम कमसीन हो नादां हो’ (आयी मिलन की बेला), ‘आवाज देके हमें तुम बुलाओ’ (प्रोफेसर), ‘तेरी प्यारी प्यारी सुरत को’ (राजेंद्र कुमारचा ससुराल), ‘तेरे खयालों में हम’ (गीत गाया पत्थरों ने), ‘एहसान तेरा होगा मुझ पर’ (जंगली), ‘तुम मुझे यूँ भूला न पाओगे’ (पगला कहीं का), ‘सायोनारा सायोनारा’ (लव्ह इन टोकियो), ‘सुन सायबा सुन’ (राम तेरी गंगा मैली), ‘उनके ख्याल आए तो’ (लाल पत्थर), ‘मैं रंगीला प्यार का राही’ (छोटी बहन), ‘नजर बचा के चले गए वो’ (दिल तेरा दिवाना), ‘मस्ती भरा है समां’ (परवरीश) यातल्या प्रत्येक गाण्यात प्रेमाची विविध रुपं आहेत.
राज कपूरचा कोणताही चित्रपट ही एक प्रेमकहाणीच असे. आपल्या प्रत्येक नायिकेच्या प्रेमात पडल्याशिवाय त्यात जिवंतपणा येणार नाही असेच त्याला वाटत असे. त्यामुळे गाणी लिहून घेताना तो गीतकारांच्या अंतरंगात खोलवर जाऊन तिथून शब्दांचे मोती भरून आणत असे. राज कपूरला १९४०च्या दरम्यान ‘घरोंदा’ या नावाने एक चित्रपट तो स्वत:, दिलीपकुमार आणि नर्गिस यांना घेऊन करायचा होता. म्हणजे एका अर्थी ही मेहबूब खानच्या अंदाज या सिनेमाची टीम एकत्र येणार होती. पण ते जमल्ो नाही. मग १९६४मध्ये हा चित्रपट ‘संगम’ या नावाने प्रदर्शित झाला. राजचा हा पहिला रंगीत चित्रपट. चित्रपटाची लांबीही भरपूर. दोन मध्यंतरं असायची. स्वित्झरलँड, युरोपात यातील बराच भाग चित्रित झाला. यातील संगीत म्हणजे अफाट ग्रँजर.. आजही ते ऐकताना याचा प्रत्यय येतो. हसरत यांची राधा राजने आपल्या चित्रपटात आणली. नायिकेचे नावच राधा होते. हसरत यांनी आपल्या राधासाठी फक्त १० ओळीचं एक प्रेमपत्र लिहिले होते,
मेहरबां लिखूँ, हसीना लिखूँ
या दिलरुबा लिखूँ…
हैरान हूँ कि आपको
इस खत में मैं क्या लिखूँ?
ये मेरा प्रेम पत्र पढकर
कि तुम नाराज ना होना
कि तुम मेरी जिंदगी हो,
कि तुम मेरी बंदगी हो…
…एकदम सुटसुटीत व सोपी शब्दरचना. जोडाक्षरही नाहीत. या सर्व ओळी आजच्या पिढीतही लोकप्रिय आहेत. हे गाणे संगीतकार शंकर जयकिशन यांनी सर्व प्रतिभा पणाला लावून तयार केले व राज कपूरने ते तितकेच प्रत्ययकारीपणे चित्रित केले. या गाण्यापूर्वीचा वाद्यमेळ म्हणजे वादकांचा एक अविस्मरणीय आविष्कार.. हसरत यांनी या गाण्यात इतके साधे शब्द वापरले आहेत की ते आपण आजही दररोजच्या व्यवहारात वापरत असतो. १९६४च्या बिनाका गीतमालामधील पहिल्या व दुसर्या क्रमांकाची गाणी संगमची होती. पहिल्या क्रमांकावर होते शैलेंद्रचे ‘मेरे मन की गंगा’ व दुसर्या क्रमांकावर होते हसरतचेच ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर…’
शैलेंद्र यांनी ‘तीसरी कसम’ या स्वत:च्या चित्रपटासाठी हसरत यांना गाणी लिहिण्यासाठी बोलावले. यातील लता मंगेशकर यांचे ‘मारे गए गुलफाम’ आणि दुनिया बनानेवाले (असे ऐकिवात आहे की या गाण्याचा मुखडा मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिला व अंतरे हसरत यांनी पूर्ण केले) ही गाणी हसरत यांनी लिहिली.
हसरत जयपुरी विशीतील प्रेम कधीच विसरू शकले नाहीत. ‘आए बहार बन के लुभा कर चले गए, क्या राज था जो दिल में छुपा कर चले गए…’ ही अप्रतिम गजल कशी विसरता येईल? तसेच ‘’चल मेरे साथ ही चल ऐ मेरी जान-ए-गजल…’ आपल्या राधेला ते गजलच्या रुपाने सोबतच घेऊन आले होते. ते आपल्या अनेक मुलाखतीत सांगत, ‘एखाद्या मुस्लीम मुलाने फक्त मुस्लीम मुलीच्याच प्रेमात पडावे, असे अजिबातच गरजेचे नाही. माझे प्रेम मौन होते. पण मी तिच्यासाठी कविता लिहिली, ये मेरा प्रेमपत्र पढकर के तुम नाराज ना होना…’ आपल्या पत्नीचा सुंदर चेहरा बघून त्यांना ‘तेरी प्यारी प्यारी सुरत को’… हे गाणे सुचले. एकदा पॅरिसला गेले असताना चमकणारी जरीची साडी परिधान केलेल्या एका सुंदर भारतीय स्त्रीला बघून ‘बदन पे सितारे लपेटे हुए…’ गाणं सुचलं.
हसरत यांच्या शायरीत भलेही साहिरसारखी गहनता नसेल किंवा कैफी आझमी वा फैजसारखी खोली, शकील बदायुनी वा राजा मेंहदी अली खाँसारखी नजाकतीची बोली नसेल, पण मनाला आकर्षून घेणारा सहज सुंदर शब्दांचा टवटवीतपणा नक्कीच असे. ‘आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी…’ म्हणताना सोबत तू असलीस की वाळवंटातही चांदणे फुलू शकते, हा विचार मनात येतो. ‘अजी रूठकर अब कहाँ जाईएगा…’ ही भावना खरं तर अशा सर्वच नातेसंबंधासाठी आहे जिथे प्रेमाचे झरे खोलपर्यंत पाझरलेले असतात… याच गीतात पुढे हसरत म्हणतात,
निगाहों से छुपकर दिखाओ तो जाने
खयालों में भी तुम ना आओ तो जाने
अजी लाख परदों में छुप जाइएगा
नजर आईयेगा, नजर आईएगा…
जणू काही एक गुलाबी आव्हानच ते देतात. तर एका गीतात रुसण्यापूर्वीच इशारा देत म्हणतात,
देखो रूठा ना करो,
बात नजरों की सुनो
हम न बोलेंगे कभी,
तुम सताया ना करो
देखो रूठा ना करो…
नूतन आणि देव आनंद या जोडीवर चित्रित झालेले हे गीत म्हणजे हलक्या हाताने रेशमी रुमालावर काढलेला कशिदाच आहे. यात एका ठिकाणी नायिका म्हणते,
जान पर मेरी बनी,
आपकी ठहरी हंसी
हाय मैं जान गई,
प्यार की फितनागरी…
यातील शेवटचा शब्द ‘फितनागरी’ मजेशीर आहे. ‘फितना’ हा मूळ अरबी शब्द. याचा अर्थ अचानक होणारा उपद्रव किंवा दंगा… प्रेमात कधी काय होईल याची शाश्वतीच नाही हे किती सुंदर पद्धतीनं सांगितलंय. मानवी हृदय म्हणजे रुंजी घालणारा भ्रमर… सतत फुलांभोवती सतत गुणगुणणारा… मग ते सहजपणे लिहून जातात,
‘दिल का भंवर करे पुकार,
प्यार का राग सुनो रे’
शायर वा कवींना स्त्रीच्या काळ्याभोर व लांब केसांचे जाम आकर्षण. त्यांना कधी काय सुचेल नाही सांगता येत. हसरत एका गीतात म्हणतात,
तेरी जुल्फों से जुदाई
तो नहीं माँगी थी
कैद माँगी थी,
रिहाई तो नहीं माँगी थी…
केशसंभार म्हणजे प्रचंड गुंतागुंतीचे धुंद करणारे जाळे. अशा जाळ्यातून सुटका नाही तर कैद हवी अशी अजब इच्छा आहे. तर एका ठिकाणी,
सौ साल पहले, मुझे तुमसे प्यार था,
आज भी है और कल भी रहेगा…
असे ठणकावून सांगतात. मागच्या आणि पुढच्या जन्मी तूच हवी आहेस म्हणून दादागिरी करतात. तर कधी ‘तुम रूठी रहो मैं मनाता रहू’ अशीही विनवणी करतात. ‘आरजू’ चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय आहेत. मात्र यातील प्रेमी जीवांना धुंद करणारे गीत म्हणजे,
छलके तेरी आँखों से शराब और जियादा
खिलते रहें होंठों के गुलाब और जियादा
खूप कलाकुसर न करता शब्दातून सहज भाव प्रकट करणे ही त्यांची खासियतच होती. रुमानियत हा त्यांच्या स्व्ाभावाचा एक गुणविशेष असल्यामुळे तारुण्यसुलभ प्रेमातील अवखळ रंग ते सहज भरू शकले. आता हेच बघा,
ये चांद खिला, ये तारे हंसे
ये रात अजब मतवाली है
समझनेवाले समझ गए है,
ना समझे वो अनाडी है…
राज कपूरचा निष्पाप बोलका चेहरा अन् नूतनचे सोज्वळ सात्विक सौंदर्य या गाण्यात अप्रतिम खुलून येते.
कुठल्याच विशिष्ट प्रवाहात अडकून न पडता वा वाहून न जाता हसरत शब्दांना एखाद्या कुंभारासारखा घडवित असे व नवनवीन प्रयोगही करत असत. लोककथेतील अनेक धागे पकडून ते सहजपणे ‘ईचकदाना बिचकदाना’ किंवा ‘तितर के दो आगे तितर आगे तितर पिछे तितर’ किंवा ‘छुन छुन करती आयी चिडिया’ तसेच ‘चोरी चोरी’मधील खालील गाणे,
ओ टिम का टिमा टिम्भा
तारे करें अचम्भा
ओ टिम का टिमा टिम्भा
उस पार साजन इस पार धारे
ले चल ओ माँझी किनारे किनारे
ले चल ओ माँझी किनारे
ओ कोडीया कोडीया कवलानी कवलानी
अशा रचना सहजपणे करत. गंमत म्हणजे सामान्यत: गाण्यात कधीच न ऐकलेले काही शब्द त्यांनी उत्कृष्टपणे आमच्या ओठावर रुजविले. मला आवडलेले रफीच्या मधाळ स्वरातील एक गाणे म्हणजे,
‘ओ मेरे शाह-ए-खुबा,
ओ मेरी जान-ए-जनाना
तुम मेरे पास होते हो,
कोई दुसरा नहीं होता…’
बहोतखुब वा जनाना हे शब्द माहित होते पण यातील ‘शाह-ए-खुबा’ आणि ‘जान-ए-जनाना’ हे दोन्ही शब्द अपरिचितच. पण हे शब्द असे ओठावर रुळले की आजही ते तसूभरही तेथून हलायला तयार नाहीत. मोमिन खाँ मोमिन नावाचे एक ऊर्दू शायर जे गालिबचे समकालीन मानले जातात, त्यांचा एक मिसरा आहे, ‘तुम मेरे साथ होते हो, गोया कोई दूसरा नहीं होता’ जो ऐकून मिर्जा गालिब याच्या बदल्यात आपला दिवान द्यायला तयार होते, असा किस्सा आहे. हसरत यांनी या मिसर्याला ‘शाह-ए-खुबा’ आणि ‘जान-ए-जनाना’ याचा असा काही तडका दिला की ते गाणे अजरामर झाले.
हसरत गंभीर वा दर्दभरी गीतेही तितक्याच तन्मयतेने लिहीत असत. ‘आंसू भरी हैं ये जीवन की राहें…’, ‘जाऊं कहां बता ऐ दिल…’, ‘दीवाना मुझ को लोग कहें…’, ‘हम छोड़ चले हैं महफिल को..’, ‘ मै जिंदगी में हरदम रोता ही रहा हूँ’, ‘हम तुमसे मोहब्बत करके सनम’, ‘सुनो छोटीसी गुडिया की लंबी कहानी’, ‘रसिक बलमा’, ‘मुझे रात दिन ये खयाल है’, ‘हम तेरे प्यार में सारा आलम’, ‘ये आंसू मेरे दिल की जुबान है’, ‘बेदर्दी बालमा तुझको’, ‘राम करे कहीं नैना ना उलझे’, ‘रात और दिन दिया जले,’ ‘दिल के झरोकों में तुझको बसा कर’, ‘वो खुशी मिली है मुझको’, ‘गम उठाने के लिए मैं तो जिये जाऊंगा…’सारखी शेकडो गाणी आजही रसिक विसरलेले नाहीत.
शैलेंद्र यांच्यानंतर शीर्षकगीत लिहिण्यात पटाईत होते ते हसरत जयपुरी. दीवाना मुझको लोग कहें (दीवाना), दिल एक मंदिर है (दिल एक मंदिर), रात और दिन दिया जले (रात और दिन), एक घर बनाऊंगा (तेरे घर के सामने), दो जासूस करें महसूस (दो जासूस), अॅन इवनिंग इन पॅरिस (अॅन इवनिंग इन पॅरिस) अशी अनेक टायटल गाणी गाजली. १९६६मध्ये प्रदर्शित झालेला दक्षिणेतील टी. प्रकाशराव यांचा निव्वळ मनोरंजन असलेला ‘सूरज’ हा भरजरी वस्त्र ड्रामा चित्रपट गाजला तो गाण्यामुळेच. यातील ‘बहारों फूल बरसाओ…’ हे आजही लग्नवरातीतील बँडचे प्रमुख गाणे आहे. या गाण्यासाठी हसरत यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यातील रागदारी सुरांवर आधारलेले ‘कैसे समझाऊं बडी नासमझ हो…’ हे गाणेही हसरतचेच.
बरीच गाणी अशी असतात, जी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलावंताशी जोडली जातात. अंदाजमधील ‘जिंदगी एक सफर है सुहाना… यहाँ कल क्या हो किसने जाना…’ असे हसरत लिहून गेले (या गाण्याने हसरत यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला) आणि संगीतकार जयकिशन आपली शेवटची चाल बांधून निघून गेले. ‘जाने कहाँ गए वो दिन…’’ हे त्यांचे गाणे आजही अंगावर काटा उभे करते आणि राज कपूरचा प्रचंड केविलवाणा चेहरा डोळ्यासमोर तरळू लागतो. ‘झनक झनक तोरी बाजे पायलिया’चे सूर कानी पडताच राजकुमारचा दु:खमग्न चेहरा आठवतो. या गाण्यासाठी हसरत यांना डॉ. आंबेडकर पुरस्कार मिळाला होता. वर्ल्ड युनिव्हर्सिटी राऊंडने त्यांना डॉक्टरेट बहाल केली होती.
१९५० ते १९७० या काळात हसरत अखंड लिहित राहिले आणि रसिकांच्या मनात खोलवर घर करत गेले. खरे तर दोन कवी किंवा दोन कथाकार एकाच म्यानात अधिक काळ राहू शकत नाहीत. पण शैलेंद्र आणि हसरत यांनी हा समज खोटा ठरवला. हे दोघेही प्रतिभावान व तितकेच संवेदनशील कवी. हसरत शैलेंद्रपेक्षा पाच वर्षांनी मोठे होते, पण वयाचा मोठेपणा प्रतिभेच्या आड कधीच आला नाही. राज कपूरच्या छत्रात तर ते एकत्र येतच असत, पण अनेकदा या छप्पराबाहेरही त्यांचा आमना सामना होत असे. उदा : ‘हरियाली और रास्तामधील ‘बोल मेरी तकदीर में क्या है… (हसरत), तर इब्तिदाये इश्क में हम… (शैलेंद्र) , ‘अराऊंड दि वर्ल्ड’मधील ‘दुनिया की सैर कर लो… (शैलेंद्र), तर ‘चले जाना जरा ठहरो… (हसरत), ‘संगम’मधील ‘हर दिल जो प्यार करेगा… (शैलेंद्र), तर ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर…’ (हसरत), ब्रह्मचारीमधील ‘मैं गाऊ तुम सो जाओ’ (शैलेंद्र) तर ‘दिल के झरोकों में’ (हसरत), गुमनाम चित्रपटातील ‘गुमनाम है कोई…’ (हसरत) तर ‘हम काले हैं तो क्या हुवा…’ (शैलेंद्र), ‘आजा सनम मधुर चांदनी में हम..’ (हसरत) तर ‘ये रात भीगी भीगी..’ (शैलेंद्र) अशी अनेक गाणी दोघांनी एकाच चित्रपटासाठी लिहिली. त्यांच्यात काँटे की टक्कर होती, पण प्रतिभेची. जणू काही दोघेही एकमेकांना उत्कृष्ट लिहिण्याची स्फूर्ती देत असावेत. हे अनोखे नाते खरे तर कोणत्याही क्षेत्रातील प्रतिस्पर्धीसाठी आदर्श नाते असावे.
७०चे दशक येईपर्यंत जयकिशन, शैलेंद्र कायमचे निघून गेले. राज कपूरची पुढची पिढी या क्षेत्रात आली. जयकिशनच्या अचानक जाण्याने हसरत मूक झाले. त्यात आरकेचा ‘मेरा नाम जोकर’ बॉक्स ऑफिसवर सपशेल कोसळला. चारपाच वर्षांनी मुकेश यांनीही एक्झिट घेतली. आरकेच्या ताफ्यात ‘बॉबी’च्या निमित्ताने लक्ष्मीकांत प्यारेलाल हे संगीतकार त्यांचे गीतकार आनंद बक्षी यांच्यासह दाखल झाले, तर नंतरच्या ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये गीतकार-संगीतकार रवींद्र जैन आले. यातील शीर्षकगीत मात्र हसरत यांच्या वाट्याला आले नाही. ते अमीर क्वझलबाश यांनी लिहिले व बाकीची गाणी स्वत: रवींद्र जैन यांनीच लिहिली. यात फक्त एकच गाने हसरत यांना मिळाले. ‘सुन सायबा सुन, प्यार की धुन…’ ते या सिनेमातलं सर्वात हिट गाणं ठरलं. या चित्रपटानंतर १० वर्षांनी त्यांना पुन्हा आरके कॅम्पमध्ये बोलावले गेले ते ‘हिना’ या चित्रपटाच्या टायटल गीतासाठी. ते त्यांनी लिहिले व गाजलेही.
७०च्या दशकातही ते लिहिते होते, पण गती कमी झाली होती. या काळातील त्यांची ‘उनके ख्याल आए तो… (लाल पत्थर), ‘आंखो आंखो मे बात होने दो…’ (आंखों आंखों में), ‘बोल मेरे साथीया…’ (ललकार), ‘दो जासूस करे महसूस’ व ‘दर्याचा राजा’ (दो जासूस), वगैरे वजा जाता त्यांची गाणी विरून गेली. नवीन संगीतकारांपैकी संगीतकार भाचा अनू मलिकसोबत त्यांनी सर्वाधिक गाणी लिहिली. अनूचे वडील सरदार मलिक हेही एक चांगले संगीतकार होते. ते हसरत यांचे साले. हसरत जयपुरी यांची बहीण कौसर जहान ही सरदार मलिक यांची पत्नी. आपण हसरत मामाबरोबर अनेक गाण्यांचं सिटिंग आणि रेकॉर्डिंग जवळून पाहिलं असं अनू सांगत असतोच मुलाखतींमध्ये.
१९८०चे दशक हे चित्रपटसृष्टीतील मोठ्या बदलाचे होते. चित्रपटकथेत गाणी असावीत या पलीकडे फारसा विचार होईनासा झाला. कथेला पुढे नेण्याचे काम पूर्वी गीतकार करीत. ते होईनासे झाले. हसरत एक असे शायर होते जे रात्रीला एका सुंदर स्त्रीचे रूप देऊन तिच्याभोवती तार्यांची चादर लपेटून देत. मग चांदण्यांनी बहरलेली ही भरजरी रात्र त्यांना नक्षत्रांचे देणे देई. कवीला लिहिताना आनंद यायला हवा. प्रसवकळा त्याशिवाय आनंदी कशा होतील? हसरत यांचे एक युग होते. ४० वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी ३५० चित्रपटांतून दोन हजार गाणी लिहिली. त्यांनी जन्मनाव टाकून नवीन नाव धारण करताना आपल्या जन्माच्या ठिकाणाचे जयपूर हे नावही अभिमानाने जोडले. जयपूरच्या रामगंजमध्ये ‘फिरदौस मंझिल’ ही त्यांची हवेली होती. फिरदौस म्हणजे स्वग. फिरदौसी हे त्यांच्या आईचे नाव होते आणि आईवर त्यांचे अफाट प्रेम होते. आईच्या देखभालीसाठी त्यांनी एक खास दाई ठेवली होती व लोक या दाईला बेगम आपा असे म्हणत असत. या हवेलीसमोरच त्यांची राधा राहात असे. सर्वप्रथम त्यांनी याच राधासाठी चार ओळी लिहिल्या होत्या आणि शायरीची सुरुवात केली होती,
तू झरोकों से झांके
तो मैं इतना पुछूं
मेरे मेहबूब तुझे
प्यार करू या ना करू
या हवेलीतल्या गच्चीत बसून त्यांनी अनेक गाणी लिहिली. या अवलियाने मुंबईच्या फुटपाथवर मातीची खेळणीही विकली होती. बस कंडक्टर असताना सुंदर मुली व स्त्रियांकडून ते तिकिटाचे पैसे घेत नसत. कारण याच सौंदर्यामुळे आपल्याला गाणी सुचतात अशी त्यांची धारणा होती.
शेवटच्या दिवसांत पत्नीच्या आग्रहामुळे त्यांनी रियल इस्टेटमध्ये मिळकत लावली. यातून मिळणार्या उत्पन्नावर ते व त्यांची दोन मुले व एक मुलगी गुजराण करीत. जयपूर हे शहर गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते. या शहराच्या गुलाबी छटांची त्यांनी आपल्या लेखणीने सर्वदूर पखरण केली. १७ सप्टेंबर १९९९ या आपल्या अखेरच्या प्रवासापूर्वी अनेक वर्षे ते अज्ञातवासातच होते.