• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सजग करणारे वैचारिक मंथन!

- संजय डहाळे (तिसरी घंटा) (नाटक - साम्राज्यम्)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 28, 2022
in तिसरी घंटा
0
सजग करणारे वैचारिक मंथन!

अर्थशास्त्रापासून ते राजकारणापर्यंत आणि प्रशासनापासून ते ध्येयधोरणापर्यंत हे नाट्यरूप प्रभावी भाष्य करतेय. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष, आर्थिक हितसंबंध तसेच नातेवाईक, गैरसमज, अविश्वास, लाचारी प्रवृत्ती अशा अनेक मुद्द्यांवर असणारे तत्कालीन भाष्य हे आजही लागू पडते. रसिकांना जागं करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे हा आविष्कार
‘हटके’ ठरतो.
– – –

रामायण-महाभारताच्या पवित्र ग्रंथातील कथा अन् व्यक्तिरेखा यामुळे संवेदनशील कलाकार कधी ना कधी भारावून जातातच. मग चित्रकार-शिल्पकार असोत, कादंबरीकार-कवि असोत, नर्तक-एकपात्रीकार असोत, वा नाटककार! सारे पुराणकथांच्या सादरीकरणासाठी सज्ज झालेले दिसतात. मराठी नाटकांच्या प्रारंभीच्या काळापासून ते संगीत आणि गद्य नाटकांपर्यंत पुराणकथांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयोग शेकडो संहितेतून दिसून आलाय.सामाजिक, राजकीय वास्तवाला भिडणार्‍या या पुराणकथांनी पिढ्यान्पिढ्यांना सजग केलं. विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’पासून सुरू झालेला हा प्रवाह आजच्या गद्य नाटकांच्या प्रवासातही कायम आहे. विद्याधर पुंडलिक यांचे ‘माता द्रौपदी’ असो वा रत्नाकर मतकरींचे ‘आरण्यक’ किंवा नाटककार गंगाराम गवाणकरांचे मालवणी ‘वस्त्रहरण’. अशा अनेक नाटकांनी पुराणकथांना नव्या आविष्कारातून नाट्यरूप दिलं. याचा धांडोळा घेणे हा एक संशोधनाचाच विषय ठरावा.
प्रायोगिक रंगभूमीवरले आघाडीचे नाटककार जगदीश पवार आणि दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनी ‘साम्राज्यम्’ या नाटकातून रामायणातील रावणाच्या कथेभोवतीच्या एका सशक्त संहितेचे लक्षवेधी सादरीकरण केलं आहे. पुराणातील घटना तसेच संदर्भ हे आजही फिट्ट बसणारे असून हे नाटक रसिकांना खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतं.
रामाला देवत्व मिळालं खरं पण राम घडला तो रावणामुळे. रावणाचे अनुयायी, राक्षस यज्ञाचा विध्वंस करायचे. ऋषींवर हल्ले होत होते. त्या पार्श्वभूमीवर विश्वामित्रांनी रामाला अस्त्रविद्या दिली. पुढे रावणाने सीतेचे अपहरण केले आणि रामायण घडले. हे अपहरण झाले नसते तर चौदा वर्षांचा वनवास संपवून राम अयोध्येला परतला असता. पण त्याला देवत्वाला पोहचवले ते रावणानेच. जो जिंकतो तो नायक आणि जो हरतो तो खलनायक ठरतो. हा सर्वमान्य नियमच आहे आणि तोच इतिहास ठरला. रावण कायमचा खलनायक ठरला खरा, पण त्याची वैचारिक, मानसिक उंची थक्क करून सोडणारी होती. शुक्राचार्यांचे अनेक दाखले आणि त्याचा रावण या व्यक्तिरेखेवर झालेला परिणाम याने त्याची प्रतिमा अधिक उजळून निघते. रामायण कथा तशी घराघरात पोहचलेली पण त्यातील कंगोरे नवनवीन अर्थ प्रकाशात आणत असल्याची साक्ष म्हणजे ही संहिता.
श्रीलंकेतलं हे नाट्य. तिथे रावण हा सम्राट. कुंभकर्ण दारु ढोसून दिवसेंदिवस झोपलेला. इथून नाटक सुरू होतं. त्यावेळी रावण सुनावतो, ‘ज्यांना लंकेची काळजी नाही. त्यांना लंकेने का म्हणून सांभाळावं? लंकेच्या प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवावं की आपल्याला व्यसनाच्या धुंदीत साम्राज्याची बांधिलकी लक्षात राहात नसेल तर या मातीत राहाण्याचा कोणताही अधिकार नाही. दरबारातील महत्त्वाची पदे दाबून ठेवणार्‍यांना तर नाहीच नाही!’
रावण दरबारी कुंभकर्ण, विद्युज्जिव्हा, शूर्पणखा, वरूण, बिभीषण, सीता, त्रिजटा, मंदोदरी, दासी यांना आणून कथानक बंदिस्त करण्यात आलंय. प्रत्येक व्यक्तिरेखा काही सांगतेय. साम्राज्यावर भवितव्याबद्दल त्यांची मत-मतांतरे आहेत. कुंभकर्णाच्या प्रसंगापासून सुरू झालेले कथानक शेवटी रावणाच्या मृत्यूपर्यंत पोहोचते. बिभीषण सिंहासनावर बसतो. सत्तांतर होते आणि श्रीराम हे लंकाधीश बिभीषणाचे अभिनंदन करण्यासाठी पोहचतात. हे सारं घडतं सत्तेच्या संघर्षाच्या साक्षीने! नाटककार जगदीश पवार यांची संदर्भपूर्ण संहिता आणि दोन अंकातील वेगवान प्रसंग, ही या सादरीकरणामागली जमेची बाजू ठरते. नाट्य कुठेही रेंगाळणार नाही याची दक्षता जशी संहितेत आहे त्याच प्रकारे दिग्दर्शनातही दिसून येते.
‘सापाला दूध जरूर पाजावं, पण त्याला कधी पाळू नये’ किंवा ‘श्रीलंका मोठी होणार ती तिजोरीत भर घालून, पूजापाठ करून कदापि नाही’ किंवा ‘साम्राज्य सांभाळण्यासाठी क्रूर अन् शूर सेनापती लागतात’ तसेच ‘सत्ता क्षणिक असते, विश्वास कायमच!’ किंवा ‘या जगात विश्वास ठेवता येईल अशी एकच गोष्ट आपल्याजवळ असते, तो म्हणजे अविश्वास!’ अशा एकापेक्षा एक संवादाची पेरणी यात केलीय. जी अर्थशास्त्रापासून ते राजकारणापर्यंत आणि प्रशासनापासून ते ध्येयधोरणापर्यंत प्रभावी भाष्य करते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष, आर्थिक हितसंबंध तसेच नातेवाईक, गैरसमज, अविश्वास, लाचारी प्रवृत्ती अशा अनेक मुद्द्यांवरील तत्कालीन भाष्य हे आजही लागू पडते. रसिकांना जागं करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे हा आविष्कार ‘हटके’ ठरतो.
कलाकारांची तयारीची ‘टीम’ ‘साम्राज्यम्’मध्ये सज्ज आहे. पात्रनिवड अचूक आहे. त्यांची देहबोली शोभून दिसते. रावणाचा वैचारिक संघर्ष अभिनयातून नेमकेपणानं साकार करण्यात उज्वल ताठे यशस्वी झालाय. ही मध्यवर्ती भूमिका. दिशादर्शक अर्थपूर्ण संवाद त्याने सुरेख पेश केलेत. दास आणि दासीचा लाचारपणा नीतेश हलगेकर आणि पूर्वी सरगडे या दोघांनी मस्त उभा केलाय. मोत्याची-सोन्याची माळ मिळविण्यासाठी कायम ‘स्तुतिपाठक’ असलेली दासी नुसत्या नजरेतून खूप काही बोलून जाते. साक्षी पाटील हिची शूर्पणखा नजरेत भरते. लंकाधीशाची बहीण शोभून दिसते. अन्य भूमिकांमध्ये आश्लेषा गाडे (मंदोदरी), अजिंक्य टेकाडे (बिभीषण), राकेश रंगवले (विद्युज्जिव्हा), राजेंद्र स्वामी (प्रहस्त), ओमकार टिके (आकंपन), मयुरेश पाटील (वरूण), तनुजा धामणस्कर (सीता), नेहा राऊत (त्रिजटा), भारत पवार (सेवक), शिवानी खरपुडे (सेविका) यांनी चांगली साथसोबत केलीय. स्पष्ट शब्दोच्चारामुळे नाट्य पकड घेते. उपलब्ध रंगमंचाचा वापर करताना कुठेही गोंधळ उडणार नाही याची दक्षताही घेतली गेली आहे.
नाटकातील वेशभूषा थेट रामायण काळात घेऊन जाणारी. त्यात कुठेही तडजोड केलेली नाही. त्यातील रंगसंगतीही भूमिकेला अनुरूप ठरते. तृप्ती झुंजारराव यांनी त्यासाठी घेतलेले परिश्रम नजरेत भरतात. गेटअपमधून व्यक्तिरेखांची ओळख तात्काळ होते. हनुमान न दाखवता फक्त त्याची भलीमोठी शेपटी दाखवून जो परिणाम साधला आहे, तो भव्यता व वेगळेपणा दाखवून देणारा ठरतो. आशुतोष वाघमारे याचे संगीत कुठेही भडक नाही. प्रयोगाच्या वेळी दिग्दर्शकाच्या हाती ‘ताल’ देऊन प्रायोगिकता साधली आहे. नेपथ्य व प्रकाशयोजना यात प्रतीकात्मकता दिसते. त्याचा अतिरेक नाही. या सर्वांमागे अभिजीत झुंजारराव दिग्दर्शकाच्या भूमिकेतून ठामपणे उभा आहे. त्याच्या कल्पकतेला दाद द्यावी, तेवढी कमीच ठरेल.
दोन वर्षाच्या कोरोनाकाळामुळे काहीशी मंदावलेली प्रायोगिक चळवळ आता नवी उभारी घेण्याचा प्रयत्न करतेय. त्यात हे नाटक एका उंचीवर घेऊन जाणारे. यातील नाट्य पडद्यामागले विचार अभ्यासकांचे सांगण्याचा प्रयत्न करणारे तसेच दिशादर्शक होते. एकीकडे व्यावसायिक रंगभूमीवर कॉमेडी नाटकांची भाऊगर्दी असली तरी या शैक्षणिक मूल्ये जपणार्‍या रंगभूमीवर वैचारिक मंथनातून प्रेक्षकांना सजग करण्याचा प्रयत्न सुरू आहे, हेही नसे थोडके!
रामायणाकडे एक कालबाह्य पुराणकथानक असे न बघता आजच्या युगाशी सांगड असणारे विचारधन म्हणून पाहून या उभ्या ‘टीम’ने अगदी चाणाक्षपणे निर्मितीच्या प्रत्येक दालनातून ते प्रभावीपणे सादर केले आहे. विशेष म्हणजे हे सारे रंगकर्मी विद्यापीठाचे नाट्य अभ्यासक विद्यार्थी आहेत. नव्या प्रायोगिक वाटेवरल्या संकल्पनेचे साक्षीदार आहेत. ‘साम्राज्यम्’चा प्रयोग हा दीर्घकाळ नवनव्या संदर्भांसह रसिकांना खुणावत राहील हे निश्चितच!

साम्राज्यम्

लेखन – जगदीश पवार
दिग्दर्शन / नेपथ्य – अभिजीत झुंजारराव
संगीत – आशुतोष वाघमारे
प्रकाश – श्याम चव्हाण
वेशभूषा – तृप्ती झुंजारराव
सूत्रधार – रोशन मोरे
निर्मिती – अभिनय, कल्याण

[email protected]

Previous Post

ललाटावरची एक सिल्व्हर लाईन

Next Post

खड्ड्यांच्या देशा!

Next Post

खड्ड्यांच्या देशा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.