□ औरंगजेबाच्या संरक्षणासाठी मोदी सरकार धावले! रत्नपूरमधील थडग्याला त्रिस्तरीय संरक्षण.
■ ते त्यांचे कामच आहे. ते संरक्षित क्षेत्र आहे. त्यांना खरोखरच ते थडगे नष्ट करायचे असेल तर त्याचे संरक्षण काढून घेऊ शकतात. पण, तसं करून ते दंगलीला चिथावण्या देण्याची सोय का नष्ट करतील आपणहून?
□ अवैध बांधकामे होत असताना अधिकारी काय करत होते? कल्याण-डोंबिवली महापालिकेची हायकोर्टाकडून खरडपट्टी.
■ दिल्लीत न्यायाधीशांच्या घरी रोकड सापडल्याची बातमी पाहता आता हा प्रश्न विचारण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेला तरी किती राहिला आहे, हा प्रश्नच आहे. पण, अवैध बांधकामं होत असताना अधिकार्यांना खूप कामं असतात, त्या बांधकामांना पाणी, वीज पुरवायची असते, ग्राहकांना गंडवण्यासाठी आवश्यक कागदपत्रं पुरवायची असतात. खूप कामं आणि खूप मोबदला.
□ आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना २१०० रुपये – विधानसभेत अजित पवारांचे मोघम उत्तर.
■ म्हणजे महायुती सरकार सत्तेत असेपर्यंत कधीही नाही… या सरकारला आर्थिक परिस्थिती सुधारण्याची इच्छा असती, तर त्यासाठी आवश्यक सामाजिक सलोखा, शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे सरकार काम करत असताना दिसलं असतं. यांचे उद्योग काय चाललेत पाहा आणि दोडक्या बहिणींनो, खरंतर ते १५०० पण विसराच आता!
□ शहापुरात भाजपचा घरकुल घोटाळा; पक्की घरे असताना यादीत नावे घुसडली.
■ जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे सदस्य असून फक्त एकच पक्कं घर असणं शोभतं का राव! तीनचार तरी घरं झाली पाहिजेत, ती गच्च भरली पाहिजेत, तर त्या सदस्यत्वाचा फायदा!
□ राज्यातील सार्वजनिक उपक्रमांनी थकवला २५ हजार कोटींचा कर.
■ त्यांना लागली आहे घरघर, ते कुठून भरतील कर… अशी एक आठवले स्टाइल कविता करता येईल या बातमीवर!
□ विद्यार्थ्यांची सुरक्षा अजूनही धोक्यातच; राज्यात केवळ ५० टक्के शाळांमध्येच सीसीटीव्ही.
■ शाळा? त्या काय असतात? त्यांचा उपयोग काय आहे? तिथे कंत्राटदार नेमता येतील का लगेच? किती हजार कोटींची उलाढाल करता येईल? ही सगळी माहिती मिळाल्याशिवाय कोण या विषयाला हात घालणार? हात घालू तिथे माल‘पाणी’ निघणार नसेल, तर उपयोग काय त्या कामाचा?
□ कोकणातील खनिज संपत्ती अदानी, अंबानींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप.
■ कोकणाचा विशेष उल्लेख करायची गरज नाही. मणिपूरपासून मुंध्रापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जे काही देशाचं आहे, ते या दोघांचं आहे, हे आता लक्षात घेऊन चाला. परत परत त्याच गोष्टी कशाला बोलायच्या?
□ आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदतच नाही – मदत व पुनर्वसन मंत्र्यांची कबुली.
■ म्हणजे त्या बिचार्याने जीवनाचं ओझं असह्य झाल्यावर ते संपवताना जो काही विचार केला असेल की निदान माझ्यामागे माझ्या कुटुंबियांचं तरी भलं होईल, माझं जगणं सार्थकी नाही लागलं, मरण तरी सार्थकी लागेल, तो विचारही बाराच्या भावातच गेला म्हणायचा!
□ ठाण्यातला अंधार हटवण्यासाठी आम्ही उजेड घेऊन आलोय – गणेश नाईकांनी मिंध्यांना पुन्हा डिवचले.
■ नवी मुंबईत इतका प्रचंड उजेड पडलेला आहे की रात्रीच्या वेळी लोक घरं काळ्या कपड्यांनी झाकून घेतात, प्रखर प्रकाश सहन होत नाही म्हणून. आता ठाणेकरांची कम्बख्ती ओढवणार आहे. आग बरी होती, असं फुफाट्यात पडल्यावर वाटेल त्यांनाही.
□ दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या घरात १५ कोटींचे घबाड.
■ त्यांच्या पदाचा मान राखा. फक्त १५ कोटींची रोख रक्कम असं म्हणा… बाकी रोखीत नसलेल्या गोष्टींची मोजदाद झालीच तर त्यांचा ‘मोठेपणा’ स्पष्ट होईल.
□ मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कंत्राटं वाटतो – शिंदे गटाच्या आमदाराचा विधानसभेत महायुती सरकारला घरचा आहेर.
■ आपापसातच यांचं हळदीकुंकू सुरू असतं ते बरं आहे एक. इतरांना बोलायला वावच ठेवायचा नाही. याने मारल्यासारखं करायचं, त्याने रडल्यासारखं करायचं.
□ सीबीएसई पॅटर्न हा एसएससी बोर्ड बंद करण्याचा डाव – सुप्रिया सुळे यांचा आरोप.
■ मुळात व्हॉट्सअॅप असताना, गोदीमीडिया अहोरात्र ज्ञानवाटप करत असताना, सोशल मीडियावर आयटी सेलचं शिक्षणकार्य सुरू असताना अक्षरओळख आणि आकड्यांची ओळख यापलीकडे खासकरून बहुजनांच्या, गरीबांच्या मुलांना फार काही शिकवण्याची गरज काय आहे?
□ बीडनंतर आता जळगावात माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या.
■ गावाच्या ‘विकासकार्या’त अडथळा आणला असणार त्यांनीही निश्चित!
□ मुंबईतील मिंध्यांच्या रस्ते घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार.
■ हत्ती उधळू नये म्हणून आणखी एक अंकुश… आपण पाळलेल्या बैलांना आणखी एक पराणी… गडबड केली की ‘निकाल’ लागणार!
□ मुंबईत होतेय गुजरातमधील गुटख्याची खुलेआम विक्री.
■ एरवी मुंबईतून सगळं गुजरातला नेलं जातं म्हणून ओरडता तुम्ही, पण आता गुजरातकडून मुंबईला काहीतरी मिळतंय हे पाहात नाही तुम्ही!
□ लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचे हंड्याचे ओझे कायम; हिंगोलीत जल जीवन मिशनचे काम अपूर्णच.
■ उन्हाचा तडाखा असा वाढणार आहे यापुढे की शहरांमधल्या आणि उच्चभ्रू सोसायट्यांमधल्या लाडक्या बहिणींना, भावांना हंडेयात्रा करावी लागणार आहे पाण्यासाठी. सब का नंबर आयेगा!