• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हिंदू जनांचा र्‍हास आणि अध:पात

- सचिन परब (प्रबोधन-१००)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 26, 2025
in प्रबोधन १००
0

प्रबोधनकारांनी अनुवादित केलेलं हिंदुजनांचा र्‍हास आणि अधःपात या पुस्तकाच्या प्रकाशनात अडचणी आल्या. पण प्रबोधनकार त्याला पुरून उरले. या पुस्तकाच्या निमित्ताने प्रबोधनकारांनी भिक्षुकशाहीमुळे झालेल्या देशाच्या अवनतीचा इतिहास मराठी माणसासमोर मांडला.
– – –

बापूसाहेब चित्रे यांच्या मृत्यूमुळे अर्धवट राहिलेला डिक्लाइन अँड फॉल ऑफ द हिंदूज या बॅ. एस. सी. मुखर्जी यांच्या इंग्रजी पुस्तकाचा इतिहास प्रबोधनकारांनी पूर्ण केला. त्याचे फॉर्मही छापून घेतले. ते बाइंडिंगसाठी एका बाईंडरकडे दिले. आठ दिवसांनंतर पुस्तकं बांधून देण्याचं ठरलं. पण तो चौथ्या दिवशीच आला आणि सांगू लागला की प्रत्येक गठ्ठ्यात २५ पानं कमी पडत आहेत. हे कसं झालं याचा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की छपाई केलेले पुस्तकाचे फॉर्म शाळकरी मुलांकडे घडी करण्यासाठी दिले जात. त्यात त्यांची थोडीफार कमाई होत असे आणि बाईंडरचंही काम कमी मजुरीत करून मिळे. ही शाळकरी मुलं प्रामुख्याने ब्राह्मणच असत. प्रबोधनकारांनी लिहिलेलं हे पुस्तक बघताच त्या ब्राह्मण घराचा संताप झाला. त्यांनी यातली अनेक पानं जाळून टाकली आणि उरलेले गठ्ठे बाईंडरकडे आणून दिले. त्यामुळे २००० प्रती छापलेली असतानाही १५०० प्रतीच हातात आल्या. प्रबोधनकारांचं या भानगडीत पाचशे रुपयांचं नुकसान झालं. पण या पुस्तकाच्या विक्रीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्यात हा तोटा भरून निघाला. त्यामुळे संसार आणि छापखान्याचा जमाखर्च सावरला गेला.
ब्राह्मण कुटुंबांचा संताप व्हावा असं या पुस्तकात होतं तरी काय? अनुवादक म्हणून मनोगत व्यक्त करताना प्रबोधनकारांनी या पुस्तकाचं वर्णन असं केलंय, बॅरिस्टर मूकरजी हे उच्चजातीय ब्राह्मणच असल्यामुळे, भिक्षुकशाहीची त्यांनी केलेली निर्दय छाननी वाचून, त्यांच्यावर ब्राह्मणद्वेषाचा आरोप करताना, इरसाल ब्रह्ममुखोत्पन्नांना तोंड नसले, तरी लाज वाटेल, असा मला भरवसा आहे. बॅरिस्टर मूकरजी हे भावनावश लेखक नाहीत. त्यांच्या विधानांचा आणि चिकित्सेचा सर्व आवेश इतिहाससिद्ध भरभक्कम पुराव्यांवरच विशेष असल्यामुळे, त्यांच्या सिद्धांताकडे आणि शुद्ध राष्ट्राभिमानाने केलेल्या अनेकविध सूचनांकडे विवेकी व विचारी हिंदुजनांचे आदरपूर्वक लक्ष वेधले जाणे अगत्याचे आहे. हिंदुजनांच्या सामाजिक आत्मप्रबोधनाच्या क्षेत्रात काम करणार्‍या समाजसुधारकांनाही आपापली कार्याची दिशा ठरविण्याच्या कामी अनेक उपयुक्त सूचनांचे भांडार या ग्रंथाच्या अध्ययनाने आज खुले होत आहे.
हे पुस्तक म्हणजे भारतीय समाजाच्या अवनतीचा इतिहास आहे आणि ही अवनती भिक्षुकशाहीमुळे झाली, असा सिद्धांत या पुस्तकात मांडला आहे. भारतीय रसायनशास्त्राचे जनक मानले जाणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रॉय यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते लिहितात, प्रस्तुत प्रबंध म्हणजे `भरतखंडाच्या पुनरुज्जीवनाचा खास संदेश’ आहे, असे माझे ठाम मत आहे. जातिभेदाचा पुरस्कार करणारी सामाजिक क्षेत्रांतली भिक्षुकशाही म्हणजे हिंदुस्थानाला जडलेली व्याधी होय. इतर अनेक गोष्टीपेक्षा या भिक्षुकशाहीनेच आमच्या प्रगतीला कुंठित करून, राष्ट्रीय भावनांची कलमछाट केलेली आहे.
हे पुस्तक लिहिण्यास लेखक कसा उद्युक्त झाले, याचं नाट्यपूर्ण वर्णन त्यांनी केलं आहे. त्यातून या पुस्तकाची पार्श्वभूमी लक्षाच येऊ शकते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि हा उज्वलध्येयमंत्र आमच्या अन्तःकरणांवर ठसठशीत कोरलेला असतांहि मातृभूमीच्या प्रेमाच्या बाबतीत इतर राष्ट्रांनी आमच्यावर वरचढ करावी काय? हें जर खरे असेल, तो मंत्र आमच्या हृदयांतून साफ पुसून गेला असेल आणि आमच्या मातृभूमिप्रेमांत खरोखरच जर विरजण पडलें असेल तर मग-तर मग काय? झाला, संपूर्ण अध:पातच झाला! या लोकी मोक्ष तर नाहींच, पण परलोकी सुद्धा नाहींच नाहीं! मला एक दिवस असे स्वप्न पडलें कीं मला कोणी उचलून हिंदभूमातेच्या मांडीवर ठेवले. मी तिच्याकडे पाहातों तो तिला मूर्छना येत असलेली दिसली. मी चटकन उठून प्रेमाच्या झटक्याने तिला पाठुंगळी मारली आणि चिंताक्रांत स्थितीत दवाखान्याकडे धावत सुटलों. तेथें बरेच डॉक्टर लोक होते. माझ्या आईला त्यांनी कांहीं उपचार करावा म्हणून मी तिला त्यांच्या समोर टेबलावर हळूच निजविले. ते कांहीं उपचार करणार तोच तिनें एक दीर्घ श्वास सोडला आणि मी जागा झालों. आज आपल्यापुढें मी ठेवीत असलेल्या ह्या निबंधाचे लेखन मी जागा होतांच तत्काळ हाती घेतले.
बॅरिस्टर मुखर्जींच्या पुस्तकाच्या निमित्ताने प्रबोधनकारांना मराठी माणसासमोर देशाच्या इतिहासाचं चित्र ठेवायचं होतं. त्यामुळे या पुस्तकाचं मर्म समजून घेण्यासाठी यातला काही भाग संपादित करून आपल्यासमोर ठेवलेला आहे. –
तर मग आता प्रथम अगदी प्राचीन वेदकालाकडे नजर फिरवून तेथे या सर्व परंपरेचे कांही विषबीज सांपडते की काय, हें एकदा नीट पाहूं या. या निबंधांतील विचारसरणीकरितां आपण श्री. टिळक यांनी आपल्या Arctic Home in the Vedas या विद्वत्ताप्रचुर ग्रंथात प्रतिपादल्याप्रमाणें आर्यांचे मूल वसतीस्थान उत्तर ध्रुवाकडील युरोपएशियन किंवा युरेशियन भागाकडे होते असेच गृहित धरूं. त्याचप्रमाणें इ.स.पू. ७००० वर्षे ही त्यांत दिलेली वेदकालमर्यादाहि आपण मान्य करू. उत्तर ध्रुवाकडील हिमाच्छादित प्रदेशांत सहा महिनें रात्र आणि सहा महिनें दिवस असतो, हें सर्वांना माहीतच आहे. तेव्हां अशा ठिकाणी राहणार्‍या आपल्या आर्य पूर्वजांना सहा सहा महिन्याच्या गुडूप अंधःकारानंतर प्राप्त होणारा सूर्याचा पहिला किरण, सर्वत्र पसरलेल्या अंधःकाराचा थोडासा तरी भेद करणारा आकाशांतील तारकांचा लुकलुकता प्रकाश, एवढेंच काय पण, कृत्रिम रीतीनें निर्माण केलेला अग्निज्वालेचा प्रकाशमय स्फुल्लिंग हा सुद्धां मोठा आनंदाचा शुभ प्रसंगच वाटावा, यांत कांहीं आश्चर्य नाही.
सर्वत्र पसरलेल्या घनदाट अंध:काराची, त्याचप्रमाणे भयंकर रोगराईच्या साथींची भीती, म्हणजे जवळ जवळ मृत्यूचीच धास्ती. या धास्तीमुळेच प्रकाशाचा एकच किरण म्हणजे उत्तर ध्रुवस्थ आर्यांना आनंदाची पर्वणी वाटे. या धास्तीच्या आणि आनंदाच्या संमिश्र भावनांतूनच आमच्या धर्मकल्पनांची उत्पत्ति झालेली आहे. थंडीच्या भयंकर कडाक्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना आरोग्याचे नियम धाब्यावर बसवून अत्यंत गचडीने रहाणे भाग पडत असे. असल्या मेंढरी गचडागचडी पद्धतीच्या टोळ्या करून राहिल्यामुळें अर्थातच वैषयिक निर्बंध व नीति त्यांच्यांत यथा तथाच राहिली. आरोग्यनियमांचे उल्लंघन आणि स्त्रीपुरुष-संबंधांतील शिथिलता यांचा यथाप्राप्त परिणाम म्हणजे महारोग आणि उपदेश यांचा त्या समाजांत जारीनें फैलाव झाला. उष्णता आणि मांस-विशेषतः गोमांस आणि सोमरस यांची त्यांना दररोजच्या जीवनाकरितां अत्यंत आवश्यकता होती. प्रत्येक ऋतु बदलण्याचे वेळी, जे त्यांचे सार्वजनिक स्वरूपाचे उत्सव व मेजवानीचें प्रसंग किंवा यज्ञ दिवसांचे दिवस चालत असत, तेव्हां तर या खाद्यपेयांचा समारंभ फारच थाटाने होत असे. थंडीचा कडाका टाळण्यासाठी आणि मारलेल्या पशूंचें मांस भाजण्यासाठी हे यज्ञांतील होमाग्नि एकदां प्रज्वलित झाले की, एकंदर समारंभ पूर्ण आटपेपर्यंत एकसारखे धडधडत असत.
वेदशाखीय आर्यांचे हिंदुस्थानांत पाऊल पडण्यापूर्वी जे लोक तेथें होते त्यांना आपण द्रविड-नाग या नांवानें संबोधू. प्रस्तुत निबंधाच्या सोईकरितां द्रविड आणि नाग या दोन जातींच्या नामसमुच्चयानें बनविलेल्या या नांवामध्यें असुर, गंधर्व, राक्षस, दैत्य, दानव, पिशाच्च, भूत वगैरें निरनिराळी नांवें आर्यांनी दिलेल्या सर्व वर्गांचा मी समावेश केलेला आहे. हे सर्व वर्ग वसाहतीच्या प्रवृत्तीपेक्षां युद्धकलेंत आर्यांपेक्षा केव्हांहि अधिक निष्णात आणि बलवान होते. हे द्रविडनाग अगदींच सरळ, प्रामाणिक, उदार, अतिथींचा मोठ्या प्रेमानें सत्कार करणारे, छक्केपंजे न जाणणारे आणि चटकन फसले जाणारे असले भाबडे आहेत, हें त्यांच्या शत्रूंच्या लवकरच ध्यानांत आले. अशा भोळसट आणि उदार प्रतिस्पर्धांच्या मनांतील आपल्याविषयींचा वैरभाव काढून टाकून त्यांच्याकडून तहनामें, सवलती, वगैरेंच्या रूपाने बरेंचसे हक्क प्राप्त करून घेणें हें मुत्सद्देगिरींत मुरलेल्या लबाड ब्राम्हणवर्गाला अगदींच सहजसाध्य झालें.
रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचे नीट चिकित्सक परिशीलन करा, म्हणजे त्या वेळच्या समाजाचें स्पष्ट चित्र तुमच्या समोर उभें राहील. भिक्षुकशाहीच्या अंमलाखालील त्या समाजांत अनिर्वेध स्वेच्छाचार आणि आठ प्रकारच्या विवाहपद्धतीच्यायोगें वाटेल तितक्या स्त्रिया करण्याची रीत यांच्या द्वारें समाजाची वाढ होत चाललेली तुम्हास दिसेल. त्याचप्रमाणें, त्यावेळच्या क्षत्रियांनी लढलेल्या मोठमोठ्या लढाया आणि त्यांची धैर्याची आणि धाडसाचीं अद्वितीय शूर कृत्ये यांच्या मुळांशीं तुम्हाला एकच गोष्ट दिसून येईल कीं, या सर्व शूरधीर कृत्यांच्या पाठीमागें, क्षत्रिय सत्तेला किंवा राजसत्तेला वाटेल तशी नाचविणारी शक्ती ही भिक्षुकशाहीच होय.
ऋग्वेद, यजुर्वेद आणि शतपथ ब्राम्हण यांमध्ये अखिल ब्रम्हांडाचा अधिराज सर्वशक्तिमान असा एकच परमेश्वर आहे अशा भावनेने गाईलेली किती तरी गंभीर आणि उदात्त कवनें सांपडतात. पण हें उदात्त तत्व आपल्यापुरतेच गुप्त ठेवून, समाजाच्या मनावर भिक्षुकशाहीचें वर्चस्व कायम राखण्याच्या हेतूने, जसा भक्ताचा भाव तसा त्याचा देव या निमित्तानें, शेंकडों देव आणि देवता निर्माण केल्या. ह्या देवदेवतांच्या नानाविध कथांनी ही भोळसट कुळें चांगलीच भारली गेलीं. मग काय? भिक्षुकशाही आणि त्यांचे जातभाई यांना मोकाट चरण्याकरता सर्व रान मोकळें झालें. यामुळें खरें तत्त्व बाजूला राहून त्याच्या भोंवतीं निरनिराळ्या पोकळ नांवांचे आणि कोरड्या विधींचे जाड कवच पडले. बहुजन समाज या वरच्या आंगतुक आवरणालाच संतत्व म्हणून कवटाळूं लागला. नाना मतांचे आणि नाना तर्‍हेचे पंथ त्यांच्यामधें भराभर उत्पन्न होऊं लागले. स्वतःच्या संस्कृतीचा आणि सत्तेचा विस्तार करण्याच्या लालसेनें ब्राम्हण वर्गाने धर्माचे गांभीर्य मात्र गमावलें. सत्ता, इभ्रत आणि संपत्ति यांच्याकरिता आपल्या सदसदविवेक बुद्धीचा त्यानें भर चव्हाट्यावर लिलांव केला आणि त्यांचे अनुयायी भक्तजन ज्या भिकार अभिरुचीच्या खातेर्‍यांत लोळत होते त्याच नैतिक अधःपाताचे त्यानें कुंटणखाने उघडले.
स्वत:ची सत्ता अबाधित रहावी, तिचा कोणत्याही तर्‍हेने भंग होऊ नये म्हणून त्यांनी फोडा आणि झोडा या मुत्सद्दी तत्त्वानुसार समाजाचे निरनिराळे वर्ग पाडले. शतकानुशतकांच्या लोकांच्या अज्ञानामुळें हेच भेद जुन्या पुराण्या हाडांप्रमाणे निर्जीव आणि अभेद्य बनले. आपणाव्यतिरिक्त सर्व समाज असा वेगळा व स्थिरस्थावर बनलेला सांपडल्यावर ब्राम्हणी सत्ताधार्‍यांनी सगळ्या विद्यांचा आणि ज्ञान्ााचा मक्ता आपल्याकडे ठेवला आणि आपल्या उत्पत्तीची मूळपीठिका थेट स्वर्गातल्या ब्रम्हदेवाच्या तोंडापर्यंत नेऊन भिडविली, यांत नवल ते काय? अहंकार आणि मद काय करणार नाही? चक्रवर्ती राजाच्या कन्येपासून तों एखाद्या चांडाळाच्या मुली पर्यंत ब्राम्हणाला वाटेल त्या स्त्रीची मुभा! स्वतःची उत्पत्ति खुद्द ब्रम्हदेवापासून झाल्याची प्रौढी मारल्यावर एका वेळी किती स्त्रियांचा स्वीकार करावा याचा धरबंधच उरला नाही. प्रेमासाठी स्त्रियांचा स्वीकार, ही कल्पनाच त्याला कधीं शिवली नाहीं. लहर लागतांच विषयवासना तृप्त करण्याकरितां शेंकडों तरुण स्त्रिया जर हात जोडून त्याच्यापुढे केव्हांहि हजर, तर प्रेमशोधनाच्या नसत्या फंदात त्यानें तरी कां पडावें? मुलेंबाळें झालीच तर एखाद्या स्त्रीवर यांची प्रेमाची मेहरनजर कधीं फिरली तर एखादे वेळेस फिरावयाची.

Previous Post

पुतनामावशीची माया!

Next Post

प्रेम मागा विठ्ठला।।

Next Post

प्रेम मागा विठ्ठला।।

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.