‘महाराज’ या शब्दाचा अर्थ महान राजा किंवा श्रेष्ठ राजा किंवा मोठा राजा असा आहे. कोणताही अर्थ घेतला तरी त्यात ‘राज’ हे प्रधानपद आहे (म्हणजेच राजा हा प्रधान आहे). विशेष हे की राजा मोठा असो वा लहान असो किंवा तो कसाही असो, त्याला ‘महाराज’ या उपाधीनेच संबोधले जाते. महाराज या सामासिक शब्दात महा आणि राज अशी दोन पदे आहेत. त्यात ‘राज’ हे द्वितीय पद असून ते प्रधानपद आहे. प्रथम पद विशेषण असल्यामुळे हा कर्मधारय समास आहे (कधी काळी मी व्याकरण शिक्षक होतो. त्यामुळे अशा निरस ‘पदफोडी’मध्ये मला फारच रस वाटतो).
द्वितीय पद प्रधान ‘कर्म’धारी महाराजे
प्रथमत: राजांच्या राजालाच म्हणजेच सम्राटाला, राजाधिराजाला, बादशहाला, शहेनशहालाच ‘महाराज’ संबोधन होते. पुढे पुढे या ‘महाराज’ शब्दातील ‘महा’पद (किंवा महापण, महानपण किंवा मोठेपण) गौण ठरले आणि केवळ ‘राज’पद (राजेपण) महत्त्वाचे ठरले आणि लहानमोठे सगळेच राजे ‘महाराज’ बनलेत, नव्हे लोक त्यांना तसे संबोधू लागलेत. विशाल भूमी, गडगंज संपत्ती किंवा अफाट सैन्यबळ असे काहीही नसताना अतिशय चिल्लर व थिल्लर राजांनासुद्धा ‘महाराज’ म्हणू लागलेत. अर्थात महाराज ही उपाधी राजांच्या छोटे-मोठेपणांवर अवलंबून नसून केवळ परंपरेने व रूढीने चालत आली आणि पुढेही तशीच चालू राहणार. ‘महाराज’ अशी उपाधी लावताना तो योजक व्युत्पत्ती, व्याकरण किंवा अर्थ यांचा विचार करीत नसतो. तो केवळ आपल्या बापदादांनी चालविलेली रूढी चालू ठेवतो हेच खरे. राजेशाहीच्या काळात आपल्या अन्नदात्या भूपतींची अतिशयोक्त प्रशंसा करणे हा तोंडपुज्या दरबारी कवींचा आणि तोंडफाट स्तुतीपाठक भाटांचा उपजीविकेचा व्यवसाय होता. लघुराजांना किंवा लघुत्तम राजांनाही ‘महाराज’ बनविणे हा त्यांचा केवल तोंडाचा खेळ, केवळ शब्दांचा खेळ होता. त्यामुळे महापद नगण्य ठरले आणि धुवून सारे सारे राजे ‘महाराजे’ झालेत.
परंतु ‘काळ’ मात्र या महाराजांच्या मागे हात धुवून लागला. उत्तरोत्तर तो महाराजांचे महापण धुवूनच काढू लागला. मोठमोठे सम्राट गेलेत. मोठमोठे राजेही गेलेत. सार्वभौम असणारे लहान राजेही गेलेत. नंतर मांडलिक राजे आलेत आणि तेदेखील ‘महाराजे’ बनलेत. ब्रिटीश काळात आपल्या देशात मांडलिक राजांचे म्हणजेच संस्थानिकांचे पेवच फुटले. दहा-बारा खेड्यांचा संस्थानिकही ‘महाराजा’च बनला. कालाय तस्मै नम:’ येथपर्यंत ठीक होते. वरनिर्दिष्ट सर्व महाराजांमध्ये ‘राज’पद प्रधान होते. ‘राज्य करणे’ हे कर्म ते धारण करीत होते. ‘राज्यकर्ते’ होते. म्हणून त्यांना ‘कर्मधारी’ म्हणावयास हरकत नसावी. परंतु आता राजेशाही नष्ट झाली. काही देशांमध्ये गंजिफ्याच्या पत्त्यांमधील राजांप्रमाणे नाममात्र असतीलही, परंतु ते सारे नगण्यच आहेत. राजेशाही गेल्यापासून सद्य:कालीन राजकीय क्षेत्रांतून ‘महाराज’ ही उपाधी पार नाहिशी झाली. लोकशाहीत राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अन्य मंत्री कुणाकुणालाच ‘महाराज’ म्हणत नाहीत. उलट त्यांना ‘महाराज’ म्हणणे कसेसेच वाटेल. रागसुद्धा येईल. पूर्वीच्या राज्यकर्त्यांपेक्षा त्यांच्या कार्याचा आशय अधिक महान असतो (असे ते मानतात). त्यामुळे त्यांना महाशय किंवा महाशया अशी नवनिर्मित उपाधी लावतात. गंमत अशी की लोकशाहीतही राज्य, राज्यपाल, राजधानी, राजपत्र, राजमार्ग असे राजेशाहीचे शाब्दिक अवशेष शिल्लक आहेतच. असो. सध्या राज्य करणारे ‘महाराजे’ उरले नाहीत. तर सध्याचे राज्यकर्ते स्वत:स ‘महाराज’ म्हणवून घेण्यास तयार नाहीत. ‘कालाय तस्मै नम:’!
प्रथमपद प्रधान ‘नामधारी’ महाराजे
कर्मधारी महाराजांची अशी घसरगुंडी होत होत ते नामशेषही झालेत. परंतु महाराजे अजून कायम आहेतच. ‘कर्मधारी’ महाराजे नष्ट झाल्यावर ‘नामधारी’ महाराजे निर्माण झालेत. त्यामुळे ‘महाराज’ ही उपाधी शिल्लक आहेच. महाराजांमधले राजे गेलेत, पण ‘महा’पद (महानपण किंवा महान नर) उरलेत. महान नर पूर्वीही होते आणि नंतरही आहेतच. आता ‘महाराज’ यातील द्वितीयपद गौण ठरून प्रथमपद प्रधान झाले. पूर्वीची ‘महाराज’ उपाधी स्तुतीवाचक तर आताची आदरार्थी. पूर्वीचे राजे भूमीस्वामी तर आताचे गोस्वामी म्हणजेच इंद्रियस्वामी किंवा इंद्रियनिग्रही. पूर्वीचे राजे लोकपती तर नंतरचे राजे हे लोकहृदयपती. पूर्वीचे लोकपालक तर नंतरचे लोकोद्धारक.
भूपालक राजे गेल्यानंतर लोकोद्धारक संत, थोर महात्मे, थोर विभूती इत्यादींना ‘महाराज’ अशी उपाधी प्राप्त झाली. ‘प्रथमपद प्रधान नामधारी महाराजे’ अशा शब्दांत त्यांचे सार्थ वर्णन होऊ शकते. या वर्णनातील प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे.
‘महाराज’ या शब्दातील प्रथमपद ‘महा’ म्हणजे महान आहे. हे राजे खरोखरच महान होते आणि सध्याही आहेत. (काही अपवाद वगळून) त्यांचे जीवन व कर्तृत्त्व खरोखर महान होते व आहे (विस्तारभयास्तव त्यांची नावे देणे टाळतो). सामान्यजनांपेक्षा ते आध्यात्मिकदृष्ट्या महान होते. त्यांच्या या महानतेमुळेच ते महाराजे झालेत. दुसरे ते ‘नामधारी’ राजेच होते. नामधारी याचे दोन अर्थ संभवतात. एक, ते नावाचेच किंवा नावांपुरतेच महाराजे म्हणून नामधारी. दुसरे, ते ‘नामधारक’ होते. नामधारक म्हणजे भगवंतांच्या नामांचा उपदेश देणारे, भगवन्नामाचा पुरस्कार, प्रचार करणारे. स्वत: नामसंकीर्तन करणे, तद्द्वारा लोकोद्धार करणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय. त्या अर्थी ते सार्थ ‘नामधारी’ होते.
तिसरा शब्द महाराज. हे थोर संत, महात्मे त्यांच्या क्षेत्रातील, म्हणजेच आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रांमधील महान राजे, सम्राटच होते. यात अतिशयोक्ती नाही. किंबहुना पूर्वीच्या कर्मधारी महाराजांपेक्षाही या नामधारी महाराजांचे साम्राज्य अधिक विशाल आणि चिरंतन होते आणि आज देखील आहेच. संत ज्ञानेश्वर-तुकारामादि किंवा आधुनिक काळातील संत गाडगे महाराज, संत तुकडोजी इ. नामधारी महाराजांचे साम्राज्य आजही अबाधित असल्याचे आपण पाहातोच.
पूर्वीच्या ‘कर्मधारी’ महाराजांचा ‘काळा’ने अंत करून त्यांना नामशेष केले, तर हे नामधारी महाराजे कालान्तक ठरून ‘नाम’रूपाने कर्मशेष राहिलेत. कर्मधारी महाराजांना काळाने पुरले तर नामधारी महाराजे काळास पुरून उरलेत. कर्मधारी ‘काळाचे कर्म’ ठरलेत, तर नामधारी काळाचे कर्ते ठरलेत.
कर्मधारी महाराजांप्रमाणेच या नामधारी महाराजांचीही पुढे पुढे घसरगुंडी होत गेली. संत, महात्म्यांचे साम्राज्य चालू असतानाच देवस्थाने, धार्मिक संस्थाने आणि मठांचे अधिपतीही ‘महाराज’ बनलेत. पुढे त्यांचे पट्टशिष्य किंवा पठडीतील शिष्यही ‘महाराज’ झालेत. वंशपरंपरेने हे ‘महाराज्य’ चालू आहे आणि चालते आहे.
नंतर आणखी एक महाराज पंथ उगवला. तो म्हणजे कीर्तनकार, प्रवचनकार, भजनगायक इ.चा. ते महान नसतील तरीपण ते नामधारी आहेत आणि म्हणून ते सारे जनतेचे आदरणीय महाराज झालेत आणि आहेतही.
शेवटी, महानता व नामधारकता यांचा दुरान्वयानेही संबंध नसणारे पुजारी, भटजी, पुरोहित, पुराणिक, जोशी, ज्योतिषी, मांत्रिक, पोथीवाचक, गोसावी, जोगी, जंगम, भिक्षुकदेखील इ. सर्व बुवा लोक (आणि दरबारी बुवाबाजसुद्धा) महाराजोपाधिविभूषित जाहलेत.
ही झाली कर्मधारी आणि नामधारी महाराजांची कथा. पण ही घसरगुंडी इथेच थांबली नाही. आणखी गंमत पुढे आहेच.
उभयपद गौण ‘तथाकथित’ महाराजे
आपल्या महाराष्ट्रात (आणि संपूर्ण देशातच) आणखी एक महाराज पंथ बर्याच वर्षांपूर्वी उदयास आला आहे. ते महाराजे महानही नाहीत आणि राजेही नाहीत. तर दोन्ही पदे गौण असलेले आणि तिसर्याच व्यक्तीचा बोध सुचविणारे ‘बहुर्विही’ महाराजे आहेत. जो महानही नाही आणि राजाही नाही असा जो तो खाणावळवाला. हाच तो नवोदित महाराजा. आपल्या देशात सर्वत्रच मारवाडी, गुजराथी किंवा हिंदी व दक्षिणी खाणावळ किंवा हॉटेल मालकांना ‘महाराज’ म्हणतात. परंतु हे महाराजपद त्या मालकाजवळच थांबले नसून ते घसरत घसरत त्यांच्या स्वयंपाक्यापर्यंत, आचार्यापर्यंत जावून ठेपले. त्यांच्या खाणावळीपुरते ते महान आणि त्यांच्या खाणावळीचे राजे म्हणून त्यांना ‘महाराज’ म्हणत असावे.
अशी आहे महाराजांची घसरगुंडी. महान सम्राटाच्या राजदरबारापासून ते खाणावळीच्या भटारखान्यापर्यंत. आता हे महाराजपद आणखी कुणाकडे जाईल याचे उत्तर भविष्यकाळच देईल. म्हणून शेवटी पुनश्च ‘कालाय तस्मै नम:’!