महाराष्ट्रात ४५ पार आणि देशात ४०० पार हा नारा भाजपा आपल्या प्रत्येक सभेत, पत्रकार परिषद आणि बैठकांमध्ये देत आहे. देशात तिसर्यांदा केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी भाजपा हा आटापिटा करीत आहे. पण त्यासाठी भाजपाला उमेदवार ‘आयात’करावे लागले आहेत. लोकसभेच्या ५४३ जागांपैकी भाजपा ४४० जागा तर मित्रपक्ष शंभरएक जागा लढवणार आहेत. आत्तापर्यंत भाजपाने ४२० नावांची घोषणा केली आहे. त्यापैकी जवळजवळ १२० उमेदवार हे ‘आयात’ उमेदवार आहेत. भाजपचे तब्बल २८ टक्के उमेदवार इतर पक्षातून आले आहेत. मूळ भाजपावाल्यांना दूर करून, ज्यांचा भाजपा आणि संघाशी काडीमात्र संबंध नाही अशा आयात केलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. त्यात इतर पक्षातील भ्रष्टाचारी, घोटाळ्याचे आरोप असलेले, कलावंत, खेळाडू, उद्योगपती, निवृत्त न्यायाधीश, शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, राजघराण्यातील व्यक्ती आदींना निवडून येण्याच्या निकषावर भाजपामध्ये प्रवेश देऊन भाजपाची उमेदवारी दिली आहे. त्यात इतर पक्षांनी ओवाळून टाकलेले काही आहेत. ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपचा जोर नाही, पण तिथे विरोधी पक्षाचा जोर आहे तेव्हा त्या पक्षातील नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमीरा लावून त्याला जेरीस आणायचे, म्हणजे तो आपसूकच भाजपाला शरण जातो. केंद्रात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी तोडा-फोडा-झोडा कूटनीती भाजप वापरते. त्यामुळे ज्यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी लढा दिला, संघर्ष केला अशा इतर पक्षातील नेत्यांच्या उमेदवारांच्या पालख्या निष्ठावान मूळ भाजपा कार्यकर्त्यांना वाहाव्या लागत आहे. ‘काँग्रेसमुक्त’ करता करता भाजपा ‘काँग्रेसयुक्त’ झाली आहे.
त्यात असली भाजपा कुठे आहे? भाजपाने १८ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशात अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांना तिकीट दिले आहेत. देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी ७० जागांवर भाजपाने उमेदवारी जाहीर केली असून त्यापैकी २१ जागांवर निवडणुकीपूर्वी भाजपाचा झेंडा हाती घेतलेल्यांना उमेदवारी दिली आहे. तामिळनाडू ११, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये प्रत्येकी ८, महाराष्ट्रातून ७, पांडिचेरी १, तेलंगणा १२, मध्य प्रदेश ६ अशी आयात उमेदवारांची संख्या आहे. नुकतेच उत्तर प्रदेशातील भदोई जागेसाठी निषाद पक्षाचे आमदार विनोदकुमार बिंद यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्याआधी ‘रामायण’ मालिकेतील कलाकार अरुण गोविल यांना मेरठमधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले महाराष्ट्रातील काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांना त्यांच्या गावी जौनपूरमधून तिकीट दिले आहे. बसपाचे खासदार राघव लखनपाल (सहरानपूर), माजी हवाईदल प्रमुख आर. के. एस. भदोरिया (गाझियाबाद), बसपाचे रितेश पांडे (आंबेडकरनगर), काँग्रेसच्या गीता कोडा (चाईबासा) यांना भाजपाने आपले उमेदवार बनवले आहेत. पंजाबमध्ये आपचे खासदार सुशीलकुमार रिंकू हे जालंधरचे भाजपाचे उमेदवार आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते बियांत सिंह यांचे चिरंजीव रवनीतसिंग बिट्टा यांनी काँग्रेसचा हाथ सोडून कमळ हाती घेतले. ते भाजपाचे लुधियानाचे उमेदवार आहेत. अमेरिकेतील माजी राजदूत तरनजीत सिंग संधू अमृतसरमधून भाजपाचे उमेदवार आहेत. पंजाबच्या पटियालामधून पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या पत्नी काँग्रेसच्या खासदार प्रणित कौर यांना भाजपाची उमेदवारी दिली आहे.
इतर पक्षातील आयात उमेदवारांपैकी काँग्रेस ४०, बसपा ८, तृणमूल ७, बिजू जनता दल ६, एनसीपी ६, समाजवादी पक्ष ६, अण्णा द्रमुक ४, भारत राष्ट्र समिती ९, आप २ इतर छोटेमोठे प्रादेशिक पक्ष ३२ अशी साधारणत: आकडेवारी आहे. याचाच अर्थ असा की भाजपाच्या प्रत्येकी ४पैकी १ उमेदवार हा आयात आहे, नकली भाजपावाला आहे. वायएसआर काँग्रेसचे माजी खासदार वाराप्रसाद राव यांना तिरुपतीमधून भाजपाने तिकीट दिले आहे.
पश्चिम बंगालमधून पोलीस अधिकारी राहिलेले देबाशिष धार यांना भाजपात घेऊन (बिरभूम) लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांना तमलुकमधून उमेदवारी मिळाली आहे. संदेशखाली येथील अत्याचारी महिलांपैकी पीडित रेखा पात्रा यांना बसिरहाटमधून भाजपाने उमेदवारी दिली आहे. नारीशक्तीचे जिवंत उदाहरण म्हणजे रेखा पात्रा आहे असे म्हणत तिच्या उमेदवारीचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर कौतुक केले. ओडिशामधून बीजेडीचे खासदार राहिलेले भाराशुबरी मेहताब हे भाजपामधून लढत आहेत. बीजेडीचे माजी खासदार जय पांडा केंद्रपाडाचे उमेदवार आहेत. उद्योगपती नवीन जिंदाल (कुरुक्षेत्र-हरियाणा), अभिनेत्री कंगना राणावत (मंडी-हिमाचल प्रदेश) तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची सून सीता सोरेन डुमका-झारखंडमधून भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवित आहेत.
२०१४ सालापासून महाराष्ट्रातही भाजपाने आयात केलेल्या इतर पक्षातील आयारामांना तिकीट दिले आहे.
डॉ. हिना गावित (नंदूरबार), डॉ. भारती पवार (दिंडोरी) या राष्ट्रवादीतून आल्या आहेत. कपिल पाटील (भिवंडी) हे राष्ट्रवादीत होते तर मूळचे राष्ट्रवादीचे उदयन राजे भोसले यांना सातारातून उभे केले आहे. डॉ. सुभाष भामरे (धुळे), प्रतापराव चिरवलीकर (नांदेड) हे आधी शिवसेनेचे होते. डॉ. सुजय विखे पाटील (नगर), नारायण राणे (सिंधुदूर्ग), संजयकाका पाटील (सांगली), रणजीतसिंह नाईक निंबाळकर (माढा) हे मूळचे काँग्रेसचे होते. अमरावतीच्या नवनीत राणा या राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष म्हणून २०१९ साली निवडून आल्या होत्या. त्या आता भाजपच्या उमेदवार आहेत. कर्नाटकातील म्हैसूर राजघराण्याचे युवराज यदुवीर यांना म्हैसूरमधून भाजपने उमेदवारी दिली आहे. केरळचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अॅन्थनी यांचे पुत्र अनिल अॅन्थनी हे भाजपमधून दक्षिण केरळातील पठनमथीत्ता हे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. बॉक्सर विजेंदर हे कट्टर भाजपविरोधी होते. २०१९ साली दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसतर्पेâ निवडणूक लढवली होती. दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत भाजपवर टोकाची टीका केली होती. तेव्हा भाजप नेत्यांनी विजेंदरवर नकली बॉक्सर व खलिस्तानी समर्थक असे आरोप केले होते. पण त्याच भाजपने आता विजेंदरला हरियाणामधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
ही सर्व मंडळी एकेकाळी भाजपाच्या भूमिकेला कडाडून विरोध करीत होती. तरी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा आकडा पार करण्यासाठी इतर पक्षांतील आयारामांना तिकीट दिले आहे. त्यासाठी २०१९ साली निवडून आलेल्या ३०३ भाजपा खासदारांपैकी १०१ विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे. तर २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत २८२ खासदारांपैकी ११९ खासदारांचे तिकीट भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने कापले होते.
सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी ‘निवडून येणे’ हा एकमेव निकष ठेवून भाजपाने या आयारामांना उमेदवारी दिली आहे. इतर पक्षातील भ्रष्टाचाराचा आरोप असलेले, आर्थिक गुन्ह्याचे आरोपी असलेल्यांना भाजपात घेऊन पावन केले जात आहे. त्यासाठी भाजपाचे शिस्तप्रिय कार्यकर्ते, संघसेवकांना या भ्रष्ट उमेदवारांसाठी पायघड्या घालाव्या लागत आहेत. नाईलाजाने ते करीत आहेत. भाजपाचे किरीट सोमय्यानेही त्याची कबुली दिली आहे. ‘सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी दयनीय परिस्थिती मूळ भाजपावासियांची झाली आहे. नकली चायनीज माल बाजारात चालवला जातोय तर देशी मालाला बाजूला फेकले जात आहे.
नरेंद्र मोदींची हवा आहे. या भ्रमात कार्यकर्त्यांनी राहू नये असे अमरावतीत आयात केलेल्या नवनीत राणा यांनी वक्तव्य करून मोदींच्या ४०० पारच्या घोषणेच्या फुग्यातील हवाच काढून घेतली आहे.
असे नारे याआधीही फुसके ठरले आहेत. २०१७च्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचा नारा होता १५० पार पण प्रत्यक्षात मिळाल्या ९९ जागा. २०१९ साली हरियाणात नारा होता ७५ पार पण मिळाल्या फक्त ४० जागा. २०१९च्या झारखंड निवडणुकीत नारा दिला होता ६५ पार पण मिळाल्या ३५ जागा. २०२०च्या दिल्लीच्या निवडणुकीत ४५ पारचा नारा दिला होता. पण भाजपाला मिळाल्या फक्त ८ जागा. २०२१च्या तामिळनाडू निवडणुकीत ११८ पारचा नारा दिला होता फक्त मिळाल्या ४ जागा. २०२१च्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत २०० पारचा नारा दिला होता, पण मिळाल्या ७७ जागा. तर २०२२च्या निवडणुकीत हिमाचल प्रदेशमध्ये ७५चा नारा दिला होता पण भाजपाला मिळाल्या अवघ्या २५ जागा. भाजपाला अशी जुमलाबाजी करायची सवय २०१४ सालापासून लागली आहे. जनतेला आकड्यांच्या भुलभुलैयांत अडकवायचे हे धोरण भाजपाचे आहे. त्यासाठी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया व सोशल मिडियाचा ते खुबीने वापर करतात. पण आता हा भाजपाचा नकली चेहरा लोकांनी ओळखला आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना आहे असे वक्तव्य मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारदरम्यान केले. ‘स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे पहायचे वाकून’ या भाजपाच्या सवयीमुळे त्यांना आपण आयात केलेले १२० उमेदवार दिसत नाहीत. २०१४ साली शतप्रतिशतचा नारा देणार्या भाजपाची हालत २०२४ साली अशी नकली भाजपावाले झाली आहे. यात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, पंजाब केसरी यज्ञदत्त शर्मा, कुशाभाऊ ठाकरे, नानाजी देशमुख, सुषमा स्वराज, उमा भारती, रामभाऊ म्हाळगी अशा त्यागी उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या भाजपा नेत्यांची असली भाजप कुठे आहे? याचा विचार जनतेने करायचा आहे.