रामायण आणि महाभारत या हिंदूंच्या पवित्र दोन ग्रंथात अनेक साम्यस्थळे आहेत. दोन्ही ग्रंथातून भावाभावांमधल्या नात्यांच्या विविध पैलूंवर विस्तृत भाष्य आहे. देशाच्या आजच्या आधुनिक घटनेत बंधुता हे जे तत्व आले आहे ते देशातील अनेक धर्मग्रंथांतून अधोरेखित केलेले आहे. रामायणात वडिलांच्या वचनाची पूर्तता म्हणून राज्यावरचा हक्क सोडणारा राम नैतिकतेचे सर्वोच्च उदाहरण आहेच; पण हाती आपसूकच राज्य आल्यावर देखील ते नाकारणारा व नंतर निव्वळ भावाचा आदेश म्हणून त्याच भावाच्या पादुका सिंहासनावर ठेवून चौदा वर्षे वैराग्यभावनेने राज्यकारभार करणारा भरत हा रामाइतकाच श्रेष्ठ आहे. रामावर तर वचनपूर्तीचं बंधन होतं, पण भरताने मात्र स्वतःहून नैतिकतेचा मार्ग स्वीकारला होता. आजच्या तारखेत किती राजकारण्यांना भरत व त्याची ती वैराग्यभावनेतून राज्य चालवण्याची नैतिकता श्रेष्ठ वाटेल? प्रभू श्रीराम परत आल्यावर चौदा वर्षानंतर क्षणात सत्ता सोडणारा भारतासारखा बंधू होता म्हणून तर रामराज्य आले. असा त्याग, असा भरत हल्ली विसरला जातो आणि सत्तेला रामराम घातला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नुकतेच भरताला न भेटता फक्त श्रीरामाचे दर्शन घेतले, त्याचे आश्चर्य वाटत नाही ते यामुळेच (अर्थात ज्यांनी शांतशीतल, संयमी प्रभू रामचंद्राला ऊग्र करून ठेवलं आहे, ‘जय सियाराम’ या मूळ अनौपचारिक सादेमधला गोडवा घालवून तिचं रूपांतर ‘जय श्रीराम’ या युद्धघोषात केलं आहे, ज्यांनी सीतामाईपासूनही श्रीरामांना वेगळं केलं आहे, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करणार म्हणा).
पंतप्रधानांनी १७ जानेवारीला केरळमधल्या त्रिपरयार येथील श्रीराम मंदिराला भेट दिली, पण तिथून जवळच असलेल्या भरत राजाच्या मंदिराला मात्र त्यांनी भेट दिलेली नाही. त्रिपरयारच्या राम मंदिराला भेट दिल्यानंतर लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न यांच्या मंदिरास देखील भेट देण्याचा संकेत आहे. तशी प्रथा परंपरा असताना देखील पंतप्रधानांनी ती भेट दिली नाही. कदाचित आचारसंहिता लागण्याआधी देशभर बरेच देवदर्शन उरकायचे असल्याने इतर तीन मंदिरे त्यांनी भेटीतून वगळली असावीत. पण या निमित्ताने रामायणातील प्रभू श्रीरामांइतकेच त्यातील बंधुता या तत्त्वाला महत्व देणारी एक यात्रा, जी केरळमध्ये होती आहे, तिची माहिती अयोध्या पर्यटनाची घाई झालेल्या अंधभक्ताना द्यावी लागेल.
नालांम्बलम ही केरळमधल्या चार मंदिरांची एक यात्रा आहे. नालू म्हणजे चार आणि एम्बलम म्हणजे मंदिर. या संधीतून नालांम्बलम हा शब्दप्रयोग आला आहे. दशरथ राजाच्या चार पुत्रांची म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत व शत्रूघ्न यांची वेगवेगळी मंदिरे केरळमध्ये आहेत व त्यांची जी एकत्र यात्रा केली जाते त्यालाच नालांम्बलम म्हणतात . रामाइतकेच महत्व त्याच्या इतर भावंडाना देणारी मंदिरे व त्यांची एकत्र यात्रा कदाचित फक्त संपूर्ण भारतामध्ये केरळ राज्यातच असेल. त्रिपरयारचे रामाचे मंदिर, कूडलमानिक्यम येथील भरताचे मंदिर, तिरूमुळिकुलम येथील लक्ष्मणाचे मंदिर आणि पायम्मल येथील शत्रुघ्नाचे मंदिर अशी ही चार मंदिरे तशी एकमेकांपासून फार लांब नसल्याने शक्यतो ही यात्रा एका दिवसात पूर्ण करावी, असे संकेत आहेत. पंतप्रधानानी त्रिशूरजवळील त्रिपरयारच्या रामाच्या मंदिराला भेट देताना भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न यांच्या मंदिरांना भेट दिली नाही आणि त्यामुळेच बंधुभावाचे प्रतीक असणारी परिक्रमा त्यांच्याकडून राहून गेली.
अर्थात बाकीच्या राज्यांमध्ये, खासकरून भाजपशासित किंवा मिंधेशासित राज्यांमध्ये पंतप्रधान आल्यावर आणि गेल्यावर जे वातावरण तयार केले जाते, त्याचा मागमूस देखील केरळमध्ये दिसत नाही. इथल्या जनतेला धर्माच्या नावावर चाललेल्या भडकपणाचा कावा समजतो. इथे सर्व धर्म, सर्व प्रकारचा आहार, सर्व सण एकत्र नांदत आहेत. देशातील सर्वात जुनी मशीद, सर्वात जुने चर्च आणि प्रभू श्रीरामाबरोबरच इतर भावंडांची देखील मंदिरे असणारे केरळ हे राज्य मोदीभक्तांना सतत खुपणार्या सर्वधर्मसमभावाचे व बंधुभावाचे उदाहरण आहे. इथे शबरीमलासारखे भावनिक मुद्दे उगाळून देखील दहा वर्षांत मोदी-शहांना एक नगरसेवक निवडून आणताना दमछाक होते आहे. जय श्रीराम म्हणा आणि मताचे बटन दाबा हे सहज चालून जायला केरळ म्हणजे गायपट्टा नाही. म्हणून तर गायपट्ट्यातील परंपरागत सुरक्षित मतदारसंघ असलेल्या अमेठीत राहुल गांधीचा पराभव झाला, तेव्हा याच केरळमधील वायनाडच्या जनतेने त्यांना लोकसभेत पाठवले आणि देशातील धर्मांध ताकदीला विरोध करणारा आवाज व पक्ष जिवंत ठेवला. राहुल गांधींनी देखील सातत्याने आवाज उठवत केरळमधील जनतेचा विश्वास सार्थ ठरवला. आजचे राहुल गांधी अंतर्बाह्य बदलले आहेत, त्याला एक कारण त्यांचे उत्तरायणातून दक्षिणायन होण्यात आहे. भाजपासोबत लढायचे तर मतदार जागरूक केला पाहिजे आणि तो भावनेच्या आहारी जातो, आर्थिक अमिषाला बळी पडतो, तेथून त्याला त्याच्या जगण्यामरण्याच्या खर्या मुद्द्यांवर आणि खर्या विकासात्मक दृष्टिकोनाकडे वळवले पाहिजे, हे आज देशातील तमाम भाजपेतर पक्षांना जाणवू लागले आहे. काँग्रेसने आधी भारत जोडो यात्रा काढली आणि आत्ता जी भारत न्याय यात्रा काढली, त्यात मतदारांपर्यंत थेट पोहोचून मुद्द्यावर राजकारण वळवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यात भावनेच्या मुद्द्यांचा झगमगाट वा आक्रमकता नाही, तरी ते प्रयत्न देशहित जपणारे आहेत, हे जनतेला आज ना उद्या उमगणार आहे. इतरत्र चाललेली दिवाळी क्षणिक आहे आणि स्वतःची दिवाळखोरी हेच वास्तव आहे, त्याचे भान येण्यापूर्वीच निवडणुक उरकली जाईल, म्हणून जनतेने वेळीच भानावर यायला हवे.
राहुल गांधीनी १४ जानेवारीला मणिपूरहून देशातील जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी भारत न्याय यात्रेची सुरूवात केली. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा असेच याचे वर्णन करावे लागेल. ६२०० किलोमीटरचे अंतर असणार्या आणि १४ राज्यांतून जाणार्या भारत जोडो न्याय यात्रेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंफाळ येथे हिरवा झेंडा दाखवला. महाराष्ट्रासह १४ राज्यांतील ८५ जिल्ह्यांतून व साधारण ३५५ लोकसभा मतदारसंघांतून जाणारी ही यात्रा देशातील जनतेला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी आहे. या यात्रेची सांगता मुंबई शहरात होणार आहे. ब्रिटिशांना चले जाव सांगण्यासाठी मुंबई शहरात देशातील नेते एकत्र आले होते तसेच इंडिया आघाडीतील नेते भाजपाला घरी पाठवण्यासाठी २० मार्च २०२४ रोजी मुंबईत एकत्र येतील. पहिल्या आठवड्यातच पूर्वोत्तर राज्यांतून गेलेल्या या यात्रेमुळे भाजपाला सहा लोकसभा जागांवर नुकसान होईल आणि काँग्रेस तेथील २५पैकी किमान १० जागा जिंकेल असा प्राथमिक अंदाज आहे.
आता एकीकडे अपूर्ण राम मंदिराचे उद्घाटन करून भाजपा भावनेच्या राजकारणाची हमखास यशस्वी होणारी खेळी खेळत आहे, तर त्याचवेळेस काँग्रेस पक्ष जमिनीवर उतरून सामाजिक न्याय मिळवून देऊ, असे सांगत जगण्याच्या प्रश्नाशी संबंधित मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. एकीकडे पंतप्रधान मोदींच्या एका डुबकीला देखील आठवडाभर चर्चेत ठेवू शकेल, अशी प्रचारयंत्रणा आणि विकली गेलेली माध्यमयंत्रणा भाजपाकडे आहे, तर शेकडो किलोमीटर चालून देखील बातमीचा एक कोपरा देखील नशीबात नसलेले राहुल गांधी आहेत. देशाच्या पंतप्रधानांचे व्यक्तिगत स्नान हे देशभर दाखवणारे प्रगल्भ व ते भक्तिभावाने पाहणारे त्याहून प्रगल्भ. फसवी आकडेवारी मोठ्या प्रमाणात पसरवून धूळफेक करणारी यंत्रणा इतक्या प्रभावीपणे राबवली जाते की खर्या आकडेवारीतून उमटणारं भेसूर सत्य कोणाकडेच पोहोचत नाही; चुकून पोहोचलंच तरी त्याच्या गुंगलेल्या मेंदूला त्याचं गांभीर्य उमगत नाही.
एकीकडे सबंध देशाला धर्माची अफू पाजून अच्छे दिन आपोआप येणार आहेत, किंबहुना (तुम्हाला दिसत नसले तरी) ते आलेच आहेत, या दिवास्वप्नात मश्गुल ठेवण्याचं काम भाजप करत असताना इंडिया आघाडीने मुलांचे शिक्षण, बेरोजगारी, महागाई यावर बोलून लोकसभा जिंकण्याचा प्रयत्न करणे आजच्या क्षणाला राजकीय शहाणपणाचे नाही, पण देशहिताचे मात्र नक्कीच आहे. गेली ४० वर्षे एका मंदिराभोवती देशाचे राजकारण फिरते ठेवत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्तेच्या लोण्याचे ढीग उपसले आहेत. जोपर्यंत यातून सत्तेचे लोणी निघते आहे, तोपर्यंत ही धार्मिक घुसळण सुरूच राहील. आज प्राणप्रतिष्ठापना झाली तरी कळस चढवायचा सोहळा होणारच, कारण जनतेला त्यातच गुंगवून ठेवणे राजकीय फायद्याचे आहे. अयोध्या सिर्फ झांकी है, काशी मथुरा बाकी है या घोषणेतले इतर ठिकाणचे वाद ‘बाकी’ ठेवण्यामागे राजकारणातलं एकमेव मुद्दल एकत्र खर्च न करण्याचा व्यावहारिक, राजकीय शहाणपणा आहे. नाहीतर हे सगळेच विवाद एकगठ्ठा निकालात काढता आले असते. पण मग भावनिक मतदानाच्या उकळ्या कशा काढता आल्या असत्या?
भाजपासमोर इंडिया आघाडीचा पर्याय आव्हान म्हणून उभा ठाकलेला आहे. तो ठळकपणे दिसण्यासाठी मुळात मतदारांनीच देवभोळेपणाने मिटलेले डोळे उघडायला हवेत. इंडिया आघाडीत आज कोणा एकाची मक्तेदारी नाही, तर तिथे सामूहिक नेतृत्वाची संकल्पना मान्य केलेली आहे. या खंडप्राय देशाचे भले कोणी एक अवतारी पुरूष अवतरून करेल, असल्या भाकड कल्पनांना भाजपने हवा देणे समजू शकते; पण, देशातली संघराज्यात्मक व्यवस्था आणि वैविध्यातली एकात्मता टिकायची असेल, तर सामूहिक नेतृत्वाला आता पर्याय नाही. इंडिया आघाडीने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना म्हणजेच पन्नासहून अधिक वर्षे निवडून येणार्या एका अनुभवी प्रशासकाला नेतृत्त्वाचा सन्मानही दिलेला आहे. हैद्राबाद दंगलीत १९४८ साली खर्गेंचे घर जाळले गेले, त्यावेळी ते अवघ्या सात वर्षाचे होते. त्यांच्या डोळ्यादेखत आई जळाली. आई दंगलीत गमावलेल्या एका सात वर्ष वयाच्या अनाथ दलित मुलाच्या मनात किती राग असायला हवा. पण खर्गेंना त्यावर नियंत्रण मिळवता आले. स्वतःचे दुःख विसरून ते देशसेवेत रमले. खर्गेंकडे बेधडक चालवलेली खोटी डिग्री नाही तर कष्टाने कमावलेली एका दलिताची कायद्याची पदवी आहे. आवाज चढ उतार करून केलेले पोकळ शब्दाचे भाषण नाही तर मोजकेच साधे सच्चे शब्द दिसतील. आज देशातील धर्मांध ताकदीसमोर हा नेता शड्डू ठोकून मजबूतपणे उभा आहे.
म्हणूनच दहा वर्षे सत्तेत राहून स्वतःच्या कर्तबगारीवर नव्हे, तर रामलल्लाच्या नावावर निवडणुकीत मते मागणार्या मोदींसमोर कोण असा प्रश्न त्यांचे भक्त विचारतात, तेव्हा त्यांची कीव येते. दहा वर्ष वाया घालवणारे मोदी लोकांना नको आहेत हे भाजपाला उमगल्यावर जणू आता मोदी गेल्यावर देश रसातळात जाईल अशी आवई उठवली जाते. पण या देशाचे अस्तित्व कोणा एका व्यक्तीच्या असण्या नसण्यावर अवलंबून नाही. उद्या मोदी हरले तर देशाकडे तारणहार नाही म्हणून भाजपा काय स्वत:चे विसर्जन करणार आहे की काय? ये पब्लिक है, ये सब जानती है…