• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

स्वत:ला नव्याने तपासून पाहणा-या चारचौघी

- नितीन फणसे (रंगतरंग)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 22, 2022
in रंगतरंग
0
स्वत:ला नव्याने तपासून पाहणा-या चारचौघी

तब्बल ३१ वर्षांनी ‘चारचौघी’ हे नाटक नव्या संचात पुन्हा रंगभूमीवर आले आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनीच आताही ते दिग्दर्शित केले असून नाटकाचा काळ त्यांनी जाणीवपूर्वक तोच ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर कुलकर्णी यांच्याशी केलेली
मनमोकळी बातचीत…

नव्वदच्या दशकात नाटक म्हणूनच नाही, तर आशय म्हणूनही ‘चारचौघी’ या नाटकाने मोठे यश मिळवले होते. १९९१ साली हे नाटक आल्यावर दशकभर दर्जेदार नाटकांची रीघच लागली. म्हणजेच ‘चारचौघी’ हे नाटक यासाठी नांदीच ठरलं. नव्वदच्या दशकाच्या पहिल्याच वर्षात हे नाटक आलं तेव्हा त्याचे असंख्य प्रयोग झाले. समीक्षक व प्रेक्षकांनाही ते खूप आवडलं. चळवळींनी त्याला जोडून घेतलं होतं. तेव्हा तर असंही म्हटलं गेलं की हे नाटक काळाच्या पुढचं नाटक आहे. बंडखोर नाटक आहे. समाजव्यवस्था असेल, विवाहसंस्था असेल, नातेसंबंध असतील या पद्धतीने या नाटकाकडे पाहिलं गेलं. चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केलेलं तेच नाटक आता तब्बल ३१ वर्षांनी नव्या संचात आलंय. आताही त्याचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णीच यांनीच केले आहे. जुन्या प्रेक्षकांना हे नाटक नव्या संचात बघण्याची उत्सुकता आहे, तर नव्या प्रेक्षकांना हे नाटक तेव्हा इतके का गाजले हे जाणून घ्यायची इच्छा आहे. पण आता इतक्या वर्षांनी आजच्या काळात स्त्रीमुक्ती वगैरे कितपत योग्य ठरेल हा प्रश्न येतोच. यासोबतच आणखीही काही प्रश्न घेऊन खुद्द दिग्दर्शक कुलकर्णी यांच्याशी बोललो तेव्हा त्यांची उत्तरं मिळाली.
आजच्या काळाला हे नाटक लागू होतं का, असं विचारता चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, काळ बदलला आहे हे नक्की. तेव्हाचे प्रश्न आज असतीलच असं नाहीच. पण आम्हीही हे नाटक नव्या संचात आणताना म्हटलंच आहे की आम्ही हे नाटक काळाच्या कसोटीवर तपासून बघण्यासाठी आणि नवीन पिढीला पाहायला मिळावे यासाठीच पुन्हा घेऊन येत आहोत. एक चांगलं नाटक, समृद्ध करणारं नाटक पुन्हापुन्हा करून बघावंसं वाटतंच. त्याच पद्धतीने आम्ही ते पुन्हा करून बघतो आहोत. नाटकात जेव्हा सामाजिक आशय असतो तेव्हा ते पुन्हा करताना काळाच्या कसोटीवर घासून बघावंच लागतं. नाटककार फक्त कथानक लिहीत नाही, तर तो त्याच्या काळातल्या काही चांगल्या वाईट घटनांवरही भाष्य करत असतो असं माझं मत आहे. तो रोज नाटक लिहीत नाही. म्हणूनच त्याचं नाटक आसपासच्या पाचदहा वर्षांना घेऊनच साकारतं. म्हणूनच ‘चारचौघी’ हे नाटक तेव्हाचा काळ दाखवतं. काळ दाखवणारं नाटक म्हणून काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ते अभ्यासासाठीही ठेवण्यात आलं होतं. आपणच आपल्याला माहे वळून बघण्यासारखं हे नाटक आहे, असं मला तरी वाटतं.
नाटक जुनं असेल तर नव्याने आणि नव्या संचात बसवताना त्यात काही बदल केले जातात. ते करावेच लागतात. कधी काळ बदलला म्हणून विषय बदलले म्हणून, तर काहीवेळा रूपयांचे संदर्भ बदलावे लागतात. कुलकर्णी यांनाही ‘चारचौघी’ पुन्हा सादर करताना असे बदल करावे लागले असतीलच हे सरळ आहे. पण यावर ते म्हणाले, आम्ही मुद्दामच बदल केले नाहीयेत. हे नाटक जसे आहे तसे, तोच काळ दाखवत आम्ही आणले आहे. आम्हाला बदल करण्याची गरजही वाटली नाही. काळ वेगाने पुढे सरकतोय पण तो तंत्रज्ञानाच्या स्वरुपात. राजकीय घडामोडींच्या संदर्भात. समाजमनाचा प्रवास नेहमी सावकाशच होत असतो.
नव्या संचातल्या नाटकात रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, श्रेयस राजे, निनाद लिमये, पार्थ केतकर यांच्या भूमिका आहेत. आधीच्या नाटकात दीपा लागू, वंदना गुप्ते, आसावरी जोशी आणि प्रतीक्षा लोणकर होत्या. दीपाजींनी केलेली आईची भन्नाट भूमिका आता रोहिणी हट्टंगडी करणार आहेत. दीपाजी आणि रोहिणीजी या दोघीही अफलातून अभिनेत्री आहेत यात वादच नाही, पण या नाटकाच्या निमित्ताने त्यांच्यात तुलना होऊ शकते. मात्र चंद्रकांत कुलकर्णी यांना दोघींमध्ये काहीच फरक जाणवत नाही. रोहिणीताईंसोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत ते म्हणाले, रोहिणीताईंसोबत मी यापूर्वीही आनंद नाडकर्णींचं ‘आम्ही जगतो बेफाम’ नावाचं नाटक केलं होतं. त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नानाजलेल्या अभिनेत्री आहेत. मग तो ‘गांधी’ सिनेमा असो की ‘सारांश’ हा बॉलीवूडपट असो. आविष्कार नाट्यसंस्था, एनएसडीचं प्रशिक्षण… यामुळे त्या खूप डिसीप्लीन्ड अभिनेत्री आहेत. ‘बेफाम’नंतर त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्याचा योग आला नव्हता. पण या नाटकाचा विचार करत होतो तेव्हा वाटलं की मला हवी ती कणखर आई ती हीच… ही एक वेगळी आई आहे. हे संवाद तिचेच आहेत असं वाटावं अशाच त्या आहेत. तिचा ठामपणा, तिचा निर्धार, तिचा कॉन्फिडन्स, समाजाच्या विरुद्ध जाऊन पूर्वी काहीतरी केले आहे आणि तिच्या या तीन मुली आहेत. या सगळ्यासाठी मला त्याच योग्य वाटल्या. मुक्ता तर उत्तम अभिनेत्री आहेच हे कुणीही सांगेल. तिच्या वयानुसार ताकदीचा कंटेंट हाच आहे. कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद, श्रेयस, पार्थ केतकर हेही आपापल्या जागी योग्यच आहेत. तरुण कलाकार टीव्हीत रमले आहेत. रोहिणी वगैरे आम्ही टीव्हीवर जाऊन परत नाटकाकडे वळतोच, पण तरुण पिढीला रंगमंचाकडे आणण्याचा माझा हा प्रयत्न आहे. त्यांना याचा फायदाच होईल. त्यांच्यासोबत रिहर्सल करताना मजा आली. मीही ३१ वर्षांनी हे नाटक पुन्हा करतोय म्हणजे मीही वयाने वाढलोय, आकलनाने वाढलोय. या नाटकाकडे वेगळ्या नजरेने बघतोय.
नवे कलाकार म्हटलं म्हणजे नाटक बसवताना कुलकर्णींना अडचणी आल्याच असतील. त्या सगळ्यांच्या वेळा सांभाळणं, त्यांच्याकडून हवा तो कंटेंट काढून घेणं हे जिकिरीचं नक्कीच आहे. यावर ते म्हणतात, फारशा अडचणी आल्या नाहीत. नाटक मी स्वतंत्र आहे असं समजूनच ते बसवलं. नाटक कोणत्या काळातलं आहे हे मी फारसं मनावर घेत नाही. मी ‘हॅम्लेट’ही केलं. ‘वाडा चिरेबंदी’ही केलं. मी अगदी नवीन लेखकाचं नाटकही करतो. प्रत्येकवेळी मला ते नाटक नवीनच आहे. कलाकारांकडून काम करवून घेणं हे तर दिग्दर्शकाचं कामच आहे. फक्त अनुभवी कलावंतांसोबतच काम करणं नाही, तर नवीन, तरुण कलाकारांची फळी तयार करणं हेदेखील दिग्दर्शकाचं काम आहेच. आधीच्या माझ्या ‘वाडा चिरेबंदी’मध्ये प्रशांत सुभेदार, दीपा लागू, दिलीप कुलकर्णी, वंदना गुप्ते, मीनल परांजपे वगैरे होते, तर नव्या ‘वाडा चिरेबंदी’मध्ये मी निवेदता जोशी, वैभव मांगले, प्रतिमा जोशी, नेहा जोशी यांच्यासोबत काम केलं. ‘चारचौघी’ नाटकही पुन्हा करताना अडचणी आल्या नाहीत, कारण हे नाटक वेगळं आहे. कंटेंट खूप छान आहे. त्याची भाषा फ्ल्युएंट आहे. हे चर्चेचं नाटक आहे.
आजच्या काळातले विषय नाहीत म्हणून जुने नाटक पुन्हा आणले, असं कुणी म्हणू शकेल, पण कुलकर्णी यांनी हा मुद्दा खोडूनच काढला. ते म्हणाले, आता विषय नाहीत म्हणून हे नाटक केलेलं नाही. नाटकाचं त्या काळातलं समकालीन मूल्य आणि त्याचा सार्वकालिक आशय आताच्या काळात तपासून पाहण्यासाठी अशी नाटकं केली पाहिजेत. काही नाटके, त्या त्या टप्प्यावरची नाटकं तर करून बघितलीच पाहिजेत. तपासली गेली पाहिजेत. नवीन विषयावरचं नाटक म्हणाल तर तेही करतोच आहे… याच नाटकाच्या लेखकाने लिहिलेलं ‘संज्या छाया’ हे आत्ताचं नाटक आहे. हे मी याच जानेवारी महिन्यात आणलंय. ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ हे नाटक स्वरा मोकाशी या एका मुलीने लिहिलेलं नाटकही मी आणलंय. दिग्दर्शकाने सर्व प्रकारची नाटकं केली पाहिजेत हे माझं स्पष्ट मत आहे. दिग्दर्शक म्हणून हे नाटक आणायची माझी इच्छा होती. लेखक प्रशांत दळवी आणि निर्माते श्रीपाद पद्माकर यांच्याशी याबाबत मी बोललो. त्यांनीही करूया म्हणून लगेच ते उचलून घेतलं, असंही त्यांनी सांगितलं.
जिगिषा निर्मित ‘चारचौघी’ हे नाटक तीन अंकी असून दहा मिनिटांची दोन मध्यांतरं ठेवण्यात येणार आहेत. हे नाटक प्रशांत दळवी यांनी लिहिलेले असून नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. संगीत अशोक पत्की यांचे असून गीते दासू यांनी लिहिली आहेत. वेशभूषा प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांची आहे. रवी-रसिक यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. या नाटकासाठी उलेश खंदारे यांनी रंगभूषा; तर प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव यांनी वेशभूषा सांभाळली आहे.

Previous Post

वर्गसंघर्षाचे धारदार उपरोधिक दर्शन घडवणारा भाऊबळी

Next Post

नाटकातलं नाटक `प्रशांत’ स्टाईल!

Next Post

नाटकातलं नाटक `प्रशांत' स्टाईल!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.