या पावसाचं काही खरं नाही. कधी तो अजिबात पडत नाही. कधी असा पडतो की रस्ते, घरं बुडवतो. शेतात पडत नाही, शहरात रस्त्यावर पडतो. नीट नेम धरून हवा तिथे हवा तितका पाऊस पाडण्याचं विज्ञान विकसित व्हायला हवं, असं तुम्हाला वाटत नाही का?
– संध्या रेळे, बदलापूर
पाऊस हवा तिथंच पडतोय हो, आपण खालची सगळी अरेंजमेंट बदलून बसलोय.
पावसात कावळ्याचं शेणाचं घर वाहून गेलं आहे. चिऊताईचं घर मेणाचं आहे, शाबूत आहे. पण ती काही दार उघडायला तयार नाही. कावळ्याने आता काय करावे?
– सिद्धार्थ लोणकर, बीड
‘१००चा नेटपॅक तुझ्या पोरासाठी मारलाय गं’ म्हणून कावळ्याने ओरडावं. पोराचं सगळं करायचं सोडून चहा टाकेल ती.
‘मुत्तुकौडी कव्वाडी हाडा’ हे माझं आवडतं गाणं आहे… पण या गाण्याच्या या ओळींचा अर्थ मला आजतागायत कळला नाही… काय असेल या ओळींचा अर्थ?
– नितीन झाल्टे, करमाळा
अर्थ न कळताही आवडत होतं ना इतके दिवस? कशाला आता अर्थ समजून घेऊन, इतके दिवस निरर्थक गाणी गात बसल्याचा पश्चाताप करून घेताय?
लैंगिक दृश्यं, शिवीगाळ, प्रक्षोभक मांडणी, डोक्यावर पडलेली पात्रं आणि अतर्क्य वळणं यांच्याशिवाय वेबसिरीज बनू शकत नाही, अशी ओटीटीवाल्यांची समजूत झाली आहे का?
– सोनल आंबेगावकर, जुन्नर
‘लोकांना हेच आवडतं’ हा जो त्यांनी निष्कर्ष काढलेला असतो, तो मोठ्या संख्येने प्रेक्षक अशा कन्टेन्टला पाठ फिरवून जोपर्यंत बदलून दाखवत नाहीत, तोपर्यंत हा समज रूढ राहील.
मनोरंजन विश्व मोठ्या पडद्यावरून आता छोट्या पडद्यावर आणि तिथूनही मोबाइलवर येऊन पोहोचलं आहे. अशा काळात कोरोनासंकट टळल्यानंतर लोक प्रत्यक्ष नाट्यानुभव घेण्यासाठी थिएटरमध्ये येतील, असं वाटतं का?
– दिगंबर तजबीजे, सटाणा
तात्कालिक संकटांना पुरून उरणारी नाटक ही एकमेव कला आहे. इतिहास गवाह है, नाटकाला मरण नाही. भले जग इकडचं तिकडे होवो.
युरो कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी इटालियन प्रेक्षकांना मारहाण केली आणि आपल्या संघातल्या आशियाई आणि कृष्णवर्णीय खेळाडूंना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. आपण या देशांना प्रगत आणि सुसंस्कृत मानतो. सगळीकडे ही अशी वृत्ती सारखीच कशी?
– अनंत घोटिवडेकर, कणकवली
आपल्याला उगाच वाटत असतं बाहेरची माणसं ग्रेट असतात म्हणून. आपली तशी समजूतही करून दिली जाते आणि आपण भुलतोही. पण शेवटी जग गोल आहे हेच आपल्या निदर्शनास येतं.
एखादा माणूस थकला, प्रवास करून आला की त्याला तहान लागते, आपण त्याला पाणी पाजतो. मग युद्धात किंवा लढाईत ‘मी तुला पाणी पाजेन’ अशी गर्जना का केली जाते?
– अभिषेक क्षीरसागर, दत्तवाडी, पुणे
तुम्हीच दिलंय की उत्तर. माणूस एकवेळ अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो, पण पाण्याशिवाय नाही. ‘मी तुला इतका थकवेन की तुला शेवटी पाणी मागायला लागेल आणि तुझ्यावर उपकार म्हणून मी ते पाजेन देखिल’; अशा अर्थाने हा वाक्प्रचार रूढ आहे.
‘अरे भाई निकल के आ घर से, आ घर से, दुनिया की रौनक देख फिर से देख ले फिर से’ या किशोर कुमारच्या लोकप्रिय गाण्याला प्रतिसाद देऊन पुन्हा एकदा निर्धास्तपणे घराबाहेर पडण्याची संधी कधी मिळेल आपल्याला?
– साहेबराव थोपटे, जुन्नर
(कधीतरी) एकदा.
तुम्ही डावे की उजवे?
– स्वप्नील पाटसकर, सातारा
सर्वांप्रमाणेच जन्मजात माझे हृदय डाव्याच बाजूला आहे. पण माझा उजवा मेंदूही कार्यक्षम आहे. म्हणून ‘कर्तव्यात’ डावं उजवं न करता रोजच्या जगण्यात मला बॅलन्स साधता येतो. सगळ्या गोष्टी कोणत्याही एकाच दिशेला गेल्या की फक्त कोसळतातच अशी माझी अनुभवातून आलेली धारणा आहे.
आईचा घो, आईचा घो, येडा झाला का रे, या गाण्यातल्या काव्यगुणांचं विश्लेषण तुम्ही कसं करू शकाल?
– नाना शितोळे, अहमदनगर
ही लिपी देवनागरी असली आणि शब्द मराठीच असले तरी, ही भाषा वेगळी आहे. या भाषेत या गाण्याचा अर्थ आनंदपर्यवसानी आणि तो ही साधा नाही तर उत्कट आणि उत्फुल्लता व्यक्त करावासा वाटणारा, पण या व्यक्त होण्यामध्ये सवंग, खाजगीतले अश्लीलशब्द, जे खरेतर जास्त प्रिय आहेत, पण जाहीर उच्चारता येणार नाहीत म्हणून, ऐकणार्याला त्याचा निर्देश तर होईलपण प्रत्यक्षात टाळलेला आहे हे अधोरेखित होईल, आणि त्याचा आनंदही प्राप्त करून देता येईल, असा सभ्य भाषेत जाहीर व्यक्त केल्याचं समाधान देणारा हा आनंद; असा आहे.