आज महाराष्ट्रातील धरणे कोरडी ठणठणीत आहेत, त्यात पाऊस देखील लांबला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचे, दुष्काळाची गडद छाया असणारे अस्मानी संकट गोरगरीब, शेतकरी जनतेसमोर आ वासून उभे असताना त्यात भर म्हणून राज्यात एकमेकांसोबत बिल्कुल ताळमेळ नसलेल्या, निव्वळ सत्तालोभापुरते एकत्र आलेल्या दोन लाभार्थींच्या अत्यंत असंवेदनशील सरकारचे खंजीर खुपसून, बेकायदा पद्धतीने सत्तेत आलेल्या सुलतानी संकट डोक्यावर आहे… सरकारचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःचा मोरपिसारा फुलवून पेड मीडिया हिताशी धरून थुईथुई नाचणे सुरूच आहे. मोराच्या नाचात काय उघडे पडते, ते मोराला कुठे माहिती असते म्हणा!
स्वतःचा ढोल स्वतःच वाजवणे हे भाजपाचे कसब आत्मसात करून कोणत्यातरी टिनपाट सर्व्हेचा आधार घेत राज्यातील जनतेने मुख्यमंत्री शिंदेंना मोठी पसंती दिल्याची आवई उठवली गेली आणि प्रमुख वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरच्या त्या विनोदी जाहिराती पाहून राज्यातील जनता पोट धरधरून हसली. इतक्या कठीण काळात राज्यातल्या जनतेला ‘त्यांच्या दारी’ जाऊन असे निखळ मनोरंजन दिल्याबद्दल तरी त्यांचे आभार मानले पाहिजेत.
देशात भविष्यात देखील मोदी हेच पंतप्रधान व्हावेत आण राज्यात भविष्यात शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा म्हणे या राज्यातील जनतेने व्यक्त केली आहे. ऐकावे ते एकेक नवलच. हा मजेशीर सर्व्हे करण्यासाठी हे सर्व्हे कंपनीवाले ज्याच्याकडे गेले होते, ज्याच्याशी त्यांनी संपर्क साधला होता, असा माणूस दाखवा आणि एक लाख रुपये जिंका, अशी स्पर्धा जाहीर करण्यासारखी परिस्थिती आहे. ही काही कोटी रूपयांची जाहिरातबाजी मुख्यमंत्र्यांच्या कोणा अज्ञात हितचिंतकाने केली म्हणे. हे असे प्रेमापोटी कोट्यवधी रुपये उधळणारे हितचिंतक राज्यातील जनतेला लाभले असते तर काय बहार आली असती.
वर्तमानपत्रात पानभर जाहिरात करून अवास्तव दावे करण्याची भाजपची मक्तेदारी मोडून केलेल्या या जाहिरातीत शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वगळले, ज्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चोरलेला वारसा हे सांगतात, त्यांनाही वगळले, तिकडे नरेंद्र आणि इकडे एकनाथेंद्र, विषय कट! फडणवीस यांचे मोजकेच चाहते समाजमाध्यमांत आहेत आणि प्रस्थापित माध्यमांतले अनेक वर्षांचे स्लीपर सेल जागे झाले आहेत, त्यातले काही पंचमस्तंभी पत्रकार आहेत. त्या सगळ्यांनी दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र अशी यमकजुळवणी करून अनेक वर्षं जी वातावरणनिर्मिती केली होती, तिलाच शिंदेंनी सुरुंग लावला. स्वतःच्या दांडीला स्वतःचा तराजू अडकवून स्वतःच स्वतःचे रिकामे असलेले पोते तोलायचे आणि ते शंभर किलोचे भरले असा शिक्का स्वतःच मारायचा अशी ही बोगस जाहिरात होती. पण, तिने छातीवर घेतलेला दगड डोक्यावर आपटावा, तशी स्थिती केली भाजपची आणि उपमुख्यमंत्र्यांची. मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, असं म्हणत फक्त स्वत:च्या घरीच जाण्याची सोय राहिली हो. फडणवीस यांना खिजवण्याचा आणि आपल्यापेक्षा छोटे दाखवण्याचाच हा एकूण प्रकार होता. पण, त्यातून सत्तेसाठी लाचार झालेले उपमुख्यमंत्री रोज नवनवे अपमान सहन करत आहेत आणि त्यांच्या बळावर सत्तेत आलेला गद्दारांचा गट आपल्या उपकारकर्त्याचाच पाणउतारा करतो आहे, ज्याने सत्तेचा घास भरवला त्या हातालाच चावा घेतो आहे, असं वातावरण त्यातून तयार झालं. हा उघड अपमान झाल्यानंतर एरवी विरोधी पक्षांना टोमणे मारण्यात पटाईत असलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी शिंदे यांना त्यांची जागा दाखवून दिली नाही, तर बिचारे कानदुखीचा बहाणा करून कोल्हापूरचा सरकारी कार्यक्रम टाळून गुळमुळीत नाराजी दर्शवून गप्प बसले.
राज्यात कोणाचीही सत्ता असते तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात रस्सीखेच असतेच. सत्ताधार्यांना सत्ता राखायची असते, विरोधकांना सत्ताधारी कसे नालायक आहेत, हे दाखवून ती खेचून घ्यायची असते. तो लोकशाहीचा भाग आहे. त्यात भारतीय जनता पक्षाची २०१४ साली दिल्लीत सत्ता आल्यापासून या निरोगी स्पर्धेची जागा अत्यंतर रोगट, दुस्वासयुक्त, दर्पयुक्त आणि गलिच्छ अशा सत्तालालसेने घेतली आहे. राज्यातही आम्हालाच सत्ता द्या, नाहीतर आम्ही जे कोणी सत्तेत असतील त्यांना काम करू देणार नाही, असा गुंडा छाप दादागिरीचा प्रकार केंद्र सरकार आणि राज्यातले भाजप नेते मिळून चालवतात. त्याला तिथल्या राज्यपाल नावाच्या चावीच्या बाहुल्यांची जोड मिळते आणि कटकारस्थानं करून, ईडी-सीबीआयचा गैरवापर करून सत्ता हडप केली जाते. मिंध्यांना हाताशी धरून महाराष्ट्रात या तथाकथित महाशक्तीने हाच खेळ केला, पण एक वर्ष होतं ना होतं तोच यांनी उभी केलेली बुजगावणी यांच्यावरच दरडावण्या करू लागली. विरोधक राहिले बाजूला, आज सत्तेतल्या दोन गटांमध्ये एकमेकांतच लठ्ठालठ्ठी सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्याचे नगरसेवक ते मुख्यमंत्रीपद हा प्रवास ज्या प्रकारे आणि ज्या वेगाने झाला त्यावरूनच राजकीय धूर्तपणा त्यांच्यात आहे हे सिद्ध करायची गरज नाही. पण, ठाणे आणि त्यातला त्यांचा मतदारसंघ हेच त्यांचं कार्यक्षेत्र. तेवढीच त्यांची ओळख. शिवाय पिंड नगरसेवकाचाच. ते नुकतेच म्हणाले की, ‘मी रस्त्यावर फिरणारा मुख्य्ामंत्री आहे, जगामध्ये माझ्यासारखा मुख्यमंत्री पाहिलाय का? मुंबईत नालेसफाई झाली की नाही हे अगदी स्पॉटवर जाऊन मी पाहतो.’ मुख्यमंत्री अशा प्रकारे वेळ घालवायला लागले, तर राज्याचे प्रश्न कोण सोडवणार? राज्याचा विकासदर ९.१ टक्क्यांवरून ६.९ टक्क्यांवर येणार नाही तर काय? फडणवीस यांचे खास प्रवक्ते आणि भाजपाचे खासदार अनिल बोंडे म्हणूनच म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची राजकीय ताकद फक्त ठाण्यापुरती आहे. ती पाचपाखाडीपुरती आहे असे नाही म्हणाले हे नशीब.
या सगळ्या गलिच्छ राजकीय कुरघोड्यांमध्ये राज्यात काय सुरू आहे? तिकडे हिंदुत्वासाठी शिंदेसोबत गेलेले अब्दुल सत्तार यांच्या खात्याने खासगी रेडबाजी करत कृषी व्यापारी वर्गाला वेठीस धरले. केसरकर पालकमंत्री असलेले कोल्हापूर पेटले, मुंबईत लोकल रेल्वेत सकाळी सात वाजता महिलेचा विनयभंग होतो आहे. ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रिक्षावाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, सातशे वर्षांची परंपरा असलेल्या वारीवर कधी औरंगजेबाची वाईट नजर पडली नव्हती, तिथे इतरांना औरंग्याच्या अवलादी वगैरे म्हणणार्या गृहमंत्र्यांच्या काळात वारकर्यांवर लाठीमार झाला. महिला शिवसैनिक आणि सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक होते. मुंबईत महिला वसतिगृहात इस्त्रीवाल्याला सुरक्षा रक्षक नेमले जाते, तो मुलीची अब्रू लुटून खून करतो, नवी मुंबईत दगड खाण व्यायसायिकांना विशिष्ट कंपनीलाच माल विकायचे बंधन घातले जाते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघे मिळून २१ खाती सांभाळत आहेत वर्षभर. राज्यकारभार असाच सुरू राहिला तर रस्त्यावर फिरणार्या मुख्यमंत्र्यांनी राज्य रस्त्यावर आणले, असा बदलौकिक होईल आणि जनता रस्त्यावर उतरेल.
‘तुझी दाढी जळू दे, पण माझी विडी पेटू दे’ अशी एक गावरान म्हण आहे अगदी तसेच राज्य होरपळत असताना स्वार्थाची विडी पेटवणारे सत्ताधारी सध्या राज्याला लाभले आहेत. गेल्या वर्षभरात भाजपाला मिंधे गटासोबत जाऊन काय मिळाले, हे त्या पक्षाचे धुरीणच जाणोत; पण गद्दार मात्र भाजपाच्या जिवावर जिवाचा महाराष्ट्र करून घेत आहेत. नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये अशी एक म्हण आहे, त्याची राज्यातल्या भाजपाला आता रोज प्रचिती येत असेल. स्वतःपेक्षा संख्येने निम्म्याहून लहान असलेल्या मिंधे गटाला डोक्यावर चढवून भाजपने दिल्लीश्वर शहेनशहांच्या आदेशापुढे मान तुकवून मतलबी धाकटेपणा घेतला खरा; पण आता कानामागून येऊन तिखट झालेल्यांनी भाजपचे नाक कापून त्यांनाच नकटे बनवले आहे. देशात जिथे कुठे युतीची सत्ता असते, तिथे भाजप ज्या प्रकारची वागणूक मित्रपक्षांना देते, त्याच कडू औषधाचा जळजळीत डोस मिंधे त्यांना देत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणालाही कवडीची सहानुभूती वाटणार नाही. नागड्यांसोबत नाचताना परीटघडीचे कपडे घातलेल्याची जी केविलवाणी अवस्था होते तशीच अवस्था आज देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील त्यांच्या पक्षाच्या सहकार्यांची होत असेल.
या घोळात घोळ असलेल्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात, त्यांच्या नेतृत्वाखाली सुसूत्रपणे काम केलेल्या महाविकास आघाडीची जनतेला आवर्जून आठवण येते आहे. आज अधिकाधिक नवीन मतदारांना महाविकास आघाडी आकर्षित करत आहे. आधीचे सरकार फार बरे होते, हे वाक्य आज सार्वजनिक ठिकाणी सहज कानावर पडते. म्हणूनच तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल असे जितेंद्र आव्हाड आत्मविश्वासाने सांगतात, त्यात तथ्य वाटते.
ईडीग्रस्त, खोकेबहाद्दर गद्दारांनी राज्याबाहेर पळ ठोकल्यावर त्यांच्याशी समझोता न करण्याचा आणि दबावाच्या राजकारणाला बळी न पडण्याचा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे यांनी ‘झुकेंगे नहीं, लढेंगे’ हा बाणा दाखवला आणि संविधानिक सभ्यतेचे व नैतिकतेचे पालन करून मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून रस्त्यावरच्या लढाईचे आव्हान अंगावर घेतले. वर्षा बंगल्यातून परतीच्या वाटेवर दुतर्फा सामान्य जनतेने गर्दी करून एखाद्या मुख्यमंत्र्याला निरोप देण्याचा भावनाविवश करणारा तो हृद्य प्रसंग सबंध देशाने पाहिला. कोविडच्या संकटात राज्याचे कुटुंबप्रमुख बनलेले, लोकप्रिय मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, म्हणूनच महाराष्ट्र हळहळला होता. काळ पुढे जातो, तसे दुःख शमते; पण गेल्या वर्षभरातील महाराष्ट्र राज्याची कारस्थानी ईडी सरकारने जी वाट लावून ठेवली आहे, उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळाची आठवण अधिक गहिरी झाली आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेला कधी एकदा निवडणूक लागते असे झाले आहे. या निवडणुकांत आपले आणि गद्दारांचे काय होणार आहे, याची कल्पना महाशक्तीला निश्चित आहे. त्यांनी करून घेतलेल्या खर्या सर्वेक्षणांमध्ये तेच स्पष्ट झालेलं आहे. वातावरण आपल्याला अनुकूल होईपर्यंत हे निवडणूक घेणारच नाहीत आणि ते कधीच त्यांना अनुकूल होणार नाही, असा हा पेच आहे. गोदी मीडिया म्हणून बदनाम झालेले चॅनेलवाले आज निवडणूक झाली तर भाजप आणि मिंधे मिळून किती विक्रमी जागा जिंकतील, हे बनावट सर्व्हेंच्या आधारावर सांगत आहेत. या सर्वेक्षणाला काही अर्थ असता तर तत्क्षणी निवडणुका जाहीर केल्या असत्या सरकारने.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा वारसा म्हणून भाजपबरोबर युती केली होती, युतीचा धर्म पाळला होता. मात्र, २०१९च्या निवडणुकीनंतर य्ाा धर्माचे पालन होणार नाही, हे लक्षात आल्यावर आणि भाजपच्या हिंदुत्वातले जहरी भोंदुत्व लक्षात आल्यावर त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय केला. त्या निर्णयाला जनतेशी गद्दारी म्हणणार्यांनी पहाटेचा शपथविधी पाहिला तेव्हा नागपूरच्या ज्युनियर चाणक्याच्या कौतुकाच्या आरत्या ओवाळल्या होत्या, तेव्हा ती गद्दारी नव्हती? पण, शिवसेनेने तोंडचा घास पळवला याच्या सुडाच्या आगीत मनोमन जळणार्या भाजपने आपल्याला महाराष्ट्रात आणि पर्यायाने देशात उभ्या करणार्या शिवसेनेचीच शकलं करण्याचं कारस्थान रचलं. त्याला आपल्याच गद्दारांनी साथ दिली. महाराष्ट्राची सर्वात कणखर जनसंघटना असलेल्या शिवसेनेचा अभेद्य गड पेटवला गेला. पण आग लावताना भाजपाच्या धोतराने देखील पेट घेतला, हे भाजपाला तेव्हा कळले नव्हते. आता बुडाला चटके बसू लागल्यावर बोंबलून काय फायदा?
येत्या निवडणुकीत एकशे पाच आमदारांवरून भाजपा पाच-पन्नासच्या आकड्यावर येणार आहे असे भाकित त्यांच्याच अंतर्गत रिपोर्टमधून वर्तवले जाते आहे. भाजपचे महाराष्ट्रातील राजकीय गणित पूर्ण चुकले आहे आणि त्यांच्या जिवावर उड्या मारणार्या मिंध्यांनी त्यांनाच वेठीला धरल्यासारखी स्थिती आहे. याला पूर्णपणे जबाबदार आहे ते साधनशुचितेला फाटा देणारे त्या पक्षाचे आजकालचे सत्ता प्रथम हे महाभयंकर धोरण. बनिये, सटोडिये बनून सत्तेच्या सट्टेबाजीमागे लागल्यावर जसे भरपूर येते, तसे दामदुप्पट जाते, हा नियम देखील आपोआप येतो. भाजपाचे नवचाणक्य गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात ब्लू चिप स्टॉक समजून ज्यांच्यावर काही खोकी लावली होती, ते सारे चाळीस स्टॉक भंगारात पडलेले पेन्नी स्टॉक निघाले. बरेचदा डे-ट्रेडिंग करताना चूक झाल्यावर काही नको असलेले स्टॉक कायमचे गळ्यात येतात आणि हातचे चांगले स्टॉक निसटून जातात. भाजपा महाराष्ट्रात या आतबट्ट्याच्या सट्टेबाजीत अडकली आहे आणि त्या पक्षाचे महाराष्ट्रात मोठे राजकीय नुकसान आता अटळ आहे. महाराष्ट्रातील जनता मात्र या सटोडियांपासून कधी एकदा सुटका मिळते यासाठी निवडणुकीवर नजर लावून बसली आहे.