मध्यंतरी श्रीदेवीचा ‘इंग्लिश विंग्लीश’ सिनेमा पुन्हा बघण्यात आला. सगळा कथाविस्तार, अभिनय, मुळातच जुळून आलयं सगळं, त्यामुळे कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा न येणार्या पठडीतला आहे ना? सगळ्याबरोबरच या सिनेमातल्या नायिकेचं बुंदीचे लाडू बनवणं मनाला भावलं माझ्या. तसाही बुंदीचा लाडू हा आवडीचाच प्रांत!
शुभकार्य म्हटले की बुंदीच्या लाडवांना पर्याय नसतोच, वर्षानुवर्ष, पिढ्यानुपिढ्या हे समीकरण जपत व सांभाळत आलोय नाही का आपण? अगदी पुलंच्या नारायणाचं लहानगं लेकरूही हातात हा बुंदीचा लाडू घेऊनच पेंगुळतं!! प्रसादाचा म्हणून मिळणारा ठिकठिकाणचा बुंदी लाडूही आपण खात असतोच की. तिरुपतीचा असो वा इतर कोणते मोठे देवस्थान. आमच्या पुण्याच्या मठातही उत्सवांना हमखास मिळतो या ताज्या बुंदीच्या लाडवांचा प्रसाद.
अलिबागला गणपतीमध्ये नैवेद्यासाठी विविध प्रकार आणायचो. त्यात कडक बुंदीच्या लाडवांची वर्णी लागायचीच!! बेळगावच्या बाजूला मिळणारा गुळाच्या पाकातला बुंदी लाडूपण खाल्ल्याचे स्मरतेय. साधारण पण कडक किंवा नरम अशी वर्गवारी होत असली तरी आजकाल मोतीचुराच्या म्हणजे बारीक कळीच्या बुंदी लाडवांची चलती जास्त आहे. एकसारख्या आकाराच्या कळ्यांचा हा मोतीचुराचा लाडू मला उगीच जास्त नटवेपणा किंवा शिष्ठपणा केल्यासारखा वाटतो, तर साधा बुंदीचा लाडू कसा आपल्यातला वाटतो, अघळपघळ नी सर्वसामान्य!!
लहानमोठी, थोडी ओबडधोबड, कशीही बुंदी असली तरी लाडवांच्या रुपात बसली की ती शुभंकराची दूत बनतेच!! तसं बघितलं नं तर फार काही साहित्य लागत नाही आणि एकदा तंत्र जमलं की विशेष काही कठीणही नाहीत हे लाडू बनवणं. वाटीभर बारीक दळलेलं हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, तेवढीच साखर, साजुक तूप, पाणी, सुका मेवा आणि वेलदोड्याची पूड हे जिन्नस असले की बनवू शकतो आपण बुंदीचे लाडू. सर्वात आधी चाळलेल्या बेसनात जरुरीनुसार पाणी मिसळून बुंदीचे पीठ भिजवावे. हे पीठ फार घट्ट झाले तर झार्यातून पडत नाही आणि फार पातळ असले तर बुंदी नीट पडत नाही. बुंदी चपटी पडत असेल तर किंचित पाणी वाढवा आणि थेंबासारख्या आकाराची होत असेल तर पीठ वाढवायचं. गोल गरगरीत बुंदी पडली की अर्धा गड जिंकलाच की आपण. साखरेच्या एकतारी कोमट पाकात बुंदी कालवून ठेवायची आणि गरम असतानाच लाडू वळायचे. गार झाल्यावर जर बुंदीने पाक शोषला पूर्ण तर लाडू वळणं कठीण जातं. बुंदी तळण्यापासून सुरू झालेला घमघमाट लाडू जिभेवर विरघळला की मनात जास्तच दरवळतो!!
साखरेच्या पाकात पडली की बुंदी जशी बुंदी न राहता लाडू बनते, जणू सार्थक होते नाही का आजवरच्या कष्टाचे? रंग, रूप, आकार सगळं बाजूला सारून एकदा का ते बुंदीचे दाणे एकत्र व्हायला पुढे सरसावले की हा आनंदघन तयार झालाच म्हणून समजा. यात सर्वात महत्वाचं, सर्व कणांना सांधण्याचं काम करणारा पाकही फार महत्वाचा ठरतो बरं!!
बुंदीच्या प्रत्येक दाण्याचं मूळ स्वरूप जसं एकचं बेसनाचं मिश्रण असतं तसंच आपणही सगळे एकाच हाडामांसाचे बनलोय की. बाह्य भेद सोडले तरी मूळ स्वरूप हे एकच आहे. विनाकारण जोपासलेले हे भेदाभेद विसरून सुखदु:खात एकमेकांशी समरस झालं की आपलीच मनं उभारी घेतात. मात्र हे बुंदीचं एकत्र येणं टिकवण्यासाठी जशी पाकाची गरज असते, जो लाडू तर सांधतोच पण गोडवाही देतो, तसाच समाजाला एकसंध ठेऊ शकेल असा पाक म्हणजे सकारात्मक आणि डोळस नामस्मरण. मनामनांतील कटुता नकळत नाहीशी करण्याचे काम तर हे नाम करतेच, पण मनांना सांधण्याचेही काम हे नाम करतेच की. नकोशा बाह्यभेदांची बंधनं आपोआप गळतात व आयुष्याला झळाळी येते.
मूळची आयरीश असलेली सिस्टर निवेदिता जेव्हा स्वामी विवेकानंदांची शिष्या बनून भारतात आली तेव्हा सर्वांना काळजी होती की माताजी श्री सारदादेवी तिला कसं स्वीकारतील? मात्र सर्वार्थानं जगतजननी असलेल्या माताजींनी सर्व अंदाज खोटे ठरवत निवेदिताला मनोमन स्वीकारले. भाषेचा अडसर त्या भावभावनांच्या राज्यात जसा कधी जाणवलाच नाही, एकमेकींच्या धरलेल्या हातातून जणू केवळ त्या सूक्ष्म संवेदनाचीच देवाणघेवाण होत होती. माताजींना एखाद्या नातीचं असावं तसं कौतुक होतं निवेदिताचं. त्यांनी सुरू केलेली शाळा स्वत: बघायला जाऊन त्याची प्रचितीच दिली माताजींनी.
एकदा का मूळ स्वरुपाची खूण पटली नं मनाला की आपोआप या भेदाभेदांना थारा उरत नाही, बाह्योपचारांच्या पलीकडे अंतरंगात नामाची गोडी पाझरली की आपोआपच प्रत्येक जीवात शिवाचे अस्तित्व जाणवायला लागते नी त्या आपल्या मूळ रूपाशी अनुसंधानित होण्यातला आनंदच निराळा, दैवीच खरं तर हे सगळं, बुंदीच्या लाडवाप्रमाणेच केवळ कल्पनेनंच मनोमन सुखावणारं!!