माशांच्या पिशवीवर चुकून बटाटे किंवा इतर बाजारहाट आदळला तर माशांची बैठक मोडलीच म्हणून समजा. एकदा का आकार मोडला की मत्स्यप्रेमींना त्याची चवही डावी भासते. म्हणूनच आकर्षक आणि मजबूत पॅकिंग हा आमच्या व्यवसायाचा मुख्य पाया आहे. ठाण्यातील ‘मळगंगा फिशरीज’चे मालक विलास वरखडे आपल्या व्यवसायाचे मर्म सांगत होते…
– – –
श्रावणाच्या अखेरीस येणार्या नारळी पौर्णिमेची नारळ वडी खाताना खवय्यांना वेध लागत ताज्या फडफडीत माशांच्या बेताचे. चांगले चविष्ट मासे बनविण्यासाठी मसाले कमी असले तरी चालतील, पण मासे ताजे असणे ही मुख्य गरज असते. चांगले ताजे मासे कुठे मिळतील याचा शोध घेत असताना एका मित्राने मला ठाण्यातील ‘मळगंगा फिशरीज’चे मालक विलास वरखडे या मासे विक्रेत्यांचा नंबर दिला. त्यांना फोन केल्यावर त्यांनी मला त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अॅड केलं. ते रोज सकाळी बंदरावरून कोणते मासे विकायला आणले आहेत, याचे फोटो आणि विक्री दर टाकतात. ते पाहून ग्राहकांनी ऑर्डर नोंदवायची. त्यानंतर ते माशांची डिलिव्हरी (मासे साफ करून, त्यांची घाण काढून, त्यांचं योग्य आकारात कटिंग करून) घरपोच पाठवतात. व्यवसायाच्या दृष्टीने पारंपरिक मासेविक्रेत्यांना जसं बाजारात ग्राहकांची वाट पाहत बाजारात बसावं लागतं त्या तुलनेत ग्राहक असतील तिथं ताज्या माशांची घरपोच डिलिव्हरी ही कल्पना मला आवडली.
एखादी कल्पना सुचणे आणि ती राबवणे यात खूप फरक आहे. म्हणूनच भारी आयडिया आहे, या कल्पनेने भारावून केले गेलेले अनेक उद्योग सहा महिन्यांत मान टाकतात. पण विलास वरखेडे हा व्यवसाय गेली दहा वर्षे करत आहेत हे कळल्यावर त्यांच्यासोबत मत्स्य व्यवसाय विश्वाची सफर करायला त्यांना भेटलो. नकळत्या वयापासून मासळी विश्वात रमणारे विलास वरखडे म्हणाले, मासे विकणे हा आमचा पारंपारिक व्यवसाय. मला आठवतंय, आई लहानपणी मला कुलाबाच्या ससून डॉकला पहाटे घेऊन जायची. तेव्हा फारसं काही कळायचं नाही, पण सकाळी पेंगुळलेल्या डोळ्यांनी पहाटे चार वाजता ससून डॉक परिसराला जाग आलेली पाहिलीय, समुद्राची गाज ऐकू यायची. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटी मासे पकडून एका पाठोपाठ एक धक्क्यावर लागायच्या. ‘मासे आले’, अशी हाळी ऐकल्यावर उच्च प्रतीचे ताजे मासे मिळावे यासाठी आईसकट इतर मावशांची होणारी लगबग… हमालांचा गलका… माशांचा लिलाव… अशा खूप आठवणी आहेत. आई मासे विकत घेत असताना सारंगा, रावस, सुरमई या ताज्या माशांचा वास नाकात शिरायचा. ही खरेदी सुरू असताना ताजे मासे कसे ओळखायचे याचं बाळकडू मला आईनेच द्यायला सुरुवात केली.
खरेदी करून आणलेले मासे आई कुलाबा मच्छी मार्केटमधून ग्राहकांना विकायची. पण आमचा मुख्य व्यवसाय मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांना मासे पुरवण्याचा होता. ही विक्रीव्यवस्था माझे वडील पाहायचे. कळत्या वयापासून मी आणि माझा भाऊ ट्रेनमधून कुर्ला, घाटकोपर, ठाणे येथील हॉटेल्सला मासे घेऊन जायचो. सकाळी मासे पोहचवले की त्याचे पैसे संध्याकाळी घ्यायला जावं लागायचं. मासे पोहोचवण्याचं काम करताना अंगाला कपड्यांना माशांचा वास यायचा. पण या गोष्टीची कधीही लाज वाटली नाही. कारण या व्यवसायातूनच आपल्या कुटुंबाचे पोट भरले जात आहे हे कळत होतं. माशांचा व्यापार करताना स्वच्छता ही किती महत्वाची बाब आहे हे आईवडिलांकडून शिकलो होतो. म्हणूनच माशांची डिलिव्हरी करून घरी आल्यावर आंघोळ करून स्वच्छ धुतलेला गणवेश घालूनच शाळेत जायचो.
आजूबाजूचे काही मित्र शिक्षण सोडून रोजंदारीवर कामाला लागले होते. बर्याचदा असं होतं की लहान वयात पैसे कमवायला लागलो की शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं पण मला माझ्या बाबतीत ते करायचं नव्हतं म्हणूनच आईबाबांना व्यवसायात मदत करत असतानाच शिक्षणात देखील मी चांगली कामगिरी करून सिद्धार्थ कॉलेजमधून बीकॉमची डिग्री प्राप्त केली. पदवी मिळाल्यावर स्थिरस्थावर होण्यासाठी सरकारी किंवा खासगी नोकरी करावी असा विचार मनाला शिवला नाही. आपल्याला व्यवसाय करायचा आहे हे मनात पक्कं होतं. त्याच उद्देशाने शिक्षण पूर्ण केल्यावर मी मासे पुरवण्याच्या आमच्या व्यवसायात स्वत:ला झोकून दिलं. उच्चशिक्षण घेतल्यावर मला व्यवसायवाढीची स्वप्ने पडू लागली. मार्केटिंग करून काही नवीन हॉटेल व्यावसायिक वाढवले, पण त्यांची माशांची मागणी कमी असायची; त्यामुळे एकूण उलाढालीत फारसा फरक पडला नाही.
आपण फक्त लहान हॉटेल्सलाच मासे का पुरवतो, कुलाबाच्या बाजूला असणार्या ताज, ओबेरॉय अशा पंचतारांकित हॉटेल्सला
आपण मासे का पुरवत नाही, असा प्रश्न मनात यायचा, पण वडिलांनी आर्थिक गणित उलगडून सांगितलं तेव्हा लक्षात आलं की या व्यवसायातून जेवढे पैसे मिळतात ते कौटुंबिक जबाबदार्या पार पाडण्यात खर्च होतात आणि मोठ्या पंचतारांकित हॉटेल्सना मासे पुरवण्यासाठी तसेच महिन्याभराची उधारी देण्यासाठी भरपूर भांडवलाची गरज असते आणि सध्या तितके पैसे आपल्याकडे नाहीत, या वस्तुस्थितीची जाणीव झाली. १९९३ साली आम्ही कुलाब्याची जागा सोडून ठाण्याला वागळे इस्टेट येथे स्थलांतर केलं. मग ठाण्यावरून कुलाबाच्या ससून डॉकला ट्रेनने पहाटे मासे आणायला जायला लागलो. १९९५ साली माझं लग्न झालं. आणि आईबाबा गावी निघून गेले. त्यानंतर मी आणि भाऊ दोघं मिळून हा व्यवसाय सांभाळू लागलो. याच काळात रेल्वेच्या अधिकार्यांनी मालडब्यातून सामान नेणार्या लोकांवर कारवाई करायला सुरुवात केली होती आणि दोन-तीन वेळा दंड भरल्यानंतर आम्हाला मासे डिलिव्हरीसाठी काहीतरी वेगळा पर्याय शोधणं गरजेचे होतं, म्हणून मग कर्ज काढून टेम्पो विकत घेतला.
तीन-चार वर्षं व्यवसाय केल्यानंतर असं लक्षात आलं की कागदावर प्रॉफिट आहे, पण हातात पैसे राहत नाहीयेत. याचं कारण शोधल्यावर असा निष्कर्ष निघाला की हॉटेल व्यवसायिकांना आपण शंभर रुपयाचे मासे पुरवले, तर ते पन्नास रुपये देतात आणि पन्नास रुपये उधारी ठेवतात. असं करत करत प्रत्येक हॉटेल व्यावसायिकाकडे आमचे हजारो रुपये अडकले होते. मग ते पैसे वसूल करायला आम्हाला दोघांनाही कामधंदा बाजूला ठेवून त्यांच्याकडे रोज खेपा मारायला लागल्या. काही पैसे आले तर काही बुडाले, पण तुकड्या तुकड्यांनी पैसे आल्यामुळे ते पैसेही गाठीशी उरले नाहीत.
हा अनुभव घेतल्यावर मी भावासोबत बसून आपण व्यवसाय करण्याच्या पद्धतीत बदल करूया असा प्रस्ताव मांडला. पण त्याला जसा आहे तसाच वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय करायचा होता. मला दिसत होतं की फक्त हॉटेल सप्लायपेक्षा (बिझनेस टू बिझनेस) मासे बनवून खाणार्या घरगुती ग्राहकांना (बिझनेस टू कन्जुमर) मासे पुरवणे हा व्यवसाय करायला हवा. याने उधारीचा प्रश्न मिटेल आणि हिशेबातील कागदावर दिसणारे पैसे प्रत्यक्षात हातात येतील. पण भावाला ही गोष्ट मान्य नव्हती. त्या काळात कधी कधी खरेदीलाही पैसे हातात नसायचे. व्यवसायावरून आम्हा भावांत खटके उडत होते. पैसे मिळत नाहीत या कारणाने भावाचाही व्यवसायातून इंटरेस्ट कमी झाला. २०१० साली भाऊ अहमदनगरला गावी निघून गेला. व्यवसायाची सूत्रे माझ्या हातात आली. मासे खाणार्या अस्सल खवय्ये लोकांना ताजे मासे जागेवर विकायचे किंवा चांगली सर्विस देऊन त्यांच्या घरी पोचवायचे अशा पद्धतीचा विचार मनात घोळत होता. हे करायला चांगल्या सोसायटीच्या आसपास दुकानाचा गाळा आपल्या बजेटमध्ये मिळायला हवा होता. आपल्या लोकांना मांसाहारी खायला आवडतं पण मासे विकणारं दुकान आपल्या सोसायटीत नको असतं. त्यामुळे जागा मिळायला वेळ लागला. शेवटी २०१७ साली ठाण्यात एक छोटा स्टॉल भाड्याने मिळाला. अहमदनगरमधील पारनेर या आमच्या गावातील ग्रामदेवतेचे मळगंगा हे नाव वडिलांनी आमच्या मत्स्य व्यवसायाला दिलं होतं. तेच नाव पुढे चालवून माझ्या नवीन दुकानाला ‘मळगंगा फिशरीज’ हा बोर्ड लागला. या दुकानात मासेविक्रीचा व्यवसाय सुरू केला.
मांसाहारी आहारात मासे विक्री हे सर्वात कठीण काम… कारण मासे किती ताजे आहेत, हे त्या व्यवसायात अनेक वर्षे काढल्याशिवाय कळत नाही तसेच ते लवकर खराब देखील होतात. त्यामुळेच अनेक ग्राहक मासेखरेदी विश्वासाच्या माणसांकडूनच करतात. ग्राहकांचा हा विश्वास संपादन करायला थोडा वेळ लागला. सुरुवातीला किती विक्री होईल याचा अंदाज लागायचा नाही, नुकसान झालं तरी चालेल पण शिळे, खराब मासे ग्राहकांना विकायचे नाहीत, हा आमचा निर्धार होता. त्यामुळे अनेकदा धंद्यात खोट यायची. हळूहळू आमचे ग्राहकच आम्ही विकत असलेल्या ताज्या आणि चांगल्या माश्यांची प्रसिद्धी करायला लागले आणि ग्राहकांचा ओघ वाढला. पण दुकानाची जागा मात्र एकाच वर्षात तीन वेळा ‘मत्स्यव्यवसाय करणारे दुकान आमच्या इथे नको’ या कारणाने बदलावी लागली.
आम्ही आमच्या परीने स्वच्छतेची काळजी घेत होतोच. आता असलेलं दुकान सह्याद्री सोसायटीचे चेअरमन गायकवाड साहेब आणि सेक्रेटरी वैष्णव साहेब हे माझ्यासारख्या मराठी व्यावसायिकाच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्यामुळे आज पाच वर्षांपासून आपल्या दुकानाची जागा फिक्स आहे. आमचं दुकान ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर आहे. मी दुकान सुरू केल्यावर दुकानात येणारे बरेच ग्राहक माझ्याशी हिंदीतून संवाद साधायचे. त्यांना मी माशांचा व्यवसाय करणारा एक परप्रांतीय वाटायचो. पण मी त्यांच्याशी मराठीतून संवाद साधायचो तेव्हा त्यांना आनंद व्हायचा की माशांचा वास येईल आणि त्यामुळे या कामाची लाज वाटेल याला न घाबरता एक मराठी माणूस हा व्यवसाय करतोय.
गेली पस्तीस वर्षे विलास मासेमारी व्यवसाय पाहत आहेत. इतक्या वर्षांत या व्यवसायात काय काय बदल झाले, आता व्यवसाय करताना काय अडचणी येतात याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, ‘तेव्हा कोणत्याही वेळेत बंदरावर गेलो तरी मासे मिळायचे, पण आता मात्र रात्री दोन वाजता पोहचावं लागतं, नाहीतर चांगल्या प्रतीचे मासे मिळत नाहीत. पर्यावरणातील बदल, रासायनिक पाणी समुद्रात सोडणे यामुळे समुद्रातील माशांची संख्या कमी झाली आहे. तसेच गेल्या काही वर्षांत मासेमारीचा अतिरेक होतो आहे. परदेशात निर्यातीसाठी अजस्त्र बोटीने केली जाणारी पर्ससीन, एलईडी पद्धतीची मासेमारी यामुळे लहान आकाराचे व कमी वयोमानाचे मासे पकडले जातात. या सर्व कारणांमुळे पारंपरिक मासेमारी करणार्या बोटींनी माशांची पकड तुलनात्मकदृष्ट्या अत्यल्प झाली आहे. याचाच परिणाम म्हणून आज माशांचा पुरवठा कमी आणि मागणी अधिक अशी परिस्थिती आहे. याच वेळी अनेक मोठे भांडवलदार ऑनलाईन अॅपद्वारे या व्यवसायात उतरल्यामुळे कॉम्पिटिशनही वाढली आहे. या सर्व बाबींमुळे आता मासेविक्रीचा व्यवसाय करताना नफा कमी झाला असून खर्च मात्र वाढलेला आहे. म्हणूनच व्यवसायात टिकायचे असेल तर अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याशिवाय पर्याय नाही.
वर्तमानपत्र आणि दूधविक्रीप्रमाणेच मासेखरेदी हा व्यवसाय देखील पहाटे लवकर सुरू होतो. रविवारी आणि बुधवारी आपल्या पोटात शिरणार्या माशांचा प्रवास कसा होतो याच्या उत्सुकतेपोटी मी विलास यांना त्यांचा दिनक्रम विचारला. ‘तुम्ही रात्रीच्या झोपेच्या तयारीला लागता तेव्हा रात्री अकरा वाजता माझा दिवस सुरू होतो,’ असं विलास गमतीने म्हणाले. ते सांगू लागले, ठाणे ते कुलाबा ससून डॉक असा रोजचा प्रवास. कोणत्या बोटी समुद्रात कधी गेल्या आहेत आणि कधी परत येतील याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे धक्क्यावर योग्य जागी थांबायचं. रात्री दोन वाजल्यापासून बोटी धक्क्यावर यायला सुरुवात होते. अडीच तीन वाजता मालाची खरेदी सुरु होते. रात्री अडीच वाजता उच्च प्रतीचे (एक्सपोर्ट क्वालिटीचे) मासे सॉर्टिंग करून लिलाव केला जातो. यातही धक्क्यावर फिरून उत्तम मालाची पारख खूप आवश्यक असते. आईकडूनच या व्यवसायाचं बाळकडू मिळाल्यामुळे बोटीतून मासे धक्क्यावर आले की एका नजरेत मालाची पारख करता येणे हा माझा प्लस पॉईंट आहे, हे मी इथे नम्रपणे सांगू इच्छितो. आमची खरेदी झाल्यानंतर उरलेला माल रस्त्यावर फिरून विकणार्या फेरीवाल्यांना दिला जातो. खूप काळजीपूर्वक मालाची खरेदी केली जाते, पण काही वेळा निसर्गनिर्मित कारणांमुळे काही अडचणी येतात. उदा. पावसाळ्याच्या दिवसात गोड पाणी आणि खारं पाणी मिक्स झालं तर माशांच्या चवीत फरक पडतो. खरेदी केलेले विविध जातींचे मासे थर्माकोल बॉक्समध्ये टाकून त्यात बर्फ टाकून पॅकिंग केले जातात. टेंपोने सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व मासे आमच्या ठाण्यातील दुकानात आणले जातात.
रस्त्यावर फिरून मासे विकणारे फेरीवाले देखील मत्स्यव्यवसाय करतात, मग यांच्यात आणि तुम्ही विक्री करता या माशात काय फरक आहे, यावर विलास म्हणाले, ‘फेरीवाले आमच्यापेक्षा कमी दरात मासे विकतात, याचं कारण म्हणजे आम्ही खरेदी केल्यानंतर उरलेला सेकंड क्वालिटीचा माल ते विकत घेतात. हलक्या प्रतीचे आणि खराब होतील अशा स्थितीतील मासे कमी दरात विकत मिळू शकतात. काही ग्राहकांना चांगले मासे ताजे मासे आणि शिळे मासे यातील फरक कळत नसल्यामुळे त्यांना आमचे दर अधिक वाटतात. परंतु मासे खाणारे अस्सल चोखंदळ ग्राहकांना आम्ही विकतो त्या माशांची क्वालिटी माहीत आहे. म्हणूनच असे ग्राहक पहिल्यांदा आमच्याकडे मासे खरेदी करून त्याची चव चाखतात, त्यानंतर मात्र ते कधीही कमी पैशात मासे विकणार्याकडे जात नाहीत. जाहिराती न करता केवळ माऊथ टू माऊथ पब्लिसिटीने ठाणे शहरासोबतच आमचा हा व्यवसाय आज मुंबईभर पसरलेला आहे. आमच्या दुकानात ग्राहकांसाठी आठवड्याचे सातही दिवस सकाळ-संध्याकाळ मासे उपलब्ध असतात. दुकानात चार जणांचा स्टाफ आहे. फक्त सोमवारी संध्याकाळी दुकान बदं असतं.
आमच्याकडे माशांना वास न येण्याचं कारण म्हणजे ताजेपणा. आपले मुंबईचे मासे जगात भारी. त्यामुळे आपल्या माशांना दूर दूरवरून मागणी असते. माझ्याकडून मासे घेऊन व्यवस्थित पॅक केलेली ताजी मासळी एसीमधून नागपूरपर्यंतही जाते, कारण ताजेपणा. आमची मासळी खरेदी करण्यापासून ते अगदी कस्टमरच्या ताटात जाईपर्यंत माझं माझ्या कामावर लक्ष असतं. मांदेली, बोंबील, कोळंबी, पापलेट, कटला, सुरमई, रावस, घोळ, इंडियन बासा… असे मासळीतले विविध प्रकार आहेत, पण साधारणत: पापलेट, बांगडा, कोळंबी, सुरमई फार तर हलवा, मांदेली एवढेच मासे बहुतांश ग्राहकांना माहीत असतात. वेगवेगळे चवदार मासे खवय्यांना मी आवर्जून उपलब्ध करून देत असतो. मोरी किंवा मुशी, सौंदाडे, घोळ, करली, असे अनेक नवे प्रकार नवीन चवीसाठी ग्राहकांना आग्रहाने दिले आणि त्यांच्या सवयीचे केले. सुरवातीला अशा प्रयोगांमुळे मला नुकसान सोसावे लागले. सुरुवातीच्या काळात किती प्रमाणात कुठले मासे विकले जातील याचा अंदाज यायचा नाही. पण आता अनुभवातून शिकत तो अंदाज आला आहे. सणासुदीच्या दिवसांत त्यानुसार मासळीखरेदी बेताने करतो, यामुळे सर्व जातीचे ताजे मासे आम्ही ग्राहकांना पुरवू शकतो.
तसे आमच्याकडचे सगळेच मासे खास आहेत, पण बाराही महिने मोठ्या आकाराची कोळंबी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत आम्ही प्रसिद्ध आहोत. अगदी एक्स्पोर्ट क्वालिटीची कोळंबी! धागे काढून स्वच्छ करून उपलब्ध करून देतो. बर्याच ठिकाणी मात्र जेव्हा स्वस्ताई असेल तेव्हा फक्त मोठ्या आकाराची कोळंबी मिळते. इतक्या वर्षाच्या अनुभवांती मी एक गोष्ट निश्चित सांगतो, कस्टमरला ताजे मासे, योग्य आकार आणि वजनाची हमी दिली तर ते आनंदाने, पैशाकडे न पाहता मत्स्यखरेदी करतात. मच्छीबाजारात जी मासळी आकारावर आणि पाचशे रुपये सांगून अडीचशे रुपयापर्यंत घासाघीस करून मिळते, ती आमच्याकडे निश्चित भावाला मिळते. कारण सगळी मासळी आम्ही किलोच्या भावाने विकतो. शिवाय आजच्या धकाधकीच्या आयुष्यात मासे साफ करत बसायला कुणाला वेळ नसतो. हौसेने मासे खाणार्या अनेकांना ताजे मासे ओळखता येत नाहीत, त्यासाठी बाजारात जाण्याइतका वेळ नसतो आणि मासे साफही करता येत नाहीत. त्यांना थेट फोडणीत किंवा मॅरिनेट करून तव्यावर टाकता येतील असे साफ केलेले, कटिंग केलेले मासे आम्ही पुरवतो, तेही घरपोच. साधारण नारळी पौर्णिमा ते दिवाळी या काळात माशांची आवक भरपूर असते. पण तो काळ आपल्याकडे श्रावणाचा, सणासुदीचा असल्याने तेव्हा माशांना मागणी जरा कमी असते. पुढे हिवाळ्यात माशांची आवक कमी होते. त्यानुसारही भावात फरक पडतो.’
अस्सल खवय्यांसाठी मासे हा नाजूक विषय असतो. बाजारहाट करून माणसे घरी जातात. त्यात जर चुकून त्या माशांच्या पिशवीवर बटाटे किंवा इतर बाजारहाट आदळला तर माशांची बैठक मोडलीच म्हणून समजा. एकदा का आकार मोडला की मत्स्यप्रेमींना त्याची चवही डावी भासते. म्हणूनच आकर्षक आणि मजबूत पॅकिंग हा आमच्या व्यवसायाचा मुख्य पाया आहे, हे आणखी उलगडून सांगताना विलास म्हणाले, ‘दिसायला सुबक आणि उग्र दर्प न येणारे घरपोच ताजे मासे हे आमचं वैशिष्ट्य आहे. स्वच्छतेला आम्ही खूप महत्त्व देतो, मासळी हाताळणारा माणूस अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छतेचे सगळे निकष पाळून मासळी स्वच्छ करून आणि कटिंग करून देतो, त्यानंतर पॅकिंग करायला वेगळा मनुष्य असतो. मासे स्वच्छ करणारे आणि पॅकिंग करणारे हात वेगळे असल्याने, पॅकेजला वास येत नाही. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. रोज ताजी मासळी घेऊन आल्यावर दुकान सुरू करण्याच्या आधी मी आजचे मासे आणि दर त्या ग्रुपवर टाकतो. सकाळी दहापर्यंत आलेली ऑर्डर दुपारी एक वाजेपर्यंत घरपोच पोहोचवतो. कुणी आदल्या दिवशी ऑर्डर दिली, कुणी लग्न किंवा पार्टीसाठी ऑर्डर दिली तर ती आम्ही सकाळी दहाच्या आधी पोहोचवतो.
दुकानात माझी पत्नी छाया मला उत्तम मदत करते आणि मुलगा राहुल डिलिव्हरी सांभाळतो, दूरच्या डिलिव्हरीसाठी आम्ही ‘वी-फास्ट’ या कंपनीची मदत घेतो. सुरुवात केली त्या वर्षी आम्ही जस्ट डायलवर होतो. त्यानंतर मात्र आम्ही केवळ माऊथ पब्लिसिटीवर आमचं काम सुरू ठेवलं. घाऊक खरेदी करणार्या ग्राहकांना आम्ही दोन हजाराच्या खरेदीवर दहा टक्के सूट देतो.
या धंद्यात आज अनेक लोक उतरले आहेत, अगदी बाजारातील पारंपारिक विक्रेते, फिरते विक्रेते, ऑनलाइन विक्री करणारे या सगळ्यांशी स्पर्धा आहे. मोठ्या कंपन्या अॅप बनवून आणि मोठं कोल्ड स्टोरेज उभारून विस्तृत ग्राहकवर्ग कव्हर करू शकतात. अशाच प्रकारची व्यवस्था सुरू करण्याचा आमचा मानस आहे, पण कोविडमध्ये झालेलं नुकसान भरून आलं की त्यानंतरच ही मोठी उडी घेऊ शकतो. मासे हा नाशवंत पदार्थ टिकवणं आणि विकणं यातल्या अडचणी आम्हीच जाणतो आणि त्यावर उपाय शोधून ग्राहकांना त्याच्या आवडीचे ताजे मासे कसे मिळतील याचं गमक आम्हाला कळलं आहे.’
महाराष्ट्र राज्याला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे. ऑनलाइनच्या काळात गेली अनेक वर्षे महापालिकेच्या सार्वजनिक मंडईत पारंपरिक पद्धतीनं मत्स्य व्यापार करणारे व्यावसायिक काही प्रमाणात आपला ग्राहक आजही टिकवून आहेत. व्यवसायाच्या या संधीचा लाभ घेण्यासाठी परप्रांतीय फेरीवाले आणि मोठे भांडवलदार ऑनलाइन अॅपद्वारे ग्राहकांना भुरळ घालत आहेत. या नवीन या कॉम्पिटीशनला न घाबरता पारंपरिक मत्स्यव्यवसायाला जर आधुनिक पद्धतीची नवी दिशा दिली, तर व्यवसाय कसा वाढू शकतो हे विलास वरखडे यांच्या व्यवसाय प्रवासातून आपल्याला उमगतं.
मुंबईसारखी मोठी बाजारपेठ आणि समुद्री पर्यटन यामुळे माशांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच या मत्स्य व्यवसायात येण्यासाठी मराठी तरुण मुलांना संधी आहे. मात्र या व्यवसायात यायचं असेल तर मेहनत करण्याची तयारी, ताजे मासे या मुख्य घटकासोबत आकर्षक पॅकिंग आणि वेळेत घरपोच डिलिव्हरी हा मंत्र जपावा लागेल.