सुमारे तीन चार महिन्यानंतर ऑफिसमध्ये कोर्टाचे एक समन्स आले. मी काढलेल्या अंत्ययात्रेच्या फोटोमध्ये पुणे येथील कोर्टाने मला साक्ष देण्यासाठी फोटोच्या निगेटिव्ह घेऊन बोलावले. मला आश्चर्य वाटले. मी इतक्या भानगडीचे अनेक फोटो काढले, पण कुणाच्या अंत्ययात्रेचे फोटो काढल्यामुळे कोर्टात उभे राहावे लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.
– – –
`ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख मे भरलो पानी’ या गीताने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात पाणी आलं. हे मी ऐकून होतो… पण या गीताचे संगीतकार सी. रामचंद्र यांचा फोटो घेतल्यामुळे डोळ्यात पाणी येऊ शकते याचा अनुभव आला.
सी. रामचंद्र यांचे अकस्मात दु:खद निधन झाल्याची बातमी येताच सिनेसंगीत क्षेत्रात दु:खाची लाट पसरली. एक थोर असामान्य लोकप्रिय संगीतकार गेल्याने मलाही वाईट वाटले. परंतु त्यांच्या अखेरच्या क्षणाचे फोटो काढल्याने मला जो विनाकारण त्रास सहन करावा लागला त्याने रडू कोसळले.
वृत्तपत्राचे काम करत असताना उद्या कोणता फोटो काढण्यासाठी कुठे जावे लागेल ते आज ठरवता येत नाही. त्याच दिवशी, त्याच सकाळी जे घडेल तेथे धाव घेऊन सर्वात पहिली बातमी आणि फोटो मिळविण्यासाठी तत्पर असावे लागते. चांगला फोटो मिळण्यासाठी कुणी घरी येऊन सांगत नाही, आपल्यालाच तो शोधावा लागतो. त्यासाठी टीव्ही लावून बातम्या पाहाव्यात तर कालची आग विझून गेली तरी दुसर्या दिवशी ती पेटलेली दाखवतात. काल रात्री मुसळधार पावसाने तुडुंब रस्ता भरलेला असतो. वाहतुकीची कोंडी होते. सकाळी उजाडेपर्यंत पाणी ओसरलेले असते. वाहतूक पूर्ववत सुरळीत चालू होते, तरीही दिवसभर झमाझम बारीश की तस्वीरे दाखवली जातात. त्यामुळे अजूनही बाहेर पाऊस चालू असल्याची अफवा पसरते आणि भीतीने लोक कामधंदा सोडून घरात बसून राहतात.
त्यापेक्षा मग रेडिओवरील बातम्यांवर विसंबून राहावे लागते. एक दिवस सकाळी सात वाजता रेडिओवर संगीतकार सी. रामचंद्र यांचे अकस्मात निधन झाल्याचे सांगण्यात आले. बातमी अतिशय महत्वाची होती. पण त्यात त्यांच्या घरचा पत्ता सांगितला नाही. मी कॅमेरा घेऊन बाहेर पडलो. भेटेल त्याच्याकडे चौकशी केली. कुणी काही माहीत नसताना काहीही पत्ता ठोकून द्यायचे. पण अनेकांच्या बोलण्यात दादर, शिवाजी पार्क, माहीम परिसराचा उल्लेख असायचा. पत्ता मिळत नव्हता म्हणून मी थेट दादर स्मशानभूमी गाठली. कारण आसपासचा माणूस गेला तर शेवटी इथेच येईल म्हणून तेथील कर्मचार्यांकडे चौकशी केली.
ते म्हणाले आम्हीही सी. रामचंद्र गेल्याचे ऐकून आहोत पण अद्याप कुणी बुकिंग करायला आले नाही.
कमाल आहे! काय म्हणतोय हा माणूस! बुकिंग करायला हा काय लग्नाचा हॉल आहे काय, मी आश्चर्याने विचारले, तर म्हणतो, अहो, माणूस गेल्यावर इथं बॉडी घेऊन येण्याअगोदर लोक बुकिंग करतात. पैसे भरावे लागतात. किती माणसं येणार हेही विचारावं लागतं. कारण गेलेला माणूस मोठा असेल तर गर्दी होते. इथे श्रद्धांजलीच्या सभा होतात. खुर्च्यांची ऑर्डर द्यावी लागते. व्हीआयपींच्या मोटार गाड्यांचे पार्विंâग करण्यासाठी रस्ता मोकळा करावा लागतो. त्यासाठी पोलिसांना आगाऊ सूचना द्यावी लागते.
इथे खूप वाट पाहिली, पण बॉडी आली नाही. मी स्कूटरवरून दादर, माटुंगा, माहीम परिसरातील गल्लीबोळात गोल गोल फिरत राहिलो. अंत्ययात्रा गेली असेल तर रस्त्यावर फूल, तांदूळ पडलेले असतात. पण तेही दिसले नाहीत. म्हणजे बॉडी अजून घरी किंवा इस्पितळातच असावी असा तर्क केला.
सिनेसंगीत क्षेत्रातील लोकांना कधी कोणता पोषाख घालावा त्याचे भान असते. दु:खाच्या प्रसंगी ते नेहमी हमखास पांढरे शुभ्र कपडे घालून येतात. पण असेही कुणी येताना रस्त्यावर दिसत नव्हते. काही थोडेबहुत जाताना पाहिले म्हणून त्यांच्यामागे-पुढे जाऊन आलो. चेहर्यावरील भाव पाहिले. कुणाच्याही चेहर्यावर दु:खाचे सावट नव्हते. सर्व हास्यविनोद करत निघालेले, ते बहुधा मॉर्निंग वॉक करून आले असावेत किंवा क्रिकेट खेळायला चालले असावेत असे वाटले. पण अनेकदा अंदाज चुकतो. माझ्या ओळखीत खानोलकर नावाचा माणूस आहे. तो कुणाच्याही अंत्ययात्रेत अग्रभागी सुटाबुटात टाय लावून येतो. गोकुळाष्टमीला दहीहंडीच्या दिवशी आणि रंगपंचमीलाही तो सुटाबुटात मिरवतो. त्यामुळे कोण कशासाठी चालला आहे त्याचा अंदाज बांधणे कठीण होते.
एक व्यापारी नुकताच दुकानाचे शटर वर करून दुकान उघडत होता. सकाळीच धंद्याच्या वेळी असं विचारणं बरं दिसत नाही म्हणून मी दबकतच विचारले, भाईजान यहाँसे किसी का मयत जाते हुए आपने देखा क्या?
नाही म्हणाला.
तुम्ही कोणाच्या बाबतीत विचारता? तो संगीतकार सी. रामचंद्र सांगितल्यावर त्याने समोर हात करून शिवाजी पार्कवरील स्काऊट हॉलसमोरील इमारत दाखवली. मी त्या दिशेने गेलो. रस्त्यावर फुलाने सजवलेला ट्रक होता. ट्रकवर सी. रामचंद्र यांचा पार्थिव देह ठेवलेला होता. आजूबाजूला सिनेसंगीत क्षेत्रातील नामवंत मंडळी होती. नामदार सुशीलकुमार शिंदे, पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर, संगीतकार सुधीर फडके, स्नेहल भाटकर, विश्वनाथ मोरे, अलबेला मधील भगवान अशी बरीच माणसं जमलेली. मी अगदी वेळेवर पोहोचलो होतो. अंत्ययात्रेला सुरुवात झाली, तशा इमारतीखाली जमलेल्या महिला ओक्साबोक्सी रडू लागल्या. त्यातीलच एका रडून रडून थांबलेल्या महिलेकडे चौकशी केली. तिच्याकडून लांबूनच इतर महिलांच्या नात्यासंबंधी माहिती घेतली.
दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्ययात्रा येईपर्यंत मी अनेक प्रासंगिक फोटो टिपले. वाटेत नाईक नावाचा फोटोग्राफर भेटला. तो लॅमिग्टन रोडवर राहतो. त्याच्याशी नव्याने ओळख झाली. त्याने स्मशानातील सार्वजनिक फोन बूथवरून घरी फोन केला आणि अमुक कामात गुंतलो असून घरी येण्यास विलंब होईल, तुम्ही जेवून घ्या, म्हणाला. समोरून कुणीतरी त्याच्यावर भडकलेले दिसले. फोन ठेवला आणि त्याचा चेहरा साफ पडला. त्याने डोक्यावर हात मारून घेतला आणि कॅमेरा बंद करून बॅगेत ठेवला. मला बाजूला घेऊन म्हणाला, अहो, झक मारली आणि इथे आलो.
काय झालं? – मी
काय सांगू, आई भयंकर चिडली. म्हणाली बायको गरोदर असताना नवर्याने स्मशानात जायचं नसतं. तू इतका मोठा गधडा झालास, आता बाप होशील, पण अक्कल नाही आली. भडेकर, आता काय होईल? काय होते हो मी स्मशानात आलो तर? हे खरं असतं का हो की बायको गरोदर असताना नवर्याने स्मशानात जायचं नसतं.
मी म्हटले, मी सुद्धा हे आत्ताच ऐकतोय बुवा, पण माझा काही त्यावर विश्वास नाही. मी तुला काय सल्ला देणार? माझं तर अजून लग्न झालेले नाही. त्यामुळे बायको गरोदर राहण्याचा प्रश्नच नाही. पण समजू या की माझं लग्न झालेय. बायको गरोदर आहे म्हणून नऊ महिने मी तिच्या पुढ्यात बसून राहायचं? नोकरी नको का करायला, आपला जॉब हा असा वेळी अवेळी कुठेही कधीही जावे लागते.
माझ्या घरचेही असेच अंधश्रद्धाळू. नव्याने या क्षेत्रात आलो तेव्हा अशा प्रसंगाचे फोटो काढले की पायावर पाणी घातल्याशिवाय घरात येऊ देत नव्हते. सर्व कपडे काढून धुवायला टाकल्यानंतर डोक्यावर पाणी टाकून आंघोळ करत नाही, तोपर्यंत आई जेवायला देत नसे. मग कानाला खडा लावला. कोणाचे फोटो काढले ते घरी बोलायचे नाही.
त्यानंतर अनेकदा थोरामोठ्यांच्या अंत्ययात्रेचे फोटो घेण्यासाठी स्मशानात कबरस्थानात जावे लागले. दंगली, मारामार्या, खून, गँगवॉर आणि भीषण अपघाताचे फोटो घेण्याचे प्रसंग आले. पण घरी आल्यावर त्याची वाच्यता केली नाही. नाहीतर दिवसातून चार वेळा कपडे धुवा, डोक्यावरून आंघोळ करा यातच वेळ गेला असता.
सी. रामचंद्र यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यापूर्वी त्यांचा मुलगा यशवंत याने सर्व धर्मसंस्कार केले. सुधीर फडके, स्नेहल भाटकर यांनी भक्तीगीत, अभंग गाऊन श्रद्धांजली अर्पण केली. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. शंकर, शाहीर साबळे, मास्टर भगवान, गजानन जहागीरदार यांची भाषणं झाली. या प्रसंगाचे आठ ते दहा फोटो प्रसिद्ध झाले.
सुमारे तीन चार महिन्यानंतर ऑफिसमध्ये कोर्टाचे एक समन्स आले. मी काढलेल्या अंत्ययात्रेच्या फोटोमध्ये पुणे येथील कोर्टाने मला साक्ष देण्यासाठी फोटोच्या निगेटिव्ह घेऊन बोलावले. मला आश्चर्य वाटले. मी इतक्या भानगडीचे अनेक फोटो काढले, पण कुणाच्या अंत्ययात्रेचे फोटो काढल्यामुळे कोर्टात उभे राहावे लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.
त्याचे असे झाले की सी. रामचंद्र यांना दोन बायका होत्या. एक मुंबईत शिवाजी पार्क येथे राहात होती, तर दुसरी पुण्यात राहायची. ती एका हॉटेलमध्ये उच्च पदावर नोकरी करत होती. एकीला अपत्य नव्हते तर दुसरीला मुलगा होता. मागे बरीच संपत्ती ठेवून ते गेले आणि वारसा हक्कावरून खटके उडू लागले. अखेर प्रकरण कोर्टात गेले आणि माझ्या मागे संकट लागले.
पुण्याच्या बायकोने मला साक्षीदार म्हणून बोलावले. माझ्या साक्षीमुळे कुणाचे भले होत असेल तर प्रामाणिकपणे सहकार्य करण्यास हरकत नाही अशा विचाराने मी फोटोच्या सर्व निगेटिव्ह शोधून काढल्या. ज्या अंकात ते फोटो छापले होते तो अंक
ऑफिसमध्ये मिळाला नाही म्हणून माझ्या जपून ठेवलेल्या रेकॉर्डमधून घेतला. कोर्टाच्या तारखेच्या आदल्या रात्री मी पुण्यातील एका लॉजवर उतरलो.
दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता कोर्टात हजर झालो. गर्दी असल्यामुळे शिपायाने बाहेर उभे राहण्यास सांगितले. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत बाहेरच्या कडक उन्हात फेर्या मारून पुरा वैतागलो. कुणीही बसायला जागा देत नव्हते. पुण्याची बायको कोर्टात आली नाही, पण तिने एका कायदेशीर सल्लागाराला कोर्टात पाठवले होते. माझी त्याच्याशी गाठ पडली. मी आल्याचे पाहून फार आनंद झाल्याचे म्हणाला. त्याने बाजूच्या हॉटेलमध्ये नेऊन अमुक घेणार का तमुक घेणार का असे विचारून कटिंग चहा पाजला. चहा घेताना माझे तोंड भरून कौतुक केले. मुंबईची माणसं टाइम टू टाइम काम करतात. ते पुण्याच्या लोकांना अजून जमत नाहीये. वगैरे बोलत पुन्हा उन्हात आणले.
घन:श्याम शांताराम भडेकर हाजीर होऽऽऽ…!
पट्टेवाला दोन वेळा ओरडला.
कोर्टात उभे राहाण्याची माझी पहिलीच वेळ. लहान कोर्ट, अपुरी जागा. पानतंबाखू खाऊन जजसाहेबांचे तोंड लालचुटूक झाले होते.
गीता हातात घ्या आणि म्हणा गीतेशपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. मी शपथ घेतली.
ते फोटो तुम्हीच काढलेत का?
होय मीच काढले.
फोटो काढायला तुम्हाला कुणी बोलावले होते?
कुणीही नाही. रेडिओवर बातमी ऐकली ती महत्वाची वाटली म्हणून मी स्वत:हून गेलो होतो.
त्याच्या मुलाला तुम्ही ओळखत होतात का?
नाही.
मग अंत्यविधी करताना तुम्ही त्याचा फोटो व नाव कसे छापले?
मी तेथील पुरोहिताला विचारले.
अशी बरीच प्रश्नोत्तरे झाल्यावर न्यायमूर्ती म्हणाले
तो अंक व सर्व निगेटिव्ह कोर्टाच्या ताब्यात द्या.
मी नाही म्हटले. देणार नाही. त्याच्यावर माझा हक्क आहे. मी ते देण्यासाठी आणलेले नसून फक्त दाखवण्यासाठी आणले आहेत. शहानिशा करायची असेल तर इथे करा आणि निगेटिव्ह पाहिजे असेल तर पूर्ण रोल तुम्हाला मिळणार नाही. जे फोटो छापले आहेत त्याच्या निगेटिव्ह कापून देतो. न्यायमूर्ती संतापले.
सर्व रोल द्यावा लागेल, कोर्टाची ऑर्डर आहे. आता काय करावं? माझ्या बाजूने मी इथे एकटाच. कुणी वकील सोबत असता तर कायदेशीर सल्लामसलत करता आली असती.
मुकाटपणे मी सांभाळून ठेवलेल्या निगेटिव्ह आणि अंक कोर्टाच्या स्वाधीन केल्या. कोर्ट संपले. मी कोर्टाबाहेर पडलो. वाटेत तो कटिंग चहा पाजणारा भेटला, म्हटले कोर्टाने माझ्या सर्व निगेटिव्ह घेतल्या. तुम्ही जरा लक्ष ठेवा. तुम्ही पुण्याचेच आहात तर खटला संपल्यानंतर सर्व निगेटिव्ह पुन्हा मिळतील अशी व्यवस्था करा. तुम्हाला जमत नसेल तर खटला संपल्यानंतर एक पत्र पाठवा मी पुण्याला येऊन कोर्टातून निगेटिव्ह घेऊन जाईन.
तो हो हो म्हणाला, पण पुन्हा कटिंग चहाची ऑफर केली नाही. काम सरो नी वैद्य मरो!
कालांतराने खटल्याचा निकाल लागला. माझ्या साक्षीमुळे पुण्याच्या बायकोला गडगंज संपत्ती मिळाली. पण त्यांनी दोन शब्दाचे पत्र पाठवले नाही.
सी. रामचंद्राचे एक प्रसिद्ध गाणे आहे. `भोली सुरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन छोटे.